सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ११ मे १९५१ रोजी पार पडलेल्या सोमनाथ प्रतिष्ठापना सोहळ्याचा आज अमृतमहोत्सव आहे. त्या निमित्ताने सोमनाथ मंदिरासाठी झालेला संघर्ष जाणून घेणे सयुक्तिक ठरेल.
गुजरातमधील प्रभासपाटण येथील सोमनाथ हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचा उल्लेख पुराणांपासून महाभारतापर्यंत अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने दक्षाच्या शापातून मुक्त होण्यासाठी येथे भगवान शिवाची उपासना केली. त्यामुळे हे स्थान सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती देणारे म्हणून प्रसिद्ध झाले.
इतिहासात सोमनाथ मंदिर इस्लामी आक्रमकांकडून अनेकदा उद्ध्वस्त झाले. पहिल्यांदा इ.स. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदाने सोमनाथवर हल्ला करून त्याचा विध्वंस केला. कत्तल, लुटालूट झाली. महमूदाचा दरबारी इतिहासकार अल् बेरुनी लिहितो, "महमूदाने या देशाचे वैभव उद्ध्वस्त केले आणि त्याने अशा कारवाया केल्या की, धूळदाण होऊन हिंदू चौफेर विखुरले आणि इतिहासजमा झालेली दंतकथा म्हणून उरले. त्यांच्या विखुरलेल्या अवशेषांमध्ये मुस्लिमांबद्दलचा तीव्र तिरस्कार टिकून आहे."
राजा भीमदेव चालुक्याने आनंदपाल आणि भोज राजा यांच्या सहाय्याने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभे केले. पुढे जेव्हा जेव्हा मंदिर उद्ध्वस्त झाले तेव्हा तेव्हा श्रद्धावान हिंदूंनी ते पुन्हा पुन्हा उभे केले. अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ उलुघ खान (इ.स. १२९८), सुलतान अहमदशाह (इ.स. १४१७), अहमदशाहचा नातू महमूद बेगडा (इ.स. १४६९) औरंगजेब (इ.स. १६६९) यांनीही सोमनाथाचा विध्वंस केला.
दीर्घकाळ सोमनाथ मंदिराचे अवशेष दुर्लक्षित अवस्थेतच राहिले. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराजवळ एक नवीन मंदिर उभारून पूजाअर्चा सुरू केली. ब्रिटिशांच्या काळामध्येही जुनागड नवाबाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मूळ भग्न मंदिराची उपेक्षाच झाली.
स्वातंत्र्यानंतर जुनागड संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान सरदार पटेल आणि काकासाहेब गाडगीळ जुनागडला गेले असताना काकासाहेबांनी 'भारत सरकारने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभारायलाच हवे' अशी इच्छा व्यक्त केली आणि सरदारांनी या विनंतीला त्वरित अनुमोदन दिले. मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी एक न्यास स्थापन केला गेला. सरदारांचे विश्वासू सहकारी, लेखक, विधिज्ञ, इतिहाससंशोधक कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे न्यासाचा कायदेशीर मसुदा लिहिण्याची जबाबदारी आली. तरुणपणी सोमनाथाच्या भग्न अवशेषांना भेट दिल्यापासून मुन्शींच्या मनात वेदना खदखदत होती आणि त्यातूनच त्यांनी 'जय सोमनाथ' नावाची कादंबरीदेखील लिहिली होती. सोमनाथाच्या पुनर्निर्माणाची संधी चालून येताच त्यांनी त्या कार्यात स्वतःला झोकून दिले.
मुन्शी सोमनाथ न्यास विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी पुरातत्त्व विभागातर्फे मंदिर परिसरामध्ये उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. उत्खननातून लक्षात आले की, ते अवशेष मंदिर पुन्हा उभे करण्याच्या दृष्टीने उपयोगाचे नाहीत. त्यामुळे संपूर्ण मंदिर नव्याने उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार या कार्यासाठी जनतेकडून निधी उभारला गेला. सोमपुरा समुदायातील कुशल शिल्पकारांची मंदिरनिर्मितीसाठी निवड करण्यात आली. सोमनाथ हे केवळ मंदिर नसून राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक होते, त्यामुळे फक्त मंदिर उभे न करता पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीची पताका डौलाने फडकू लागेल अशी गोष्ट यानिमित्ताने सुरू व्हावी, अशी मुन्शींची इच्छा होती. म्हणूनच एक मोठी गोशाळा मंदिराशी संलग्न असावी, संपूर्ण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. पूर्वी मंदिरे केवळ पूजा-अर्चा करण्याचे स्थान नसून ज्ञानाप्रसाराची केंद्रेही असत, त्यामुळेच नवे सोमनाथ पूजेपुरते मर्यादित न राहता त्यासोबतच संस्कृत भाषेचे शिक्षण देणारे एक विद्यापीठ नव्याने स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
सोमनाथ पुनर्निर्माणाला विरोधही झाला. सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन खर्च करण्याबाबत पंतप्रधान नेहरूंनी नाराजी व्यक्त केली. परंतु सरकारतर्फे मशिदी आणि दर्गे यांनाही अनुदान दिले जात असल्याचे काकासाहेबांनी निदर्शनास आणून दिले. पुनर्निर्माणाला नेहरूंनी 'हिंदू पुनरुत्थानवाद' असे संबोधले. मुन्शींनी नेहरूंना सविस्तर पत्र लिहून पुनर्निर्माणामागची राष्ट्रीय भावना आग्रहाने मांडली आणि मंदिराचा भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही यासाठी कोणती काळजी घेण्यात येत आहे, हेही विशद केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठापना व्हावी ही मुन्शींची विनंती राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारली. पंडित नेहरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्याच हस्ते नूतन सोमनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली. या मंगलकार्याचे पौरोहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी केले. दुर्दैवाने हा सोहळा पाहण्यास सरदार पटेल हयात नव्हते. परंतु त्यांच्या पश्चात गाडगीळ आणि मुन्शी यांनी हे महान कार्य समर्थपणे तडीस नेले होते.
सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे केवळ एका मंदिराचे पुनरुज्जीवन नव्हते. ती शतकानुशतकांच्या वेदनांवर घातलेली फुंकर होती. तो असीम श्रद्धेच्या अविरत लढ्याचा विजय होता. या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान पुन्हा जागृत झाला.
--- प्रसाद फाटक

