Total Pageviews

Thursday, June 18, 2026

संघर्ष निवारणातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका





हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे आहे. उपेक्षा, प्रखर विरोध आणि स्वीकार अशा टप्प्यांमधून जात ‘जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना’ या लौकिकास पोचलेल्या संघाबद्दल आजवर अनेकांनी लेखन केले आहे. साधारणपणे अशा लेखनाचा भर प्रामुख्याने संघाच्या धार्मिक दृष्टिकोनावर असतो. अशा परिस्थितीमध्ये 'संघर्षप्रवण क्षेत्रातील संघाचे कार्य' हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले ‘कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन - द आर. एस. एस. वे’ हे पुस्तक वेगळे ठरते. या पुस्तकामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब आणि ईशान्य भारत या तीन महत्वाच्या प्रांतांमधील अशांततेच्या अनुषंगाने संघाच्या कार्याचे विश्लेषण केले गेले आहे. 

जम्मू-काश्मीरचा संघर्ष केवळ राजकीय नसून, पाकिस्तान आणि कट्टरपंथी इस्लामी गटांमुळेही प्रेरित आहे, ही संघाची भूमिका स्पष्ट करून लेखक आपल्याला जम्मू-काश्मीरमध्ये संघर्षाच्या काळात पाय रोवून उभे राहिलेल्या संघ स्वयंसेवकांची माहितीही देतात. फाळणीच्या वेळी विस्थापितांना मदत करणे, १९४८च्या पाकिस्तानच्या हल्ल्याच्या वेळी प्रसंगी जीव धोक्यात घालून भारतीय सैन्याला मदत करणे, पुढे घटनेचे ३७० आणि ३५अ हे कलम हटवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे यामधून काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीबद्दलच्या संघाच्या भूमिकेचे सातत्य लेखक उलगडून दाखवतात आणि राजकीय अशांतता असूनही, संघाच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रदेश उर्वरित भारताशी जोडला गेल्याचे प्रतिपादन करतात. 

पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ भरात असताना, संघाने फुटीरतावादी मागण्यांना सातत्याने विरोध करत त्याच वेळी शीख-हिंदूंमधील दरी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. संघाला त्याची किंमतही मोजावी लागली. खलिस्तानी अतिरेक्यांनी 'मोगा' या गावी संघाच्या शाखेवर केलेल्या गोळीबारात वीसहून अधिक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परंतु अतिरेकाला अतिरेकाने उत्तर न देता दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी भरघोस उपस्थितीची शाखा लावून संघाने विधायक उत्तर दिले. संघ स्वयंसेवक आणि नेतृत्वाच्या कणखरपणाची साक्ष देणारी अशी अनेक उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. 

ईशान्य भारतातील - विशेषतः नागालँड, मिझोरम आणि मणिपूरसारख्या राज्यांमधील - अस्थिरतेची समस्या अधिक व्यापक आहे. विविध जनजातींमधील ताणलेले परस्परसंबंध, बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे होणारे लोकसंख्येच्या गुणोत्तरातले बदल, विदेशी अर्थसाहाय्याच्या बळावर स्थानिक जनजातींना मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित करून त्यांना आपली संस्कृती आणि भूमीपासून तोडण्यासाठी चर्चतर्फे केले जाणारे प्रयत्न यांमुळे ईशान्येतील समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या झाल्या असल्याचे प्रतिपादन लेखक करतात. अशा अस्थिर वातावरणात या जनजातींमध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न संघातर्फे सुरू केला गेला. अनेक कार्यकर्ते, प्रचारक यांनी चिकाटीने कार्य करत इथे रुजवलेल्या निःस्वार्थ सेवेच्या मॉडेलवर पुस्तकात विस्ताराने माहिती दिली आहे. 

ईशान्य भारतातील देशविघातक शक्तींच्या निशाण्यावर संघाचे कार्यकर्ते कार्यकर्ते कायमच असून त्यातून संघाच्या प्रचारकांच्या हत्याही झाल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही ईशान्येतील जनजाती समुदायांना आपल्या मूळ सांस्कृतिक ओळखीची जाणीव करून देणे आणि उर्वरित भारताशी असलेले त्यांचे ऐतिहासिक नाते समजावून सांगण्याचे कार्य संघाच्या प्रेरणेतून होत आहे. त्यांची या मातीशी असलेली नाळ घट्ट करण्याच्या संघाच्या प्रयत्नांची ओळख या उदाहरणांमधून वाचकाला होते. 

संघाची कार्यपद्धती हिंदुत्वाच्या मूळ तत्त्वज्ञानावर आधारित असून हे तत्वज्ञान धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आहे, तोच राष्ट्रवादाचा मूलाधार असल्याचे लेखक अधोरेखित करतात आणि त्यातूनच प्रेरित झालेले संघ कार्यकर्ते हिंदू बहुसंख्य नसलेल्या संघर्षप्रवण प्रांतामध्येही शांतता प्रस्थापित कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधतात. अभ्यासक रतन शारदा यांनी यशवंत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पीएचडी संशोधनामध्ये संघाचे विविध ठराव आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विश्लेषण केले होते. त्यामध्ये भर घालून प्रस्तुत पुस्तक साकारले आहे. 

पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ सप्टेंबर २०२५



पुस्तकाच्या शीर्षकात असलेल्या रिझोल्युशन या शब्दाच्या 'निवारण' या अर्थासोबतच 'ठराव' हा अर्थही पुस्तकाच्या परिप्रेक्ष्यात लक्षात घ्यायला हवा. संघाची वाटचाल या ठरावांसोबत पडताळून पाहिल्यास संघाची उक्ती आणि कृतीमध्ये अंतर नाही; परंतु संघाचे कार्य प्रतिकूल प्रसारमाध्यमांमुळे आणि संघ नेतृत्वाच्या प्रसिद्धीपराङ्मुख कार्यशैलीमुळे दुर्लक्षित राहिले किंवा चुकीच्या पद्धतीने मांडले गेले, असा निष्कर्ष लेखक नोंदवतात. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, विपुल संदर्भ आणि आकडेवारी यांच्या आधारे साकारलेले हे पुस्तक संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या वाटचालीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन वाचकाला देईल. 

पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २७ सप्टेंबर २०२५


कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन - द आर. एस. एस. वे 
लेखक : रतन शारदा, यशवंत पाठक 
प्रकाशक : गरुड प्रकाशन 
पृष्ठसंख्या : ४९८ 
किंमत : ५४९ रु.

No comments:

Post a Comment