Total Pageviews

Friday, December 23, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा ! (भाग २ )


मनसेच्या परीक्षांचा 'दै. सुकाळ'चा वृत्तांत वाचल्यापासून प्रश्नपत्रिका आणि निकाल याबद्दल मला विलक्षण उत्सुकता लागून राहिली होती. भेळवाल्याकडे ५ डिसेम्बर नंतरचे कागद न मिळाल्यामुळे मी निराश झालो होतो हे तुम्हाला सांगितलेच आहे. पुढचे काही दिवस तसेच गेले. आठवडाभराने पुन्हा भेळवाल्याकडे चक्कर मारली पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र मला राहवेना.  मी अगदीच मनावर घेतली ही गोष्ट आणि एके दिवशी संध्याकाळी थेट 'दै. सुकाळ'चे कार्यालय गाठले. कार्यालय छोटेच होते. तिथे जाऊन थेट संपादक श्री. पिंपळकर यांनाच गाठले. आपल्या वर्तमानपत्राचा वाचक अस्तित्वात आहे आणि तो उत्सुकतेने पुढच्या बातमीसाठी आपल्याकडे आला आहे हे पाहून त्यांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता. त्यांनी मला हाताला धरून बाहेर बागेत नेले. तिथे त्यांच्या एका शिपायाने शेकोटीची तयारी करून ठेवली होती आणि काटक्या ,लाकडे कमी असल्यामुळे 'दै' सुकाळ'चे काही अंक 'अग्नये स्वाहा' करण्यासाठी तयार ठेवले होते (निकालाचा वृत्तांत असणारा अंक इतका स्फोटक आहे की शेकोटीला रॉकेलची गरज नाही - इति श्री. पिंपळकर). श्री. पिंपळकरांनी त्यातले काही पेपर घाईघाईने उपसले आणि 'दै.सुकाळ' चा  २० तारखेचा अंक माझ्या हातात ठेवला.

दै. सुकाळ
विशेष प्रतिनिधीकडून : ता. २० डिसेम्बर

४ डिसेम्बर रोजी पार पडलेल्या मनसेच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेबद्दल बरीच गुप्तता पाळली गेली होती आणि उमेदवारांनाही त्याबद्दल कुठेही अवाक्षर न उच्चारण्याची तंबी देण्यात आली होती हे आम्ही आपणास सांगितले आहेच. परंतु आमच्या वार्ताहराने शोधपत्रकारिता करून अखेर प्रश्नपत्रिका आणि एका परीक्षार्थीने लिहिलेली उत्तरपत्रिका शिताफीने हस्तगत केली. त्यापैकी काही वेचक प्रश्न आणि चित्तवेधक उत्तरे इथे देत आहोत.

काही प्रश्न महापालिकेच्या कामकाजाबाबत विचारण्यात आले होते
प्र. 'तहकूब'  ही संकल्पना  उदाहरणासह स्पष्ट करा
उ. आपला वकूब ओळखून केलेला तह म्हणजे 'तहकूब' उदा. उल्हासनगर मध्ये मनसेने शिवसेनेशी केलेली दोस्ती.

प्र. गणसंख्या म्हणजे काय आणि त्याच्या अभावी कामकाजावर काय परिणाम होतो ?
उ. गेल्या आठवड्यात आपल्या वार्डातल्या वाहतूक नवनिर्माण सेनेच्या फलक अनावरण प्रसंगी ठेवलेल्या भाषणाला पुरेसा प्रेक्षकगण हजर नसल्यामुळे तो कार्यक्रम १५ मिनिटात आवरता घेतला होता

राज ठाकरेंना चित्रपटात विशेष इंटरेस्ट असल्यामुळे त्यासंबंधीही  काही प्रश्न होते  

प्र. 'गांधी' चित्रपटाची २ वैशिष्ट्ये लिहा
उ.  (१)  हा चित्रपट महात्मा गांधींवर आहे
(२) 'चार दिवस सासूचे'मध्ये दाखवलेल्या 'सासू ते आजेसासू' या प्रवासाइतकाच 'तरुण कस्तुरबा ते वृद्ध कस्तुरबा' हा प्रवास त्या नटीने समर्थपणे उभा केला आहे.
(वरील उत्तरामुळे प्रस्तुत परीक्षार्थी पुरुष नसून स्त्री असा प्रस्तुत प्रतिनिधीचा देखील गैरसमज झाला होता. परंतु आधी चौकशीअंती हे कळले की तो पुरुषच आहे, त्याच्या घरी आई, बहीण व पत्नी अशा ३ स्त्रिया आहेत, LCD TV आहे आणि  अचानकपणे जाणीपूर्वक घराबाहेर पडून त्याने पक्षकार्य सुरु केले आहे)

प्र. लोकांच्या अडीअडचणीला धावून/लोंबून जाणाऱ्या spiderman चे खरे नाव काय असते ?
उ. इथे नावाचा घोळ होऊन ‘पीटर पार्कर' ऐवजी 'शिरीष पारकर' असे लिहिले होते.    

काही प्रश्न ‘मनसे’संबंधी देखील होते:    

प्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी व का झाली ?
उ. राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली कारण विठ्ठलाला बडव्यांनी घेरले होते

प्र.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनेवेळी उद्दिष्टे काय होती ?
उ. शेतकऱ्याला जीन्स T shirt मध्ये tractor वर बसवणे, यू.पी. / बिहारींना विरोध करणे, रेल्वे मध्ये स्त्रियांच्या डब्यात छेड छाड रोखण्यासाठी मनसैनिकांचे  पथक ठेवणे.

काही प्रश्न सांस्कृतिकदेखील होते. 

प्र. तुमचा आवडता सण कोणता आणि त्यातून तुम्ही महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन कसे घडवता ते थोडक्यात लिहा.
उ. दसरा हा माझा आवडता सण आहे . त्या दिवशी रावण दहनाच्या वेळेस महाराष्ट्र-शत्रूंचे (आणि राज साहेबांच्या शत्रूंचे ) फोटो रावणाचे एकेक तोंड म्हणून लावतो. उदा. अबू आझमी, कृपाशंकर, अमिताभ बच्चन, संजय निरूपम इ. (पुढच्या वर्षी अजितदादाचा पण लावणारे.... आमच्या साहेबांचे बापजादे काढतो काय ?)

खरेतर असे बरेच प्रश्न विचारण्यात आले होते परंतु जागेअभावी नमुन्यादाखल केवळ निवडक प्रश्न या उत्तरेच आम्ही इथे देऊ शकत आहोत. अशा रीतीने आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही प्रश्नपत्रिका सदर केलीच आहे पण त्याच बरोबर परीक्षेच्या निकालाची बित्तमबातमी देखील मिळवली आहे.  

४ डिसेम्बरला  पार पडलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षेच्या निकालांनंतर उमेदवारांच्या मुलाखती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचा (आणि त्याबरोबरच तुम्हा वाचकांचा) जीव टांगणीला लागल्याचे जाणवत आहे. बरेच दिवस झाले तरी अजून निकाल जाहीर होत नसल्याचे पाहून हळूहळू कुजबुजीला सुरुवात झाली आहे, आणि म्हणूनच ‘दै.सुकाळ’ने नक्की पडद्यामागे काय चालू आहे ('वाचकांचे प्रबोधन हेच आमचे धन' या आमच्या तत्वाला जागून)  याचा सुगावा घेण्याचे ठरवले. अधिक खोलात जाऊन तपास केला असता बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या आहेत. परीक्षांचे निकाल केव्हाच तयार आहेत आणि निकालावरून असे वाटते आहे की राज ठाकरेंना या निवडणुकीत बहुतांश प्रभाग 'ऑप्शन' ला टाकावे लागतील. अनेक लोकांना पास होण्यातही अपयश आले आहे.  मुंबईमध्ये तर काही विद्यमान नगरसेवकांना काठावर देखील पास होता आलेले नाही. त्यामुळे आता या 'विद्यार्थ्यां'ना ATKT ची परवानगी द्यावी अशी मागणी दबक्या आवाजात केली जाऊ लागली आहे.  सर्वात धक्कादायक निकाल तर मनसेच्या मुंबईतल्या एका शक्तिशाली नेत्याचा लागला आहे. आपण पास होऊन पहिले येऊ अशा भ्रमात असणाऱ्या या नेत्याला तर चक्क नापास व्हावे लागले आहे.  याची कुणकुण प्रस्तुत प्रतिनिधीला लागताच त्याने या नेत्याला गाठले. सर्वप्रथम त्याने हे वृत्त सपशेल खोटे असल्याचे सांगितले. पण जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने त्याचा पेपर पुढ्यात ठेवला तेव्हा मात्र त्याचा पवित्रा अचानक बदलला आणि अत्यंत उद्विग्न अवस्थेत त्याने 'दै. सुकाळ' कडे आपले मन मोकळे केले. जे घडले ते असे :
परीक्षेच्या केवळ २ दिवस आधी बिहारी सामोसेवाल्यांच्या  विरोधातल्या आंदोलनात तोडफोड करताना या नेत्याच्या हात petromax ची बत्ती पडून भाजला .... त्यामुळे परीक्षेला कसे बसणार, असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्याने 'रायटर' ची विनंती केली आणि ती मिळालीसुद्धा. प्रत्यक्ष परीक्षेत उपयुक्त ठरेल अशा एका जाणकार रायटरची या नेत्याने स्वतःच setting लावून निवड केली ("पक्षाच्या आदेशावरूनच केलेल्या आंदोलनात मला दुखापत झाली. मग परीक्षेत उत्तरे लिहून काढण्यासोबत उत्तरे सुचवण्यासाठीही रायटरची 'थोडीशी' मदत घेतली तर बिघडले कुठे" - इति  नेता) आणि प्रत्यक्ष परीक्षेत रायटरची मदत  (लेखणी आणि डोके दोन्ही प्रकारे)  घेऊन पेपर संपवला आणि निश्चिंत मनाने घरी गेला. पण निकालाची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी आपली ओळख वापरून त्याने स्वत: लिहिलेला पेपर मिळवला, आणि बघतो तर काय , महाशय नापास झाले होते. अक्षरशः deposite जप्त व्हावे इतके कमी मार्क मिळाले होते. न येणारी उत्तरे सांगणे दूरच, पण नेतामहाशयांनी  सांगितलेली उत्तरेसुद्धा रायटरने चुकवली किंवा लिहिलीच नाहीत. प्रस्तुत प्रतिनिधीने बराच वेळ खोदून खोदून विचारूनही रायटर कोण याचा थांगपत्ता या नेत्याने लागू दिला नाही. परंतु अखेरीस मात्र त्यांच्या मनातली खदखद बाहेर आलीच. "माझेच चुकले. याला रायटर म्हणून घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. या राजूने तिकडे खुद्द अण्णांचा ब्लॉग लिहिताना घोळ घातला. जिथे अण्णांनी सांगितलेले जसेच्या तसे लिहिले जाते याची ग्यारंटी नाही, तिथे मी सांगितलेले लिहिले जाईलच याचा भरवसा कोणी कसा द्यावा ?? काहीतरी करायला पाहिजे " असे हा नेता मुठी वळत म्हणाला.

अशाप्रकारे निकालाचे घोळात घोळ असल्यामुळे खरा निकाल जाहीर होईलच याचा भरवसा नाही. परंतु  'दै. सुकाळ'च्या वाचकांपर्यंत सत्य अखेर पोहोचलेच आहे. तेव्हा यथावकाश निकाल काहीही जाहीर झाला तरीही खरा निकाल काय आहे ते आपल्या ध्यानात राहिलंच. 


सगळा मजकूर मी एका दमात वाचून काढला आणि 'दै. सुकाळ'च्या प्रबोधनाच्या ध्यासाने भारावून गेलो. श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आणि जीव धोक्यात घालून त्यांच्या प्रबोधन कार्यात वाट उचलणारे धाडसी वार्ताहर आपल्या पुण्यात आहेत हे आपले अहोभाग्यच. कृतज्ञतेने सद्गदित होऊन माझ्या डोळ्यात पाणी आले.  अखेर काही मिनिटांनी साक्षात श्री. पिंपळकरांनी पाठीवरून मायेने हात फिरवून मला सावरले आणि तेही सद्गदित होऊन आत निघून गेले . प्रबोधनाचा अतुल्य नमुना असणारे ते वार्तापत्र कायमचे घरात जपून ठेवावे म्हणून मी इकडे तिकडे ते वर्तमानपत्र शोधू लागलो आणि हाय रे कर्मा ! समोरची शेकोटी धडाडून पेटलेली दिसली. शिपायाने वाढती थंडी असह्य होऊन त्या अंकाचीच आहुती वाहून ती शेकोटी पेटवली होती. ज्या पुण्यात श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आहेत त्याच पुण्यात त्यांच्या शिपायाइतके कोरडे , निर्विकार पाषाणही आहेत हे पाहून मला अतीव दु:ख झाले.  मनसेच्या निकालाचे 'आतले'  वृत्त देणारा शेवटचा अंक आता इच्छा असूनही मी तुम्हाला दाखवू शकत नाही .....  क्षमस्व !




4 comments:

  1. हा हा...सुंदर लेख प्रसाद...तु जे काही details वापरले आहेत ना त्याला तोड नाही.

    ReplyDelete
  2. निकालाचा वृत्तांत असणारा अंक इतका स्फोटक आहे की शेकोटीला रॉकेलची गरज नाही - इति श्री. पिंपळकर (पु. ल. style जमला आहे )

    ReplyDelete
  3. @आशिष : तू असे म्हटल्यावर पु.लं.चे 'उरलं सुरलं' मधले एक वाक्य आठवले :
    "‘राकेल संपले आहे’ ह्या ज्वालाग्राही संगीत नाटकाचे लेखक रामभाऊ (कुलकर्णी की देशपांडे ते विसरलो)"
    (कंस पण पु.लं.चाच :D)

    ReplyDelete
  4. भाग २ ची वाट बघतच होतो... झकास!!
    जरा प्रबोधनकार (दुसरे) पिंपळकरांना तुझा हा लेख दै. सुकाळ मध्ये छापायची विनंती करून बघ... जर ते ऐकत नसतील तर आपण शिपायाला सांगू... एका लाकडाच्या मोळीवर तो आपले काम नक्कीच करेल :D

    ReplyDelete