Total Pageviews

Sunday, June 28, 2026

दहा दुर्ग दहा दिवस



काही उत्साही तरुणांचं एक मंडळ होतं. त्याचं नाव ‘शिवराय मंडळ’. त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळी, साहसी कामगिरी कल्पना आली. त्यांनी तळेगावला जाऊन गो. नी. दांडेकरांची भेट घेतली. गोनीदा खुश झाले आणि शिवराय मंडळाच्या एका महत्वाकांक्षी मोहिमेचे नेतृत्व करण्यास होकार दिला. ही मोहीम होती अवघ्या दहा दिवसांमध्ये दहा किल्ले सर करण्याची. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी १९६४  दरम्यान पार पडलेल्या या अनोख्या मोहिमेच्या आठवणींमधून साकार झालेले छोटेखानी पुस्तक म्हणजे ‘दहा दुर्ग दहा दिवस’


मोहिमेची कुणकुण लागल्यावर पन्नासेक जण उत्साहाने तयार झाले. परंतु आपल्या चमू मधला प्रत्येक भिडू गोनीदांनी स्वत: निवडला आणि मोहिमेसाठी  २३ जणांची निश्चिती झाली. विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये सामील असणारी एकमेव मुलगी कुंदा चाफेकर केवळ पंधरा वर्षांची होती. ही मोहीम पार पडल्यावर या मोहिमेतील एक सदस्य वसंत पेंढारकर यांनी ‘स्नेहसुगंध’ नावाचं हस्तलिखित काढलं होतं. या मोहिमेची तरुण भारत, नवाकाळ, मराठा, लोकसत्ता या वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. त्यांची कात्रणेदेखील ‘स्नेहसुगंध’ या अंकामध्ये छापली गेली. ‘स्नेहसुगंध’ काही लेख, गोनीदांनी या मोहिमेवर अन्यत्र लिहिलेला दीर्घ लेख, दहा दुर्गांची छायाचित्रासह थोडक्यात माहिती, बाबासाहेब पुरंदरे यांचे एकेक पानी दोन लेख यांनी मिळून ‘दहा दुर्ग दहा दिवस’ तयार झालं आहे.


मोहिमेचा क्रम राजमाची, विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा आणि शेवटी दुर्गदुर्गेश्वर रायगड असा होता. सुरुवात लोणावळा स्थानकापासून झाली. तिथे मोहिमेला निरोप द्यायला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. त्यानंतर दहा दिवस मजल दरमजल करत अंगावरचे ओझं वागवत सह्याद्रीच्या दुर्गम रानवाटा मधून माग काढत एकेक गड या मंडळाच्या सदस्याने सर केला. 


२० फेब्रुवारी रोजी पाच किल्ले संपवून सर्व भटके पुणे मुक्कामी नूमवि प्रशालेमध्ये पोहोचले. तिथे त्यांची खबरबात घ्यायला बाबासाहेब पुरंदरे हजर झाले. विशेष म्हणजे रात्री आठ वाजता आणि पुणे  विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि काही प्रतिष्ठित मंडळी देखील तिथे उपस्थित राहिली. पोतदार यांनी तरुणांना प्रोत्साहनपर बोलणे केले आणि चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आणखीन हुरूप आलेल्या मंडळाने दुसऱ्या दिवशी सिंहगडाकडे कूच केले. त्यावेळी सिंहगडावर इतिहासकालीन नाणी आणि तोफ गोळ्यांचे अवशेष गोनीदांना मिळाले. इतक्या स्वराज्याच्या अस्तानंतर इतक्या वर्षांनी ही सिंहगडावर इतक्या सहजपणे प्राचीन दस्तावेज मिळणे ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती. 



गोनीदांनाचे अत्यंत काटेकोर नियोजन आणि शिस्तीमुळे कोणताही अनवस्था प्रसंग न उद्भवता मोहीम अगदी सुखरूप पणे पार पडली. गोनीदा म्हणजे उभा सह्याद्रीच नव्हे तर आडवा महाराष्ट्रदेखील पायाखाली असणारा भटक्यायचं. या मोहिमेपूर्वी यातील प्रत्येक गडावर कैक वेळा कोणी त्यांची चक्कर झालेली असल्यामुळे त्यांना चढण्याउतरण्यासाठी एकूण लागणारा वेळ, त्यासाठी पडणारे कष्ट, गडांवर पोहोचण्यासाठी असलेल्या सुलभ वाटा या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्यादहा दिवसांची ही साहसी मोहिम फत्ते झाली. ५० वर्षांपूर्वी खाण्यापिण्याच्या, दळणवळणाच्या सोयी मर्यादित असताना २३ जणांनी पार पाडलेली ही कामगिरी भन्नाटच म्हणायला हवी. 


नुकतीच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तब्येत धडधाकट नसतानाही या सर्व शिलेदारांचे कौतुक करायला दहाव्या दिवशी रायगडावर बाबासाहेब पुरंदरे जातीने हजर झाले! बाबासाहेबांबरोबर रायगड फिरताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहण्याचं भाग्य सर्वांना लाभलं. 


या पुस्तकामधून घडणारं डोंगरदऱ्या-देवळारहाळामध्ये भेटलेल्या साध्याभोळ्या, प्रेमळ, नि:स्वार्थी माणसांचं दर्शन अतिशय लोभस आहे. दोन वेगवेगळ्या गडांवर भेटलेल्या इमानी दोन कुत्र्यांचं शब्दचित्र चटका लावून जातं.. गोनीदांच्या रसाळवेल्हाळ शैलीमधला मोहिमवृत्तांत म्हणजे पुस्तकातील सर्वात हवाहवासा भाग आहे. 


आपल्या चमूला बाबासाहेबांच्या ताब्यात देऊन गोनीदा एकटेच रायगडाच्या सांदीसपाटीत भटकू लागले आणि त्यामध्ये त्यांना एक अपूर्व गोष्ट गवसली... एक वृंदावन! आपल्या पुढ्यात उभ्या असलेल्या शक्यतेमुळे गोनीदा थरारून उठले. आपल्याला जे सापडले आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांकडे धाव घेतली. 


पुढे जे घडले त्याबद्दल गोनीदा लिहितात “वृंदावनाजवळ पोंचतांक्षणीं त्यांचे तेजस्वी डोळे क्षणभर विस्मयचकित होतात. मग इतिहासाने पांघुलेला पोलादी पडदा उघडून ते डोळे पल्याड शिरतात. भरून येऊन बाबासाहेब मजजवळ येतात. म्हणतात, “आप्पा हा तुमच्या दुर्गदर्शन यात्रेचा कळस! हें सर्वोत्कृष्ट यश. महाराजांच्या एक पत्नी काशीबाईसाहेब राज्याभिषेकापूर्वी दोन महिने वारल्या. महाराजांचं त्यांच्यावर उत्कट प्रेम. बहुदा हें वृंदावन त्यांचं!” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांचे हे शब्द. याहून अधिक आगळं मिळवण्याजोगं कांहीं राहिलं नाही. ही यात्रावेली अशी फळींफुलीं वोळली आहे!”



या मोहिमेची सांगता एका अविस्मरणीय गोष्टीने झाली. त्याबद्दल अविनाश पाटील लिहितात, 

“दुपार झाली. जेवून विश्रांती. अन् त्यानंतर अद्भुत घडणार होतं...! जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथल्या चौथऱ्याजवळ उभं राहून तो त्याकाळी झालेला सोहोळा बाबासाहेबांनी साकार उभा केला. आपल्या वाणीने! किती वेळ हे चाललं? तब्बल साडेतीन-चार तास! आमच्यातल्या प्रत्येकाचे जीवनातले हे चार तास म्हणजे एक सोनेरी स्वप्न आहे. अविस्मरणीय. आजही कधी आठवलं की, अंगावर काटा येतो. हळुवार!”


दुर्गमोहिम गोनीदांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोहिमेची सांगता बाबासाहेबांच्या मुखातून येणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या समालोचनाने... आयुष्यात याहून मोठं भाग्य कुठलं असू शकतं!


संपादक : विजय देव

प्रकाशक : गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ 

प्रथम आवृत्ती : १४ फेब्रुवारी २००९ 

मूल्य : ७५ रुपये 


Thursday, June 18, 2026

ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे

 


एकाहून अधिक कामांमध्ये एकाच वेळी लक्ष द्यायचं म्हटलं तरी सामान्य व्यक्तीची तारांबळ उडते. म्हणूनच एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर आपली अमीट मोहोर उमटवणाऱ्या व्यक्ती समाजात दिसतात, तेव्हा अचंबित व्हायला होतं. त्यातूनही असं कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती स्त्री असेल तर तिने किती आव्हांनाना तोंड दिलं याची कल्पनाच केलेली बरी. कुसुमताई साठे या अशाच कर्तृत्ववान विदुषी. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी ठसा उमटवला असला तरी 'राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या' ही त्यांची मुख्य ओळख. 'ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे' या चरित्राच्या माध्यमातून कुसुमताईंच्या कार्याच्या अनेक पैलूंची ओळख देण्याचे कार्य डॉ. छाया नाईक यांनी केले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाने प्रभावित झालेल्या वंदनीय मावशी केळकर यांनी स्त्रियांसाठीही तशाच संघटनेची आवश्यकता असल्याचे डॉ. हेडगेवारांना पटवून देत १९३० च्या दशकामध्ये राष्ट्र सेवा समितीची स्थापना केली. एकीकडे स्वसंरक्षणाच्या दृष्टीने शारीरिक कौशल्य अंगी बाणवणे आणि दुसरीकडे बौद्धिक मशागत करणे ही संघा प्रमाणेच समितीचीदेखील कार्यपद्धती. यापैकी बौद्धिक कार्यक्षेत्राचे दायित्व कुसुमताईंनी तब्बल चाळीस वर्षं निभावले. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांच्या छत्रछायेमध्ये कुसुमतांईंच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत गेले आणि पुढे त्यांच्या तेजाने राष्ट्र सेविका समिती अधिक उजळून निघाली. 


नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात विज्ञान, हिंदी, मराठी या विषयांचे अध्यापन, समितीचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुखपद, समितीच्या केरळ प्रांताचे पालकत्व, समितीच्या 'राष्ट्रसेविका' या मुखपत्राचे संपादकपद, चार पुस्तकांचे लेखन, अनेक व्याख्यानं, रामकथा आणि भागवतकथाकथन, कथा,कविता,समीक्षा,स्फुट अशा साहित्याच्या विविध प्रांतात संचार हे सगळं कुसुमताईंनी आपल्या आयुष्यात पेललं. याशिवाय समितीसाठी असंख्य पद्यांची रचनाही केली. संघ आणि समितीमध्ये कवी अथवा कवयित्रीचं नाव व्हावं म्हणून नव्हे तर राष्ट्रभावना चेतवण्यासाठी पद्यं रचली जातात. म्हणूनच त्या काव्यामागचे रचनाकार कायमच पडद्यामागे राहतात. त्यामुळे कुसुमताईंनी रचलेल्या पद्यांची/रचनांची निश्चित संख्या आजही ज्ञात नाही. पण त्यापैकी किमान काही ज्ञात रचना डॉ. छाया नाईक यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्याने एक महत्वाची नोंद झाली आहे. 


समितीसाठी कुसुमताईंची सर्वात मोठी देणगी म्हणजे समितीची संस्कृत प्रार्थना! जोवर समिती अस्तित्वात आहे, तोवर कुसुमताईंचे शब्द समितीच्या शाखास्थानावर म्हटले जाणार आहेत. प्रार्थनारूपाने कुसुमताई अमर झाल्या आहेत. याशिवाय समितीमध्ये जे प्रात:स्मरण म्हटले जाते त्याची रचनाही त्यांचीच आहे हे लक्षात घेतली की, समितीच्या कार्यामध्ये त्यांचे काय स्थान आहे याची कल्पना येईल. 


संघ आणि समितीच्या कार्यकर्त्यांचे चरित्र लिहिताना येणारी महत्वाची अडचण म्हणजे चरित्रनायक अथवा चरित्रनायिकेच्या सामाजिक आयुष्याचे तपशील गोळा करणे आणि त्यांची संगतवार मांडणी करणे. कारण हे कार्यकर्ते दुधात साखर विरघळावी तसे संघटनेशी एकरूप होऊन गेलेले असतात. त्यांनी स्वतः 'आपण हे केलं' असं ना कुठे लिहून ठेवलेलं असतं, ना कुठे त्यांचं नाव दिलं गेलेलं असतं, ना त्यांच्याबद्दल वर्तमानपात्रात काही छापून आलेलं असतं. त्यामुळे बहुतांश वेळा चरित्रलेखनाची भिस्त त्या कार्यकर्त्यांचा सहवास लाभलेल्या (आणि अनेकदा त्या कार्यकर्त्यापेक्षा वयाने लहान असलेल्या) अन्य कार्यकर्त्यांच्या आठवणींवर असते आणि त्या घटना, अनुभव हे कालानुक्रमामध्ये निश्चितपणे कुठे बसवता येतील याचा अंदाज चरित्रकाराला येणं कठीण होऊन बसतं. प्रस्तुत चरित्रामध्येही तशी अडचण आलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय, पुस्तकाच्या पूर्वार्धात कालानुक्रमानुसार येणाऱ्या घटनांमध्ये प्रामख्याने वैयक्तिक आयुष्याचे तपशील अधिक आले आहेत. परंतु पुस्तकाच्या उत्तरार्धातील प्रकरणांमधून मात्र कुसुमताईंच्या बौद्धिक प्रमुख, संपादक, लेखिका अशा एकेका पैलूची स्वतंत्रपणे दखल घेतली आहे. 


पुस्तकांच्या शेवटी कुसुमताईंचा जीवनपट दिला आहे, त्यातून बुद्धिमत्तेचा आणि एकूण आवाका यावा. 


*शिक्षण* 

१९३५ : मॅट्रिक 

कर्वे विद्यापीठात संस्कृतमध्ये प्रथम, गृहितागमा ही बीएची समकक्ष पदवी. 

१९३८ : मराठी आणि संस्कृत विषयात विद्यापीठात सर्वप्रथम 

१९४२ : संस्कृतशास्त्री ही पदवी 

१९४३ : हिंदी कोविद परीक्षा उत्तीर्ण

१९५८ : बीटी पदवी

१९६० : मराठीमध्ये एम. ए.


*अध्यापन* 

१९३८ ते १९४९ : शाळेमध्ये शिक्षिका

१९६० - १९८१ : महाविद्यालयात प्राध्यापिका 


*राष्ट्रसेविका समितीचे कार्य*

१९३७ : नागपूरला महाल भागात राष्ट्रसेविका समितीची शाखा सुरू केली. 

१९५०-१९९१ : राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका

१९७८-१९९० : राष्ट्र सेविका समितीच्या केरळ प्रांत पालक


१९५३-१९८५ : सेविका आणि राष्ट्रसेविका या अंकांचं संपादन 

१९५३-१९९१ : सेविका प्रकाशनाच्या अध्यक्षा


*साहित्य*

१९७० : कथारूप स्वामी विवेकानंद 

१९८७ : कथाकामधेनू 

१९८८ : धर्मसंस्थापनेचे नर

१९९१ : दिग्विजयी रघुवंश

१९८५-१९९१ : महिला निकेतन अध्यक्षा


हे चरित्र वाचत असताना कुसुमताईंनी वेळेचं नियोजन कसं केलं असेल असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. बरं, सामाजिक कार्य करत असतानाच संसारी स्त्री या नात्याने आला-गेला, पै-पाहुणा, सणवार, अपत्यांची दुखणीखुपणी आणि अन्य सर्व सांसारिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्याच. शिवाय समितीच्या कामासाठी देशभर प्रवासही ओघाने आलाच. हे सगळं सांभाळणं म्हणजे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही.

 

१९९१ साली स्वर्गस्थ झालेल्या कुसुमताईंचं चरित्र खरंतर यापूर्वीच यायला हवं होतं. श्री. राम नाईक यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतही हीच भावना व्यक्त केली आहे. अर्थात २०२१ साली कुसुमताईंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे चरित्र साकार झाले हेही नसे थोडके. कुसुमताईंचा दीर्घ सहवास लाभलेल्या डॉ. छाया नाईक यांनी कुसुमताईंशी वेळोवेळी झालेल्या चर्चा, कुसुमताईंचं साहित्य, बौद्धिकं आणि व्याख्यानं, कार्यकर्त्यांनी आणि कुसुमताईंच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या आठवणी इत्यादी माहितीच्या आधारे परिश्रमपूर्वक चरित्र लिहून महत्वाचं दस्तावेजीकरण केलं आहे. या चरित्राच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये राष्ट्राभिमानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या एका कर्तृत्ववान स्त्रीची ओळख वाचकांना होण्यास निश्चित मदत होईल. 

पूर्वप्रसिद्धी : मुंबई तरुण भारत, ३ मे २०२६



ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे

लेखिका : डॉ. छाया नाईक 

प्रकाशन : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

पृष्ठसंख्या : २४० 

मूल्य : २७५ रू. 


(हे पुस्तक 'स्टोरीटेल'वर ऑडिओ स्वरूपातदेखील उपलब्ध असून सविता म्हसकर यांनी अतिशय उत्तम अभिवाचन केलं आहे)


संघर्ष निवारणातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका





हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे आहे. उपेक्षा, प्रखर विरोध आणि स्वीकार अशा टप्प्यांमधून जात ‘जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना’ या लौकिकास पोचलेल्या संघाबद्दल आजवर अनेकांनी लेखन केले आहे. साधारणपणे अशा लेखनाचा भर प्रामुख्याने संघाच्या धार्मिक दृष्टिकोनावर असतो. अशा परिस्थितीमध्ये 'संघर्षप्रवण क्षेत्रातील संघाचे कार्य' हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले ‘कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन - द आर. एस. एस. वे’ हे पुस्तक वेगळे ठरते. या पुस्तकामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब आणि ईशान्य भारत या तीन महत्वाच्या प्रांतांमधील अशांततेच्या अनुषंगाने संघाच्या कार्याचे विश्लेषण केले गेले आहे. 

जम्मू-काश्मीरचा संघर्ष केवळ राजकीय नसून, पाकिस्तान आणि कट्टरपंथी इस्लामी गटांमुळेही प्रेरित आहे, ही संघाची भूमिका स्पष्ट करून लेखक आपल्याला जम्मू-काश्मीरमध्ये संघर्षाच्या काळात पाय रोवून उभे राहिलेल्या संघ स्वयंसेवकांची माहितीही देतात. फाळणीच्या वेळी विस्थापितांना मदत करणे, १९४८च्या पाकिस्तानच्या हल्ल्याच्या वेळी प्रसंगी जीव धोक्यात घालून भारतीय सैन्याला मदत करणे, पुढे घटनेचे ३७० आणि ३५अ हे कलम हटवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे यामधून काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीबद्दलच्या संघाच्या भूमिकेचे सातत्य लेखक उलगडून दाखवतात आणि राजकीय अशांतता असूनही, संघाच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रदेश उर्वरित भारताशी जोडला गेल्याचे प्रतिपादन करतात. 

पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ भरात असताना, संघाने फुटीरतावादी मागण्यांना सातत्याने विरोध करत त्याच वेळी शीख-हिंदूंमधील दरी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. संघाला त्याची किंमतही मोजावी लागली. खलिस्तानी अतिरेक्यांनी 'मोगा' या गावी संघाच्या शाखेवर केलेल्या गोळीबारात वीसहून अधिक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परंतु अतिरेकाला अतिरेकाने उत्तर न देता दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी भरघोस उपस्थितीची शाखा लावून संघाने विधायक उत्तर दिले. संघ स्वयंसेवक आणि नेतृत्वाच्या कणखरपणाची साक्ष देणारी अशी अनेक उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. 

ईशान्य भारतातील - विशेषतः नागालँड, मिझोरम आणि मणिपूरसारख्या राज्यांमधील - अस्थिरतेची समस्या अधिक व्यापक आहे. विविध जनजातींमधील ताणलेले परस्परसंबंध, बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे होणारे लोकसंख्येच्या गुणोत्तरातले बदल, विदेशी अर्थसाहाय्याच्या बळावर स्थानिक जनजातींना मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित करून त्यांना आपली संस्कृती आणि भूमीपासून तोडण्यासाठी चर्चतर्फे केले जाणारे प्रयत्न यांमुळे ईशान्येतील समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या झाल्या असल्याचे प्रतिपादन लेखक करतात. अशा अस्थिर वातावरणात या जनजातींमध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न संघातर्फे सुरू केला गेला. अनेक कार्यकर्ते, प्रचारक यांनी चिकाटीने कार्य करत इथे रुजवलेल्या निःस्वार्थ सेवेच्या मॉडेलवर पुस्तकात विस्ताराने माहिती दिली आहे. 

ईशान्य भारतातील देशविघातक शक्तींच्या निशाण्यावर संघाचे कार्यकर्ते कार्यकर्ते कायमच असून त्यातून संघाच्या प्रचारकांच्या हत्याही झाल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही ईशान्येतील जनजाती समुदायांना आपल्या मूळ सांस्कृतिक ओळखीची जाणीव करून देणे आणि उर्वरित भारताशी असलेले त्यांचे ऐतिहासिक नाते समजावून सांगण्याचे कार्य संघाच्या प्रेरणेतून होत आहे. त्यांची या मातीशी असलेली नाळ घट्ट करण्याच्या संघाच्या प्रयत्नांची ओळख या उदाहरणांमधून वाचकाला होते. 

संघाची कार्यपद्धती हिंदुत्वाच्या मूळ तत्त्वज्ञानावर आधारित असून हे तत्वज्ञान धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आहे, तोच राष्ट्रवादाचा मूलाधार असल्याचे लेखक अधोरेखित करतात आणि त्यातूनच प्रेरित झालेले संघ कार्यकर्ते हिंदू बहुसंख्य नसलेल्या संघर्षप्रवण प्रांतामध्येही शांतता प्रस्थापित कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधतात. अभ्यासक रतन शारदा यांनी यशवंत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पीएचडी संशोधनामध्ये संघाचे विविध ठराव आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विश्लेषण केले होते. त्यामध्ये भर घालून प्रस्तुत पुस्तक साकारले आहे. 

पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ सप्टेंबर २०२५



पुस्तकाच्या शीर्षकात असलेल्या रिझोल्युशन या शब्दाच्या 'निवारण' या अर्थासोबतच 'ठराव' हा अर्थही पुस्तकाच्या परिप्रेक्ष्यात लक्षात घ्यायला हवा. संघाची वाटचाल या ठरावांसोबत पडताळून पाहिल्यास संघाची उक्ती आणि कृतीमध्ये अंतर नाही; परंतु संघाचे कार्य प्रतिकूल प्रसारमाध्यमांमुळे आणि संघ नेतृत्वाच्या प्रसिद्धीपराङ्मुख कार्यशैलीमुळे दुर्लक्षित राहिले किंवा चुकीच्या पद्धतीने मांडले गेले, असा निष्कर्ष लेखक नोंदवतात. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, विपुल संदर्भ आणि आकडेवारी यांच्या आधारे साकारलेले हे पुस्तक संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या वाटचालीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन वाचकाला देईल. 

पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ सप्टेंबर २०२५


कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन - द आर. एस. एस. वे 
लेखक : रतन शारदा, यशवंत पाठक 
प्रकाशक : गरुड प्रकाशन 
पृष्ठसंख्या : ४९८ 
किंमत : ५४९ रु.

Wednesday, June 17, 2026

संस्कृततज्ज्ञ एव्हर्ट श्नायडर यांच्याशी गप्पाटप्पा

२०१९मध्ये नेदरलँड्समध्ये आलो होतो तेव्हा १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात कालिदासाच्या मेघदूताचे डच भाषेमध्ये अनुवाद करणाऱ्या एव्हर्ट श्नायडर (Evert Schneider) यांची अनपेक्षित भेट, त्यानंतर मी घेतलेली त्यांची ऑनलाईन मुलाखत आणि त्यावर मी दिवाळी अंकात लिहिलेला लेख, याबद्दल या पूर्वी इथे सांगितलंच होतं. पुन्हा नेदरलँड्सला आल्यावर त्यांची भेट घ्यायची हे ठरवलंच होतं. पण त्यांच्या संपर्क करायचा आळस केल्यामुळे अनेक महिने भेट झालीच नाही. मार्च महिन्यात मात्र आळस झटकून त्यांना ई-मेल करून भेटायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्याकडून २०मार्च २०२६ रोजी भेटीसाठी घरीच येण्याचे आमंत्रण मिळाले. इतके महिने नेदरलँड्समध्ये राहूनही डच व्यक्तीच्या घरी जायचा प्रसंग प्रथमच आला. त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्यांच्या सौंनी दार उघडून स्वागत केलं आणि बसायला सांगितलं. वरच्या मजल्यावरून सावकाश चालत एव्हर्ट दिवाणखान्यात आले तेव्हा लक्षात आलं की, ते आता प्रचंड थकले आहेत.. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी मला पहिली वार्ता दिली तीच उत्साह वाढवणारी होती. 'साप्ताहिक सकाळ'मधला माझा लेख वाचून बेल्जिअमच्या एका मराठी कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधला होता, एवढंच नाही तर त्यांच्या घरी येऊन त्यांची व्हिडिओ सेटप वगैरे करून मुलाखतही घेतली होती! आपण काहीतरी लिहितो त्याचा कधी, कुठे, कसा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज करणं खरंच अशक्य असतं.. या वार्तेच्या ओघाने ज्या गप्पा सुरू झाल्या त्या चांगल्याच रंगल्या. विषय अर्थातच संस्कृत आणि त्या अनुषंगाने संस्कृतचा भारताबाहेरचा प्रवास, इतिहास. बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी कळत गेल्या; काही मी त्यांना सांगितल्या. इंग्रजांनी केलेला संस्कृतचा अभ्यास आणि संस्कृत अभ्यासक/प्रसारक म्हणून जगासमोर असणारी इंग्रजांची (त्यातही विल्यम जोन्सची) प्रतिमा याबद्दलची एव्हर्ट यांची मतं झणझणीत आहेत 😃. गप्पांच्या ओघात एव्हर्ट यांनी टेनिसच्या निमित्ताने (ते स्वतः डेव्हिस चषक आणि अमेरिकन ओपन खेळलेले आहेत) त्यांच्या स्वतःच्या दिल्ली भेटीच्या आणि नंतर मेघदूताच्या मेघाचा मागोवा घेण्यानिमित्ताने झालेल्या हिमालय भेटीच्या आठवणी निघाल्या. आल्प्स् अगदी सविस्तर पाहिलेला हा माणूस भारतभेटीत मात्र हिमालय पाहून भारावून गेला होता! गप्पा जेव्हा खेळ आणि भारताकडे सरकल्या तेव्हा क्रिकेटचा विषय निघाला आणि कळलं की, त्यांची नात Phebe Molkenboer ही Netherlands टीमची ओपनिंग बॅटर आहे!! ते म्हणाले "तिला पुढेही क्रिकेटच खेळायचं आहे. पण आमच्या देशात हा खेळ खूप छोटा आहे." मी म्हणालो, "छोटा असला तरी तुमची पुरुष क्रिकेट टीम गेली काही वर्षं खूप चांगली कामगिरी करत आहे, महिला क्रिकेट संघाने यावर्षी T20 विश्वचषकातही प्रवेश मिळवला आहे आणि आता भारतात WPL सुरू झालं आहे, इंग्लंडमध्ये The Hundred सुरू झालं आहे. अशा लीग्जमुळे एखाद्या छोट्या देशाच्या क्रिकेटपटूलाही संधी मिळू शकते.. IPL मध्ये नेपाळसारख्या क्रिकेटच्या दृष्टीने छोट्या देशातल्या खेळाडूलाही संधी मिळाली आहे. तुमची नात मन लावून खेळून चांगली कामगिरी करत राहिली तर तिलाही अशा लीग्जमध्ये संधी मिळू शकते" बोलण्याच्या ओघात महाराष्ट्र आणि भारतातील डच हा विषय निघालं तेव्हा त्यांना निखिल बेल्लरकर हा तरुण अभ्यासक मराठा-डच संबंधांवर संशोधन करत आहे, असं सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "मला मराठे आवडतात, कारण त्यांनी इंग्रजांना हारवलं". हा (चुकीचा) संदर्भ त्यांनी कशावरून दिला कळलं नाही, पण एकुणात त्यांचं इंग्रजांवरच्या विशेष प्रेमाचा पुन्हा प्रत्यय आला😅 एव्हर्ट यांच्या भेटीला येण्यापूर्वीच त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो. राजीव मल्होत्रा यांची संस्कृतवरची दोन्ही पुस्तकं त्यांनी वाचली आहेत आणि ती त्यांना आवडली आहेत हे मला माहित होतं. त्यामुळे तो पर्याय बाद होता. मग त्यांना भारताबद्दलच आणखी माहिती देणारं आणि संस्कृतशी संबंध असणारं 'Imperishable Seed' हे पुस्तक अगदी योग्य ठरेल असं वाटलं (हिंदू गणिताचा इतिहास सांगणारं हे पुस्तक संस्कृत भाषेतील गणिती सूत्रांनी संपृक्त आहे). योगायोगाने याच सुमारास नेदरलँड्सला येऊ घातलेल्या निखिल या संशोधक मित्राला हे पुस्तक घेऊन यायला सांगितलं. पण ट्रम्प तात्याने मध्येच गोंधळ घालून ठेवल्याने त्याचा प्रवास रद्द झाला आणि पुस्तक मिळवण्याचा प्रश्न निर्माण झाला. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच Imperishable Seed चे बर्लीनस्थित लेखक भास्कर कांबळे यांच्याशी फोनवर ओळख आणि बोलणं झालं होतं. त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. त्यांनी लगोलग मला त्यांचं पुस्तक पाठवलं. एव्हर्ट यांना ते भेट दिलं तेव्हा मिश्किलपणे म्हणाले, "मला हे कळेल का?" बोलण्याच्या नादात सव्वा - दीड तास कसा गेला कळलं नाही. निघताना ते मला सोडायला बाहेरपर्यंत आले. मी सायकलवरून आलोय हे कळल्यावर खूप खुश झाले.. निघताना त्यांना म्हणालो, "तुमचं मेघदूतावरचं पुस्तक मी आणायला विसरलो. त्यावर तुमची स्वाक्षरी घ्यायची होती." ते म्हणाले आता "हरकत नाही, त्यानिमित्ताने पुढच्या वेळी पुन्हा ये." अंगण ओलांडून ते मला सोडायला फुटपाथ पर्यंत येत होते पण तेवढं चालणंही नीट जमत नव्हतं. त्यांचं वय पंच्याऐंशीच्या जवळ आहे. या वयातही त्यांचा संस्कृत संदर्भातच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन संशोधन आणि लेखन चालू आहे. त्यांना तब्येतीची साथ मिळो आणि त्यांचं नवं पुस्तक आपल्याला वाचायला मिळो अशी मनोमन प्रार्थना केली.
निरोप घेताना त्यांना म्हटलं "आता अजून पुढे फुटपाथपर्यंत यायचे कष्ट घेऊ नका" आणि त्यांना आणि त्यांच्या सौंना अच्छा करून निघालो. परतीच्या वाटेवर असताना अचानक लक्षात आलं की, मगाशी त्यांच्या "कुठला नवीन लेख लिहिलास का?" या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देताना "मी आख्खं पुस्तक लिहिलंय" हे सांगायचं विसरूनच गेलो आहोत! आपण कितीही बोललो तरी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या राहूनच जातात!

आडवाटेवरचा अवलिया

बऱ्याचदा असं होतं की, एखादी गोष्ट करायची आहे असं नुसतं मनाशी म्हणत राहतो; पण प्रत्यक्षात ती करतच नाही. 'आपल्या व्यग्रतेमुळे ती करणं आपल्याला जमत नाहीये', अशी आपण स्वतःची समजूत घालत राहतो. परंतु एखादा दिवस असा उजाडतो, जो 'आपण ती गोष्ट केली नाही' याची कायमची हुरहूर लावून जातो. २२ मे २०२६ रोजी प्रवीण कारखानीस नावाचा विलक्षण भ्रमंतीकार सर्वात मोठ्या प्रवासाला निघून गेल्याची बातमी कळली आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट राहून घेल्याची कायमची सल मनाला देऊन गेली. बहुतां देशां हिंडावे। नाना कळा शिकत जावें ।। बहुश्रुतपणें विवरावें । बरे वाईट ।। हे समर्थवचन प्रवीण कारखानीस शब्दश: जगले. हमरस्ता सोडून आडवाटा तुडवण्यामध्ये ज्यांना विलक्षण थ्रिल वाटत असावं. त्यांची पुस्तकं, लेख, फेसबुक पोस्ट्समधून माझ्या मनात तयार झालेली प्रतिमा म्हणजे एक धाडसी दुचाकीवीर, एक चौकस माणूस, एक मनस्वी रसिक, एक उत्तम लेखक अशा अनेक छोट्या 'स्नॅपशॉट्स'चं कोलाजच आहे. कारखानीसांच्या साहसांशी प्रथम परिचय झाला तो त्यांच्या 'अष्टचक्री रोमायण' या पुस्तकातून. मोटरसायकलवरून मुंबई ते रोम असा सलग प्रवास करणाऱ्या आठ वेड्या पीरांपैकी एक असणाऱ्या कारखानीसांनी लिहिलेलं हे पुस्तक बराच काळ बाजारात उपलब्ध नव्हतं. सुदैवाने त्या पुस्तकाची नवी आवृत्ती आल्याचं सोशल मीडियाच्या कृपेने कळलं. फेसबुकवर सक्रीय असलेल्या कारखानीसांशीच संपर्क करून पुस्तक मिळवलं. वाचताना वाटलं 'आज वेगवान सोशल मीडियामुळे इतक्या सहजतेने मिळालेलं हे पुस्तक प्रत्यक्षात ज्या प्रवासाची कथा सांगतं, तो पन्नास वर्षांपूर्वीचा प्रवास मात्र अतिशय मर्यादित संपर्क साधनांमुळे केवढा आव्हानात्मक होता!' अपरिचित प्रदेश, प्रतिकूल हवामान, खराब रस्ते, अनुभवाचा अभाव अशा परिस्थितीमध्ये आठ तरुण आपल्या चार मोटरसायकल्स वरून २२ मे १९७७ रोजी 'गेटवे ऑफ इंडिया' वरून निघाले आणि तब्बल साडेबावीस हजार कि.मी.चं अंतर कापून दीडशे दिवसांनी २९ जुलै रोजी रोमला पोहोचले. अपरिचित मुलुखात सहकाऱ्यांशी झालेली चुकामूक, इस्तंबूलकडे जात असताना लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हे दुचाकीस्वार राज कपूरच्या भारतातून आलेले आहेत हे कळल्यावर त्यांच्यासोबत राज कपूरची गाणी गाऊन सेलिब्रेशन करणे, मराठी माणसाला अपरिचित असलेल्या देशांमधले समाजजीवन अशा अनुभवांमुळे हे प्रवासवर्णन वाचनीय झालं आहे. इस्लामिक क्रांती होण्यापूर्वीच्या अत्यंत खुल्या, आधुनिक वातावरणातल्या इराणचं - आज अगदी अविश्वसनीय वाटणारं - मराठी प्रवाशाने केलेलं वर्णन हे तर मराठी साहित्यातलं एकमेव उदाहरण असावं (या पुस्तकावर मी ‘महाएमटीबी’साठी लिहिलेला लेख या दुव्यावर वाचता येईल : https://www.mahamtb.com/Encyc/2018/5/5/Book-review-of-Ashtchakri-Romayan-by-Prasad-phatak-.html). कारखानीसांनी बँकेची नोकरी सांभाळून आपल्या लाडक्या 'येझदी' बाईकसह अफाट भटकंती केली. ज्यांचा विचारही सर्वसामान्य प्रवासी करणार नाही अशा केनिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, मोझांबिक, मालावी या देशांचा साडेचौदाहजार कि.मी.चा प्रदेश मोटरसायकलवरून पालथा घातला. झिम्बाब्वेमध्ये रस्त्याने प्रवेश करणारे ते पहिले भारतीय आहेत, अशी नोंद त्या देशाच्या सरहद्दीवर करण्यात आली. 'भटकंती-देश विदेशांची' या पुस्तकामध्ये हे अनुभव वाचता येतात. १९८१ मध्ये कारखानीसांची बदली 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या कलकत्ता शाखेमध्ये झाली, तेव्हा ते तिथे रुजू होण्यासाठी चक्क मोटरसायकलवरून गेले कलकत्त्यातली पाच वर्षं त्यांनी बंगाली खानपान, साहित्य, चित्रपट हे सगळं जाणून जाणून घेतलं. संधी मिळतातच बांगलादेशही पाहून घेतला. वंगदेशीच्या अनुभवांवर आधारित लेखांचं पुढे ‘हावडा-ब्रिजवरून’ हे पुस्तक झालं. बंगालमध्ये १९३४ सालापासून असलेलं 'महाराष्ट्र निवास' आणि कलकत्त्याचे रहिवासी असलेल्या मराठी मान्यवरांची शब्दचित्रं, हा या पुस्तकामधला सर्वात वेधक भाग आहे. ओठावर हसू, चौकस नजर आणि शिस्त या शिदोरीच्या बळावर ते मनाची पाटी कोरी ठेवून मनसोक्त हिंडले. मनुष्याच्या चांगुलपणावर विश्वास आणि सहज संवाद साधण्याच्या हातोटीमुळे आपल्या अनेक जण जोडले. प्रवासातल्या ओळखी, कमीत कमी गरजा यांमुळे त्यांच्या सफरी विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात पार पडत. १९०८०च्या दशकात त्यांनी संपूर्ण श्रीलंका अवघ्या ३२० रुपयांमध्ये पालथा घातला होता! २००४ साली भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्याच्या वेळी मोजक्याच त्या देशाने भारतीयांसाठी 'विशेष क्रिकेट व्हिसा' देऊ केला होता. रोमपर्यंतच्या प्रवासाच्या वेळी पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने तो देश पाहण्याची हुकलेली संधी कारखानीसांना मिळाली, तेव्हा पाकिस्तानी वकिलातीतील रणधुमाळीनंतर त्यांनी व्हिसा पदरात पाडून घेतला. या प्रवासात पाकिस्तानी मुस्लिमांकडून झालेले प्रेमळ आदरातिथ्य एकीकडे आणि मानसिकरित्या दबलेला, अगतिक पाकिस्तानी हिंदूंचे दर्शन दुसरीकडे असे दोन टोकांचे अनुभव त्यांना आले. भगतसिंह-सुखदेव-राजगुरू जिथे ताठ मानेने फासावर चढले, अशा ठिकाणाची धूळ मस्तकी लावण्याचे भाग्य २३ मार्च या स्मृतिदिनीच कारखानीस यांना लाभले. अखंड कुतूहलातून जन्मणारे साहस माणसाला कसे अकल्पनीय अनुभव देऊ शकते, याची प्रचिती कारखानीसांचं 'मंज़िल-ए-मक्सूद पाकिस्तान' हे पुस्तक वाचताना येते. याच अखंड कुतुहूलातून कारखानीसांनी अनेक दिग्गजांच्या आवर्जून भेटी घेतल्या. सालीम अलींपासून जनरल अरुणकुमार वैद्यांपर्यंत अनेकांशी त्यांची ओळख झाली. ज्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता अशांबद्दलही त्यांनी माहिती घेऊन लिखाण केलं. 'गाथा गुणीजनांची', 'ज्योतीने तेजाची आरती', 'तेथे कर माझे जुळती' अशा पुस्तकांमधून त्यांनी परिचित-अपरिचित शंभरेक व्यक्तींची शब्दचित्रं लिहिली. इतकं सगळं पुस्तकरूपाने प्रसिद्ध करूनही कारखानीसांकडे भरपूर खजिना शिल्लक होता. तो ते फेसबुवर नियमितपणे रिता करत. उतारवयातही नव्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा त्यांचा गुण त्यांच्या चिरतारुण्याची साक्ष देणारा होता. त्यांच्या फेसबुकवरील निवडक लिखाणाचंही एक पुस्तक झालं! एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला पुरस्कार मिळाला, अथवा तिचं निधन झालं की, त्यावर कारखानीसांची एखादी तरी फेसबुक पोस्ट हमखास येई. अनेकदा त्या व्यक्तीसोबत स्वतःची भेट कधी झाली याच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचं छायाचित्रही असे. त्यांचं वर्तुळ नक्की किती मोठं आहे, याचा मला कायमच अचंबा वाटे. त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणाऱ्यांमध्ये गो. नी. दांडेकर, विद्याधर गोखले, अरुण टिकेकर इ. अनेक दिग्गजांचा समावेश आहे. हावडा-ब्रिजवरून या पुस्तकाचं प्रकाशन तर बंगालचे माजी मुखमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांच्या हस्ते झालं होतं! को.म.सा.प.चा ‘उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’, ठाण्याचा 'वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार' मिळालेल्या कारखानीसांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावारही प्रेम होतं. त्यांनी तब्बल ५०पेक्षा अधिक संमेलनांना लावलेली उपस्थिती हा बहुदा विक्रमच असावा. प्रवीण कारखानीसांचा जन्म ६ नोव्हेंबर १९४६ चा; परंतु त्यांची कार्यप्रवणता पाहता त्यांचं या वयात जाणंसुद्धा अकाली आहे अशीच भावना होत आहे. असा अखंड उत्साहाचा धबधबा आटतो तेव्हा त्याचं जाणं अधिक रितेपणा देऊन जातं. दरवेळी त्यांचं नवीन लिखाण वाचलं की, अंबरनाथला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर मुलाखत घेण्याची योजना माझ्या मनात आकार घेऊ लागे. पण ती अर्धवटच राही. आळस करत राहिलो तर वेळ निघून जाईल, ही शक्यता मी ध्यानातच घेतली नाही. आपण आळस झटकायला हवा, हे तरी आपण कार्यमग्न कारखानीसांकडून ते हयात असतानाच शिकायला हवं होतं, याची बोचरी जाणीव आता प्रकर्षाने होत आहे.
(पूर्व प्रसिद्धी : मुंबई तरुण भारत, ७ जून २०२६)

Wednesday, May 13, 2026

खऱ्याखुऱ्या धुरंधरची गोष्ट




धुरंधरच्या दोन्ही भागांनी सर्वत्र एकच धमाल उडवून दिलेली आहे. भारताच्या हेरांच्या नव्याजुन्या छुप्या कामगिऱ्यांची उजळणी पोस्ट्स आणि पॉडकास्ट्समधून उजळणी होत आहे. ते वाचून मला मी करोना काळात ऐकलेल्या एका पुस्तकाची प्रकर्षाने आठवण येत आहे. 


'मैं पाकिस्तान मैं भारत का जासूस था' ही आहे एक सत्यकथा. ही कथा पाकिस्तानातली आहे, भारतीय हेराचीही आहे पण ती हेरगिरीची नाही! यात कोणतेही रहस्य नाही, छुपे कॅमेरे नाहीत, वेषांतर नाही, शत्रूला ठार करणे नाही, की जेलरच्या हातावर तुरी देऊन निसटणे नाही... ही गोष्ट आहे हेरगिरी होऊन गेल्यानंतरची. त्यानंतरच्या प्रचंड खडतर आणि अनिश्चित आयुष्याची.. निनावी राहून मातृभूमीची सेवा करणाऱ्या एका वीराची, त्याच्या आशानिराशेची, संतापाची.. 


ही कथा नवीनही नाही. ही आहे 1970च्या दशकातली गोष्ट. कथेचे नायक आहेत मोहनलाल भास्कर. त्यांना पाकिस्तानात केलेल्या अणुऊर्जा केंद्रातून फाईल मिळवण्याच्या आरोपाखाली अटक होते या घटनेपासूनच पुस्तकाची सुरुवात होते आणि कोणत्याही गुप्तहेरी चातुर्याची उदाहरणे नसूनही शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. मुळात मोहनलाल नक्की कोणत्या कामगिरीवर पाकिस्तानात गेले होते, त्यांनी कोणती माहिती गोळा करून भारतापर्यंत कशी पोहोचवली याबद्दल पुस्तकात अवाक्षरही नाही. मुळात 'आपण हेर होतो' याचा शीर्षक आणि काही ओझरते उल्लेख वगळता फारसा कुठे उल्लेखही नाहीये! .


अमरिकसिंह नावाच्या एका डबल क्रॉस माणसामुळे मोहनलाल पकडले गेले आणि पुढे अमरिकसिंहला सुद्धा संशयावरून तुरुंगात टाकले गेले! तुरुंगात मोहनलाल यांचा प्रचंड छळ झाला. पुस्तकात लाहोर, रावळपिंडी, कोट लखपत इथल्या तरुंगांचे, तुरुंगात भेटलेले सहृदय अधिकारी, कर्मचारी यांचे वर्णन आहे.


विशेष गोष्ट अशी की, एक तुरुंगाधिकारी मोहनलाल यांच्या पोलीस खात्यातील वडिलांचा फाळणीपूर्वीचा पोलिस खात्यातील सहकारी निघाला! त्याने माहिती काढून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असले तरी त्याच्यामुळे मोहनलाल यांचे हाल कमी झाले.


एका अधिकाऱ्याची आपल्या हिंदू पूर्वजांबद्दलची भावना आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. आपण काही पिढ्यांपूर्वी केवळ हिंदूच नव्हे तर ब्राह्मण असल्याची त्याला जाणीव होती. मुस्लिमांमधल्या कुप्रथा, त्यांनी जबरदस्तीने केले गेलेले पूर्वजांचे धर्मांतर याचीही जाणीव. परंतु त्याचे मुसलमान झालेले पूर्वज हिंदूंकडे मदत मागायला गेले तेव्हा आणि नंतर स्वधर्मात परत येण्याची इच्छा दाखवली तेव्हा कुणीही मदत केली नाही याची चीड आता काही पिढ्या उलटून गेल्यावरही त्याच्या मनात धगघत होती... ब्राह्मणांवर विशेष राग होता.त्या अनुषंगाने मोहन यांच्याशी अनेकदा चर्चाही केली!


शत्रूराष्ट्र पाकिस्तानात हेरगिरी साठी गेलेला देशभक्त असूनही त्यांनी पाकिस्तान म्हणजे सगळेच वाईट अशी त्यानी कुठेही सूर लावलेला नाही. उलट तशा सार्वत्रिक समजुतीला तडा देणारी अनेक उदाहरणं पुस्तकात आहेत 


पुस्तकात लेखकाने झुल्फिकार अली भुट्टो यांच्याबद्दल आत्मीयतेने लिहिलं आहे. याचं कारण बरंचसं वैयक्तिक आहे. याह्याखानने भुट्टो यांना तुरुंगात टाकलं होतं. तेव्हा तुरुंगातील कैद्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती. भुट्टो मोहन यांच्यासोबतच्या कैद्यांनाही भेटले आणि आपल्याला सत्ता मिळल्यास आपण तुमची सुटका करू असे आश्वासन दिले आणि ते खरोखरच पाळले. १९७२च्या सिमला कराराअंतर्गत दोन्ही देशांनी कैदी सोडले. 


१९७१मध्ये शेर-ए-बंगाल मुजीब-उर-रहमान देखील त्या तुरुंगात कैदेत होते परंतु मुजीबची फाशी ४ वेळा टळली. मोहनलाल यांना त्यांना बघायची/भेटायची संधी मिळाली नाही.


मोहनलाल यांचा भावनिक कल्लोळ प्रकट होतो तो भाग आहे तो १९७१च्या युद्धाच्या वेळचा. याचं कारण असं आहे की, गुजरांवाला तुरुंगामागेच असणाऱ्या पाकिस्तानी वायुदलाच्या विमानतळावर १९७१च्या युद्धात भारतीय वायुदलाचने बॉम्बिंग केलं होतं.. चुकून बॉम्ब तिकडचा इकडे पडला असता तरी निभाव लागणं कठीण होतं. पण जेव्हा बॉम्बिंग व्हायचं तेव्हा पाकिस्तानी कैदी, तुरुंगाधिकारी लपून बसत आणि अगदी जीवाची तमा न बाळगता तुरुंगातले भारतीय कैदी विमानाचा आवाज आला की मोकळ्या जागेत येऊन बेभान नाचत! डोक्यावरच्या घिरट्या मृत्यूच्या असल्या तरी त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण त्याच घिरट्या त्यांच्या स्वातंत्र्याच्याही होत्या!


तुरुंगातल्या कैद्यांच्या मनस्थितीचे, आपसातल्या नात्यांचे तपशिलाने वर्णन, हा देखील भावनिक रोलर कोस्टरचं दर्शन घडवतो. पाकिस्तानातले भारतीय कैदी हा प्रकार फारच करूण असतो. त्यात कमालीची अनिश्चिती आहे. हेरगिरी, चुकून हद्दीत घुसणे, व्हिसा संपल्यावरही तिथेच राहणे, मासेमारांचे समुद्रात भरकटून हद्दीत शिरणे अशा अनेक कारणांनी अनेक भारतीय माणसं पाकिस्तानी तुरुंगात खितपत. बाहेर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले (उदा. ७१चं युद्ध) की, तुरुंगात भारतीय कैद्यांचा जास्तच दुस्वास आणि छळ होऊ लागतो. इथलं जीवन किती अस्थिर असतं हे सांगणारी अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. शिक्षा संपली तरी परत कधी जाऊ याची शाश्वती नाही.  मोहनलाल यांनाही सोडायचे ठरल्यावरही कोर्ट लखपत तुरुंगातून लाहोरला आणले पण तिथे पुन्हा वर्षभर वर्षभर ठेवले! आधी याद्या exchange होतात. मग भारतीय अधिकारी हे कैदी भारतीय आहेत की नाहीत याचा शोध घेतात आणि नंतरच गाडी पुढे सरकते. सुटका होणार असं कळल्यावरही सगळ्य लालफितीच्या कारभारात वर्षभर काढणे किती असह्य असेल यांची कल्पनाच केलेली बरी.. 


तुरुंगात एक विलक्षण घटनाही घडली.. तुरुंग फोडून जायचा प्रयत्न ऐनवेळी उघडकीला आला म्हणून तुरुंगात सैन्य घुसवून शंभरहून अधिक कैद्यांची हत्या करण्यात आली, अनेकांचे हातपाय तोडले गेले. परंतु आश्चर्य म्हणजे त्यामध्ये भारतीय कैद्यांना काही त्रास दिला गेला नाही. अधिकाऱ्याचं म्हणणं होतं "हे सगळे भारतीय कैदी चांगले आहेत. पाकिस्तानी कैदीच आगाऊ आहेत." 


तुरुंगत व्यसन लागणं अपरिहार्य. सिगरेटच्या थोटकासाठीही जीव पाखडतात. अनेक गोष्टी सर्रास तुरुंगत पोचतात. कैदी त्या आयुष्यालाही सरावतात. काही इतके धीट बनतात की अधिकाऱ्यांना तोंडावर शिव्या देतात. तिथला आणखीन एक कैदीही भारतीय हेर होता. त्याने तर जवळजवळ प्राणांतिक मार खाल्लेला आणि त्यातूनच तो कोडगा झाला होता... त्याला बडवून उपयोग नाही आणि ठारही मारता येत नाही म्हणून तुरुंगाधिकारीही वैतागले होते आणि तो सरळ आईबहिणीचा उद्धार करायचा. हे वाचायला खूप विचित्र वाटतं. जणू ही एकप्रकराची निर्वाणस्थितीच आहे मनाची. नंतरनंतर तर मोहनलालही त्याच मनस्थितीत गेले होते..


शेवटचा काळ मात्र तुरुंगात मजेत गेला असं मोहनलाल म्हणतात. मुख्य कारण म्हणजे तपासादरम्यान झालेले तसे टॉर्चर परत कधी झाले नाही.


मोहनलाल परत आल्यानंतरचा पुस्तकातला कथाभाग सर्वात त्रासदायक आहे.. परतल्यावर त्यांची परिस्थिती खडतर झाली. भारतीय हेर बनून मोहनलाल पाकिस्तानात अडकले, शिक्षा भोगत राहिले तेव्हा त्यांच्या कुटुंबाची स्थिती हलाखीची झाली होती, हे वाचून क्लेश होतात. कुटुंबासाठी सरकारने काहीच का केले नसेल  हा प्रश्न आपल्याला सतावतो. 


भारतात परतल्यावर काही वर्षांनी मोहनलाल पंतप्रधान मोरारजींना भेटले आणि "पाकिस्तानात भारतासाठी काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची योग्य पावती मिळायला हवी" असं ते म्हणाले. खरंतर त्या दोघांचा आधीपासून परिचय होता,  तरीही मोरारजी निर्दयीपणे म्हणाले "पाकिस्तानच्या कृत्याची शिक्षा आम्ही का भोगू? पाकिस्तानने वीस वर्षं तुरुंगात ठेवलं तर आम्ही तुम्हाला वीस वर्षं नुकसानभरपाई देऊ का?" 


मोहनलाल कडवटपणे वाचकासमोर प्रश्न उपस्थित करतात वि "ज्या माणसाला हाजी मस्तान सारख्याचा पाहुणचार करायला वेळ आहे, त्याला देशासाठी जीव धोक्यात घातलेल्यांसाठी बोलायला वेळ का नाही? माझ्या हातात पिस्तूल असतं तर मी त्यांना तिथेच गोळ्या घातल्या असत्या.."


देशासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या माणसाला असं वागवलं जातं, तेव्हा आपल्या priorities किती चुकल्या आहेत याची पुन्हा एकदा जाणीव होते. 


(पुस्तक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे. रोहन प्रकाशनातर्फे मराठीमध्ये त्याचा अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.)


Monday, May 11, 2026

सोमनाथचा संघर्ष : एक तेजस्वी पर्व




(चित्रसौजन्य : जेमिनी)

सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ११ मे १९५१ रोजी पार पडलेल्या सोमनाथ प्रतिष्ठापना सोहळ्याचा आज अमृतमहोत्सव आहे. त्या निमित्ताने सोमनाथ मंदिरासाठी झालेला संघर्ष जाणून घेणे सयुक्तिक ठरेल.

गुजरातमधील प्रभासपाटण येथील सोमनाथ हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचा उल्लेख पुराणांपासून महाभारतापर्यंत अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने दक्षाच्या शापातून मुक्त होण्यासाठी येथे भगवान शिवाची उपासना केली. त्यामुळे हे स्थान सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती देणारे म्हणून प्रसिद्ध झाले.

इतिहासात सोमनाथ मंदिर इस्लामी आक्रमकांकडून अनेकदा उद्ध्वस्त झाले. पहिल्यांदा इ.स. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदाने सोमनाथवर हल्ला करून त्याचा विध्वंस केला. कत्तल, लुटालूट झाली. महमूदाचा दरबारी इतिहासकार अल् बेरुनी लिहितो, "महमूदाने या देशाचे वैभव उद्ध्वस्त केले आणि त्याने अशा कारवाया केल्या की, धूळदाण होऊन हिंदू चौफेर विखुरले आणि इतिहासजमा झालेली दंतकथा म्हणून उरले. त्यांच्या विखुरलेल्या अवशेषांमध्ये मुस्लिमांबद्दलचा तीव्र तिरस्कार टिकून आहे."

राजा भीमदेव चालुक्याने आनंदपाल आणि भोज राजा यांच्या सहाय्याने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभे केले. पुढे जेव्हा जेव्हा मंदिर उद्ध्वस्त झाले तेव्हा तेव्हा श्रद्धावान हिंदूंनी ते पुन्हा पुन्हा उभे केले. अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ उलुघ खान (इ.स. १२९८), सुलतान अहमदशाह (इ.स. १४१७), अहमदशाहचा नातू महमूद बेगडा (इ.स. १४६९) औरंगजेब (इ.स. १६६९) यांनीही सोमनाथाचा विध्वंस केला.

दीर्घकाळ सोमनाथ मंदिराचे अवशेष दुर्लक्षित अवस्थेतच राहिले. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराजवळ एक नवीन मंदिर उभारून पूजाअर्चा सुरू केली. ब्रिटिशांच्या काळामध्येही जुनागड नवाबाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मूळ भग्न मंदिराची उपेक्षाच झाली.

स्वातंत्र्यानंतर जुनागड संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान सरदार पटेल आणि काकासाहेब गाडगीळ जुनागडला गेले असताना काकासाहेबांनी 'भारत सरकारने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभारायलाच हवे' अशी इच्छा व्यक्त केली आणि सरदारांनी या विनंतीला त्वरित अनुमोदन दिले. मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी एक न्यास स्थापन केला गेला. सरदारांचे विश्वासू सहकारी, लेखक, विधिज्ञ, इतिहाससंशोधक कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे न्यासाचा कायदेशीर मसुदा लिहिण्याची जबाबदारी आली. तरुणपणी सोमनाथाच्या भग्न अवशेषांना भेट दिल्यापासून मुन्शींच्या मनात वेदना खदखदत होती आणि त्यातूनच त्यांनी 'जय सोमनाथ' नावाची कादंबरीदेखील लिहिली होती. सोमनाथाच्या पुनर्निर्माणाची संधी चालून येताच त्यांनी त्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

मुन्शी सोमनाथ न्यास विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी पुरातत्त्व विभागातर्फे मंदिर परिसरामध्ये उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. उत्खननातून लक्षात आले की, ते अवशेष मंदिर पुन्हा उभे करण्याच्या दृष्टीने उपयोगाचे नाहीत. त्यामुळे संपूर्ण मंदिर नव्याने उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार या कार्यासाठी जनतेकडून निधी उभारला गेला. सोमपुरा समुदायातील कुशल शिल्पकारांची मंदिरनिर्मितीसाठी निवड करण्यात आली. सोमनाथ हे केवळ मंदिर नसून राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक होते, त्यामुळे फक्त मंदिर उभे न करता पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीची पताका डौलाने फडकू लागेल अशी गोष्ट यानिमित्ताने सुरू व्हावी, अशी मुन्शींची इच्छा होती. म्हणूनच एक मोठी गोशाळा मंदिराशी संलग्न असावी, संपूर्ण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. पूर्वी मंदिरे केवळ पूजा-अर्चा करण्याचे स्थान नसून ज्ञानाप्रसाराची केंद्रेही असत, त्यामुळेच नवे सोमनाथ पूजेपुरते मर्यादित न राहता त्यासोबतच संस्कृत भाषेचे शिक्षण देणारे एक विद्यापीठ नव्याने स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

सोमनाथ पुनर्निर्माणाला विरोधही झाला. सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन खर्च करण्याबाबत पंतप्रधान नेहरूंनी नाराजी व्यक्त केली. परंतु सरकारतर्फे मशिदी आणि दर्गे यांनाही अनुदान दिले जात असल्याचे काकासाहेबांनी निदर्शनास आणून दिले. पुनर्निर्माणाला नेहरूंनी 'हिंदू पुनरुत्थानवाद' असे संबोधले. मुन्शींनी नेहरूंना सविस्तर पत्र लिहून पुनर्निर्माणामागची राष्ट्रीय भावना आग्रहाने मांडली आणि मंदिराचा भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही यासाठी कोणती काळजी घेण्यात येत आहे, हेही विशद केले.


राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठापना व्हावी ही मुन्शींची विनंती राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारली. पंडित नेहरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्याच हस्ते नूतन सोमनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली. या मंगलकार्याचे पौरोहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी केले. दुर्दैवाने हा सोहळा पाहण्यास सरदार पटेल हयात नव्हते. परंतु त्यांच्या पश्चात गाडगीळ आणि मुन्शी यांनी हे महान कार्य समर्थपणे तडीस नेले होते.

सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे केवळ एका मंदिराचे पुनरुज्जीवन नव्हते. ती शतकानुशतकांच्या वेदनांवर घातलेली फुंकर होती. तो असीम श्रद्धेच्या अविरत लढ्याचा विजय होता. या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान पुन्हा जागृत झाला.

 

--- प्रसाद फाटक