Total Pageviews

Monday, August 15, 2016

शिल्लक Panther

मला आठवते आहे तेव्हापासून रामदास आठवले फक्त मंत्रीपद मागतानाच दिसत आलेले आहेत. पक्षाचा एकच खासदार (म्हणजे ते स्वतःच) असूनही थेट कॅबिनेट मंत्रीपद मागण्यात कुठलाही संकोच/लाज न वाटणारा माणूस... आणि ते मिळाले नाही व पुढच्या वेळीस निवडणुकीत पराभव घडवून आणला गेला म्हणून कॉन्र्ग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली , एवढेच नव्हते तर भाजपची लाट असल्याने मंत्रीपदाची आशा होती म्हणून एकेकाळच्या हाडवैरी भाजप/शिवसेनेसोबत गेलो असे आडपडदा न ठेवता सरळसोटपणे सांगणारा हा माणूस. त्याच्या विचार/कृती/बोलणे यात काडीमात्रही खोली असेल शंकाही येऊ शकत नाही. मग हा माणूस अजूनही या जगड्व्याळ system मध्ये टिकून कसा असा एक चिरंतन प्रश्न....
नानू सरंजामेसारखे कपडे, थुकरट चारोळ्या, धृतराष्ट्रासारखी उर्ध्वदिशेला असणारी नजर, ढेकरेच्या आवाजातले बोलणे ही बहुतांश पांढरपेशांना असणारी रामदास आठवले यांची ओळख. त्यामुळे आठवले म्हटले की पहिला सूर लागतो तो चेष्टेचाच. शिवाय या अवताराला असणारी निळ्या झेंड्यांची प्रभावळ, उठता बसता कुठलीही गोष्ट बाबासाहेबंपार्यंत पोचवायची सवय वगैरे गोष्टीमुळे कुचेष्टेला एक श्रेष्ठ-कनिष्ठतेचेही अस्तर....
कालपरवापर्यंत रामदास आठवलेंकडे पाहण्यासाठी पाहण्याकडे माझ्याकडेही एकच चष्मा होता. नाणे जमिनीवर पडले असेल की त्यःची एकच बाजू दिसत असते. पण हवेत उसळलेल्या नाण्याकडे जरा नजर वर करून पहायची इच्छा दाखवली तर छाप्यापलीकडचा काटाही दिसून येतोच. आठवले या माणसाबद्दल अलीकडे फेसबुकच्या कृपेने काही गोष्ट वाचनात आल्या. ते वाचून असे वाटले की आपण आत्तापर्यंत किती मर्यादित नजरेतून बघत होतो. हेही लक्षात आले की कुणी कितीही चेष्टा केली तरी बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शेकडो चिंध्या झाल्या आहेत त्यात किमान रुमालाच्या आकाराचा म्हणावा असा गट एकट्या रामदास आठवलेंचा रिपाई(आटवले गट) हा पक्ष आहे. सहा महिन्याच्या वयात वडील जग सोडून गेल्यावर प्रचंड खस्ता खाऊन वाढवलेला हा माणूस.. दलित panther या वादळी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ इ प्रभृतींसोब्त एकेकाळी आख्खा महाराष्ट्र हलवून सोडलेला आहे. अजूनही सतत कार्यकर्त्यांमध्ये असणारा हा माणूस आहे. प्रत्येक जिल्ह्यात याचा गेली तीसेक वर्षे सातत्याने संपर्क आहे. एकदा का होईना पण लोकांनी संसदेत निवडून दिले एवढी ताकद अजूनही त्यांच्यात आहे. माझ्या एका पत्रकार मित्राचे निरीक्षण असे

ही आहे की दलित अस्मितेवर आयुष्यभर राजकारण करूनही ब्राह्मणांबद्दल विखार (जो इतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये आणि आतातर सर्व ब्रिगेडी मंडळींमध्ये असतो) तो यांच्यात नाहीये. शिवाय ते उठता बसता इतर रिपब्लिकन (आणि अन्यही कुठल्याही नेत्यांबद्दल टीका/कुरापती वगैरे भानगडी कधी दिसत नाहीत. हा माणूस मंत्रीपदाचा भुकेला आहे हे त्याने कधीही लपवून ठेवलेले नाही. त्या दुर्ष्टीने तो स्वार्थी असेलही पण ताकाला जाऊन भांडे लपवणारा (आणि कार्यकर्त्यांसाठी मंत्री व्हायचंय, विचारसरणीच्या लढ्यासाठी सत्ता हवीये, सत्तेसाठी लाचार होणार नाही/स्वाभिमान/वाघ सिंह शेळीच्या उपमा देत भुंकत राहणे वगैरे भंपकपणा करणारा ) भामटा वाटत नाही. (ढाण्यावाघाची गम्मत म्हणजे आपला बोलण्याच्या जोशातला एक वाग्बाण एवढेच. त्याला अर्थ/खोली वगैरे (नेहमीप्रमाणेच) नाही !)
एकुणात आठवलेंबद्दल मी अलीकडे सहिष्णू झालोय एवढे मात्र खरे.
यापुढे मी आठवले स्पेशल चारोळ्या किंवा त्यांच्या झगमग कपड्याची किंवा त्यांच्याकडच्या एकूणच गाम्भीर्याच्या अभावाची रेवडी उडवणे सोडून देईन असे अजिबात नाही, पण त्याचवेळी हा माणूस कवाडे-गवई-ढसाळांच्या काळापासून ते आनंदराज आंबेडकर-बापूसाहेब भोसले वगैरे बाबासाहेबांच्या वारशाच्या गफ्फा करणाऱ्या आजकालच्या दीडदमडीच्या नेतुकल्यांच्या काळातही रेस मध्ये आहे, एवढेच नव्हे तर (येनकेन प्रकारे का असेना) विनमध्ये येऊ शकणारा एकमेव घोडा आहे एवढे भान नक्कीच ठेवेन
ता.क. : रामदास आठवलेंवर अजून प्रकाश टाकणारा हा लेख नक्की वाचा :

http://www.livemint.com/Politics/zgbWKrkpLlJvVXJcoqA31O/Ramdas-Athawale-poet-painter-exDalit-Panther.html

 (९ जुलै २०१६ ची पोस्ट)

No comments:

Post a Comment