Total Pageviews

Wednesday, June 29, 2011

बांध




त्या दिवशी मी नेहमीसारखाच माझ्या कोशात सुरवंटासारखा बसलो होतो... किंवा असे म्हणा की मी माझ्या बिळात उंदरासारखा  बसलो होतो. बाहेर दरवाज्याची बेल वाजली आणि आईने दरवाजा उघडला. बाहेर कोणीतरी नेहमीसारखेच मागणारे हात आहेत इतपत अंदाज आला होता. नेहमीचेच असते हे. सारखे कोणी ना कोणी हात पसरून दाराबाहेर उभे असते. त्यांचे कष्टी तोंड पाहून त्यांचा हिरमोड करावासा वाटत नाही म्हणून काहीतरी पाच पंचवीस रुपये हातावर टेकवून बोळवण करायची. पण सारखेच कोणीतरी आले तर देणे कसे शक्य आहे ? मग समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या निर्ढावलेपणाच्या प्रमाणावरून पवित्र घ्यायचा. समोरचा उगीचच कष्टी भाव चेहऱ्यावर दाखवत नसेल तर सरळ निर्विकारपणे "नाही" सांगायचे. किंवा मग समोरचा अगदीच चेहरा कसनुसा करत असेल तर "आत्ता आम्ही काही देऊ शकत नाही... आमचेच आम्हाला भागत नाही... महागाई किती वाढलीये" वगैरे टेप वाजवायची आणि दरवाजा लावून घ्यायचा.

आज यापैकी काय करायचे याचा विचार करत असताना आईने मला बाहेर बोलावले. बाहेर एक मूळचा गोरा पण खस्ता खाल्ल्यासारखा रापलेला चेहरा असलेला एक चाळीशीचा गृहस्थ उभा होता आणि बरोबर एक मुलगा पण होता १०-१२ वर्षांचा. तो हिंदीमध्ये बोलू लागला आणि प्रकाश पडला की हा काश्मिरी आहे. त्याचे आडनाव भट्ट होते. तो सांगायला लागला "आम्ही पिंपरी जवळच्या काळेवाडी इथल्या कॅम्प मध्ये राहतो..." आणि अचानक मला प्रकरण गंभीर असल्याचे जाणवायला लागले. तो बोलतच होता.... "हम काश्मिरी पंडित है, लेकीन हमारा काश्मीरमें जीना बहोत मुश्कील हो गया है. एक एक करके हमे काश्मीर छोडना पडा". इथपर्यंत मी कसेतरी ऐकत होतो इतक्यात त्याने माझ्या घराकडे वरपासून खालपर्यंत पहिले आणि ते वाक्य टाकले "साब हमारा भी आप जैसा खुदका घर था.. वहां  पे बडे बडे बाग थे, खुदका गालीचोंका कारोबार था  .. लेकीन साब, सब कुछ छोडके हमे वहां से भागना पडा....." आणि अगदी याच क्षणाला कुठेतरी आत मध्ये एक प्रचंड घण बसला - अगदी घनघोर ! ते जे काही होते ते माझ्या सहनशक्तीच्या पार पलीकडचे होते. आनंदात स्वतःच्या बागेत बागडत असताना अचानक कोणीतरी येऊन भोसकावे तसे काहीतरी घडले होते. घाव गहिरा बसला होता आणि माझ्या गोड गोबऱ्या जगाभोवतीची भिंत क्षणार्धात जमीनदोस्त झाली होती .... त्या धुराळ्याने गुदमरून जाऊन अचानक डोळ्यातून पाणी झरू लागले.... झरू लागले कसले, चांगले फुफाटत वाहायला लागले ...     

त्या क्षणाला मी उभा असलेल्या उंबऱ्यापाठीमागे भरभक्कम भिंत उभी होती जी मला जन्मापासून या क्षणापर्यंत अगदी अंजारून गोंजारून सुरक्षित ठेवत होती आणि...आणि उंबऱ्यापलीकडच्या जगात हे दोघे वादळात तंबू उडून गेल्यासारखे असहाय्यपणे उभे होते. एके काळी माझ्यासारखेच निर्धास्त असणाऱ्या या दोघांना आणि त्यांच्यासारख्या अगणित हिंदू पंडितांना काश्मिरातल्या मुस्लीम अतिरेक्यांनी त्यांच्या कागडीच्या उबेतून हिसडून गारढोण वादळात हाकलून दिलेले होते. उद्या मी साखरझोपेत असताना कोणी मला काहीही बरोबर घेऊ न देता नेसत्या वस्त्रांनिशी घराबाहेर हाकलून दिले तर ?? मला कल्पनाही करवेना. मी त्या दोघांसमोरच रडायला लागलो .... अगदी ओक्साबोक्शी.... माझ्या रडण्याने तो माणूस पण कावराबावरा झाला आणि तोही रडू लागला.....फारच चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली. तो रडत रडतच काहीतरी सांगत होता... मला पायातले बळच गेल्यासारखे वाटायला लागले. मी सरळ आत निघून आलो, आणि काय सांगू, रडू आवरेचना. हुंदक्यांवर हुंदके... मलाच कळत नव्हते हे काय होतंय. या आधी कधीच असं झालं नव्हतं. मला फक्त स्वतःच्या दुःखावर कढ काढणे  माहित होते. मग मी आज दुसऱ्याचे ऐकून एवढा का रडतोय ?  कदाचित असेही असेल की मी फार दिवसात-वर्षांत रडलो नव्हतो, कसलेतरी दुःख आत साचले होते आणि आज फुग्याला टाचणी लागल्यावर बांध फुटला होता. असं होतं बऱ्याचदा. आपली दुःखं आतल्या आत कुठेतरी दबून राहतात आणि मग असले काही निमित्त मिळाले की मिळेल त्या वाटेने बाहेर येतात..... पण छे ! माझी कसली आलीयेत दुःखं ? काड्यापेटीत मावतील इतपत जेमतेम माझी दुःखं... मला कुठे कोणी यांच्यासारखं सर्वस्व सोडायला लावून हाकलून दिलं होतं ? केवळ हिंदू आहे म्हणून माझ्या डोक्यावर यांच्यासारखी तलवार कुठे लटकत होती ? नाही नाही ... हे काहीतरी फार गहिरे होते... मला रडता रडता काहीच कळेनासे झाले होते... एवढा हमसून हमसून मी आधी कधी रडल्याचे आठवतसुद्धा नव्हते. त्या माणसाच्या केवळ चार-दोन वाक्यांमुळे मला पांगळा झाल्यासारखं वाटत होतं.
आई बाहेर त्या माणसाशी थोडावेळ तशीच बोलत राहिली. थोड्यावेळाने मी सावरलो आणि बाहेर येऊन त्याच्याशी बोललो, त्याला पाणी दिले. तो सांगत होता की "आम्ही भीक मागत नाही, आम्ही इकडे गालिचे विणून विकतो आणि थोडेफार पैसे मिळवतो.... आम्हाला पैसे नकोत. जुने कपडे किंवा बूट असतील तर द्याल का ?" नाही म्हणणे शक्यच नव्हते. आपणा पांढरपेशांची एक गोष्ट विशेष असते बरंका...  आपल्या वापरत नसणारे कपडे-वस्तू गरजूंना दिले की आपल्याला 'समाजसेवा' केल्याचा आनंद मिळतो. एकदा अशी समाजसेवा केली की पुढची समाजसेवा करेपर्यंतच्या काळात (म्हणजे नवे कपडे जुने आणि नव्या वस्तू निरुपयोगी होईपर्यंतच्या काळात)  आपण आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घ्यायला मोकळे. मी पण अशीच समाजसेवा केली - झेपेल इतपत.  जाताना त्याने आभार मानले आणि "काळेवाडीला आमच्या कॅम्पला भेट द्या" म्हणाला आणि मुलाला घेऊन (बहुदा आणखी एका दारात उभं राहण्यासाठी) निघून गेला.

त्या काही मिनिटांमध्ये उठलेले प्रश्नाचे मोहोळ अजून शांत झालेले नाहीये.
ते लोक हिंदू म्हणून जन्माला आले हा त्यांचा दोष आहे का ? की मग काश्मीरचे लचके पडल्यानंतर ५० वर्षे होऊन गेली, तरीही ते मुसलमान झाले नाहीत हा त्यांचा गुन्हा आहे?
काश्मीर आणि पाकिस्तानात लाखो हिंदूंच्या कत्तली करून आणि एवढ्या देशोधडीला लावल्यानंतरसुद्धा तिकडच्या मुसलमानांच्या राहणीमानात काय फरक पडला ? अजूनही तिकडचे मुसलमान नागरिक शस्त्रांच्या नंग्या नाचाला बळी पडतच आहेत ना ?  
एरवी उठता बसता अल्पसंख्याकांच्या नावाने ऊर बडवणाऱ्या secular नरपुंगावांपैकी एकही माईचा लाल काश्मिरातल्या अल्पसंख्य हिंदूंबद्दल अवाक्षर का उच्चारत नाही ? 

यातल्या एकही प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाहीये अजून.... मिळेल अशी आशाही वाटत नाहीये.... एवढे मात्र खरे त्या एका प्रसंगाने मला आतून हादरवले, ढवळून काढले. यापूर्वी कधीही ना अनुभवलेली अस्वस्थता आणि अस्थिरता जाणवून दिली.  आपण इकडे किती सुरक्षित (आणि त्यामुळेच अनभिज्ञ आणि बेफिकीर)  आहोत याचा साक्षात्कार झाला. We should not take our life for granted हे चांगलेच कळून चुकले. आणि त्याचबरोबर कुठेतरी समाधान वाटले - त्यांची वेदना मलाही तेवढीच सलली म्हणून, आपण अजूनही पूर्णपणे दगड झालेलो नाहीये याची जाणीव झाली म्हणून, खूप खूप दिवसांनी मला मोकळं होण्याचं निमित्त मिळालं म्हणून आणि त्या पाण्याने माझी नजर आणखी साफ झाली म्हणूनही !!
   



Tuesday, May 31, 2011

चिरतरुण आजोबा !!




कुकुल्या वयात असताना काही वाटा आपोआप सुरूच होतात ... म्हणजे त्या न कळत्या वयामध्ये "या वाटेवरून चालायला सुरुवात करायची की नाही" वगैरे प्रश्न पडतच नसतात आपल्याला !  चालणे असो, बोलणे, वाचणे असो - स्वतःहून या वाटांवरून पुढे जायला सुरुवात करतो.  वाचन  वगळता बाकीच्या मुलभूत गोष्टी आपल्या  आपोआप चालूच राहतात  ठेवतो.  (मी 'वाचणे'  असे न लिहिता मुद्दामून 'वाचन' लिहिले आहे.अगदीच नाईलाज म्हणून काही गोष्टी डोळ्याखालून घालणे - यात वाणसामानाच्या यादीपासून अभ्यासाच्या  पुस्तकापर्यंत बऱ्याच अपरिहार्य  गोष्टी आल्या -  म्हणजे 'वाचणे'  झाले, आणि मनापासून एखाद्या गोष्टीत रस वाटून ती वाचून संपवणे म्हणजे "वाचन" ). लहानपणी एखादी गोष्ट म्हणजे 'गोष्ट'च असते - 'कथा' वगैरे नसते.  लहानपणी प्रत्येकजण हटकून 'गोष्टीची पुस्तकं' वाचत असतो तशी मी पण खूप वाचली आणि सुदैवाने पुढे  इतकी छान छान पुस्तकं वाचायला मिळाली, की नकळत चालू लागलेल्या वाटेवर ती सावल्या देणारी झाडंच बनून गेली ..

   भा. रा. भागवत असेच केव्हातरी फास्टर फेणेच्या मागून दबकत दबकत आले आणि अक्षरशः गारुड केले.  वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला कोणीतरी हिरो  असतो - खरा किंवा काल्पनिक -  आणि बऱ्याचदा  आपला हिरो काल्पनिक आहे हे मानायला मन तयारच नसते ! पाचवीत असताना पहिल्यांदा फास्टर फेणेचे पुस्तक नजरेला पडले. त्याआधी कधीतरी एका दादाने फा.फे. बद्दल पुरेशी उत्सुकता पेरून ठेवली होतीच.  आईकडे हट्ट करून समोर दिसणाऱ्या सहा  पुस्तकांपैकी कशीबशी दोन झोळीत पडून घेतली 'फास्टर फेणे डिटेक्टीव'  आणि 'प्रतापगडावर 'फास्टर फेणे' . बास्स ! मला माझा हिरो मिळाला .... मग तो खरा आहे की काल्पनिक याच्याशी मला घेणे देणे नव्हते. तो खूप जवळचा वाटत होता. तो जे बोलत होता ते कुठेच पुस्तकी वाटत नव्हते.  तो जे धावरे धाडस करत होता ते त्या वयातल्या कोणत्याही मुलाला मनापासून करावेसे वाटते तसलेच होते.  आणि मुख्य म्हणजे त्याची 'कर्मभूमी'  'माझं पुणं' होती. मला आठवतंय जसा जसा फास्टर फेणेच्या गोष्टी वाचत गेलो तसा तसा त्यात वर्णन केली गेलेली पुण्यातली ठिकाणं डोळ्यासमोर उभी राहू लागली. .. मग कसब्यात गेलो की फा. फे. च्या मामांचा वाडा अमुक एका ठिकाणी असेल असे चित्र रंगवू लागलो.  रेसकोर्सपाशी गेलो की डोळे विद्याभवन शाळा शोधायला लागले, बंडगार्डनपाशी गेलो की फा. फे. ने पर्णकुटीपाशी वेड्याशी केलेला सामना दिसायला लागला ...  जेव्हा मी पहिल्यांदा पाताळेश्वर पाहायला गेलो तेव्हा माझे डोळे मागची अंधारी गुहा आणि त्यातल्या चीनी हेरासाठी भिरभिरत होते .... एक ना दोन .....  आणि हे वेड पुण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही .... ट्रेनने खंडाळ्याचा घाट ओलांडताना 'नक्की कोणत्या बोगद्यापाशी फा. फे. ने ढाण्या  वाघाला मालगाडीत अडकवले असेल'  याचीसुद्धा मनाशी खूणगाठ बांधली होती मी !   'डोळ्यांची निरांजने करून ओवाळणे' म्हणजे काय हे मला फा. फे ची पुस्तकं वाचत असतानाच्या भावना आठवल्या की कळते ( मला माहित आहे की मी लिहिलेले हे शब्द फार पुस्तकी किंवा नाटकी आहेत, पण या घडीला मला दुसरे शब्द आठवत नाहीयेत .. खरंच !).

आणि हा फास्टर फेणे जसा शब्दात आहे तसा तंतोतंत उभा केला तो राम वाईरकरांच्या अफलातून चित्रांनी.  सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये फा.फे. हा एका काटकुळ्या sketches च्या स्वरुपात होता. जसजशी पुस्तकं येत गेली तसतसा तो अधिक सुस्पष्ट आणि ठाशीव होत गेला.... एकुणात काय तर फास्टर फेणेचा प्रभाव फार जबरदस्त होता... इतका, की त्याची बरीच वर्षे 'out of print'  पुस्तके मी कॉलेज मध्ये असताना  जेव्हा नव्याने प्रकाशित झाली , तेव्हा माझ्याकडे नसणारी उरलेली सगळी पुस्तकं घेऊन अक्खा २० पुस्तकांचा सेट पूर्ण केला !! 


    अर्थात 'फास्टर फेणे'  चे गारुड हे भा.रा. भागवतांच्या झपाट-लेखणीचे आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मुख्यत्वेकरून मराठी मुलांसाठी लिहिलेला असला तरी त्यात हलके फुलके इंग्लिश शब्द चपखलपणे पेरलेले आहेत. त्यामुले आजही ही पुस्तकं कालबाह्य वाटत नाहीत. शिवाय सगळ्या गोष्टी अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या आहेत. या सगळ्यामुळे भा. रां. चे  पुस्तक दिसले की वाचायला लागलो.  त्यांची अनुवादित आणि रुपांतरीत पुस्तकं सुद्धा तितकीच मंत्रमुग्ध करणारी  आहेत. आपण ती वाचतो तेव्हा ती मूळची मराठीत नाहीत यावर विश्वास बसत नाही. Alice in Wonderland चे 'नवलनगरीत जाई'  हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. जगातल्या तमाम बंडखोरांचा 'हिरो' असणारा शरवूडच्या जंगलातला Robin Hood अणि त्याचे यारदोस्त त्यांनी अश्या चटकदार मराठीत रंगवलेत की Robin Hood आपल्याच गावातला कोणीतरी वाटतो ("शिंग वाजता Robin करिता शरवूड जंगल भंगेल - गडी लोटतील रंगेल" अश्या ओळीनेच पुस्तक सुरु होते ते संपेपर्यंत खली ठेववत नहीं). सर्वात अविस्मरणीय रुपांतरीत पुस्तक म्हणजे Charles Dickens च्या The Christmas Carol चा मराठी अवतार - 'भटांच्या वाड्यातील भुतावळ'. मूळच्या पुस्तकातल्या christmas ची यात दिवाळी होते. कंजूष चिटको शेठजी आणि नरकचतुर्दशीच्या आदल्या  एका रात्रीत त्याला वठणीवर आणणारी धमाल भुते ....  भा. रा. एका मराठमोळ्या खेड्याचे वातावरण असे काही उभे करतात की गोष्ट एकदम या मातीतली होऊन जाते ! हे पुस्तक मिळाले तर कधीही सोडू नका.

 भा.रा.भागवतांनी अक्षरशः शेकड्याने पुस्तकं लिहिली आणि इंग्लिश मधून भाषांतरित, रुपांतरीत, अनुवादित केली.  ज्यूल्स  व्हर्न ची जवळपास २५ -३० , H G Wales ची काही, Arthur Conan Doyle चा Sherlock Holmes अशी कितीतरी. खऱ्या अर्थाने ते बालसाहित्यातले भीष्माचार्य होते. परदेशात बालसाहित्यालासुद्धा एक वलय असतं. तसं दुर्दैवाने आपल्याकडे नसल्यामुळे एवढे मोठे भा.रा. आज फारसे माहित असावेत असे वाटत नाही. नेटवर शोधल्यावर काही तुरळक forums वगळता फारसे हाती लागत नाही (ब्लॉग साठी वापरलेला फोटो नेटवर कसा काय मिळाला याचेच मला आश्चर्य वाटते आहे). Harry Potter च्या चित्तथरारक कादंबऱ्या वाचताना  प्रकर्षाने जाणवते की आज भा. रा. भागवत असायला पाहिजे होते. या अफलातून कादंबऱ्या तितक्याच ताकदीने मराठी मध्ये आणायला भा. रा. भागवत यांच्या इतका समर्थ (आणि मुख्य म्हणजे मुलांचे विश्व जाणून घेऊन लिहिणारा)  दुसरा अनुवादक  आहे असं वाटत नाही. 

 खरेतर भा.रा. भागवतांनी मोठ्यांसाठीचे साहित्यसुद्धा लिहिले. विज्ञानकथा लिहिल्या. 'हाजीबाबाच्या गोष्टी' सारखे इराणच्या सुल्तानशाहीच्या पार्श्वभूमीवरचे पुस्तक लिहिले. पेरू देशातली इनका संस्कृति नष्ट करणार्या पिझारो या spanish आक्रमकावरचे  'पिझारोचे थैमान' लिहिले. भरपूर विनोदी कथा लिहिल्या. छगन नावाचे गमतीदार पात्रसुद्धा निर्माण केले (राम कोलारकर संपादित 'निवडक मराठी विनोद कथां'चे  २० खंड प्रकाशित झालेत त्यातल्या जवळपास प्रत्येक खंडात भा.रा. भागवतांची एक ना एक कथा आहेच). एवढे असले तरी ते मनापासून रमले लहान मुलांमध्येच. 

मुलांसाठी छान छान साहित्य सादर करावे यासाठी भा.रां.ची कायम धडपड चालायची. १९४० च्या दशकात सुमारास त्यांनी 'बालमित्र' नावाचे मासिक सुरु केले. मुलांनी केवळ जादूच्या गोष्टीमध्ये रमून न जाता चटपटीत,प्रसंगावधानी आणि आजच्या भाषेत 'dashing' बनावे अशी त्यांची खूप इच्छा असायची. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बाजाच्या गोष्टी,
वैज्ञानिक कुतूहल शमवणाऱ्या गोष्टी, साहसकथा, संस्कारक्षम कथा अशा अनेक प्रकारांनी अंक सजवला. त्यावेळच्या मोठ्या लेखकांकडून लिखाण करून घेतले. बऱ्याचदा स्वतः वेगवेगळ्या टोपणनावांनी  एकाच अंकात गोष्टी, लेख लिहिले. परवडत नसूनही पदराला खार लावून , नाना खटपटी करत मासिक चालू ठेवले.(सुदैवाने अलीकडेच 'निवडक बालमित्र' नावाचे ७ भाग प्रकाशित झाले आहेत. ते पाहून हे अंक किती सुंदर असायचे याची कल्पना येते.) बाल - कुमार गटातल्या मुलांची नस त्यांना बरोब्बर सापडली होती.... त्यामुळेच तुडतुडीत फास्टर फेणे, पुस्तकातला किडा असूनही वेळप्रसंगी विजू-मोना या छोट्या दोस्तांना घेऊन साहसात उडी घेणारा बिपीन बुकलवार, थापाड्या तरीही निरागस असणारा नंदू नवाथे अशी वेगवेगळ्या जातकुळीची (आणि तरीही सारखीच वाचनीय असणारी) पात्रे कायमच जवळची वाटत राहतात. भा.रा.भागवतांच्या पुस्तकांमधे साहस हे समान सूत्र असले तरी पार्श्वभूमी वेगळी असते.त्यामुळे वाचताना दरवेळेस आपण वेगळ्या विश्वात जातो. मग 'भुताळी जहाज' मध्ये आपण एका गूढ धुक्यात गुंतत जातो तर 'ब्रह्मदेशातला खजिना' मध्ये १८५० च्या आसपास च्या काळातली अनोखी शोधकथा अनुभवता येते. 'जयदीपची जंगलयात्रा' मध्ये जयदीप बरोबरच आपणसुद्धा ब्राझीलच्या जंगलात हरवतो तर 'तैमूरलंगचा भाला' मध्ये १९४२ च्या लढ्यामध्ये भगतराम या क्रांतिकारकासोबत लता आणि किरण या भावंडांनी बेभान होऊन केलेलं साहस अनुभवतो.... भा.रा.भागवतांची पुस्तके जितकी वाचावी तितकी कमीच आहेत  !!! प्रत्येकाबद्दल लिहायला लागलो तर वेळ पुरायचा नाही. सुदैवाने माझ्या संग्रहात त्यांची पन्नासेक पुस्तके आहेत . अजूनही प्रदर्शनात त्यांचे पुस्तक दिसले की मी ते घेतोच.


ब्लॉग सुरु केल्यापासून ठरवले होते भा.रा. भागवतांवर नक्की लिहायचे आणि लिहायचं लिहायचं म्हणता म्हणता आजचा दिवस उजाडला तो पण एकदम perfect . बरोब्बर १०१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे १९१० ला इंदोरला भा.रा.भागवतांचा जन्म झाला होता.....त्यांच्या लिखाणाचा काळ लक्षात घेतला तर त्यांचे बरेचसे लिखाण १९६० नंतर म्हणजे  वयाच्या पन्नाशी - साठी नंतर झालेलं आहे. एवढे असूनही ते अगदी ताजे आणि चटकदार आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख मला आठवत नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही. माझ्यासाठी ते चिरतरुण असणारे  आणि आजसुद्धा पुस्तकांच्या पानापानातून मिश्किलपणे भेटत राहणारे जानी दोस्त आहेत. 

 

 मी काही पुस्तकांची नावे देतोय जी मी केव्हाची शोधतोय. सध्या यातली बरीचशी आउट ऑफ प्रिंट आहेत. ही ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्या कोणाच्या पुस्तकाच्या कपाटात यातले एखादे पुस्तक असेल तर मला नक्की कळवा
१) भाराभर गवत - भा.रां.चे आत्मचरित्र
२) घड्याळाचे गुपित - बिपीन बुकलवारची  साहसकथा
३) दीपमाळेचे  रहस्य
४) जयदीपची जंगलयात्रा
५) समुद्र सैतान
६) कॅप्टन किडचा खजिना

ता.क. : इकडे तिकडे भटकताना आजूबाजूच्या लोकांच्या सतराशे साठ प्रकारच्या T - Shirts वर नेहमी परदेशी characters (Dennis, मिकी - डोनाल्ड इत्यादी )  आणि व्यक्तिमत्वं (Che Guevara, Kurt Cobain इत्यादी ) दिसत असतात.  म्हटले - एवढे सगळेजण  T -Shirt वर झळकत आहेत मग आपला मराठमोळा फास्टर फेणे का नाही !! त्यामुळे मी लवकरच फास्टर फेणेचे चित्र असणारा  T -Shirt प्रिंट करून घेणारे - Sweat Shirt  प्रिंट करून घेतो तसा.... तमाम फास्टर फेणे fans ना यामध्ये सहभागी करून घ्यायला मला आवडेल  !!


Tuesday, February 8, 2011

वेडा



कधी खुदकन , कधी गडगडून , स्वतःशीच हसतो पुलंचा joke आठवून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी बेभान होउन घेतो निसर्ग डोळ्यात साठवून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी गीत ऐकतो देहभान हरपून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी दैन्य पाहून आसपासचे ह्रदय जाते करपून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी जीव गलबलतो आप्तांचे प्रेम पाहून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी आठवणीने मित्रांच्या , जातात अश्रू वाहून
लोक मला वेडा म्हणतात .....
रोज रोज टी व्ही वर रक्तपात पाहून मला शिसारी येते
लोक मला वेडा म्हणतात .....
माथं भड़कतं , वाटतं "कसे तोडतात क्षणात नाते ?"
लोक मला वेडा म्हणतात .....
आता मला कळून चुकलंय ,
आजच्या जगात चालायचं असतं झापडं लावून
भावनांनी केलाच प्रयत्न मनात शिरायचा,
तर घ्यायच्या दारं खिडक्या लावून ........

म्हणून मी आजकाल
सरळ 'लायनीत' चालतो ,
मान खाली घालून काम करतो
हसत नाही, रडत नाही,
हादरत नाही, गहिवरत तर नाहीच नाही ........
कारण....
मीसुद्धा बहुदा
इतर 'शहाण्यां'मध्येच सामील झालोय !!

Friday, January 14, 2011

कुंपणांचे जग


छोट्याश्या मुठी एवढे जग , आणि मी त्यात एखादी असीम - अनिर्बंध गोष्ट अस्तित्वात आहे का याचा शोध घेतोय. किती वेडा आहे मी !! माझे जग, माझी पृथ्वी सीमेने घेरलेली तर चीज आहे . सगळीकडे मर्यादा .. देशाला 'बॉर्डर'ची , गावाला वेशीची तर समाजाला रूढी - परंपरांची लक्ष्मणरेषा .. आणि प्रत्येक व्यक्तीला शिष्टाचाराच्या दिखाऊ सामाजुतींनी अभेद्य बनलेल्या मनाच्या भक्कम भिंती ... सगळ्या व्यक्ती , चीजवस्तू, संकल्पना - एका वर्तुळाच्या घेऱ्याच्या आत ... एका वर्तुळात असंख्य वर्तुळे ...

एवढे मोठ्ठे असीम आकाश, पण माझ्या घरावरून बघितलं तेव्हा त्याला क्षितिजाचं कुंपण दिसलं. आकाश मर्यादित असल्याचा भ्रम झाला . सहज म्हणून चालत दूर गेलो, तेव्हा आकाशातल्या पोकळीमधले माझ्या घरावरून न दिसणारे तारे दिसू लागले. मला आनंद झाला. "म्हणजे आकाश सीमित नाही तर !!! मग मगाशी भ्रम का झाला?" थोड्या वेळ विचार केल्यावर लक्षात आलं की हा आपल्या भोवतीच्या वर्तुळाचा परिणाम . आम्हाला सवयच लागली आहे - सीमारेषांची, बंधनांची.... त्यामुळे विचारांनाही झापडे लागली आहेत. जगात मर्यादा, सीमा यांना एवढे महत्व का आले आहे ? भौतिक सीमा हे तर याचे सर्वात मोठे उदाहरण. कालपर्यंत एकाच आईच्या अंग-खांद्यावर खेळणारी मुलं दुसऱ्या दिवशी आईचं शरीर अर्धं-अर्धं वाटून घेतात. त्यांच्यासाठी ती बोर्डर असते , पण आईसाठी ती चारत जाणारी जखम असते. ४७ साली माझ्या आईच्या शरीरावर किती मोठा ओरखडा ओढला गेला आणि एका दिवसात मधली यःकश्चित रेषा दोन्ही बाजूंची मनं दुभंगून गेली. खरच, सीमारेषेत एवढी पाशवी ताकद असते मला माहीतच नव्हतं !!!

भौतिक सीमा परवडल्या एकवेळ, इतक्या असंख्य सीमा माझ्या समाजात आहेत. खोट्या रुढींच्या, फसव्या परंपरांच्या, भोंगळ जातीपातीच्या आणि शेवाळलेल्या विचारांच्या .... असल्या सीमा ओलांडायला सुद्धा दसऱ्याची वाट बघायची ? अशाने सीमोल्लंघन कधी व्हायचेच नाही. फार कशाला , स्त्री जेव्हा पुरुषाच्या पावलात पाउल मिसळून चालू पाहते तेव्हा  'मर्यादा' या शब्दाची आठवण पुरुष जातीला फार प्रकर्षाने होते. 'संयम , शालीनता , शील हीच स्त्रीची मर्यादा ' वगैरे वाक्ये बरी पडतात तोंडावर फेकायला ...

या सीमेला एक लहान भावंड आहे. 'कुंपण' त्याचे नाव. सगळ्यात पीडादायक ! मनाच्या सीमा आकसल्या की ते झालं 'कुंपण'. एकवेळ सीमेच्या आत सद्गुण, परोपकार औषधाला तरी असतात, पण कुंपणाआड असतो फक्त स्वार्थ आणि अल्पसंतुष्टता. कुंपणाचं फार मोठं पीक आलंय आजकालच्या राजकारणात. असली जागा आसनासाठी फार सोईची. शेताच्या आतली आणि बाहेरची, दोन्ही जागा नजरेच्या टप्प्यात राहतात. वाऱ्याच्या दिशेने  टोपी फिरवणारे नेते लोक यातले तज्ञ. फायद्याच्या कुरणात पटकन उडी मारून जाता येतं. 'सलाम' कविता संग्रहात पाडगावकरांनी 'कुंपण-प्रशस्ती' गायली आहे.
 "शहाणे कुंपणावर बसतात, पण आपली माणसे पेरून ठेवतात शेतात |
आणि काही शेताबाहेर . माणसे हेरूनही ठेवतात कुंपणावर बसून |
शहाणे, कुंपण आणि परमेश्वर यांचा थांग लागत नाही ||"

खरंच ! आजच्या तथाकथित शहाण्यांची धाव सरड्यासारखी कुंपणा पर्यंतच आहे. अशी कुंपणे, ज्यांनी शेतच नाही तर अक्खा समाज गिळला आहे. ती मला तोडायची आहेत. सीमांच्या पलीकडे जायचे आहे. असीमता अनुभवायची आहे - मनाची, विचारांची. पण आहे का हे शक्य? अख्ख्या पृथ्वीला गिळू पाहणारा समुद्र - पण त्याला सुद्धा किनाऱ्याने बंदिवान करून टाकले आहे. असीमातेच्या शोधासाठी मग मी बाहेरच पडलो पृथ्वी वरून. विश्वाचा एक तुकडा - जो माझ्या अस्तित्वाच्या कणाकणात आहे तो - सुद्धा धुंडाळला, पण व्यर्थ !

शेवटी मी पृथ्वी कडे वळलो. जवळ येऊन बघतो तर काय !  'असीम' ' अमर्याद' अशा कित्येक गोष्टींनी मला पृथ्वी चमचमताना  दिसली... काय काय होते हे असीमतेला कवटाळणारे ? पृथ्वीवर होते आईचे  पिल्लांवरचे प्रेम - कोणत्याही बंधनापुरते मर्यादित नसणारे, पृथ्वीवर होती माझ्या बांधवांची परमेश्वरावरची अपार भक्ती, पृथ्वीवर होती सैनिकांची आणि देशभक्तांची मातृभूवरची गाढ निष्ठा, पृथ्वीवर होती समाजसेवकांची संपूर्ण समर्पणाची भावना ..... आणखीही खूप काही... या सर्वांची तुलना करणारा तराजू कुठे आहे? या सर्वांना अडवणारी तटबंदी कुठे आहे? या सर्वांनी झुगारली आहेत सीमांची बंधने, मर्यादेच्या बेड्या. माझे जग कुंपणाचे आहे खरे, पण मला आज समाधान वाटत आहे कि त्याचा एक छोटासा  का होईना, पण असा एकतरी कोपरा जिवंत आहे, ज्याला आभाळा शिवाय कशाचीच सीमा नाही....!!!

Tuesday, December 21, 2010

आपण सारे खुळाडू



ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करू नये म्हणतात, याच चालीवर बालपणीच्या खेळांचे खूळ कुठून, कसे (आणि मुख्य म्हणजे 'का' ) सुरु होते हे शोधण्याचा प्रयंत्न करू नये. कारण आपल्या हाती काहीही लागणे शक्य नसते. नानाविध चमत्कारिक शब्द, जगावेगळ्या कल्पना, कुठल्याही नियमावलीला फेफरे आणतील असे नियम यामुळे लहानपणी खेळले जाणारे खेळ हे अगदी अजब रसायन बनते. मलातर जेव्हा जेव्हा लहानपणीचे खेळ आणि त्यातल्या तर्कापलीकडच्या संकल्पना आठवतात तेव्हा आपल्याच येडेपणाबद्दल जाम हसायला येते. त्यामुळे म्हटले आज लहानपणीच्या अशाच काही चित्तचक्षुचमत्कारिक संकल्पना आठवून बघू. मला खात्री आहे तुम्ही पण हे नक्की अनुभवले असेल , पण खेळताना  'हे असेच का' वगैरे फालतू प्रश्न अजिबात पडले नसतील..

आता हेच बघा ना कोणत्याही खेळात 'राज्य' कोणावर आणायचे हे ठरवण्यासाठी 'सुटणे' नामक एक विधी केला जायचा. त्यात सुद्धा किती खुळ्या गमतीजमती (आणि प्रश्न !!). 'सुटण्या' च्या  दोन पद्धती काहीशा अशा   :

१) सगळ्यांनी रिंगण करून आपला उजवा हात पालथा करून समोर धरायचा (भगतसिंगाने मेणबत्तीवर धरला होता तसा) आणि मग कोणीतरी एक गडी (बऱ्याचदा तो ग्रुप मध्ये लीडरगिरी करणारा असतो ) "जास्तीची majority " असा खच्चून ओरडायचा (उच्चार : "मेजॉ  ssssss  र्टी" ). मग सगळी पोरंसोरं आपापला हात हवेत उडवून उताणा किंवा पालथा करायची. मग यातलं ज्याला कळतं असे काही अनुभवी खेळगडी कोण 'सुटलं' आणि कोण नाही हे सांगायची. मलातर नक्की पालथे हात असणारे सुटले की उताणे असणारे सुटले हे आजपर्यंत कळलेले नाहीये. बहुतेक तो गडी आधी जे काही खच्चून ओरडला त्यावर अवलंबून असावे. कारण बऱ्याचदा तो 'कमीची majority' (?????)  असंही ओरडायचा !! बऱ्याच जणांना तोपर्यंत इंग्लिशचा गंध नसल्यामुळे ओरडणारा भिडू इंग्लिश किंवा मराठी यापैकी एका भाषेला उताणा (की पालथा ?) पाडतोय हे कोणाच्या गावीही नसायचे. सगळे जण आपल्यावर येऊ शकणारे 'राज्य' वाचवायच्या प्रयत्नात असायचे. मी तर 'चार लोक करतात ते बरोबर' हे डोक्यात ठेऊन नेहमी कुंपणावरच असायचो. म्हणजे असे की उगाचच हात उंच हवेत उडवायचो आणि सावका ssss श खाली आणायचो म्हणजे, हात खाली येईपर्यंत एकूण उताणे/पालथे हात किती आहेत याचा अंदाज यायचा आणि मी शिताफीने 'जास्त लोकांचा' हात जसा असेल तसा धरायचो !! (पण कधी कधी माझ्यासारखेच आणखी काही 'सावकाश भामटे' कंपू मध्ये असतील तर मात्र आम्हा सगळ्या भामट्यान्चे हात बराच वेळ खाली न येता 'हाईल हिटलर' म्हणताना हात जसा तिरका हवेत असतो तसेच हवेत राहायचे.)

२) सगळ्यांनी रिंगण करून आपले हात शेजारच्याच्या हातात गुंफायचे आणि मग हात दोन वेळा वरखाली करून ते हात सोडून द्यायचे आणि (आपल्याच) डाव्या तळव्यावर उजवा हात (परत एकदा उताणा किंवा पालथा !) आपटायचा. जो 'सुटला' आहे तो त्याने एकदम खुश होऊन आनंदाच्या भरात दोन्ही हात तसेच्या तसे लगेच ('वाचलो' या भावनेने) उचलून छातीला लावले की बाकीचे 'न सुटलेले' रडतराव एकसुरात ओरडणार "जळला sssssss" . झाले ! सुटलेल्या भिडूला  पुन्हा त्या प्रक्रियेत नाईलाजाने सामील व्हावे लागायचे.  असे करता करता एक एक जण सुटत गेला आणि शेवटी दोघेच उरले मग अर्थातच कोण 'सुटला' हे कळणार नाही म्हणून मग आधी सुटलेल्या गड्यांपैकी एक जण परत 'राज्य कोणावर' हा पेच सोडवायला या प्रकारात सामील व्हायचा. आता एवढ्या साध्या गोष्टीसाठी मदतीला येणारा तो गडी एक चमत्कारिक कृती करून मगच 'सुटण्या' च्या प्रक्रियेत सामील व्हायला यायचा. ती कृती म्हणजे - 'एक तंगडी इतपत उचलावी की मांडी जमिनीला समांतर असेल आणि गुढग्यापासून पुढचा भाग लोंबकळता आणि मग उचललेला पाय आणि जमीन याच्या मध्ये दोन्ही हात नेऊन टाळी वाजवायची !!'  यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की कृती जास्तीत जास्त अर्ध्या सेकंदात पूर्ण व्हायची. एवढे झाले की तो मदतीला तयार. एवढी अचाट कृती पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आली, पाय उचलणे आणि टाळी वाजवणे यातला परस्पर संबध काय, 'एकच पाय उचलणे' यामागे माणसाचे संतुलन वगैरे सुधारण्याचा प्रयत्न असावा का, इत्यादी प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. अभ्यासूंनी प्रकाश टाकावा.

हे झाले 'सुटणे', जे जवळपास प्रत्येक खेळाच्या सुरुवातीला अनिवार्य असते. प्रत्यक्ष खेळामध्ये सुद्धा इतक्याच सुरस गोष्टी असतात. उदाहरणार्थ, लपाछपी खेळात असताना लपलेला कोणीतरी दिसला की त्याचे नाव घेऊन "अमुक अमुक
इस्टॉप (?????)" असे ओरडायचे. मी समासविग्रह, संधीविग्रह वगैरे व्याकरण चालवून 'इस्टॉप'चा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त जवळ पोचू शकलो तो 'Is Stop' या शब्दांच्या. पण तरीही हे दोन इंग्लिश शब्द आहेत याव्यतिरिक्त त्यांचा परस्परसंबंध, इंग्लिश व्याकरणाशी त्याचे नाते, 'इस्टॉप' ही आज्ञा आहे की 'सापडला' या अर्थाचा उद्गार आहे, वगैरे अर्थबोध मला आजतागायत होऊ शकलेला नाही. याव्यतिरिक्त धावत येऊन पाठीत दिलेला गुद्दा, पाठोपाठ 'धप्पा' ही आरोळी (कदाचित तो शब्द 'धप्पा' हा नसून गुद्द्याच्या आवाजाला represent करणारा 'धप्प' असा असावा), एखाद्याला दुसराच समजून 'इस्टॉप'  दिल्यावर चहूबाजूंनी घुमणारा 'अंडं sssss' (म्हणजे काय ????) वगैरे रोमहर्षक प्रकारांनी लपाछपीला अजूनच मनोरंजक बनवलंय ! (लपाछपीचा एक चुलतभाऊ आहे. त्याच्या तर नावापासूनच गोलमाल आहे, त्याच्या नावाचा अर्थ लागत नाहीच पण त्याचे खरे नाव 'डब्बा ऐसपैस' आहे की 'डब्बा एक्स्प्रेस' आहे हे मला कधीच कळले नाही. पुन्हा एकदा अ. प्र. टा. !!)


या सगळ्या खेळातल्या गोष्टींसोबतच आपसूकपणे घडणारी एक गोष्ट अजिबात विसरता येणार नाही, आणि ती कृती आठवली की मी आजही अवाक होतो - 'राज्य' असणारा भिडू पकडायला खूप आला जवळ की पळणारा हमखास एक गोष्ट करायचा - झटकन मनगट चाटायचा आणि ओरडायचा "ट्यामप्ली sss ज". झाले ! सगळे असतील तिथे थांबायचे. कधीकधी 'ट्यामप्लीज' ओरडायला आणि त्याला 'राज्यकर्त्या' ने पकडायला एकच गाठ पडायची तेव्हा मात्र आधी पकडणाऱ्याने औट केले की पळणारा 'ट्यामप्लीज' आधी ओरडला यावरून दोघांची जुंपायची.... मग पळणारा पोरगा हुकमी एक्का टाकायचा आणि म्हणायचा "हे बघ, मी आधीच ट्यामप्लीज 'घेतली' होती" आणि आणि असे पुरावा म्हणून लाळेने माखलेले मनगट उन्हात धरून चमकवायचा !!! आहे की नाही हाईट  !! स्वतःचे मनगट हे 'मेवाड'  ice cream असल्यागत चाटण्याच्या प्रथेचा उद्गाता कोण ??? कृपया अ. प्र. टा.

इथे एक गम्मत आठवते आहे, जी खेळताना घडत नसली तरी एरवी नेहमी घडायची ... शाळेत असताना 'बिट्टी धरणे'  हा एक प्रकार आमच्यात फार पॉप्युलर होता. कधीकधी शाळेत अचानक नाक बेचैन करणारा दुर्गंध हळूहळू पसरत जायचा (यामागचे कारण एखाद्या पोराचा शाळेत येतायेता रस्त्यातल्या शेणात पाय पडलेला असणे, कोणीतरी अंघोळ केलेली नसणे, कोणीतरी अपानवायू मुक्त केलेला असणे यापैकी काहीही  असू शकायचे). काही मिन्टे अशाच अस्वस्थतेत गेल्यावर अचानक आमच्यातलाच एखादा 'शेरलॉक होम्स' त्या दुर्गंधाचे उगमस्थान असणारा गडी शोधून काढायचा.  झाले ! आता त्या उगमस्थान पोराची अचानक दहशत निर्माण व्हायची. याने आपल्याला स्पर्श जरी केला तरी आपण जणू आपण बाटणारच  ! यावर उपाय एकच 'बिट्टी धरणे'. सगळी पोरं हाताच्या मधल्या बोटाचा तर्जनीला विळखा घालून 'बिट्टी ' धरायची. आता आपण 'सेफ'. "अब वो तो अपना बाल भी बांका नाही कर सकता" असा confidence यायचा. वास्तविक ज्या पोरावर 'आळ' आलेला आहे  त्याने यावेळी शरमेने चूर होणे अपेक्षित असायचे. पण व्हायचे भलतेच. त्या कारट्याच्या अंगी अचानक हत्तीचे बळ  संचारायचे. तो हिरीरीने आजूबाजूच्यांना स्पर्श करून त्यांना पण 'आपल्यात' घ्यायचा प्रयत्न करायचा आणि नकळत 'बिट्टी सुटलेले' काही गाफील भिडू त्याला सापडायचेच. मग ते पण नवी जबाबदारी स्वीकारून तेच करायला लागायचे आणि  जसे एका अमिबाचे दोन दोनाचे चार व्हावेत तसा हा समाज वाढत जायचा !! ( अर्थात कोणत्याही प्रकारच्या भूतबाधेपासून वाचण्यासाठी मांत्रिकाकडे जस हरतऱ्हेचा उपाय असतो (गंडा , अंगारा, अंगठी  इ. इ.), तसा या गाफील मंडळींसाठी माझ्या एका मित्राकडे नेहमी काही ना काही 'उतारा' असायचाच. तो अधिकारवाणीने सांगायचा "हाताने 'बिट्टी धरलेली नसेल तरी चालते - अंगावर लोखंड असेल (बक्कल वगैरे) तर ते दाखवायचे किंवा हातावर अगोदरच खाजवून ठेवायचे आणि ते ओरखडा सदृश पांढरे फराटे दाखवायचे म्हणजे 'त्या' पोराने तर अंगाला हात लावला तरी प्रॉब्लेम नाही" !!!!)

हे सगळे आठवून आता स्वतःवरच हसू येते. अशा कित्येक वेड्या गोष्टी आहेत ज्यांनी आत्ता मनात गर्दी केलीये - ज्या आठवताना 'का ????? का ?????' असा नेहमीचा प्रश्न पडतोय मला... मग हळूच माझं दुसरं मन मला सांगतंय, "अरे वेड्या, लहानपणी खेळता खेळता दंगून जाणे एवढाच तर उद्देश असतो. किंबहुना तर्कसंगती, डोकं लावणे वगैरे गोष्टी त्या वयातल्या खेळांचा उद्देश नसतोच. मिळेल त्या जागेत, मिळेल त्या साधनांसह आणि हजर असतील तितक्यांसह एन्जॉय करणे एवढंच तर आपली आनंदाची सर्वोच्च कल्पना असते. जे आधीपासून आले आहे ते 'का ?? ' असे न विचारता follow करण्याइतकं निरागस मन असतं आपलं आणि तेच आपलं 'लहानपण' शाबूत ठेवत असतं " .
अशा वेळेस मात्र प्रकर्षाने जाणवायला लागतं की आपण सगळे आयुष्याचा वेगवान खेळ खेळणारे निबर खेळाडू झालोय. खुळ्या संज्ञा आणि शब्द वापरणारा आपल्यातला निरागस 'खुळाडू' कधीच अंधारात गाडला गेलाय ही कल्पना मात्र नकळत कुठेतरी अस्वस्थ करत राहते..... 


ता. क. : कोणाला असल्या आणखी काही गमती जमती किंवा अतर्क्य शब्द ( उदा: गोट्या खेळतानाचे 'अक्क्या, बोक्क्या, टोकक्या' वगैरे शब्द)  आठवत असतील तर नक्की share करा. मी वाट बघतोय...

Tuesday, December 14, 2010

चार पावलं o o o o



वाचनाचा नाद कधी लागला हे आठवत नाही आता, पण वाचनाचे बोट पकडूनच हळू हळू मनातल्या मनात काहीतरी जुळवायला लागलो. सुचतंय ते लिहून वगैरे काढायची अक्कल फारशी नव्हती आधी. नंतर नंतर मात्र मनात बरेच विचार फेर धरायला लागले तेव्हा मात्र त्यांना कान पकडून डायरीत आणायला लागलो. वाचता वाचता आणि डायरी लिहिता लिहिता स्वप्नं पाहायला लागलो - कधीतरी स्वतः नक्की स्वतःचे पुस्तक लिहीन..... आणि जेव्हा केव्हा पुस्तक लिहीन तेव्हा त्याच्या अर्पणपत्रिकेत कोणाची नावे असतील हे पण ठरवलं होतं. नाल तयार होती, घोडा आणणे तेवढे बाकी होते.

नंतर जेव्हा कळून चुकलं , की पुस्तक लिहिण्यासाठी (खरं म्हणजे छापून येण्यासाठी ) लिखाणामध्ये किमान काही दर्जा असावा लागतोतेव्हा पुस्तक छापून येण्याची  स्वप्नं बघणं सोडून दिलंखूप दिवस लोटले आणि अचानक लक्षात आलं की , पुस्तक लिहिण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा मी ब्लॉग लिहू शकतो !! मनात आलं ते लिहिलं आणि share करावसं वाटलं ते ब्लॉग वर टाकलं, इतका सोप्पा मामला वाटला मला हाअधे मधे थोडं फार सुचत होतं ते कागदावर लिहिलंच होतं; आता ते ब्लॉगवर उतरवता येईल .. वा, छान कल्पना !! त्यात अलीकडे नवीन नवीन बरेच काही वाचायला - अनुभवायला मिळायला लागलं आणि डोक्यात अक्षरांची फुलपाखरं भिरभिरायला लागली ...मग जेव्हा डोक्यात ती मावेनाशी झाली, तेव्हा त्यांच्यासाठी माझ्या बोटांतून वाट फुटली  आणि मी keyboard बडवायला सुरुवात केली ....
ब्लॉग वर काय काय लिहीन मी ?? बघूया .... ठरवलं काहीच नाहीये..... सुचेल तेव्हा, मनात येईल तसे आणि share करावेसे वाटेल ते ... निश्चित असे कोणतेही स्वरूप नाही किंवा फॉर्म सुद्धा नाही  ...  त्यामुळेच ब्लॉगचे नाव ठेवणे अवघड नाही गेले , ते आपोआप डोक्यात आले ... "इत्यादी

एवढं मात्र नक्की की पुढे एकवेळ 'लिहायला काहीच सुचल्यामुळे' ब्लॉगची नंतरची पानं कोरी राहिली, तरी सुरुवातीचं एक पान नक्की भरलेलं असेल - अर्पणपत्रिकेने !! (एकेकाळी पुस्तक लिहिता येणार नाही हे कळल्यावर "आता अर्पणपत्रिका केव्हा आणि कुठे लिहिणार" या विचाराने चिंतेत पडलो होतो ...  नंतर नंतर तर किमान अर्पणपत्रिका लिहिण्यासाठी तरी पुस्तक लिहावसं वाटायला लागलं याचे कारण अर्पण पत्रिकेतल्या 'त्या' दोन व्यक्तींनी मला जे काही दिलंय ते खरच अनमोल आहे).

यापूर्वी कोणता ब्लॉग अर्पणपत्रिकेने सुरु झालाय की नाही माहित नाही , पण मी मात्र (नमनाला घडाभर तेल ओतल्यानंतर का होईना) अशी सुरुवात करतोय ... 'त्या' चार पावलांना नमस्कार केल्यामुळे मी पावलं न अडखळता चालत राहीन अशी अशा वाटते आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रिय भा.रा.भागवत आणि पु.



भा.रा.: तुमची पुस्तकं वाचायला सुरुवातपण केली नव्हती तेव्हा वाटायचं की 'चटकदार' चव ही फक्त भेळेलाच असते, पुस्तकाला नसतेच मुळी !! आणि ते फास्टर फेणे नावाचं भूत जे माझ्या मानगुटीवर बसवलंत   ते अजूनही उतरायचं नाव घेत नाहीये ...



पु. : जगण्यातली एकही situation अशी नसते ज्यावेळी तुम्ही आणि तुमचे dialog आठवत नाहीत, मग ती situation म्हणजे अगदी जन्म असो ( "रामराणा जन्माला ती  टळटळीत दुपारची वेळ होती...." - मी आणि माझा शत्रुपक्ष'  )  किंवा मृत्यू  ("शेवटी "चांगली बरणी आल्याशिवाय तुमच्या साड्या बोहारणीला देणार नाही" असं बोलल्यावर  पिंडाला कावळा शिवला ...." - पाळीव प्राणी ).  अवघं जगणं किती आनंदी होऊ शकतं हे तुमच्या मुळे कळलं ...



तुम्ही दोघांनी लिहिलं नसतंत तर मला वाचायची आवड लागली असती असं खरोखर वाटत नाही.. आणि वाचायला लागलो नसतो आज हे पांढऱ्यावर काळं (खरेतर काळ्यावर पांढरं) लिहायची काही शक्यताच नव्हती !

तुम्ही दोघेही हयात असताना (किंवा निदान अखेरच्या प्रवासाला निघालात तेव्हा तरी) तुम्हाला नुसतं एकदा बघून तरी यावं हा विचार माझ्या डोक्यात सुद्धा येऊ नये याबद्दल राहून राहून खंत वाटतीये  ......!!!

-----------------------------------------------------------------------------------------------