Total Pageviews

Wednesday, July 1, 2026

गणितवृक्षाचे बीजारोपण




आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांनी एका व्याख्यानात ‘पायथागोरसचे प्रमेय भारतीयांना पायथागोरसच्या पूर्वीपासूनच ज्ञात होते’ असे विधान ऐकले, तेव्हा हा काहीतरी उजव्या विचारसरणीचा ‘प्रपोगंडा’ असणार, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. परंतु या विधानाला पुष्टी देणारा स्कॉटिश गणिती जॉन प्लेफेअर याचा एक लेख पुढे त्यांच्या वाचनात आला. सतराव्या शतकातल्या या लेखाने कुतूहल जागृत होऊन कांबळे यांनी भारताच्या गणिती परंपरेचा अभ्यास सुरू केला आणि एक विलक्षण पट त्यांच्यासमोर उलगडत गेला. या अभ्यासाचाच परिपाक म्हणजे ‘इम्पेरिशेबल सीड’ हे पुस्तक.


भारतातील गणिती परंपरेचे विवेचन करताना कांबळे यांनी ‘हिंदू गणित/गणिती’ ही शब्दयोजना वापरली आहे. ‘हिंदू’ ही ओळख विशिष्ट भूभागाशी जोडली गेली असून ‘हिंदू गणित’ या व्यापक संकल्पनेमध्ये वैदिक, बौद्ध आणि जैन विचारधारांमधून आलेले गणितही समाविष्ट असल्याचे ते स्पष्ट करतात; एवढेच नव्हे तर ‘हिंदू संख्यापद्धती’सारख्या संकल्पना पाश्चात्य गणिततज्ज्ञांनीही वापरल्याची उदाहरणेही देतात. हिंदू गणितींनी अंकगणित, बीजगणित, भूमिती, संख्यामालिका, त्रिकोणमिती (ट्रिग्नोमेट्री) आणि कॅल्क्युलसमध्येही मूलभूत कार्य कसे केले, हे उलगडून दाखवणारी प्रकरणे पुस्तकात आहेत. आर्यभट्ट (‘पाय’ची किंमत), भास्कराचार्य पहिले (खगोलशास्त्रीय सूत्रे) व भास्कराचार्य दुसरे (क्रमांतरण-संयोगीकरण म्हणजेच पर्म्युटेशन- कॉम्बिनेशन), ब्रह्मगुप्त (ऋण संख्या) अशा अनेक श्रेष्ठ गणितींनी अंगांमध्ये श्लोकरूपात मांडलेले सिद्धांत/सूत्रेही आपल्याला वाचायला मिळतात.

केरळमध्ये माधवापासून नारायण भट्टीहारीपर्यंत (चौदावे ते सतरावे शतक) चालत आलेल्या देदीप्यमान गणिती परंपरेची कांबळे यांनी आवर्जून दखल घेतली आणि आज बहुतेकांना कल्पनाही नसणाऱ्या या ज्ञानपरंपरेचे तेथील भक्तिपरंपरेशी असणारे गहिरे नातेही सांगितले. हिंदू गणिताचा प्रभाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फक्त गणितच नव्हे तर भाषाशास्त्र, संगणकशास्त्र या विषयांमधील अनेक पाश्चिमात्य अभ्यासकांवरही पडत आला आहे आणि त्यांनी वेळोवेळी ते ऋण मान्यही केले आहे. उदा. संगणकशास्त्रातले पायाभूत कार्य करणाऱ्या बॅबेज, बुलियन आणि डी मॉर्गन यांच्या प्रेरणांबद्दल बॅबेजची पत्नी १९०१च्या ‘इंडिअन थॉट अँड वेस्टर्न सायन्स इन नाईटिन्थ सेंच्युरी’ लेखात या तिघांवर असलेल्या हिंदू गणिताच्या प्रभावाबद्दल लिहिताना, ‘कल्पना करा, या तिघांवरील सखोल हिंदू प्रभावाचा इ.स. १८३० ते १८६५ या कालखंडातील गणिती वातावरणावर काय परिणाम झाला असेल’, असे लिहिले आहे.

गणिताचा भारतातून पश्चिमेकडे प्रसार होण्याचे तीन टप्पे आहेत. एक म्हणजे, इसवीसन पूर्व काळ : ग्रीकांशी भारतीयांचा संपर्क, दुसरा अरब साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात आर्यभट्टीय, ब्रह्मस्फुटसिद्धांतासारखे ग्रंथ संस्कृतमधून अरबीतील (आणि तिथून लॅटिन-इंग्रजीमध्ये गेलेले) अनुवाद आणि तिसरा टप्पा हा पोर्तुगिजांनी जेझुईट मिशनऱ्यांच्या माध्यमातून केरळमधून गणितविषयक संस्कृत ग्रंथांचे युरोपमध्ये नेलेले अनुवाद. तिसऱ्या टप्प्यानंतर युरोपची गणितामध्ये घोडदौड सुरू झाल्याच्या ‘योगायोगा’कडेही कांबळे यांनी लक्ष वेधले आहे. काही प्रकरणांमध्ये कांबळे यांनी आपल्या गणिती परंपरेचा ऱ्हास कसा झाला आणि पाश्चात्यांनी वांशिक आणि धार्मिक श्रेष्ठतेच्या अहंगंडातून भारताच्या गणितातल्या योगदानाला कसे नाकारले याबद्दल ऊहापोह केला आहे. इंग्रजांनी भारतीय शिक्षणपद्धती मोडून काढल्याने भारतीय ज्ञानपरंपरा विस्मृतीत गेली आणि पाश्चात्यांनी सांगितले तेच मान्य करायचे, अशी भारतीयांची मानसिकता झाली, याबद्दल कांबळे खेद व्यक्त करतात आणि या पुस्तकाद्वारे ती बदलण्याचा मानस व्यक्त करतात.

भारताच्या गणिती परंपरेवर यापूर्वीही पुस्तके लिहिली गेली, परंतु या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये भारतातील गणिताचा विकास हा इथले तत्त्वचिंतन आणि अध्यात्म यांचाच परिपाक कसा आहे, याचे विस्तृत विवेचन आहे. ‘द फिलॉसॉफिकल अंडरपिनिंग्ज ऑफ हिंदू मॅथेमॅटिक्स’ हे प्रकरण उद्बोधक आहे. गीतेच्या श्लोकात (९.१८) वेगळ्या संदर्भात आलेली ‘अविनाशी बीजा’ची संकल्पना पुस्तकाच्या शीर्षकामध्ये कल्पकतेने वापरून हिंदू गणिताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पुस्तकातील आकृत्या, तक्ते, चित्रे, उद्धृते, मूळ स्रोत आणि ससंदर्भ लेखन यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती आल्यास कांबळे यांचे प्रयत्न अधिक खोलवर पोचण्यास मदत होईल.

इम्पेरिशेबल सीड
लेखक : भास्कर कांबळे
प्रकाशक : गरुड प्रकाशन
पृष्ठसंख्या : ४५० किंमत : ८९९ रुपये




पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर २०२३

https://maharashtratimes.com/editorial/column/dakhal/imperishable-seed-book-written-by-bhaskar-kamble-maharashtra-times-article/articleshow/105488294.cms






भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा

भारताचा इतिहास हा ज्ञानाचा इतिहास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाने काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला. भारतीय ज्ञानपरंपरेकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीला आलेले अवाजवी महत्व; एकेकाळची ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेबद्दलची उदासीनता; पाली, अर्धमागधी यांसारख्या भाषांचा झालेला ऱ्हास यामुळे अनेक विषयांमधले ज्ञानभांडार विस्मृतीच्या गर्तेत जात आहे. ‘ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशा विस्मृत ज्ञानावर प्रकाश टाकला गेला आहे. 


पुस्तकामध्ये एकूण २७ प्रकरणांमधून स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जलव्यवस्थापन, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकला इत्यादी अनेक क्षेत्रांमधल्या भारतीयांच्या विलक्षण कामगिरीचे दाखले दिले आहेत. कुतुबमिनारजवळचा बाराशे ते पंधराशे वर्षे न गंजता उभा असलेला लोहस्तंभ, १८०० वर्षांपासून वापरात असणारे कलानाई धरण, अदृश्य होणाऱ्या शाईमध्ये लिहिलेले अग्रसेन महाराजांचे चरित्र ही त्यापैकी काही उदाहरणे. सोमनाथ मंदिराजवळच्या किमान दीडहजार वर्षे जुन्या असणाऱ्या ‘बाणस्तंभा’वर ‘या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या सरळ रेषेला कुठेही अडथळा नाही’ अशा अर्थाची संस्कृत ओळ कोरलेली आहे. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने याची सत्यता पडताळता येते तेव्हा इतक्या पूर्वी हे भौगोलिक ज्ञान भारतीयांकडे कसे आले याचे नवल वाटत राहते. 


सांकेतिक भाषेतमधल्या साहित्याबद्दलच्या पुस्तकातल्या माहितीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 

१) जैन मुनी कुमुदेंदू लिखित ‘सिरी भूवलय’ ग्रंथ : हा जणू रामायण, महाभारत तसेच अन्य प्राचीन ज्ञानसाहित्याचा एनसायक्लोपिडियाच आहे. याच्या प्रत्येक पानावर ‘सुडोकू’सारख्या २७ x २७ चौकटींमध्ये १ ते ६४ दरम्यानच्या संख्या लिहिल्या आहेत. या संख्यांशी संबंधित विशिष्ट अक्षरे ठराविक क्रमाने कशी वाचायची काही संकेत आहेत. ते वापरून हा ग्रंथ एकूण १८ लिप्या आणि ७१८ भाषांमधून वाचता येतो अशी माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी कन्नड, मराठी, तमिळ, तेलुगु प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून यातील काही मजकुराचे अनेक जैन संस्थांच्या प्रयत्नांमुळे ‘वाचन’ करण्यात यश आले आहे.. 

२) ‘कटपयादी संख्यापद्धती’ : अक्षरांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यातून गुप्तसंदेश देण्यासाठीची ही पद्धती वापरून ‘गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग | खलजीवितखाताव गलहालारसंधर ||’ ही काव्यपंक्ती लिहिली गेली आहे.  यामध्ये कृष्णाला केंद्रस्थानी घेऊन वर्तुळाकार फेर धरणाऱ्या गोपिकांचे वर्णन असले तरी यातील एकेका अक्षराचे कटपयादी संख्यासंकेतानुसार वाचन केले असता वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘पाय’ या स्थिरांकाची (३.१४) दशांश चिन्हाच्या पुढच्या ३१ स्थानांपर्यंतची किंमत मिळते!


एवढा विलक्षण ज्ञानवारसा खंडित होण्यामागची कारणे पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात विशद केली आहेत. बाराव्या शतकापासून भारतावर होणाऱ्या सततच्या इस्लामी आक्रमणांमध्ये इथली मठ-मंदिरे, ग्रंथसंपदा यांचे आतोनात नुकसान झाले. बख्तियार खिलजीने तब्बल तीन महिने केलेल्या नालंदा विद्यापीठाच्या विध्वंसाचे वर्णन वाचून मन विषण्ण होते. पुढे युरोपीय वसाहतवाद्यांनी आपल्या लुटीमध्ये  अनेक ग्रंथ भारतातून आपल्या देशात नेले. अशा प्रतिकूलतेतही काही ग्रंथ तग धरून राहिले. ‘सुश्रुतसंहिते’मध्ये मांडलेले ‘प्लास्टिक सर्जरी’चे तंत्र, भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथातमधले काटकोनाच्या कर्णाबद्दलचे सूत्र, नागार्जुनाच्या ‘रसरत्नाकर’ या ग्रंथातले ‘आसवन विधी’चे (distillation) वर्णन इ. उदाहरणे त्या काळातील भारतीयांच्या ज्ञानाची साक्ष देतात. प्रख्यात शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी ‘हिंदू केमिस्ट्री’ या आपल्या ग्रंथामध्ये भारतीयांनी प्राचीन काळी केलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल लिहून ठेवल्याने महत्वाची माहिती जगासमोर आली. 


प्रस्तुत पुस्तक हे ’भारतीय ज्ञानाचा खजिना’ या मराठी पुस्तकाचा देविदास देशपांडे यांनी केलेला उत्तम अनुवाद आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेमध्ये विविध प्रांतांमधून मिळालेल्या योगदानाची दखल पुस्तकामध्ये घेतली गेली आहे. लेखनासाठी प्राचीन भारतीय ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली निरीक्षणे, भारतीय आणि विदेशी अभ्यासकांच्या नोंदी यांचा आधार घेतला गेला आहे. माहिती आणि रंजकता यांचा उत्तम मेळ असणारे हे पुस्तक भारताच्या ज्ञानवारश्याकडे पुन्हा एकदा वळण्याची आवश्यकता ठळकपणे अधोरेखित करते.  


ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज

लेखक : प्रशांत पोळ

प्रकाशक : प्रभात प्रकाशन

पाने : २०८, किंमत : ३०० रु 





पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, ३० ऑक्टोबर २०२१

https://tinyurl.com/dymfkvp4


--- प्रसाद फाटक