Total Pageviews

Monday, August 15, 2016

Mr & Mrs

गोष्ट आहे एकेकाळी छोटा पडदा गाजवलेल्या पण एका काम नसलेल्या अमित जयंत या अभिनेत्याची. १० वर्षापूर्वी कुणीतरी केलेल्या  अभिनयक्षमतेच्या कौतुकावर आजही मिशीला तूप लावून फिरतोय. अजूनही ताठा भरपूर. एकदा चान्स मिळाला तर 'छा जाउंगा' वगैरे प्रौढी मिरवतोय. मालाला आता उठाव नाही हे मानायला राजी नाहीये. रोजच्या घरखर्चासाठी देखील बँक मध्ये नोकरी बायकोवर अवलंबून. तिच्याशी खटके उडणे, वादावादी नित्याचीच झालेले. बायकोशी बँकेतल्या सहकाऱ्याशी असणारी मैत्री डोळ्यात खुपत आहे. अशातच एक निर्माता मित्र अश्विन घरी येतो तेव्हा त्याच्या "कसं चाललंय ?" या प्रश्नाला उत्तर देताना अमित म्हणतो "बायकोपासून घटस्फोट घ्यावासा वाटतोय". धंद्यात तरबेज असलेला अश्विन त्याला ऑफर देतो "मी तुझा घटस्फोट विकत घेतो. आपण एक मस्त reality  show करू. तू बायकोशी संबंध बिघडवत न्यायचे. आपण घरात सगळीकडे छुपे कॅमेरे लावू. तुझ्या कानात इयरपीस लावून त्यावर मी तुला सूचना देणार. बघ तुझा २ महिन्यात घटस्फोट होतो की नाही. show तर कमालीचा हिट होणार राखी सावंतचे लग्न लोकांनी चवीने पाहिले तुझा घटस्फोट का नाही बघणार !!" आणि बदल्यात ऑफर देतो 'प्रत्येक एपिसोडचे ४ लाख रुपये'.

पैशाची हाव सुटलेला आणि बायकोला वैतागलेला अमित ऑफर स्वीकारतो आणि सुरु होतो नातेसंबंध उद्ध्वस्त करणारा reality show !!!  स्क्रिप्टेड भांडण करण्यासाठी / गैरसमज पसरवण्यासाठी बऱ्याच गोष्टी plant करूनसुद्धा बायकोच्या त्याच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे ते प्रयत्न फोल ठरतात. आपण काय करून बसलो आहोत हे त्याला कारण तोपर्यंत तो निर्माता आणि channel चे फक्त माकड बनून गेलेला असतो. << ज्यांना नाटक पहायचे आहे त्यांच्यासाठी यापुढचा मजकूर Spoiler असू शकतो --->  अमित नकाराचा प्रयत्न करू पाहतो तेव्हा त्याच्या बायकोच्या मित्राला गळाला लावून अश्विन अजून मोठा गेम खेळतो. reality शो अजून चमचमीत व्हावा म्हणून बायकोच्या पर्स मध्ये condom plant करून अमितला तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढायला भाग पाडतो. या सगळ्याने मोडून पडलेली बायको, या सर्व गोष्टी पूर्वनियोजित आहेत हे माहित असूनही अश्विनच्या हातातले खेळणे बनून सगळे काही निमूटपणे बघणाऱ्या अमितला सोडून घराबाहेर पडते. ती बाहेर पडत असताना कानातल्या इयरपीस मधून “घटस्फोटाच्या कागदावर सही घे ... तरच हा शो पूर्ण होईल” असे बोम्बल्णाऱ्या अश्विनकडे दुर्लक्ष करत हताश झालेला अमित इयरपीस काढून ठेवतो.... आणि नाटक संपते .... <--- Spoiler संपला >

निलेश-असलम या जोडगोळीने लिहिलेल्या नाटकाची कल्पना अभिनव आहे. घटस्फोटाचा reality शो ही कल्पना तर मला अजिबात अतिरंजित वाटली नाही. सध्या emotional अत्याचार किंवा बिग बॉस वगैरे (scripted असूनही वास्तवाचा आभास निर्माण करणाऱ्या) शोज मधून इतरांच्या आयुष्यातली लफडी जिभल्या चाटत बघणारे प्रेक्षक आपणच असतो. नाटकात जोडप्याच्या घरात लावलेले छुपे कॅमेरे जे दृश्य टिपत आहेत ते आपल्याला प्रेक्षागृहात लावलेल्या LCD स्क्रीन वर देखील दिसत असते त्यामुळे प्रयोगाला वेगळाच उठाव येतो आणि आपण त्या reality शो चा भाग झाल्यासारखे वाटते.  नाटकाचा शेवट हा सुखांत न केल्याबद्दल लेखक दिग्दर्शकाचे विशेष कौतुक. reality शो मध्ये अनेक प्रायोजकांची नावे / लोगो दिसत राहावेत यासाठी अमितला कराव्या लागणाऱ्या कसरती आपली करमणूक करतात खरी पण त्याला असणारी प्रत्येक गोष्टीच्या विकाऊपणाची किनार अस्वस्थ देखील करते. सगळ्यात कहर होतो तो अमित बायकोची पर्स उघडतो तेव्हा. “तुझ्या पर्स मध्ये condom ?” असे तो उद्विग्न होऊन विचारतो तेव्हा कानातल्या ईयपीस मध्ये अश्विन ओरडतो “brandचे नाव घे...” काहीही विरोध करण्याच्या अवस्थेत नसलेल्या अमितच्या तोंडातून पुन्हा सुधारित वाक्य उमटते – “तुझ्या पर्समध्ये कोहिनूर condom ?” एरवी अत्यंत हास्यस्फोटक होईल असा हा प्रसंग या ठिकाणी पाह्त्ना मात्र अख्खे आयुष्य बाजारू करायला निघालेल्या वृत्तीची आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या ‘गिऱ्हाईका’ची अक्षरशः घृणा येते !

नाटकाला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने दिलेली treatment मुद्दामुनच reality show सारखी भडक आणि लाऊड आहे. नाटक गंभीर विषयावरचे असले तरीही नाटकात हशे मिळवणाऱ्या जागा भरपूर आहेत त्यामुळे पूर्वार्ध बर्यापैकी हलकाफुलका आहे.  मधुरा वेलणकरने समरसून केलेली भूमिका अभिनयाच्या आघाडीवरची सगळ्यात जमेची बाजू. विवेक गोरेने उभा केलेला अश्विन देखील चोख. मधुराच्या मित्राच्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत माझा मित्र अक्षय शिंपीने केलेले काम सुद्धा मस्त ! त्याला अजून मोठ्या लांबीच्या भूमिका मिळाल्या तर मजा येईल. राहता राहिला अमित जयंत अर्थात चिन्मय मांडलेकर. सदैव कपाळावर आठ्या पाडून अभिनय करणारा तिरसट तारू चिन्मय आपण बराच काळ बघत आलोय. "त्याला भूमिका तशाच मिळाल्या आहेत" असे असे वाटून वेगवेगळ्या छटा असणारा रोल एखादा तरी त्याला मिळण्याची मी वाट बघत होतो. अखेर तो इथे मिळालाय आणि त्याने सिद्ध केलंय की  …… तो किती अपूर्ण अभिनेता आहे. Slapstick कॉमेडी पासून ते भावनांच्या उद्रेक पर्यंत सगळया छटा असणाऱ्या भूमिकेची अतिशय कृत्रिम अभिनयाने त्याने पार वाट लावली आहे. अश्विनला नकार देण्याच्या प्रसंगातले त्याचे भावपूर्ण स्वगत त्याने इतक्या अतिरिक्त वाकड्या तिकड्या चेहऱ्याने म्हटले आहे की बघवत नाही. म्हणजे marcel marceau ने ते बघितले असते तर स्वतःचे mimes बंद करून याचे शिष्यत्व पत्करले असते. विलक्षण बोलका चेहरा, विनोदाची उत्तम जाण पण तरीही संयत अभिनय करण्याची क्षमता असणारा सुमित राघवन या नाटकात असता तर काय बहार आली असती. (दुसरे एक नाव आठवते ते म्हणजे जितेंद्र जोशीचे – मला तर अनेक छटा असणारी कुठलीही भूमिका दिसली की तिथे जितेंद्र जोशीच फिट्ट बसेल असेच वाटते).

नाटकात आणखी एक खटकलेली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ठेहराव नाही. अनेक वेळेस यातली पात्रे इतकी चटकन - आधीच programmed असल्यासारखी – react होतात की त्यामागे काही विचार आहेत का नाही असाच प्रश्न पडतो. मोठ्ठ्या pauses बद्दल विक्रम गोखलेंची बऱ्याचदा चेष्टा होते पण या नाटकाचा प्रयोग पाहताना pauses महत्वाचे आणि प्रभावी अंग असते हे फार जाणवते !
असो. एकुणात नाटक अगदी आजच्या काळाचे आहे. आता याचे शेवटचे काही प्रयोग होणारा आहेत. संधी मिळाली तर नक्की बघा !!

(८ ऑगस्ट २०१६) 

No comments:

Post a Comment