Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'झोंबी' : दुर्दम्य आशावादाची कहाणी




ग्रामीण जीवनातल्या कष्ट, दारिद्र्याचा आणि अन्नाच्या दाण्यापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्याशी कराव्या लागलेल्या झोंबाझोंबीचा जिवंत अनुभव म्हणजे आनंद यादव यांचे आत्मकथन ‘झोंबी’. साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवली गेलेली संघर्षगाथा. हे एका अर्थाने संपूर्ण ग्रामीण जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे कथनच, कारण थोड्याफार फरकाने गावगाड्यातील असंख्य लोकांच्या वाटेला याच गोष्टी येऊन गेलेल्या आहेत आणि अजूनही येत असतात. अर्थात त्यातूनही तावून सुलाखून निघणारे आनंद यादवांसारखे विरळाच !

कष्टकऱ्यांच्या आयुष्यातल्या हालअपेष्टांची कल्पना शहरातल्या सुखवस्तू लोकांना येणे फारच अवघड आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीची परिस्थिती अजूनच कठीण ! कारण शहरात चौकोनी कुटुंबात टुकीने राहणे वेगळे आणि पदरात पैसा असण्याची मारामार असताना खेड्यापाड्यात ढोरांच्या खिल्लारासारखे कुटुंब हाकणे वेगळे. पोरानं तालमीत अंग कसलं आणि परसात शेत कसलं म्हणजे ‘जल्माचं कल्यान झालं’ अशी समजूत असण्याच्या काळात आनंद यादव यांनी परिस्थितीशी झगडून चुकत माकत का होईना मॅट्रिक पास होऊन दाखवणे म्हणजे मोठीच कामगिरी म्हटली पाहिजे !

पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला झटके बसायला सुरुवात होते. आनंद यादवांच्या आईचं लग्न एक वर्षाची असतानाच झालेलं होतं. पोरगी जन्माला आल्यापासून तिच्या सासरी जायच्या दिवसापर्यंत दिवस मोजणं, ‘पोरगी वयात आल्यावर सासरीच जायची, तिला चांगलंचुंगलं खायला घालून करायचंय काय’ अशी भयानक विचारसरणी आपल्याला दिसायला लागते. यादवांच्या घरातले वातावरणही तसे गढूळच. आजोबांपासून भाऊबंदकी चालत आलेली. वडील रत्नाप्पा आणि आई तारा यांचं उभं आयुष्य कष्टातच गेलं. कुळाची शेतं कसता कसता हातातला थोडासा पैसा देखील गळत गळत गेला. पुढे तर कष्टाचे पैसेही मिळेनासे झाले. त्यात भर म्हणून घरात तब्बल डझनभर तोंडं ! ताराच्या पोटी अक्षरशः रतीबासारखी पोरं जन्माला आली. अवघ्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत आठ बाळंतपणं झेलून तारा अक्षरशः मेटाकुटीला आली होती. पण तरीही रत्नाप्पाची पोरं जन्माला घालायची हौस काही फिटत नव्हती. एवढ्या लेंढारात बुकं शिकला तो एकटा आनंद. पण शिकला तो असा शिकला की आई बापाच्या जन्माचं सार्थक झालं.

पण हे शिक्षण सहजसाध्य नव्हतं. रत्नाप्पाने आनंदाच्या शिक्षणात पदोपदी मोडता घालायचा प्रयत्न केला. पोरगा शिकल्याने काही चांगले होणार आहे हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. पोराला मळ्यावर राबराब राबवलं. स्वतःच्या जीवाला मात्र तोशीस लागू दिली नाही. थोडीशी जरी चूक झाली तर बायको-पोरांच्या हाडाची भुकटी करायला मागेपुढे रत्नाप्पा पहायचा नाही. पुस्तक वाचताना त्या माराची वर्णनं वाचायला अगदी नकोसं होतं. बायको म्हणजे काय आपली खाजगी मालमत्ताच अशीच बापाची समजूत. त्यामुळे बडवलं नि तुडवलं काय, बायकोला तोंड वर करून बोलायचा हक्क नाही. अशा हजारो तारा आजही अस्तित्वात आहेत ही जाणीव पुस्तक वाचत असतानाही मला अस्वस्थ करत होती. एकतर गावातलं आयुष्य खडतर. सगळेच कामाचा भर सोसणारे. पण बाईमाणूस त्यातही तळाशी. सगळ्या शरीराचा भार जसा पायावर होतो तसा हा समाजव्यवस्थेचा, अतिकष्टाचा भार स्त्रीवरच. तान्ह्या पोराचं दूध, धन्याची भाकरी, गोठ्यातल्या शेण्या अन् मळ्यातली कापणी.... सगळीकडे गुरापेक्षा जास्त राबायचं आणि वर नवऱ्याची मर्जी फिरली की तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा.

या पुस्तकात आणखी एक भयंकर प्रकार वाचायला मिळतो, तो म्हणजे माती खाऊन आयुष्याची माती झालेली आनंदाची भावंडं...  घरी खरोखर अन्नान दशा. जेवायला कुणालाच धड नाही. मग काहीतरी पोटात ढकलायचं म्हणून माती खायची सवय ! माती खाऊन खाऊन सगळ्यांची शरीरं सुजली, अशक्त झाली. हिरा नावाची एक बहिण तर पंधराव्या वर्षीसुद्धा माती खाई... हे वाचूनसुद्धा पोटात ढवळायला लागते.

इतक्या बिकट परिस्थितीतूनही आनंद शिकला. बापाचा मार अंगात मुरवतच शाळेत गेला. फाटके कपडे, मळकं अंग, घाण वास हे त्याचे कायमचे सोबती. पण त्यातही काही देवदूत भेटले. सणगरांचा आबाजी, शाळेतले जिव्हाळ्याचे मास्तर यांनी आनंदाची परिस्थिती जाणून त्याला मदत केली. पण पुढे हायस्कुलात मात्र फार कटू अनुभव आले. अनेकांनी परिस्थिती माहित करून न घेताच शिक्षा केल्या. तर काहींनी सगळे माहित असूनही केवळ आपलं वर्चस्व गाजवायचं म्हणूनही शिक्षा केल्या. एवढ्या दिव्यातून पार पडून, बैलागत काम करून आनंदा बापाशी भांडून घरातून पळून गेला आणि तरीही पुढे एसएसस्सीच्या परीक्षेच्या दिव्यातून पार कसा झाला आणि ऐपत असूनही फ्रीशिप पदरात पाडून घेणाऱ्या सहाध्यायींच्या नाकावर टिच्चून संस्कृत विषयात पहिला कसा आला याची रोमहर्षक कहाणी मुळातूनच वाचायला हवी.

पुस्तकात छोट्या छोट्या घटनांमधून लहान वयातल्या आनंदाचा विचारीपणा, समंजसपणा लिखाणात येत राहतो. गांधीजी आदर्श असूनही त्यांची हत्या हा गावातल्या ब्राह्मणांचा दोष नाही हे लक्षात घेण्याचा समजूतदारपणा आनंदमध्ये वयाच्या बारा-तेराव्या वर्षीच आला होता आणि त्यामागे निःसंशयपणे शिक्षणातून येत गेलेल्या शहाणपणाचा मोठा वाटा होता. वडिलांचा स्वभाव शिक्षणाला प्रतिकूल असूनही त्यांच्याबद्दल कडवटपणा लिखाणात जाणवत नाही. उलट लहानपणी बारीकसारीक चोऱ्या करायची सवय लागल्याचे कळल्यावर वडील ‘एके दिवशी दरोडेखोर होशील’ असे म्हणाले तेव्हा त्यावर तीव्र प्रतिक्रिया न देता त्यातून योग्य तो बोध घेऊन आनंदाने चोरणं बंद केल्याचही दिसून येतं.

पुस्तकात वापरलेली भाषा ही दोन पातळ्यांवरची आहे. आनंद यादवांनी आईबाप आणि भाऊबंदांचे संवाद, लहानग्या ‘आंद्या’च्या मनातले विचार यासाठी ग्रामीण ढंगाची भाषा वापरली आहे. त्यात शिव्यांचा सुकाळ आहे हे ओघाने आलंच. त्याचबरोबर त्या काळाची किंवा एखाद्या घटनेची यादव जेव्हा त्रयस्थाच्या भूमिकेतून नोंद घेतात तेव्हा तिथे प्रमाण मराठी वापरलेली आहे. परंतु यात कुठेही कृत्रिमता येत नाही किंवा जोडकाम केल्यासारखेही वाटत नाही. पुस्तकातली निवेदन शैली एकप्रकारचा कोरडेपणा आणि थंडपणा घेऊन येते. म्हणजे असं की अनेकदा घटनांचे वर्णन अगदी किरकोळीत येते आणि त्यामुळे ते जास्तच अंगावर येते. जणू इतके टक्के-टोणपे खाल्ल्याने भाषेलाही एक सुकट रापच चढलेला असावा ! वानगीदाखल सांगायचं तर ‘तीन पोरं घरात जगली’ किंवा ‘ताराचा भाऊ आईच्या मढ्यावरच दूध प्याला’ अशी वरवर निर्विकार भासणारी वाक्ये मणक्यातून थंडपणे सरकत जातात आणि कमालीचं हादरवून करून सोडतात.

अर्थात एवढ्या अडथळ्यांचे वर्णन असूनही पुस्तकात कुठेही दीनवाणेपणाचा सूर नाही. उलट एवढ्या घडामोडींनी भरलेले आनंद यादव यांचे बालपण वाचून संपवले तेव्हा मला सकारात्मक उर्जेने भारल्यासारखे वाटत होते.

आनंद यादव अगदी परवा परवाच आपल्याला सोडून गेले, पण जाताना मागे दुर्दम्य आशावादाची ‘पॉवर बँक’ ठेवून गेले आहेत. ती अनुभवायलाच हवी. याशिवाय ‘झोंबी’चं आणखी एक खास आकर्षण म्हणजे त्याला लाभलेली आपल्या लाडक्या पुलंची प्रस्तावना ! म्हणजे हा तर डबल बूस्टर झाला !

चला तर मग, झोंबी वाचून ‘चार्ज’ होऊया !


जाता जाता :

आनंदाच्या रोमहर्षक प्रवासाचे ‘झोंबी’च्या पुढचे टप्पेही नांगरणी, घरभिंती आणि काचवेल अशा तीन पुस्तकांच्या  रूपाने उपलब्ध आहेत. माझे ते वाचून झालेले नाहीत, पण तेही तितकेच चांगले असतील याबद्दल मला खात्री आहे.


मेहता प्रकाशन,

पृष्ठे ४०८, किंमत ३२०

आवृत्ती सतरावी

'देव चालले' : स्थित्यंतराची गोष्ट



‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो. जागा सोयीची वाटली तर काही काळ (कधीकधी शे-दोनशे वर्षंसुद्धा) पथारी पसरतो. पुन्हा आधीच्यांपैकीच कुठल्यातरी कारणाने पायात वहाणा चढवून चालू लागतो. मागे सांडलेली काही शितं, काही आठवणी त्याला व्याकूळ करून सोडतात खऱ्या, पण त्याने तो जायचा थांबतोच असे नाही. दि.बा. मोकाशी लिखित ‘देव चालले’ हे अशीच एका स्थित्यंतराची गोष्ट आहे. कुटुंबाची आणि त्यांच्यासोबत नव्या दिशेने जाण्यासाठी निघणाऱ्या त्याच्या दैवताची.

दीर्घकथा म्हणता येईल असे या पुस्तकाचे स्वरूप. त्यातही घटना फार कमी. घालमेल आणि घुटमळणं मात्र बरंच. पळसगावात जोश्यांचं वडिलोपार्जित घर आहे. घरातले सगळेजण पोटापाण्यासाठी कधीच बाहेर पडलेत. अपवाद फक्त दोघांचा. एक काकू आणि दुसते तिच्या सोबतीला असणारे त्यांचे दैवत, नरसिंह – ज्याला ते सर्वजण नरहरी म्हणतात. त्यापैकी काकूला आता वयोपरत्वे देवाचे काहीच करणे शक्य होत नसल्यामुळे नरहरीसुद्धा आता प्रस्थान करणार आहे. नरहरीची मूर्ती घेऊन जायला काकूचा थोरला पुतण्या आबा त्याच्या बायकामुलांसह आलेला आहे. घरातले देवाचे शेवटचे कार्य म्हणून बाकीचे पुतणे रामू, नरू आणि जगूसुद्धा आलेत. देव घरातून हलण्यापूर्वीचे २ दिवस एवढाच विस्तार आहे या कथेचा.

विस्तार छोटा असला तरी चारही भावांच्या मानसिक आंदोलनांमधून त्यांच्या स्वभावाच्या छटा फार कुशलेतेने दाखवून दिल्या आहेत मोकाशींनी. आबा सश्रद्ध आहे, त्याने कष्टाने स्वतःचा शहरात जम बसवला आहे आणि तो गाठीशी चार पैसे साठवून आहे. नरूची भक्ती फक्त पैशावर आहे, इतकी की देवाच्या नावाचा उपयोगसुद्धा त्याने पैसे कमावण्यासाठी केलेला आहे. दोन दिवसापुरता आपल्या जुन्या घरात येऊनसुद्धा त्याचा श्वास गुदमरतो आहे. जगू नास्तिक आहे त्यामुळे देवाशी सख्य नसले तरी घराच्या जुन्या आठवणींमध्ये तो रमला आहे. रामू मात्र दीनवाणा आहे. खूप गरिबीत दिवस काढतोय. त्यातून वर येण्यासाठी सदैव भावडांकडून कृपेची अपेक्षा करतोय आणि मोकाशींच्याच शब्दात सांगायचे तर लोकांनी आपल्या गरिबीची कीव केल्याचा त्याला विकृत आनंदही मिळतो. तो कमालीचा देवभोळा आहे खरा, पण त्या भक्तीमागे देखील परतफेड म्हणून देवाच्या कृपेची वाट बघणे आहे.

काकू मात्र इथेच आहे.... कधीपासून .... नवरा कधीच निवर्तलेला.. बाकीचे आप्त कधीच दूर गेलेले.. आता तर नरहरी पण चाललाय. घराचे वासेच काय ते सोबतीला असतील आता ... पण मग तरीही ती का थांबतीये ? आबाने तिला सोबत घेऊन घरी जाण्याची तयारी दाखवूनही ती का जात नाहीये ? उत्तर नाही ... काही पाश तुटत नाहीत हेच खरे. मला तर या काकूचं गोनीदांच्या ‘पडघवली’ मधल्या अंबू वहिनीशी खूप गहिरं नातं वाटतं. दोघीही बदलत्या वाऱ्याला आणि कोसळत्या काळाला न जुमानता गावाशीच निष्ठा अभंग ठेवून शेवटी तिथेच विरघळून जातात.

पुस्तकात एकेका पात्राच्या मनोवस्था, त्यांची आंदोलनं दि. बा. मोकाशींनी इतक्या प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत की ते वाचताना माझ्या मनातही असंख्य तरंग उठत होते. ‘देव घरातून हलणे’ हे फक्त एक प्रतीक आहे. देवाला काय, आहे तिथे राहिल्यानेही फरक पडत नाही आणि बाहेर पाडूनही. पण खरेतर हे प्रातिनिधिक चित्र आहेत ते देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास आपला गावगाडा सोडून नव्या क्षितिजांच्या शोधात निघालेल्या कुटुंबांचे आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही जणांच्या कालविसंगत वृत्तीचे देखील. गावात सहज फेरफटका मारायला निघालेल्या जगूला भेटणाऱ्या ‘गोविंदा’ या त्याच्या जुन्या परिचिताच्या पात्रामधून मोकाशी हे थोडक्यात पण नेमकेपणाने सांगून जातात. ‘कसेल त्याची जमीन’ या नव्या कायद्याने एका फटक्यात पांगळा झालेला हा गोविंदा स्वतःच्याच निष्क्रियतेने झालेल्या अवस्थेचे खापर सरकारवर फोडतोय. गावातून बाहेर पडणाऱ्या लोकांनीच आपल्यासाठी काहीतरी करायला हवे अशी त्याची ऐदी मानसिकता आहे. बोलताना जुन्या वैभवाच्या गप्पा करणारा पण आत्ता हातपाय हलवायचेही जीवावर आलेला गोविंदा एका अर्थाने रामूच्या दीनवाणेपणाशीच नाते सांगतो. वेळच्या वेळी नवे वंगण न घातल्याने कुरकुरत अखेर गंजून जाणाऱ्या अनेक कुटुंबांची हीदेखील प्रातिनिधिक कहाणीच.

कथानकाच्या शेवटी शेवटी घरात संन्यासी काकाचे पात्र एक वेगळेच वादळ निर्माण करते. संस्यासाश्रमात असूनदेखील कधी इतरांना आणि कधी स्वतःलाच फसवत वासनेच्या फेऱ्यातून मुक्ती न मिळालेला पडणारा विक्षिप्त काका एका अजब मनुष्यस्वभावाचे रूप उघडे करतो. पण अखेर ते एक पेल्यातले वादळच ठरते. सरोवराचा पृष्ठभाग कुणीतरी मारलेल्या एखाद्या खड्यामुळे डहुळला जावा आणि ते तरंग हळूहळू विरत जाऊन पुन्हा एकदा त्या सरोवराने धीरगंभीर मुद्रा धरण करावी तसे काकूचे आणि सोबतच्या त्या खिन्न वाड्याचे जगणे पुढच्या पानावर चालू राहते...

अशा प्रकारच्या पात्रयोजनेमुळे आणि प्रसंगयोजनेमुळे ‘देव चालले’ हे केवळ नॉस्टाल्जिया निर्माण करणारे कथानक राहत नाही तर ते मध्यमवर्गीय मूल्ये जपणाऱ्या कुटुंबांच्या स्थित्यंतराचे स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या प्रातिनिधिक डॉक्युमेंटेशन ठरते (त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आलेल्या महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ने हेच काम अधिक विस्ताराने केले. त्यामुळे मला स्वतःला ‘देव चालले’ आणि ‘वाडा...’ चे गोत्र कायमच एक वाटत आले आहे).

पुस्तकाच्या अगदी शेवटच्या पानावर येणाऱ्या लोलकाच्या सप्तरंगी प्रकाशाच्या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय हा पुस्तक परिचय अपूर्ण राहील. केवळ काही ओळींचा हा प्रसंग खऱ्या अर्थाने cinematic आहे. एखादा श्रेष्ठ दिग्दर्शक चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात मास्टर स्ट्रोक खेळून आपल्या कलाकृतीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो तसंच या ठिकाणी दि. बा. मोकाशींनी केलेलं आहे.

आपल्या बहिणीचे जगूशी लग्न जुळवून देण्याचा प्रयत्न करणारी त्याची वहिनी – आबाची बायको – आणि त्यातून तिची बहिण आणि जगूमध्ये फुलू पाहणाऱ्या प्रेमाचे उपकथानक मात्र ठिगळ लावल्यासारखे वाटते. त्याने काही साध्य झाल्यासारखे वाटत नाही. पण ते वगळता अतिशय हृद्य अनुभव देणारे हे पुस्तक आहे. काळ वेगाने बदलत जात असताना काही जण योग्य तो मुक्काम सापडेल याची खात्री नसतानाही मिळेल ती गाडी पकडून पुढे निघून गेले आणि ज्या लोकांना हे जमलेनाही ते कवटाळून बसले जुन्या गोष्टींना....

कोण चुकला, कोण बरोबर हे आपण नाही सांगू शकत... ते ठरवणारे आपण कोण?

आणि ठरवणारे कदाचित कुणी असेलच तर तो नरहरीच !!!


देव चालले

लेखक: दि. बा. मोकाशी

पृष्ठे : ८९

आवृत्ती दुसरी

मॅजेस्टिक प्रकाशन




mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2016/11/19/Book-Review-Dev-Chalale-Marathi-Book.html



डॉ. खानखोजे : नाही चिरा ...



देशाला स्वातंत्र्य मिळून जुनं झालंय. काही ठराविक नावे वगळता स्वातंत्र्यसंग्रमातल्या प्रसिद्ध व्यक्तींचाच विसर पडलाय, मग अप्रसिद्ध/अप्रकाशित अग्रणींची आठवण राहणे कसे शक्य आहे ? त्यामुळेच पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाच्या प्रखर क्रांतिकारक, एक उत्तुंग कृषितज्ञ अस्तित्वात होता हे सत्य चारचौघांशिवाय फारसे कुणाला ज्ञातच नाही. त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्यासाठी पराकाष्ठा करत होते त्या सर्वांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की खानखोजे यांच्या इतका आवाका, संचार फार कमी लोकांचा असेल. चित्रपटातसुद्धा सापडणार नाही इतके वादळी जीवन जगलेला हा क्रांतिकारक ! या विलक्षण व्यक्तिमत्वाचा ७ नोव्हेंबर हा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्यावर वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आणि त्याद्वारे या महान व्यक्तिमत्वाची ही ओळख.

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्ध्याचा, १८८४ सालचा. १८५७ च्या क्रांतीत सहभाग घेतलेल्या आजोबांचा घरात वारसा लाभलेला. लहान वयातच पांडुरंग खानखोजे यांनी विविध संघटनांची स्थापना केली आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेऊन क्रांतिकार्य अधिक व्यापक करायला सुरुवात केली. १९०३ साली लग्नाच्या आदल्या दिवशीच चक्क समर्थ रामदासांप्रमाणे पलायन केले. काही काळ हैदराबादमध्ये राहून वर्ध्यास परतले पण तोपर्यंत देशकार्याचा निर्धार अधिकच पक्का झाला होता. दुसरे लग्न करण्यासही घरच्यांना नकार दिला आणि पुन्हा घर सोडले. स्वतःची सर्कस काढली त्याद्वारे नेमबाजी आणि कसरतींचे शिक्षण, लोकजागृती असे अनोखे मार्ग चोखाळले. परंतु एका वादळात सर्कशीची अपरिमित हानी झाल्याने त्याचा नाद सोडावा लागला. मग शिफारसपत्र घेऊन पुण्यात दाखल होऊन थेट लोकमान्य टिळकांची भेट घेतली. अमेरिकेत जाऊन रणशास्त्र शिकून त्याचा वापर क्रांतीकार्यासाठी करावा असा टिळकांनी सल्ला दिल्यामुळे खानखोजे अधिकच प्रेरित झाले. अमेरिकेहून परतलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांची भेट घेतली. त्यांच्या शिफारसपत्रासह अमेरिकेत जाण्याचा बेत पक्का केला. परंतु ऐनवेळी अश्या काही घटना घडल्या की त्यांनी जपानला प्रयाण केले.

जपानमधले त्यांचे महत्वाचे काम म्हणजे विद्यार्थ्यांचे क्रांतीकारी संघटन ! चीनी क्रांतिकारक सन-यत्-सेन याचा पाठिंबा मिळवला. ‘अधरचंद्र लष्कर’ या जपानमधल्या प्रमुख सहकाऱ्याच्या मदतीने ‘इंडिअन इंडीपेंडेन्स लीग’ची स्थापना केली. जपानने त्यांना खूप काही शिकवले – श्रमप्रतिष्ठा, तंत्रज्ञान, स्वयंपूर्णता, लष्करी शिक्षण आणि यासोबतच आधुनिक कृषिशास्त्राचा अवलंब करण्याचे महत्व ! हे सर्व चालू असतानाच सानफ्रान्सिस्को येथे मोठा भूकंप झाला. पुनर्वसन कार्यासाठी मजुरांची खूप गरज भासू लागली. अमेरिकेत प्रवेश करण्याची ही नामी संधी चालून आल्याने खानखोजे यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला.

अमेरिकेत पोचल्यावर स्वस्थ न बसता पुन्हा एकदा त्यांनी एकीकडे तिथल्या भारतीयांचे संघटन करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला जपानमध्ये गवसलेल्या दृष्टीचा विस्तार करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापिठात कृषिशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. भारतात राजकीय क्रांतीइतकीच कृषिक्रांतीदेखील अत्यावश्यक असल्याची प्रखर जाणीव त्यांना झाली.भारतातल्या शेतकऱ्यांची मर्यादित दृष्टी, मागासलेपण, आधुनिक ज्ञानाचा अभाव यामुळेच बहुसंख्य शेतकरी वंचितच राहतात हे त्यांना कळून चुकले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर देशाला उपयोगी पडेल असे ज्ञान आतापासूनच मिळवण्याचा दूरचा विचार ते आताच करू लागले. संघटन, अभ्यास आणि लष्करी शिक्षण या सर्व गोष्टी त्यांनी एकाच वेळेस कशा चालू ठेवल्या हे वाचताना थक्क व्हायला होते.

‘गदर’ हे स्वातंत्र्यलढ्यातले १८५७ च्या उठावाप्रमाणे अयशस्वी पण धगधगते पर्व ! या उठावाच्या सूत्रधारांपैकी  अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. खानखोजे. अमेरिकेत संघटित होऊ लागलेल्या भारतीय क्रांतिकारकांना बॉम्ब बनवणे, गनिमी कावा वगैरेचे प्रशिक्षण सुरु झाले होते. आझाद-ए-हिंद पार्टीची स्थापना करण्यात आली आणि (१९१३ च्या सुमारास) त्यांच्या ‘गदर’ या मुखपत्रामधून कडवे देशभक्तीपर साहित्य प्रसिद्ध होऊ लागले होते. पाहता पाहता पार्टीने बाळसे धरले आणि भारताच्या इतिहासात गाजलेला ‘गदर’ या उठावाचे नियोजन सुरु झाले. बेत फार महत्वाकांक्षी होता. ‘प्रहारक’ विभागातल्या तब्बल १०००० प्रशिक्षणार्थींना भारतात पाठवायची योजना झाली. पण हे यशस्वी व्हायचे नव्हते. फितुरी, कुशल संघटकाचा अभाव, शस्त्रास्त्र तुटवडा अशा अनेक कारणांमुळे भारतातली ब्रिटीशांची सत्ता उलथण्याचा बेत फसला. त्याचवेळेस आलेल्या पहिल्या महायुद्धामुळेही ‘गदर’ ला खीळ बसली. पण खानखोजे हा माणूस सामान्य नव्हताच मुळी ! यानंतरचा खानखोजे यांचा जीवनपट हा अतिशय विलक्षण आहे. आपल्याला सुभाषबाबूंचे भारतातून पलायन आणि मग जर्मनीपासून ते जपानपर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास माहित असतो. तितकाच वादळी प्रवास खानखोजेंचाही आहे. पुढे त्यांनी पी.एच.डी. ला रामराम ठोकून ग्रीस, इराण या ठिकाणी आपला कसा मोर्चा वळवला. ब्रिटिशांनी खानखोजे अटक करूनही केली हा पठ्ठ्या त्यातूनही शिताफीने कसा निसटलाएवढेच नाही तर भारतात येऊन तर वेषांतर करून टिळकांची भेट घेऊन ते देशाबाहेर का पडले, पायाला पुन्हा भिंगरीलावून रशियाला का गेले, तसेच जर्मनीतदेखील क्रांतिकार्याचा प्रसार कसा केला हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच मुळातून वाचायला हवे.

मेक्सिकोमधले कार्य हे डॉ. खानखोजेंच्या जीवनातले लखलखते पर्व. आपली मातृभूमी नसूनही परमुलखात जाऊन सर्वस्व झोकून केलेले त्यांचे कार्य वाचताना मला सतत चीन युद्धात चीनी नागरिकांची सुश्रुषा करणारे डॉ. कोटणीस यांची आठवण येत होती. मेक्सिकोत त्यांनी मक्यावर संशोधन केले. रबरासंदर्भात संशोधनासाठी दक्षिण अमेरिकेतील जंगलात प्रचंड भटकंती केली. मध्वाली कंदापासून मिळालेले हार्मोन्स नपुंसकत्व कमी करण्यास उपयुक्त असतात हे सिद्ध केले. या सर्व कामांसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. महान कृषितज्ञ डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना भेटण्याचा अपूर्व योग हा त्यांना कृतकृत्य वाटायला लावणारा क्षण !

१९४७ साल उलटून गेले होते आणि खानखोजे यांचा एक डोळा अजूनही भारताकडे होता. दरम्यानच्या काळात मेक्सिकोत राहणाऱ्या आणि आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या जीन सिंडिक हिच्याशी डॉ. खानखोजे यांनी विवाह करून मेक्सिको इथेचसंसारही थाटला होता. मेक्सिकोमध्ये सरकारी सल्लागारम्हणूनही त्यांना जबाबदारी मिळाली होती परंतु त्यांना ओढ लागली होती मातृभूमीला भेटण्याची. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला करून देण्यासाठी ते उत्सुक होते. त्यामुळे कुटुंबासह ते भारतात परत आले. परंतु एका अजब प्रकारामुळे स्वतंत्र भारताचे नागरिकत्व लांबणीवर पडण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले.  त्यामग पुन्हा मेक्सिको, पुन्हा भारत अशी फिरस्ती. १९६१ साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. परंतु देश पुढे चालला होता. त्याला डॉ. खानखोजेंच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावासा वाटलाच नाही. देशाच्या कृषिक्षेत्रासाठी झटण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली.

श्वास रोखून धरायला लावेल असे नाट्य ज्यांच्या आयुष्यात आहे असा असे हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. इथे उल्लेखलेल्या घटनांव्यतिरिक्तदेखील एवढे काही त्यांनी अनुभवले आहे ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच मुळातून वाचायला हवे. डॉ. जॉर्ज कार्व्हर, सलीम अली या महान, परंतु दुर्लक्षित व्यक्तींची जीवनकहाणी प्रकाशात आणणाऱ्या वीणा गवाणकर यांनी डॉ. खानखोजेंचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आणण्यासाठीही किती कष्ट घेतले याची कल्पनाही आपण करू शकत नाही. एकेक संदर्भ मिळवण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा, दाखवलेली प्रचंड चिकाटी या गोष्टी कळण्यासाठी पुस्तकाची संपूर्ण प्रस्तावना वाचायलाच हवी.अशा थोर व्यक्तीला प्रकाशात आणणे म्हणजे एकप्रकारे त्यांचे आपल्यावरचे ऋण फेडणेच आहे, अशा उदात्त भावनेतूनच हे पुस्तक साकारले असल्याने त्यातले साधे सोपे वर्णन सुद्धा भिडणारे आहे. घडलेल्या घटनांमधून आणि वेळोवेळी खानखोजेंच्या स्वतःच्याच शब्दांतून त्यांच्या ध्यासप्रेरित व्यक्तिमत्वाचा क्रांतिकारक ते कृषितज्ञ-संशोधक हा प्रवास उलगडत नेला आहे.अतिअलंकारिक भाषा किंवा घटनांवर लेखिका म्हणून काही भाष्य करणे या गोष्टी त्यांनी टाळल्या आहेत ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

पुस्तकाचे शेवटचे प्रकरण वाचताना लेखिकेप्रमाणेच आपल्याही मनात अपराधी भावना दाटून येते. कारण डॉ. खानखोजेंच्या प्रखर ज्ञानाचा आमच्याच देशबांधवांनी काहीही उपयोग करून घेतला नाही. वृद्धावस्थेतही देशप्रेमापोटी मेक्सिकोमधील सर्व मनाची पदे त्यजून ते भारतात आले आणि केवळ व्यक्तिपूजेपुरतेच आम्ही त्यांचे गोडवे गायले. आपण उत्सवमूर्ती आहोत ही खंत शेवटपर्यंत त्यांना छळत राहिली. ५० वर्षांहून अधिक काळ देशासाठी रक्ताचे पाणी करणारा हा जीव आज कुणाला ठाऊकही नाही ही आपली समाज म्हणून, राष्ट्र म्हणून एक मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच‘नाही चिरा ..’ हे या पुस्तकाचे उपशीर्षक अतिशय योग्य आहे. बंदुकीच्या रांगांचे हळूहळू पिकांमध्ये होत गेलेले रुपांतर असे अतिशय चपखल मुखपृष्ठ दाद द्यावे असेच आहे. एकूणच अथ पासून इति पर्यंत वाचनीय हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे असे आहे.


राजहंस प्रकाशन

पृष्ठे २४०, किंमत १८०,

आवृत्ती चौथी



- प्रसाद फाटक


mahamtb.com वर 07-Nov-2016 रोजी पूर्वप्रकाशित

http://mahamtb.com//Encyc/2016/11/7/Dr-Khankhoje-Book-Review.html

प्रयोगांतून बहरत गेलेला ‘किशोर’ : ज्ञानदा नाईक यांची मुलाखत





‘किशोर’ची संपादकीय भूमिका किंवा उद्दिष्टं काय होती?
‘किशोर’ची वेगळी अशी उद्दिष्टं नव्हती. पाठ्यपुस्तकं का आणि कशी असावीत अशी ‘बालभारती’ची उद्दिष्टं होती. ‘बालभारती’तर्फे पूरक वाचन या उद्दिष्टानेच ‘किशोर’ची निर्मिती होत होती.
तुम्ही संपादिका झालात तेव्हा तुमच्यासमोर कुणी आदर्श होते का?
कुणासारखं काम करावं असं काही डोक्यात नव्हतं. मी आधीही ‘किशोर’मध्ये लिखाण करत होते, तेव्हापासूनच ‘किशोर’मध्ये कुठले बदल व्हावेत याबद्दल माझे काही विचार होते. संपादक म्हणून ते अमलात आणावेत हे डोक्यात होतं.
तुम्ही ‘किशोर’मध्ये कुठले वेगळे प्रयोग केलेत?
बरेच प्रयोग केले. मुलांचा ‘किशोर’मधला सहभाग वाढवला. मुलांच्या लिखाणाची सदरं सुरू केली. ‘किशोर’बद्दलची मतं जी मुलं कळवत असत, त्या मुलांना लिहितं केलं. एकेका विषयाला वाहिलेले विशेषांक काढले. लोककला विशेषांक काढला. कारगिल युद्धाच्या वेळी विशेषांक काढला; त्यात सैन्याधिकाऱ्यांचे लेख, प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचे अनुभव, तिथली छायाचित्रं यांचा समावेश होता. सैन्यात सहभागी होण्यासाठी कोणते मार्ग आहेत, त्यासाठी काय-काय करावं लागतं याचं मार्गदर्शन त्यापाठोपाठच्या अंकात होतं.
संस्कृत साहित्याची मला अतिशय आवड. मी संपादक होण्यापूर्वी ‘किशोर’मध्ये सुभाषितं वगळता संस्कृत साहित्यविषयक फार काही यायचं नाही. अभिजात संस्कृत वाङ्मयाची ओळख व्हावी म्हणून आम्ही ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ सुलभ गोष्टीच्या स्वरूपात वर्षभर प्रसिद्ध केलं. अन्यही महत्त्वाच्या संस्कृत कलाकृतींना अंकात स्थान दिलं.
एक निरीक्षण असं आहे, की तुमच्या काळात वेगवेगळ्या शैलीच्या चित्रांना ‘किशोर’मध्ये स्थान मिळालं. जी चित्रं सुबकतेच्या चाकोरीबद्ध व्याख्येत बसत नाहीत, अशीही चित्रं दिसू लागली. त्याबद्दल थोडं सांगाल का?
आपल्या इथे साक्षरता ही संकल्पना फक्त अक्षरांच्या बाबतीत वापरली जाते. पण मला वाटायचं, की ‘दृश्यसाक्षरता’ (visual literacy) हीदेखील महत्त्वाची आहे. त्याकडे आपलं विशेष लक्ष्य जात नाही. मुलांना चित्रसाक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाहीत. ते ‘किशोर’मधून व्हावेत यासाठी पारंपरिक शैलीपासून ते आधुनिक शैलीपर्यंत सर्व प्रकारची चित्रं देण्याचा प्रयत्न आम्ही केला.
अशा अपारंपरिक शैलीतली चित्रं वापरण्यात तुम्हांला काही धोका वाटला नाही का?
नाही. अर्थात आमच्यावर टीकाही झाली. एक खूप मोठे चित्रकार शांताराम पवार, जे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’मध्ये प्राध्यापकही होते. त्यांना मी म्हटलं, “आपल्याला एक दिवाळी अंक असा करायचा आहे, जो मुखपृष्ठापासून शेवटपर्यंत तुमच्या कल्पनेप्रमाणे बनलेला असेल.” तो धाडसीच प्रयोग होता. पण मला खात्री होती, की मुलांना अंक आवडेल. रूढ अर्थाने गोंडस, आकर्षक अशी चित्रं त्यात नव्हती. चार घड्या-घड्यांचं मुखपृष्ठ असणारा तो अतिशय वेगळा अंक होता. अंकाच्या मजकुराबद्दल आणखीही काही सांगून जाणारी त्या अंकातली चित्रं होती. तो अंक मुलांना आवडला, पण आमच्या इथल्या मोठ्यांना – म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळातल्या लोकांना – आवडला नाही. कारण काही माणसं ‘हे म्हणजे चांगलं चित्र, हे म्हणजे वाईट चित्र’ असा पारंपरिक विचार करणारी असतात.
‘किशोर’चं काम कसं चालतं ही उत्सुकता आहे. लेखांचे विषय ठरवणे, लेखक ठरवणे, चित्रकारांना सहभागी करून घेणे हे सगळं कसं चालत असे?
काही ठरलेली सदरं असतात. ती त्या-त्या लेखकांकडून लिहून घेणे हे नियमित काम असे. त्याशिवाय लेखकांनी स्वतःहून पाठवलेलं साहित्य असे, त्यातलं वेचक साहित्य निवडणं हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग म्हणजे मुद्दाम मागवलेलं साहित्य, जे विशेषांकाच्या मुख्य सूत्रासाठी लिहायची विनंती लेखकांना केलेली असे. असं तिन्ही प्रकारचे साहित्य एकत्र येऊन अंक बनत असे.
यासाठीच्या चित्रांची वाटणी चित्रकारांमध्ये कशी व्हायची?
चित्रांची जातकुळी पाहून ते ठरवायचो आम्ही. उदा. भावुक चित्रं असतील, तर ती पद्माताई सहस्रबुद्धेंना द्यायचो. विनोदी कथा असेल, तर श्याम जोशींसारखे चित्रकार असायचे. ‘किशोर’ची चित्रकारांची मोठी फळी होतीच, पण एक गोष्ट मी जाणीवपूर्वक केली. ती म्हणजे ‘अभिनव’ किंवा ‘जे. जे.’सारख्या कलामहाविद्यालयांमधून उत्तीर्ण झालेल्या तरुण चित्रकारांना ‘किशोर’च्या चित्रांच्या कामात सहभागी करून घेणे. अशा महाविद्यालयांमध्ये जाऊन मी तिथल्या प्राध्यापकांकडून माहिती घ्यायचे. ‘तुमच्याकडे अशा प्रकारचं काम करू शकणारे कोण कलाकार आहेत, त्यांची नावं सुचवा. त्यांना आम्ही मानधन देऊ आणि चित्र काढायला सांगू. त्यातून कदाचित चांगले चित्रकार घडतील,’ असं मी त्यांना सांगत असे आणि नवीन चित्रकारांशी संपर्क साधत असे.
तुम्ही केलेल्या या ‘टॅलेंट हंट’मधून पुढे आलेली काही नावं सांगता येतील का?
आत्ता मला सगळी नावं आठवत नाहीत, पण यातून बरेच जण पुढे आले. रेश्मा बर्वे ही अगदी विशीतली तरुणी होती, जी आजही उत्तम काम करते आहे. प्रभाकर भाटलेकर हे असंच एक नाव डोळ्यासमोर येतंय. अशा अनेकांना ‘किशोर’मुळे मंच मिळाला. जसे चित्रकार होते, तसेच नवीन लेखकही होते. मी अन्य काही वाचन करत असायचे, तेव्हा नवीन आश्वासक लिहिणारं कुणी दिसतं का; याकडेही मी लक्ष्य ठेवायचे आणि असं कुणी दिसलं की त्याला ‘किशोर’मध्ये सहभागी करून घ्यायचे. राजीव तांबे अगदी सुरुवातीला ‘किशोर’मध्ये लिहीत असे.
जागतिक बालसाहित्याचं प्रतिबिंब ‘किशोर’मध्ये पडावं या दृष्टीने फार प्रयत्न झालेले नाहीत…
अधूनमधून असे प्रयत्न आम्ही केले, परंतु आपल्या संस्कृतीत शिकवण्यासारख्या इतक्या गोष्टी, मूल्यं असताना अट्टाहासाने परदेशातलं काही आणून ते शिकवावं अशी आवश्यकता मला फार प्रकर्षानं वाटली नाही.
प्रकाशित होणारं नवीन साहित्य, बालसाहित्य यांची विशेष दाखल ‘किशोर’मध्ये घेतलेली दिसत नाही. याचं कारण काय?
मी संपादक असताना पुस्तकपरिचयाचं एक सदर सुरू केलं होतं, शिवाय ‘बालचित्रवाणी’ हा ‘किशोर’सह ‘किशोर’ला समांतर चालवला जाणारा राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा उपक्रमही होताच. त्यातून आजूबाजूच्या घडामोडींचा परिचय करून दिला जात असे.
आत्ता तुम्ही ज्या सदराचा उल्लेख केलात, त्यात सातत्य असल्याचं दिसत नाही. त्याच्यामागे कारण काय असावं?
आमच्याकडे पुस्तकपरीक्षणासाठी फारशी पुस्तकं येईनाशी झाली, त्यामुळे ते चालू राहिलं नाही.
‘किशोर’ हा पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प आहे. म्हणजेच पर्यायाने ते सरकारी योजनेचा भाग म्हणून चालत आलेलं आणि तरीही स्वायत्त असलेलं असं प्रकाशन आहे. या कारणामुळे तुमच्या कामात सरकारी हस्तक्षेप झाला का कधी?
काही वेळा तसं होणं स्वाभाविक होतं. काही वेळा मंत्र्यांचा दबाव यायचा, पण त्यावर ‘ठीक आहे, असं असेल तर मी राजीनामा देते’, असा पवित्रा मी घेत असे.
मग त्यांना त्यांचं म्हणणं रेटता येत नसेल…
नाही. ‘राजीनामा देऊ द्या, पण आम्हांला हवं तसंच व्हायला हवं’ असा दबाव मात्र कधी आला नाही. माझं काम मला करू देण्यात आलं, त्यामुळेच मी संपादक म्हणून येण्याआधी आधी अठरा ते वीस हजार अंकांपर्यंत असणारा ‘किशोर’चा खप माझ्या कारकिर्दीत एक लाख अंकांपर्यंत गेला.
‘किशोर’चा असा कुठला प्रकल्प होता का, जो करण्याची इच्छा असूनही लाल फितीमुळे करता आला नाही?
नाही. मला भरपूर मोकळीक होती. शिक्षणमंत्री पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष असायचे. मी मांडीन त्या-त्या कल्पनांना ते मान्यता द्यायचे, त्यांच्याकडून मला कधीही आडकाठी झाली नाही. ‘निवडक किशोर’ या प्रकल्पाची कल्पना माझीच होती. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प मी केला. चार भिंतींच्या आत बसून आम्ही एक मासिक काढतोय आणि आम्हांला हवं ते आम्ही मुलांवर लादतोय असं न करता आम्ही लेखक मंडळींना सोबत घेऊन खेडोपाडी जायचो. माडगूळसारख्या छोट्या खेड्यापर्यंतही आम्ही गेलो होतो. आमच्यासोबतचे लेखक तिथल्या मुलांशी बोलून त्यांना लिहितं करण्याचा प्रयत्न करायचे. पुण्याजवळच्या दगडाच्या खाणीत काम करणाऱ्यांच्या मुलांपर्यंतही आम्ही पोचलो. एका वर्षीचा दिवाळी अंक आम्ही त्या मुलांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्यांना लिहायला सांगितलं आणि तेही प्रकाशित केलं. अशा शिबिरांमधून मुलांकडून जे साहित्य मिळायचं, ते आम्ही छापायचो. त्यामुळे मुलांनाही अंक आपलासा वाटायचा. फक्त शहरी, मध्यमवर्गीय मुलांपर्यंतच आम्ही स्वतःला मर्यादित ठेवलं नव्हतं, अगदी वाड्यावस्त्यांपर्यंतही आम्ही पोचलो.
सरकारी पाठबळावर ‘किशोर’ उभा राहिलेला आहे. विविध समित्या, त्यांतली राजकीय पक्षांशी संबंधित असणारी माणसं यांमुळे ‘किशोर’वर कधी कुठल्या विचारसरणीचा प्रभाव पडला असं वाटतं का?
नाही, मला नाही तसं वाटत.
पौगंडावस्थेत मुलांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. त्यांचा वेध घेणारं काही लिखाण ‘किशोर’मधून कधी प्रकाशित झालं का?
हो, बालमानसशास्त्रज्ञांकडून या विषयावर मुद्दाम लिखाणही करवून घेतलं. बा. सी. मर्ढेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्यादेखील या विषयावर लिखाण करत असत.
या लिखाणात लैंगिक शिक्षणाबद्दल लिहिण्याचे प्रयोग झाले का?
नाही, थेट नाही झाले.
यामागे काही कारण होतं का? किंवा हा विषय टॅबू असल्याने प्रतिक्रियांची काळजी होती का ?
कारण असं काही नाही. हा विषय त्या वेळी डोक्यात आला नाही खरा. पण काही टॅबूज् मात्र आम्ही पाळले. उदा. बलात्काराला स्थान असू नये. एका नामवंत लेखकाने तसा विषय असणारी कथा दिली, ती नाकारली गेली. मग त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली. मग मला विचारणा झाली. मी म्हटलं, “मुलांना या वयात हे देण्याची आवश्यकता आहे का?” ते त्यांना पटलं. आपण आपल्या विचारांशी ठाम असलं की अशा प्रसंगात कुणाची आडकाठी येऊ शकत नाही.
नव्वदच्या दशकाच्या शेवटी मजकुराच्या दर्जात आधीच्या पंचवीसेक वर्षांइतकं सातत्य राखलं गेलं नाही, असं एक निरीक्षण आहे. तुम्हांला असं वाटतं का?
माझ्या कारकिर्दीत तसं झालं असं मला नाही वाटत. आधीच्या वीस वर्षांत जे चांगलं जमलं, ते शेवटच्या सात-आठ वर्षांत न जमण्याचं काही कारण नाही.
मी हे संपादनाच्या दृष्टीने नाही, तर लिखाणाच्या दृष्टीने विचारलं. कारण आधीच्याइतके मातब्बर लेखक या काळात लिहीत नव्हते. कमी प्रसिद्ध लेखकांच्या लिखाणामुळेही ते असू शकेल.
प्रसिद्ध लेखकांनी लिहिलं नाही हा मला नकारात्मक भाग वाटत नाही. ते उत्तम साहित्य होतं की नाही, हे महत्त्वाचं. जे छापलं जात होतं, ते उत्तम दर्जाचं होतं असं मला वाटतं.
अलीकडच्या काळात ‘किशोर’ काळासोबत किती बदलला? काळासोबत राहण्यासाठी ‘किशोर’नं नवीन कुठलं माध्यम आत्मसात करावं असं वाटतं का?
अलीकडच्या काळामध्ये मी ‘किशोर’ बघितला नाहीये. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. मी मागच्या गोष्टींमध्ये पुन्हा लक्ष्य घालत नाही. आपला सहभाग संपला की आपण बाजूला व्हावं, हा माझा स्वभाव आहे.
‘किशोर’ बघितला नसेल, तरीही प्रयोग म्हणून आजच्या काळाला अनुसरून अमुक एक प्रयोग व्हावा, असं तुम्हांला वाटतं का?
नाही, मी त्या दृष्टीने विचार नाही केला. ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे, ते यात लक्ष्य घालतीलच.
आजच्या काळात ‘किशोर’सारखी मासिकं कालसुसंगत आहेत असं तुम्हांला वाटतं का?
अलीकडे वाचनाची आवड खूपच कमी झाली आहे. प्रामुख्याने शहरी भागात. पण मी छोट्या गावांत जाते; तेव्हा लक्ष्यात येतं, की मुलांना अजूनही वाचनाची आवड आहे. ‘माडगूळकर प्रतिष्ठान’तर्फे ग्रामीण मुलांसाठी कार्यक्रम घेऊन आम्ही लेखन, वाचन, अभिनय या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडतो. तालुक्यांत, खेड्यांत अजूनही चांगली पुस्तकं वाचायची आवड आहे असं दिसतं. ‘किशोर’ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जातो. तो पडून राहिला आहे असं मला कधी कुठे दिसलं नाही. मुलांच्या मानसिकतेवर आक्रमणं बरीच झाली आहेत. करमणुकीची साधनं बदलली आहेत. खेड्यांत अजून हे वारं तितकंसं पोचलेलं नाही. अजूनही तिथल्या मुलांना शब्दकोडं सोडवायला आवडतं. त्यामुळे ‘किशोर’ आजही कालसुसंगत आहे.
शहरांमधल्या मराठी कुटुंबांमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. शहरातल्या मुलांच्या वाचनाची आवड कमी होण्यामागे शिक्षणाचं हे बदललेलं माध्यम असू शकतं का?
हो, नक्कीच. पुण्यात मराठी शाळांचं प्रमाण खूप कमी झालंय. गोव्यातही मी हेच पाहिलं. ७०% मराठी शाळा बंद झाल्या आहेत. बऱ्याच घरात मुलांशी इंग्रजीच बोललं जातं. मग मुलांची मराठीची गोडी वाढणार कशी!

– प्रसाद फाटक
(रेषेवरची अक्षरे या ऑनलाईन दिवाळी अंकावर पूर्वप्रकाशित : http://www.reshakshare.com/2017/10/1039/)

Saturday, February 17, 2018

गुलाबजाम : स्वयंपाकावरचं खरखुरं प्रेम





चांगली नोकरी सोडून मनापासून अस्सल मराठी/पुणेरी जेवण शिकण्यासाठी पुण्यात आलेला तरुण आणि जेवणाचे डबे बनवणारी त्याची गुरू होणारी स्त्री यांच्याभोवती फिरणारा हा सिनेमा. सुरुवातीपासून त्यांचे मूड्स, त्यांच्यातले रुसवे-फुगवे, हळवे क्षण खूप छान टिपले आहेत. त्याची स्वैपाक शिकण्याची तीव्र इच्छा आणि तिचा सुरुवातीचा reluctance, मग त्याने विश्वास संपादन करणं आणि तिच्या हाताखाली तयार होणं, तिला तिच्या आयुष्यातल्या गर्तेतून बाहेर काढत आत्मविश्वास देणं हे टप्पे छान फुलवत नेले आहेत. आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे गोष्टी घडायला आणि नातं घट्ट व्हायला आवश्यक तो अवकाश दिलेला आहे. अलीकडच्या काही चांगल्या सिनेमात देखील जो ‘ठहराव’ आढळत नव्हता तो इथे अगदी व्यवस्थित आहे. 
सोनाली आणि सिद्धार्थ या दोघांचं अन्नाबद्दल आदर दाखवणं, आपण करत असलेल्या पदार्थांशी बोलणं, राधाचा तिच्या पोळपाटाबद्दल असणारा पझेसिव्हनेस, “पदार्थ बनवतो म्हणजे आपण त्या पदार्थाला आपल्यातलं काहीतरी देतो” यासारखे अन्नतत्वज्ञान सांगणारे संवाद हे सगळं बघताना हे सतत जाणवत राहतं की स्वयंपाकावर अपरंपार प्रेम करणाऱ्या दिग्दर्शकानेच हा सिनेमा बनवला आहे.
यातल्या तांत्रिक गोष्टी 'ए वन' आहेत. काळाच्या धावपळीत राधा (सोनाली कुलकर्णी) मागेच कुठेतरी अडकून पडलेली आहे हे ठसवण्यासाठी अनेक गोष्टी जाणीवपूर्वक योजल्या आहेत. घरातल्या वस्तू जुन्या आहेत, वशिवाय खालच्या मजल्यावरचे काका वाचत असलेलं पुस्तकही कालप्रवासाबद्दलचंच आहे. तिचं घर, राहता परिसर हे सगळं जुनं पुणं दाखवणारं आणि नॉस्टाजिक करणारं आहे. एकूणच सिनेमातले रंग आणि लायटिंग ही मला सगळ्यात आवडलेली गोष्ट. वेळेनुसार घरातला बदलत जाणारा सूर्यप्रकाश परफेक्ट दाखवला आहे. सिनेमात वापरलेल्या पिवळसर, सेपिया रंगछटा वापरल्या आहेत त्याही रेंगाळेला काळ सूचित करणाऱ्याच आहेत. मुबलक प्रमाणात वापरलेले कॅमेऱ्याचे top angles मजा आणतात. या top angles मुळे चित्रपटभर बनत राहणारे असंख्य पदार्थ त्यामुळे विलक्षण हवेहवेसे वाटतातच पण आतली अस्वस्थता दाखवणारे आदित्यचे सीन्सही अधिक इंटेन्स होतात. शिवाय पदार्थ पार्श्वसंगीत मोजकं आणि प्रभावी आहे. अवधूतच्या आवाजातलं गाणं खूप छान आहे. 
एवढं सगळं असूनही माझ्या सिनेमाबद्दल काही जेन्युईन तक्रारी आहेत ज्यामुळे तो ग्रेट होता होता राहिल्यासारखं वाटतं. एक म्हणजे काही गोष्टी हळूहळू establish होऊ न देता एकदम दाखवून टाकणे (उदा. राधाच्या घराच्या आतल्या पहिल्याच दृश्यात तिचं जुनाट विश्व एकदम भसकन दाखवून टाकलं आहे. दुसरं म्हणजे भावनिक प्रसंगात सातत्य नसणं. म्हणजे काही प्रसंग अगदी ‘सटल’ आणि हळुवार झाले आहेत तर काही इतके सरळसोट आणि थेट आहेत की त्यात विलक्षण कृत्रिमता येते (उदा. चिन्मय उदगीरकर सोनालीला भेटायला येतो तेव्हा मागे रेडिओवर मोठ्या आवाजात ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना चालू असणं’) (अगदी असाच imbalance सचिन कुंडलकरच्या ‘राजवाडे and सन्स’ मध्येसुद्धा होता!) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवट. आपल्या इथे बहुतांश दिग्दर्शकांना ‘कहाणी सुफळ संपूर्ण’ असं दाखवल्याशिवाय चैनच पडत नाही. चितळे मास्तरांसारखं ‘.... आणि ते सुखाने नांदू ........ लागले’ असं वदवून घ्यायची जणू सवयच लागलेली असते. ज्या दिग्दर्शकाने स्पून फीडिंग पासून मैलोनमैल दूर असणारा ‘गंध’ सारखा सिनेमा दिला त्याला अशी सवय लागेल असं वाटलं नव्हतं पण इथे त्याने किमान तीन सीन आधी संपवून खूप जास्त प्रभावी होऊ शकला असता असा चित्रपट उगाच ‘सगळ्यांचं सगळं कसं मार्गी लागलं’ हे दाखवून मगच थांबवलाय.... अनावश्यक cameo चा मोह ‘आपला मानूस’ सारखा ‘गुलाबजाम’ला देखील झालाय. 

असो. थोडं उन्नीस-बीस व्हायचंच .... इतक्या वेगळ्या विषयावरचा सिनेमा मराठीत यावा आणि त्याची नाळ या मातीशी घट्ट जुळलेली असावी यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. ‘रुचिपालट’ (शब्दशः!) म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे....

व्हॅलंटाईन


कॉलेजमधलं आयुष्य खूप रंग उधळत येतं. गडद, फिके, बटबटीत, आल्हाददायक … कुठल्याच रंगाची कमतरता नसते. सगळ्यांसारखंच मीही त्यात चिंब भिजून घेतलं. माझा कॅनव्हास त्या रंगांनी जमेल तसा आणि जमेल तितका रंगवून घेतला आहे आणि ते रंग आयुष्यभर पुरूनही वर उरणारे आहेत.
पण माझी रंगपंचमी तिथेच थांबली नाही.

एखाद्या चित्रात खूप सारे रंग असतात. पण त्यात न रंगवता अधेमध्ये तसाच ठेवलेल्या कागदाचा पांढरा रंग चित्राला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. माझी नोकरी लागल्यावरची चार पाच वर्ष तशीच होती. त्यात रंग कमी असतील पण सौंदर्य कमी नव्हतं. सांस्कृतिक भूक असलेल्या कुठल्याही मनुष्याला पुण्यापासून दूर राहणे ही खूप मोठी शिक्षा असते. २५ किमी हे अंतर हे चटकन उठून पार करण्याइतकं छोटं नाही. पुण्यात एवढ्या पंगती रोजच्या रोज उठत असताना मी इकडे निगडीत निपचित पडून राहणं शक्य नव्हतं. पुण्याच्या वाऱ्या अटळ होत्या. वीकएंडला तर मोकाटच असायचोच पण आठवड्यातही जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ऑफिसमधून थेट पुणं गाठायचो. सिनेमे, नाटकं, व्याख्यानं, मुलाखती, फर्ग्युसनमधला मुक्तछंद, पुस्तक प्रदर्शनं/प्रकाशनं, शुक्रवारपर्यंत उदघाटनं, कसलेकसले महोत्सव, सुदर्शनचे नाट्यानुभव वगैरे भरपूर खजिना लुटायचो. वीकएंड येण्यापूर्वीच त्या आठवड्यातले प्रमुख सिनेरिलीज, नाटकाचे प्रयोग इ. गोष्टींची डोक्यात नोंद तयार असायची. वीकएंडला कुठे, कधी, काय, कसं करायचं या सगळ्याचा आराखडा शुक्रवारपर्यंत डोक्यात तयार झालेला असायचा. शनिवारी/रविवारी घराबाहेर पडताना घरी फक्त "जातोय आणि साधारणपणे अमुक वाजतील" इतकं सांगितलेलं पुरायचं. कुठेही, कधीही जायला आडकाठी न करणारे आणि मुख्य म्हणजे "का ?" असा प्रश्न कधीही न विचारणारे आईवडील फार कमी लोकांना लाभतात, त्यातलाच मी एक.

पहिली दोन वर्षं माझ्याकडे बाईक नव्हती. पण प्लॅन action packed असायचे. म्हणजे कॅम्पातलं काम आटपून 'प्रभात'ला पिक्चर बघणे आणि लक्ष्मी रस्त्याच्या 'पंकज म्युजिक हाऊस'मध्ये जाऊन मराठी गाण्याची सीडी धुंडाळणे, किंवा लोकलने शिवाजीनगरपर्यंत जाऊन पुढे अप्पा बळवंत चौकात एखाद्या पुस्तकाची चौकशी करून निवारा वृद्धाश्रमातल्या एका मुलाखतीला जाऊन पुन्हा सुदर्शनला किंवा भरतला नाटकाला हजर राहणे वगैरे गोष्टी अंगवळणी पडलेल्या असायच्या. रिक्षा वर्ज्य असल्याने या सगळ्या गोष्टी पायी किंवा बसने चालायच्या. एकदा कॅम्पातून चालत फर्ग्युसनला गेलो होतो (वाटेत प्रभातला एक मॅटिनी शो आटोपून घेतला!). असे असे मराठी सिनेमे पाहिले जे त्यातल्या कलाकारांनीही बघितले नसतील. असल्या असल्या थिएटरमध्ये गेलो जिथे हे वाचणाऱ्यांपैकी कुणी गेलं नसेल. लाल महालाजवळच्या ‘वसंत’ला गेलो आणि कल्पनातीत स्वच्छ थिएटर पाहून उडालोच. तिथल्या वस्तीत सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये एकही पानाची पिचकारी न दिसणं किंवा टिपिकल कुबट वास न येणं हे केवळ अशक्य होतं. तिथूनच हाकेच्या अंतरावरच्या ‘रतन’ला गेलो आणि पुण्यातच काय पण कुठेच न पाहिलेली curved screen बघायला मिळाली. जिथे आधी ‘तसले’ सिनेमे लागायचे तिथे अचानक मराठी सिनेमे लागायला लागले अशा ‘अल्पना’मध्येही जायचा प्लान करत होतो पण थिएटरच बंद झालं. भवानी पेठेतल्या जुन्या 'भारत' थिएटरचा (जिथले पिक्चर केव्हाच बंद होऊन आता त्याचं गोडाऊन झालं आहे) आणि मिथुनचे रक्ताळ बी ग्रेड सिनेमे दाखवणाऱ्या कॅम्पातल्या 'निशात' नामक थिएटरचाही मुक्त भटकंतीतच अनपेक्षितपणे शोध लागला (जरा बरा पिक्चर असता तर मी निशातमध्येही घुसलो असतो). बुधवार पेठेतल्या मोक्याच्या गल्लीच्या तोंडाशी असणाऱ्या ‘श्रीकृष्ण’ला जायची मात्र हिम्मत कधी झाली नाही.

फिरता छोट्या मोठ्या खाऊच्या अड्डयांचे शोध लागायचे. रमणबागेजवळच्या पुष्करणी भेळेच्या दुकानात स्वर्गीय चवीचे दडपे पोहे, लक्ष्मी रस्त्याच्या पूर्वेच्या तोंडापासच्या क्वार्टर गेटपाशी शिंदे काकांच्या गाडीवरचे तोफगोळ्याच्या आकाराचे डिंक-शेंगदाणे-मनुकांनी युक्त पौष्टिक लाडू आणि अर्धवट जळक्या गुळातली काळपट लाल खमंग  चिक्की, पत्र्यामारुतीला लागून असलेल्या टपरीतले मसाला पोहे, भरतनाट्यपासून हाकेच्या अंतरावर असणारा गुडदाणीवाला ..... आणखी बरच काय काय जिभेवर रेंगाळत राहायचं...

पुढे माझ्याकडे बाईक आली आणि wild became wilder. एका दिवसात चार सिनेमे आणि दिवसाच्या शेवटी एक नाटक असं साहस दोनदा केलं. त्यापैकी एकदा तर चार सिनेमे चार  वेगवेगळ्या थिएटरला पाहिले होते! बरं हा पसारा फक्त पुण्यात मांडला नव्हता तर तो चिंचवड ते पुणे असा आडमाप विस्तारलेला होता. कसली किक यायची कोण जाणे, पण भन्नाट थ्रिल वाटायचं.

या सगळ्या प्रवासात सगळ्यात विलक्षण गोष्ट अनुभवता यायची ती म्हणजे पेठांमधली भटकंती. भवानी, रास्ता वगैरे पेठांमधली रखरखीत, आपल्यापासून अंतर राखून असणारी घरं नजरेला पडायची. लक्ष्मी रस्त्यावरून सिटी पोस्ट चौकापाशी येताना उजवीकडे अटळपणे जाणवणारे रंगवलेले ओठ आणि त्या ओठांमधून येणारी ‘शुकशुक’ त्या चौकातल्या वाहनांच्या कलकलाटातही कानावर यायची. चौकापलीकडेच अदृश्य बेलबाग मंदिरातल्या विष्णूला ही शुकशुक कधीच ऐकू येत नसेल ? तिथून जरा पुढे आलं की तीन देवियां : सदाशिव, नारायण आणि शनवार! तिथली ती कोमट, सुस्त घरं हवीशी वाटायची. या पेठांना एक वेगळाच वास आहे. तिथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून फिरताना माजघरात फिरल्यासारखं वाटतं. इथे कुठेतरी रहात असतो असतो तर कैच्याकै ऐश करता आली असती असं स्वप्नरंजन करताना मी स्वतःच स्वतःला खुश करायचो. त्या एकेकट्या गल्ल्या मला माझ्यासारख्याच वाटायच्या…. आपल्यातच मश्गुल. ते एकलेपण बाय चॉईस नसेल पण ते तसं असण्याबद्दल तक्रारही नव्हती. एक गल्ली दुसऱ्या गल्लीला फक्त त्यांच्यातून आडव्या जाणाऱ्या बोळाद्वारे शेकहँड करते तेवढंच. बाकी जे काही आहे ते आतल्या आत आणि आपल्या आपण… हेही वागणं तिथे राहणाऱ्या स्वयंभू माणसांसारखंच. इथे फिरता फिरता शांत व्हायला व्हायचं. बाहेरचे आवाज थांबायचे. मग तसंच ओंकारेश्वरापाशी जाऊन बसायचं. माझा मीच मला ऐकू यायचो. माझीच सोबत मी प्रचंड एन्जॉय करायचो. इतकं ऐकून घेणारी, मी विचारल्याशिवाय सल्ला देण्याच्या फंदात न पडणारी, मी नेईन तिथे निमूट येणारी आणि तिथे गेल्यानंतर मात्र मला आतापर्यंत न जाणवलेल्या गोष्टी गाईड बनून स्वतःहून दाखवणारी ही व्यक्ती म्हणजे माझ्याआत असणारी पण माझ्यापेक्षा वेगळे अस्तित्व असणारी कुणीतरी आहे याची जाणीव झाली. तेव्हापासून माझ्यातल्या ‘मी’ सोबत जी गट्टी जमली ती आजपर्यंत कायम आहे. आजही जेव्हा डोक्यात सगळा येळकोट झालेला असतो तेव्हा मी तो त्याच्यासमोर मांडतो. 'तो' सारा पसारा आवरून मोकळं करेलच असं नाही पण माझ्यासोबत डाव मांडायला तो नेहमीच तयार असतो. काही वेळा प्रश्नचिन्हाचं उद्गारचिन्ह करून देणारं कुणी भेटलं तरी पुरेसं असतं.


व्हॅलंटाईन म्हणजे तरी अजून वेगळं काय असतं?

Thursday, June 15, 2017

सुदर्शनचे दिवस

नाट्यप्रयोगांबद्दल लिहिण्यापूर्वी पुण्यातल्या प्रायोगिक नाटकांची पांढरी असणाऱ्या 'सुदर्शन रंगमंचा'बद्दल लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून आज त्याबद्दलच ...

पहिल्यांदा पाहिल्यावर सुदर्शन रंगमंच ही खूप unusual जागा वाटली होती. म्हणजे त्याला रंगमंच म्हणावं असं आतमध्ये गेल्यावरही वाटत नव्हतं. कारण आतापर्यंत मी पाहिलेल्या कुठ्ल्याच नाट्यगृहासारखं यात काहीच नव्हतं. एखाद्या सोसायटीच्या दरवाजासारखं गेट. मग पुढे गेल्यावर लाकडी बाकडे टाकून बसलेला/ली एक पुरुष/स्त्री, असतो (सोयीसाठी तो पुरुष असतो असं समजूया) जो प्रयोगाचं 'देणगीमूल्य' स्वीकारून आपल्याला 'सुदर्शन रंगमंच' लिहिलेलं जेवणाच्या कुपनसारखं छोटं चौरसाकृती तिकीट देतो. त्यावर नाट्यप्रयोगाचं नाव नसतं. (सर्वात आधी मी इथे ४० रू मध्ये प्रयोग पहिले आहेत. मग पन्नास झालं नंतर अजून वाढलं असावं. सध्या किती आहे कल्पना नाही). ७ चा प्रयोग असला की साधारणपणे ६ ला तिकीट विक्री चालू होते. तिकीट काढायचं आणि जास्त वेळ नसेल तर हॉलच्या गेटमधून बाहेर येऊन डावीकडे वळून पन्नासेक पावलांवरच्या खाऊच्या दुकानात जायचं. तिथे मिळणाऱ्या पॅटीस, घारगे वगैरे जाम भारी पदार्थांपैकी काहितरी एक चट्कन घेऊन शबनममध्ये टाकून पुन्हा सुदर्शनच्या गेटमध्ये शिरायचं. प्रयोगाला थोडासा वेळ असेल तर मात्र तिकीट घेतल्यावर बाहेर पडून उजवीकडची प्राचीन डेअरी काही सेकंद कुतूहलाने न्याहायची (नाना फडणवीस इथेच पिशवी घ्यायला यायचे म्हणतात !!) आणि मग ती ओलांडून अहिल्यादेवी शाळेसमोरच्या रसवंतीगृहात जाऊन रस प्यायचा… परत येऊन गेटच्या दोन्ही बाजूचे नोटीस बोर्ड न्याहाळत बसायचे. डावीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होऊन गेलेल्या काही प्रयोगांचे फोटो असतात. उजवीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होणाऱ्या एखाद्या आगामी प्रयोगाची जाहिरात असते… त्याच्या बाजूला पुण्यातल्या कुठल्याकुठल्या कॉलेजातील नाट्यमहोत्सव, सुदर्शनलाच होणारी एखादी कार्यशाळा किंवा तळमजल्यावरच्या दालनात होऊ घातलेलं प्रदर्शन, भरतला होणारा एखादा वेगळा नाट्यप्रयोग वगैरे खूप खच्चून भरलेला खजिना असतो… या बोर्ड्सच्याच रांगेत एक छोटासा लाकडी फळा आहे. त्यावर आपण जो नाट्यप्रयोग बघायला आलोय त्याचे तपशील रंगींत खडूने लिहिलेले दिसतात… जगात सगळीकडे पोस्टर्स, पत्रकं, जाहिरातफलक, फ्लेक्स असताना त्यांचं कुठलंही दडपण तो फळा अजिबात घेत नाही हे मला जाम आवडतं… बोर्ड न्याहाळताना आजूबाजूच्या गर्दीकडे नजर टाकत राहायची… अधूनमधून काही दुचाकीस्वार मोझेसप्रमाणे तो जनसागर दुभंगत तिकीटवाल्याच्या पलीकडे जाऊन तिकडच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन विरघळतो… (एकदा डॉ मोहन आगाशे आपली ‘स्पिरिट’ मोपेड घेऊन गर्दीतल्या कुणालाही धक्का न देण्याचं स्पिरिट दाखवत पलीकडे गेल्याचं पाहून जाम गंमत वाटली होती)...

सुदर्शनच्या तिकीटविक्रीची एक गंमत म्हणजे ती तिकिटं संपेपर्यंत चालत नसून जागा संपेपर्यंत चालू असते ! म्हणजे असं की एखादा चांगला प्रयोग असेल तर तिकीटविक्री चालू झाल्यावर अर्ध्या तासात बरीच तिकिटं संपतात. मग तिकीटवाल्याची थोडी चलबिचल होते. अगदी प्रयोगाच्या तोंडावर आपण धावतपळत पोचलो आणि तिकीट मागितलं तर तिकीटदाता आपल्याला थांबायला सांगतो. ऑलरेडी जवळपास सगळे प्रेक्षक जिना चढून हॉलमध्ये जाऊन बसलेले असतात. मग हॉल मध्ये आणि हॉलमधून आतबाहेरही धावपळ करणाऱ्या थेटरग्रुपमधल्याच एखाद्या नारायणाला खालून हाळी दिली जाते. तो वरून डोकावून सांगतो, अजून ५ जण बसू शकतात. मग तिकीटदाता आपल्या झोळीत तिकीट टाकतो. नवखा असलेल्याला हा जागेवर आधारित तिकीटविक्रीचा प्रयोग नवा असतो पण जिना चढून हॉलमध्ये गेल्यावर त्याला त्याचं उत्तर मिळू शकतं.

वर जाताना अचानक आजूबाजूची गर्दी विनाकारण धीरगंभीर होत जाते… गप्पा दबक्या आवाजात रूपांतरित होत जातात. (नाटक संपल्यावर किंवा दोन अंकी असेल तर मध्यंतरात तर बहुतांश मंडळी मला ‘नाट्यकलेच्या भवितव्याची चिंता' असणाऱ्या ‘न-प्रेक्षकां’सारखीच भासायला लागतात !!!), वर गेल्यावर आधी चपला स्टॅंडवर ठेवायच्या आणि 'हॉल' मध्ये जायचं .... आत गेल्यावर कळतं याला हॉल म्हणणंही धाडसाचं आहे. ही एक ताणलेली खोली आहे. समोर केवळ लाकडी लेव्हल्सचा एक platform म्हणजे इथला रंगमंच. हा रंगमंच नेहमीच्या स्टेज पेक्षा अगदीच छोटा आहे. त्यामुळे नेपथ्य निवडक ठेवणं अत्यावश्यक असतं (‘प्रायोगिक’मध्ये फार पसाऱ्याला परवानगीही नसावी). रंगमंचापुढे मोकळ्या जागेत सतरंजी टाकून ३०-४० जण मांडी दाटीवाटीने घालून बसतील इतपत सोय केलेली. लोक (म्हणजे मुख्यत्वे तरुण मंडळी) मांड्यांचे जितके वेगवेगळे कोन करून सरकासरकी, स्थलांतर वगैरे adjustment करायला तयार तितकी खाली तिकिटाच्या आशेवर असणाऱ्या नाट्यरसिकाला ते मिळण्याची शक्यता जास्त !

सतरंजीपाठीमागे चाळीसेक खुर्च्या. खुर्च्यांवर ज्येष्ठ, पोक्त, जाणकार इ. मंडळींचा राबता. मग त्यात लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरे कुणीही पुणेरी मान्यवर सापडू शकतो. त्या खुर्च्यांमध्येच कुठेतरी कृष्णविवरात sound/light सांभाळणारे शिलेदार ('पौष्टिक जीवन' मधल्या पोष्टल कर्मचाऱ्याप्रमाणेच हेही सबंध कधीही दिसत नाहीत. प्रयोगानंतर शेवटी सर्व कलाकार तंत्रज्ञांची ओळख करून दिली जाते तेव्हा जरा उजेड असल्यामुळे आणि हे शिलेदार उभे राहिल्यामुळे दोनपंचमांश वगैरे दिसू शकतात). 'फोकस' मध्ये न येताही नाट्यकलेवरच्या निष्ठेमुळे काम करत राहण्याचं कौतुक वाटतं. ‘थिएटर’ अगदी छोटं असल्यामुळे मंचावरचा शब्दन् शब्द सर्व कोपऱ्यात ऐकू येऊ शकतो, पण म्हणून इथे ध्वनी यंत्रणेत अजिबात तडजोड नाही… अतिशय चांगल्या दर्जाची यंत्रणा इथे आहे. लाईट्समधलं आपल्याला फारसं काही कळत नाही पण आजपर्यंत लाईट्सनी कधी रसभन्ग केल्याचं आठवत नाही म्हणजे तीही व्यवस्था चोख असावी.

अर्थात या सगळ्या गोष्टी सहाय्यभूत असल्या तरी सर्वांना उत्सुकता असते ती नाट्यानुभवाची. आणि एवढं नक्की सांगेन की इथला अनुभव दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखा असतो. गुडुप्प अंधार आणि मिट्ट काळोख यांच्यात उत्सुकतेने श्वास रोखून वाट पाहत बसायचं (एवढ्या शांततेत शबनममध्ये हात घालून पिशवीचा चुर्रर्र चुर्रर्र आवाज न होता घारग्याचा तुकडा तोंडात टाकणं म्हणजे खायचं काम नसतं !!! ) सतरंजीवरची जागा पटकावली असेल तर मंचावर परफॉर्म करणाऱ्यांपासून आपण अवघ्या काही हातांच्या अंतरावर असतो….. त्यांचे हावभाव आणि आवाजच काय पण त्यांचे श्वासही टिपता येतात इतका निकट अनुभव असतो तो…. मंच आणि प्रेक्षागार यांच्यातला पडदा गळून पाडणारा… इंग्रजीत ज्याला ‘इंटिमेट थिएटर’ म्हणतात असा हा सुदर्शन रंगमंच. अत्यंत अविस्मरणीय नाटकांपासून ते अत्यंत टुकार प्रयोगांपर्यंत कित्येक आविष्कार मी इथे पाहिलेत ( सुरुवातीला तर मी पाहायचो त्यातली एकाआड एक नाटकं वाईट निघायची... मी काळाच्या कितीही अंतराने बघत असलो तरीही !!! त्यानंतर काहीकाळ एकाआड एक नाटकं skip करावी असं वाटायला लागलं होतं मला ).... प्रायोगिक रंगभूमीला मुंबईत ‘छबिलदास’ हे हक्काचं स्थान होतं तसं ते पुण्यातही (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता) मिळवून दिल्याबद्दल सुदर्शनच्या शुभांगी दामले यांचे नाट्यरसिक कायमच ऋणी राहतील… आता पुण्यात हिराबागेजवळ ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि दांडेकर पुलाजवळ साने गुरुजी सभागृह देखील झाल्यामुळे प्रायोगिक नाटकांची खूपच चांगली सोय झाली आहे… तरीदेखील ‘सुदर्शन’ च्या आपलेपणाची ओढ अजूनही कमी झालेली नाहीये...