Total Pageviews

Monday, August 15, 2016

मुंबई-पुणे-मुंबई २ : अपेक्षित अपेक्षाभंग !

पहिल्या भागापेक्षा वरची पातळी गाठणे दुसऱ्या भागाला बहुतांश वेळेस जमतच नाही. त्यामुळे sequel बघताना मी अत्यंत माफक लेव्हलच्या अपेक्षा ठेवतो. त्यामुळे या भागाबद्दलचा माझा अंदाज बरोबरच ठरला.
पहिल्या भागाचे वेगळेपण होते ते त्याच्या संकल्पनेत. कथा जवळपास शून्य असताना फक्त संवाद, अभिनय (आणि लोकेशन्सचा अतिशय खुबीने वापर) यांच्या बळावर चित्रपट मस्त जमला होता. दुसऱ्या भागात एखादी नवी चमकदार कल्पना असणार नाही हे प्रोमोवरून लक्षात आले होतेच. हा मराठी ' हम आपके है कौन आहे' कि काय अशी भीती वाटत होती. सुदैवाने तसे काही इथे नाही. पहिल्या भागाशी धागे जोडणारे भरपूर संदर्भ देत दुसरा भाग पहिल्याशी संवादातून छान जोडून घेतला आहे. (हे कथानक पहिल्या भागानंतरच्या लगेचच्याच काळात घडत असूनही मुक्ताचे केस तेवढ्यात दुप्पट वगैरे वाढलेले दिसतात ते कसे ते मात्र विचारायचे नाही). प्रोमोमध्ये लग्न पुण्यात की मुंबईत यावरच्या नातेवाईकांच्या चर्चा दाखवून एखाद्या कदाचित येऊ शकणाऱ्या conflict बद्दल थोडीशी उत्सुकता वाढवली होती ते सगळे संवाद इथेही आहेत पण प्रत्यक्षात त्याचे पुढे काहीच होत नाही. साखरपुडा बहुतेक चंद्रावर पार पडतो आणि लग्न सुद्धा (एकदाचे !) पुण्यात होणार आहे हे शेवटी काही नातेवाईकांनी प्रेक्षकांना लग्न पुण्यात आहे हे कळावे म्हणून मारलेल्या dialog मधून ("तुमच्या पुण्यातले वाडे म्हणजे अगदी ....!!" वगैरे) कळते. असे असताना प्रोमोमध्ये यावर एवढा जोर का दिला होता कळले नाही. असो.
पहिल्या भागात उल्लेखलेला अर्णव इथे गौरी समोर दत्त म्हणून पुन्हा उभा राहिल्यामुळे गौतम-गौरीच्या प्रेमकथेला 'ट्वीस्ट' आला आहे. अर्णवचे चुका माफ करून पुन्हा गौरीच्या आयुष्यात येणे (आणि पुन्हा गळ टाकून बसणे !) आणि त्याच वेळेस तिला गौतम मधल्या खटकू लागलेल्या गोष्टी यामुळे झालेली तिची द्विधा मनस्थितीच मग चित्रपटाला पुढे घेऊन जाते. कुठल्याही मुलीच्या/मुलाच्या आयुष्यात येऊ शकणारा हा संभ्रम मला त्याहून निर्माण होणाऱ्या शक्यतांमुळे इंटरेस्टिंग वाटला. पण दुर्दैवाने पुढे तो जास्त फुलवला गेलेला नाही. लग्नाला पक्के होऊन काही काळ बाकी असताना "मला आपल्या लग्नाबाबत अजून विचार करायला हवा. माझे नक्की होत नाहीये" असे सांगणारी गौरी एकटी बसून शांतपणे विचार न करताना दिसतच नाही. तिला जर तिचे विचार त्याच्या सतत आजूबाजूला असण्यामुळे इन्फ़्लुएन्स होऊ द्यायचे नसतील ती त्याच्यासोबत फिराबिरायला का जाते हेच कळत नाही. बरं, याचे इतके प्रयत्न चालू असताना त्याचा (आणि त्याच्या घरच्यांचा) चांगुलपणा इतका बदाबदा वाहत असतो तरी तिचे मत त्याच्याविषयी अनुकूलसुद्धा होत नाही. विचार तर काडीचा करत नाही आणि सारखे आपले एकच पालुपद "माझे नक्की होत नाहीये".
एवढेच असते.
चित्रपटाची लांबी १५ मिनिटांनी कमी असती तरीही मी या सिनेमाला above average म्हटले असते. (मध्यंतरानंतरच्या प्रशांत दामले आणि स्वप्नील जोशीच्या प्रसंगामुळे तर माझ्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या होत्या) पण पुढे पुढे सिनेमा इतका ओढत नेलाय (त्यात एक राजश्री किंवा K Jo टाईप "band बाजा वरात घोडी" असले काहीतरी शब्द असलेले गाणे घुसवले आहे ते तर इतके पकाऊ आहे की शेवटाकडे डोळे लावून बसलेल्या म्हाताऱ्याला यमराजाने "थांब हां, एवढी कापूसकोंड्याची गोष्ट संपू दे मग जाऊ" असे म्हटल्यावर म्हाताऱ्याची जी अवस्था होईल तसे माझे झाले होते. अविनाश-विश्वजीतच्या कारकीर्दीतले सर्वात भंगार गाणे असेल हे). शेवटी बरीच भवती न भवती होऊन, गौतमच्या चांगुलपणाचे पाट वाहून त्यात चिंब झालेली गौरी एकदाची बोहल्यावर चढते तेव्हा मी निश्वास टाकला आणि थेटरबाहेर धावलो (मी आयुष्यात पहिल्यांदाच शेवटची श्रेयनामावली न पाहता बाहेर पडलो असेन).
चित्रपट वाईट आहे असे मी म्हणणार नाही. अधेमध्ये काही खरच चमकदार प्रसंग / संवाद आहेत (स्व.जो. मुक्ताला हॉटेलमध्ये 'अर्णवचा फोन होता का?" विचारतो तो प्रसंग), प्रशांत दामलेचा धांसू अभिनय आहे (इतका की हाच सगळा पिक्चर खाणार असेच मला वाटायला लागले). मुक्ताचा चांगला आणि स्व.जो.चा सुसह्य अभिनयसुद्धा plus point. पण तेवढे पुरेसे नाही. एका सुरात बोलणारी आजी (सुहास जोशी), शेवटी अचानक उपटलेला गौरीच्या की गौतमच्या वडिलांचा मोठा भाऊ आणि अश्या बराचश्या गण्या-गम्प्यांचा चित्रपट पुढे/मागे/वर/गर्तेत नेण्याच्या दृष्टीने काडीचाही उपयोग नाहीये. (तो मोठा काका तर निर्माते मंडळींपैकी कोणीतरी असावा आणि त्याने कॅमेऱ्यासमोर येण्याचा कंडू शमवून घेतला असावा असा मला संशय आहे.) संवादाच्या दर्जात अजिबात सातत्य नाही. काही अगदी झकास आणि काही अगदी गटणेसारखे बेगडी. (मुळात पहिल्या भागात इतकी झकास कामगिरी केलेल्या पराग कुलकर्णीलाच दुसऱ्या भागातही पटकथा-संवाद लिहायला संधी न देता अश्विनी शेंडेला का दिली हे राजवाडेच जाणे). मुक्ताच्या घरी अगदी मुक्त वातावरण आहे म्हणून तिला शोभत नसतानाही बळंच short कपडे घालायला लावण्यामागे (आणि ती केवळ ती fashion designer असल्यामुळे ऑफिसमध्ये तिला तिच्या लहान बहिणीपेक्षाही छोटा ड्रेस घालायला देण्यामागे) पिक्चरच्या costume designer आणि दिग्दर्शकाचा विचार काय होता हेही समजू शकले नाही.
चित्रपटात केलेल्या branding / जाहिरातींबद्दल लिहायचे तर मला इथे आणखी एक पुरवणी जोडावी लागेल. त्यातल्या त्यात रेड लेबलची जाहिरात कथेच्या ओघात खपूनही जाते पण प्रभात तूप वगैरेची घुसखोरी मात्र असह्य होते.
असो. एक चांगला होऊ शकणारा चित्रपट मध्यम दर्जापर्यंतच पोचायला नको होता असे वाटते. तरीही तो थेटरवर चांगला चालतोय यात आनंद आहेच. 'प्रेम रतन धन पायो' सारखा तुपकट सिनेमा (प्रभात तूप घातलेला !!) हिट होण्यापेक्षा मुंपुमु २ हिट होणे कधीही चांगले !!

No comments:

Post a Comment