Total Pageviews

Tuesday, June 20, 2023

नवोदित लेखकांसाठी कानमंत्र


 


आपले विचार व्यक्त करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे लेखन. निरीक्षण, वाचन, चिंतन, मनन अशा साखळीच्या शेवटचा टप्पा म्हणून लेखनाविष्कार घडत असतो. अर्थात सर्वांनाच आपले विचार, भावना सहजतेने आणि प्रभावीपणे लेखनात उतरवता येतात असे नाही. नव्याने लिहू पाहणाऱ्यांसाठी रस्किन बॉंड यांनी ‘हाऊ टू बी अ रायटर’ या पुस्तकामधून खुसखुशीत शैलीमध्ये मार्गदर्शन केले आहे.

रस्किन बॉंड तब्बल ७० वर्षे लघुकथा, कादंबरी, ललितबंध, भयकथा, कविता, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांमधून मुशाफिरी करत आहेत. त्यांच्या लेखनातला ताजेपणा आजही टिकून आहे. प्रस्तुत पुस्तकातून त्यांनी आपली लेखनप्रक्रिया उलगडून दाखवली आहे आणि आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे नवोदितांसाठी उपयुक्त ठरतील अशा टिप्सदेखील दिल्या आहेत.

लेखनसातत्य ठेवणे, निरीक्षण करणे, काळजीपूर्वक ऐकणे, शब्दांच्या रचनेकडे आणि त्यातल्या सौंदर्याकडे लक्ष देणे या गोष्टी लेखनासाठी महत्वाच्या असल्याचे बॉंड सांगतात. “कोणीही लेखक होऊ शकतो, पण प्रत्येकजण चांगला लेखक होऊ शकत नाही” हे सांगून बॉंड यांनी चांगला लेखक होण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवणे गरजेचे आहे याचे विवेचन केले आहे, तसेच “का लिहावे?” या मुद्द्यावरही चर्चा केली आहे. साहित्याची आवड, भाषेची आवड, जगण्यावरचे प्रेम, उत्तम स्मृती, उत्साह, आशावाद, चिकाटी हे सगळे गुण लेखक म्हणून घडण्यासाठी हातभार लावत असतात असे बॉंड यांचे प्रतिपादन आहे.

उत्तम साहित्यवाचनामुळे एक लेखक म्हणून मनाची मशागत होत असते. म्हणूनच अनेक परदेशी साहित्यिकांच्या तसेच रवींद्रनाथ टागोर, आर. के. नारायण, प्रेमचंद अशा भारतीय साहित्यिकांच्या साहित्यकृती बॉंड यांनी वाचनासाठी सुचवल्या आहेत. 

लेखक म्हणून शिस्त अंगी बाणवणे, आपली दिनचर्या निश्चित करणे, नियमित लेखनासाठी विशिष्ट जागा ठरवणे या सगळ्या गोष्टी लेखनाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. नोंदवही सोबत ठेवण्याचा लेखकाला खूप उपयोग होतो. आलेले अनुभव, सुचलेल्या कल्पना यांची वहीमध्ये केलेली नोंद पुढे संदर्भ म्हणून वापरून अधिक फुलवता येते. “एखादी कल्पना कुठल्याही वेळी सुचू शकते, त्यासाठी तयार राहायला हवे” हे सांगताना बॉंड त्यांना स्वत:ला तसेच अन्य लेखकांनाही झोपेत पाहिलेल्या स्वप्नामधून लेखनासाठी बीज कसे गवसले याची  उदाहरणे दिली आहेत. लेखकाने किती पातळ्यांवर जागरूक राहायला हवे, हे यातून अधोरेखित होते.

“स्वतःच्या लिखाणाचा कंटाळा आलेला लेखक संपतो”, “उदरनिर्वाहासाठी मी या माझ्या लेखनावर अवलंबून असलो, तरीही माझ्यासाठी ती जगातील सर्वात आनंददायी गोष्ट आहे” बॉंड यांच्या विधानांमधून लेखनप्रक्रियेत आनंद मिळत राहणे किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते.

लेखनक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्यांच्या मनामध्ये आपले लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे अशी सुप्त इच्छा असतेच. म्हणूनच पुस्तक लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी काय करणे आवश्यक असते हे थोडक्यात सांगणारे स्वतंत्र प्रकरण बॉंड यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक आकर्षक असले पाहिजे, असा ते आग्रह धरतात. त्यासाठी त्यांनी ‘वॉर अॅँड पीस’ आणि अन्य काही प्रसिद्ध पुस्तकांची पूर्वीची शीर्षके आणि अंतिमत: ठेवलेली अधिक परिणामकारक शीर्षके यांची उदाहरणे दिली आहेत.

लेखकाला लेखन करत करताना काही वेळा अचानक सुचेनासे होते (याला इंग्रजीमध्ये ‘रायटर्स ब्लॉक’ असे म्हणतात). अशी वेळ आल्यास लेखकाने तो विषय काही काळासाठी बाजूला ठेवून काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला बॉंड यांनी दिला आहे. त्यामुळे मूळ विषयाकडे परत वळल्यावर विचारप्रक्रियेतला अडथळा दूर होऊन प्रवाह वाहता होतो. पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयत्न करत असताना नकार पचवण्याचीही तयारी ठेवावी लागते आणि निराश न होता प्रयत्न करत राहावे लागतात; तसेच पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावर टीका झाल्यास त्याचीही तयारी लेखकाने ठेवायला लागते याकडे बॉंड लक्ष वेधतात.

बॉंड यांनी लेखनासाठी केलेले मार्गदर्शन मूलभूत स्वरूपाचे आहे. ते प्रामुख्याने कुमार आणि तरुण गटाला समोर ठेवून केले असले तरीही मोठ्या वयोगटातील नवोदितांसाठीही ते उपयुक्त आहे. आधुनिक काळातील माध्यमांच्या गरजा आणि त्यासाठी लेखनामध्ये करावे लागणारे बदल; अलीकडे लेखकाला आपले पुस्तक स्वत:च प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध झालेले पर्याय या मुद्द्यांवर मात्र पुस्तकामध्ये भाष्य केलेले नाही. ते असते पुस्तक अधिक कालसुसंगत ठरले असते.

 

‘हाऊ टू बी अ रायटर’

लेखक : रस्किन बॉंड

प्रकाशक : हार्पर चिल्ड्रन्स

पृष्ठसंख्या : १२६

किंमत : २९९    


(महाराष्ट्र टाईम्समध्ये २१ मे २०२३ रोजी पूर्वप्रकाशित)

महाराष्ट्राचे कलावैभव



आज लिहिलेली गोष्ट, बोलले गेलेले शब्द, सादर केलेली कला उद्यासाठी टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा गोष्टींच्या नोंदी, संकलन, वर्गीकरण डोळसपणे केल्यास येणाऱ्या पिढीसाठी इतिहासात डोकावून पाहण्यासाठी खिडकी निर्माण होऊ शकते. या दृष्टीनेच कोशवाङ्मयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे अनेक विषय आहेत ज्यांचा कोशनिर्मितीच्या दृष्टीने अभ्यास झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘दृश्यकला’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील कलाकारांच्या त्यातील योगदानाची दखल घेणारा ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा कोश प्रकाशित झाल्याने मोठी महाराष्ट्रातील दृश्यकला परंपरेच्या अपुऱ्या दस्तावेजीकरणाची उणीव दूर होण्यास मदत झाली आहे.


प्रसिद्ध चित्रकार व जे. जे. कलामहाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुहास बहुळकर आणि ज्येष्ठ समीक्षक दीपक घारे यांनी प्रस्तुत कोश संपादित केला आहे. महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा आहे, परंतु कला व संस्कृतीचा वारसा नाही; इंग्रजांच्या काळात भारतीय कलेचे पुनरुज्जीवन फक्त बंगालमध्ये झाले इ. गैरसमजांचे कोशाच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असा प्रयत्न असल्याचे संपादकांनी आपल्या मनोगतात नमूद केले आहे.

 

२०१३ साली बहुळकर व घारे या द्वयीने ‘साप्ताहिक विवेक’च्या कोशमालिका प्रकल्पाअंतर्गत मराठी दृश्यकला कोशाचे संपादन केले होते. एवढा महत्वाचा कोश मराठीपुरता मर्यादित न राहता इंग्रजीत जायला गेल्यास महाराष्ट्राचा कलावारसा अनेकांपर्यंत पोहचेल, या विचारांनी ‘पंडोल आर्ट गॅलरी’तर्फे हा कोश इंग्रजीमध्ये नेण्याची तयारी २०१५ मध्ये सुरू झाली. मराठीतील ग्रंथ इंग्रजीत नेताना मराठीतील नोंदींचा इंग्रजी अनुवाद केला गेला, तसेच दरम्यानच्या काळात मिळालेल्या नव्या माहितीनुसार जुन्या नोंदींमध्ये काही ठिकाणी दुरुस्त्या केल्या गेल्या, २७ नव्या नोंदींची भर घातली गेली. कोशाचे कलात्मक मूल्य अबाधित राहावे यासाठी दृश्य माध्यमाची जाण असणारे अनुवादक मिळवणे हेही एक आव्हान होते. पुणे व मुंबई अशा दोन ठिकाणच्या अनुवादकांच्या चमूने अनुवादाचे काम चोखपणे पार पाडले आहे. बहुळकर व घारे यांच्याकडे मुख्य संपादनाचे दायित्व असले तरी सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे आणि अन्य ज्येष्ठ दृश्यकला तज्ज्ञांचाही संपादनकार्यात हातभार लाभला आहे (या प्रकल्पाचे शिवधनुष्य कसे पेलले याबद्दल ललित मासिकाच्या २०२१ सालच्या दिवाळी अंकातला दीपक घारे यांचा जिज्ञासूंनी लेख अवश्य वाचावा).

 

पुस्तकामध्ये तीन विभाग आहेत. ‘महाराष्ट्राचा वारसा’ या पहिल्या विभागात इतिहासपूर्व काळापासून ते पेशवेकाळापर्यंतच्या महाराष्ट्रातील दृश्यकलांचा आढावा घेतला आहे, त्याचबरोबर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आगमनानंतरच्या महाराष्ट्रातील दृश्यकला प्रवाहाचीही नोंद घेतली आहे. १८५७ साली ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ची मुंबईत झालेली स्थापना हा महाराष्ट्राच्या कलाप्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. इथपासूनच ‘बॉंबे स्कूल’ या नावाने ओळखली जाणारी कलापरंपरा सुरू झाली. जे. जे. कलामहाविद्यालयाने आधुनिक काळामध्ये दृश्यकलेच्या प्रगती आणि आणि प्रसाराबाबत कशी भूमिका निभावली हे या विभागात वाचायला मिळते. कलामहाविद्यालयातर्फे  अंबरनाथच्या शिवमंदिराचे सर्वेक्षण, अजिंठा गुंफांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवणे इ. प्रकल्प हाती  जाऊन दृश्यकलांचा अभ्यास आणि दस्तावेजीकरण करण्याचे मोठे कार्य घडले.

 

या विभागात दृश्यकलेच्या ‘उपयोजित कला’ (अप्लाइड आर्ट) या शाखेची विशेष दखल घेतली आहे. रोजच्या जीवनात दिसणाऱ्या कित्येक गोष्टी (उदा. काडेपेटी, कॅलेंडर, प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी पोस्टकार्ड) अशा अनेक उपयोजित कलेची उदाहरणे आहेत हे यातून लक्षात येते. अनेक ख्यातनाम चित्रकारांनी उपयोजित कलेमध्ये मोठे योगदान दिले आहे. एस. एम. पाटील, डी. आर. भोसले (चित्रपट पोस्टर), रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल (कॅलेंडर आर्ट, दिवाळी अंक व पुस्तकांची मुखपृष्ठे) बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण (व्यंगचित्र/अर्कचित्र) यांच्यासोबतच कॉमिक्स (अमर चित्रकथा), हास्यचित्रमालिका (चिंटू) यांचीही यामध्ये दखल घेतली आहे. ‘

 

दुसरा विभाग हा प्रत्यक्ष शिल्पकार आणि चित्रकार यांच्याबद्दलच्या नोंदींचा आहे. कलाकार महाराष्ट्रात जन्मलेला व महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कारकीर्द असलेला असावा; अथवा महाराष्ट्राबाहेर जन्मलेला असेल तरीही कलेतील त्याच्या कारकीर्दीची पंचवीसहून अधिक वर्षे महाराष्ट्रात व्यतीत केलेली असावीत हा कोशासाठी कलाकार निवडीचा प्रमुख निकष आहे. अशा एकूण ३०७ कलाकारांच्या चरित्रात्मक नोंदी यामध्ये आहेत. आबालाल रहमान, बाबुराव पेंटर, आचरेकर, धुरंधरांपासून वासुदेव कामतांपर्यंतचे अशा ख्यातकीर्त चित्रकार; शि. द. फडणीस, वसंत सरवटे यांच्यापासून राज ठाकरेंर्यंतचे हास्यचित्रकार/व्यंगचित्रकार, रॉबी डिसिल्व्हा यांच्यासारखे डिझायनर, अच्युत पालवांसारखे सुलेखनकार अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या कलादृष्टीचे दर्शन इथे घडते.

 

या विभागात दृश्यकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या कलाकारांबरोबरच असे शिक्षण घेतले नसतानाही दृश्यकलेच्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवलेल्यांचीही नोंद घेतली आहे. पद्मा सहस्रबुद्धे,  ज्योत्स्ना कदम, माधुरी पुरंदरे इ. स्त्री कलाकारांनाही आवर्जून स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक कलाकाराचा जीवनकाळ, कलाक्षेत्रातले उल्लेखनीय कार्य, त्याच्या कलाविष्काराची समीक्षा, त्याच्या प्रमुख कलाकृती आणि त्यातील काहींची छायाचित्रे असे प्रत्येक कलाकारावरच्या नोंदीचे स्वरूप आहे. शक्य तिथे कलाकाराच्या आईचे आणि पत्नीचे नावही समाविष्ट केले आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय. शिवाय कलाकाराच्या कुटुंबात जर त्याच्या कलेचा वारसा पुढे चालू ठेवणारी व्यक्ती असेल तर तिचाही उल्लेख केला आहे. अशा प्रकारच्या विस्तृत नोंदी अभ्यासकांना कलाकारांच्या वैशिष्ट्यांसोबतच त्यांनी खळाळत्या ठेवलेल्या कलाप्रवाहाचीही जाणीव करून देतात.

 

तिसऱ्या विभागात दृश्यकलेच्या क्षेत्रात पायाभूत कार्य केलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया इ. कलासंस्था; त्याचबरोबर महत्वाचे आर्ट स्टुडिओ आणि दृश्यकलेला वाहिलेली प्रदर्शनस्थळे यांच्याबद्दल माहिती मिळते. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या सयाजीराव गायकवाड, भवानराव पंतप्रतिनधी यांच्या राजाश्रयाचे महत्वही या विभागात अधोरेखित केले आहे.  

 

मोठ्या आकारातला उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला हा कोश कलासमीक्षक, अभ्यासक यांच्यापासून सर्वसामान्य कलाप्रेमी वाचकापर्यंत सर्वांनीच अनुभवावा असा आहे. विपुल छायाचित्रांमधून रंग आणि कुंचला किंवा काष्ठ आणि मृदा यांच्या सहाय्याने कलाकार उभ्या करत असलेल्या प्रतिसृष्टीचे विलोभनीय दर्शन आपल्याला होते. एकाहून एक प्रतिभावान कलाकारांवरच्या नोंदी वाचत असताना त्यांनी घेतलेला उत्कृष्टतेचा ध्यास, प्रतिकूल परिस्थितीतून काढलेला मार्ग, कलेप्रती असणारी त्यांची निष्ठा या गोष्टी खूप काही शिकवून राहतात. विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या अनेक कलाकारांना या कोशाने ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे. महाराष्ट्राच्या कलावैभवाला देखण्या रुपात सादर केल्याबद्दल संपादक, प्रकाशक आणि सर्व संबंधितांचे देशभरातील अभ्यासक आणि रसिक आभार मानतील यात शंका नाही.   


एन्सायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र

संपादक : सुहास बहुळकर, दीपक घारे

प्रकाशक : पंडोल आर्ट गॅलरी

किंमत : ४००० रु.

पृष्ठसंख्या : ९६०


(या लेखाची संक्षिप्त आवृत्ती ७ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाली)


Saturday, December 31, 2022

२०२२ मधले वाचन आणि लेखन

 


१) क्रेमलिनच्या बुरुजावरून : नरेंद्र सिंदकर

मॉस्को रेडिओच्या मराठी विभागात पंचवीसहून वर्षे काम केलेल्या व्यक्तीच्या नजरेतून दिसलेली रशियन व्यवस्था. 

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_31.html

२) स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग : डॉ. गिरीश आफळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांपासून स्वयंसेवकांपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात घेतलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागाबद्दल माहिती 

३) राष्ट्रीय आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सुधीर जोगळेकर 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संघाच्या स्थापनेच्या योजना डॉ. हेडगेवारांच्या मनात कशी रुजत-फुलत गेली ती प्रक्रिया यामध्ये मोजक्या शब्दांमध्ये खूप नेमकेपणाने मांडली आहे . इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा ते दादरा नगरहवेली स्वातंत्र्यलढा यात संघाचे स्वयंसेवक कसे आणि कधी सहभागी झाली याची थोडक्यात माहिती दिली आहे. 

(स्टोरीटेलवर उपलब्ध आहे)

४) १ जानेवारी १८१८ - कोरेगाम भीमा लढाईचे सत्य : रोहन जमादार

कोरेगाव-भीमाची लढाई जातीय उद्देशाने लढलेली नव्हती हे ऐतिहासिक नोंदी आणि कोरेगाव-भीमाच्या जयस्तंभावरच्या शिलालेखाच्या माहितीसह उलगडून सांगणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_13.html

५) दत्तोपंत म्हसकर - संघसमर्पित जीवन

मावळ तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घट्ट रोवणाऱ्या ज्येष्ठ प्रचारकांचे अल्पचरित्र आणि आठवणी 

६) द्रष्टा कलासाधक : उदयन इंदूरकर

भीम बेटका गुहांमधील आदिमानवाच्या अस्तित्वाचा पुरावा जगासमोर आणणारे, लुप्त सरस्वती नदीचा शोध आणि त्याद्वारे आर्य आक्रमण सिद्धांत खोडून काढणारे पुरातत्वशास्त्रज्ञ ऋषितुल्य हरिभाऊ वाकणकर यांचे अल्पचरित्र

७) मुस्लिम मनाचा कानोसा : हमीद दलवाई

मुस्लिमांवर प्रभाव असणाऱ्या आणि त्यांचे धार्मिक/राजकीय नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलूसंवाद साधून त्यांच्या मनाचा जुनाट आणि कट्टर विचारांकडे असणारा कल तपासून तो शब्दबद्ध करण्याचा धाडसी प्रयत्न. 

(किंडलवर उपलब्ध आहे)

८) अश्रू ईशान्येचे - मिशन मणिपूर : पुरुषोत्तम रानडे

देशापासून मानाने पूर्णपणे तुटलेल्या ईशान्य भारताच्या टोकातल्या गावामध्ये जाऊन त्यांच्यात भारताबद्दल आपुलकीचे बी पेरणाऱ्या अचाट आणि अफाट भैयाजी काणे यांच्यावरचे पुस्तक

या पुस्तकावर मी केलेले फेसबुक लाइव्ह : https://www.facebook.com/100001635303337/videos/371182194888362/

९) The Bera Bond : Sundeep Bhutoria

राजस्थानातील बेरा या खेड्यामध्ये एकमेकांच्या आसपास सहजपणे वावरणाऱ्या मनुष्य आणि बिबट्यांचे सहअस्तित्व कॅमेराबद्ध करणारे कॉफीटेबल बुक

https://prasadgates.blogspot.com/2022/07/the-bera-bond.html

१०) प्राचीन भारतीय विद्यापीठे : श्वेता काजळे

तक्षशीला, नालंदा इत्यादी प्राचीन विद्यापीठांमधील शिक्षण परंपरेचा इतिहास उलगडून दाखवणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_55.html

११) जावे किंगफिशर्सच्या गावा : पराग नलावडे

किंगफिशर पक्ष्याच्या भारतात आढळणाऱ्या सर्वच्या सर्व (१२) प्रजातींना कॅमेऱ्यात टिपणाऱ्या निसर्गप्रेमी व्यक्तीच्या अनुभवांची टिपणे

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_66.html

१२) परिसांचा संग : गिरीश प्रभुणे

भटक्या विमुक्तांसाठी मोठे कार्य उभे करणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना आयुष्याच्या वाटचालीत भेटलेल्यांची हृद्य व्यक्तिचरित्रं असणारे पुस्तक. नागपूरच्या तरुण भारतमधून प्रकाशित होणाऱ्या 'ऊन-सावली' या सदराचे संकलन

१३) वार्ता ईशान्य भारताची : सुनील किटकरू

ईशान्य भारताची संस्कृती, तेथील समस्या, त्या समस्यांवर उपाय शोधणारे वेडे पीर आणि ईशान्येच्या समाजाच्या उत्थानासाठी झटणाऱ्या संस्थांची माहिती सांगणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_24.html

१४) हिंदुस्थानातील संस्थानांचे विलीनीकरण कसे झाले : सुधाकर डोईफोडे

संस्थानांचे विलीनीकरणाचा रोमहर्षक इतिहास 

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post.html

१५) असत्यमेव जयते : अभिजित जोग

भारताच्या इतिहासकथनामध्ये जाणीवपूर्वक पेरलेल्या गेलेल्या असत्यामागचे सत्य उलगडणारे पुस्तक. यामध्ये आर्य आक्रमण, अहिंसेमुळेच स्वातंत्र्य मिळाले, सूफींची 'सहिष्णुता' आदी भूलथापांचा सप्रमाण समाचार घेतला आहे. 

https://prasadgates.blogspot.com/2022/07/blog-post.html

१६) How to be a writer : Ruskin Bond

नवलेखकांसाठी टिप्स 

१७) Reborn : Santhi Krishna आणि १७) Story of a reversion : O Sruthi 

अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांच्या भ्रमजालामध्ये ओढल्या गेलेल्या युवतींचे खळबळजनक अनुभव. सुदैवाने योग्य वेळी 'आर्ष विद्या समाज' या संस्थेचे आचार्य मनोजजी यांनी केलेल्या समुपदेशनाने सर्व शंका नष्ट होऊन दोघी सनातन धर्माकडे परत आल्या,  सनातन धर्माच्या प्रसारार्थ स्वत:ला वाहून घेतले

१९) सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महर्षी दयानंद : श्रीपाद जोशी

वैदिक धर्माच्या मूळ शिकवणुकीवर श्रद्धा कायम ठेवून परंपरांमधून पसरलेल्या कुप्रथांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या असामान्य योद्ध्याचे चरित्र. 

(सविस्तर लेख लवकरच)

२०) प्रामाणिकही, सुंदरही : करुणा गोखले

अनुवाद करत असताना मूळ संहितेशी प्रामाणिक राहून त्यातले सौंदर्य कसे जपता येईल याची चर्चा करणारे, तांत्रिकता उलगडून दाखवत महत्वाच्या टिप्स देणारे पुस्तक 

२१) मृत्युंजयी वीर : संदीप कवीश्वर 

देश आणि धर्मासाठी प्राणांची आहुती दिलेल्या ईशान्य भारतातील मृत्युंजयी वीरांची माहिती देणारी पुस्तिका. या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम अशा संघटनांचे कार्यकर्ते तसेच तसेच ईश्यान्येतील स्वाभिमानी जनजातीय व्यक्ती तेथील चर्चप्रेरित फुटीरतावाद्यांच्या डोळ्यात खुपत असतात. त्यातूनच झालेल्या खुनी हल्ल्यांत झालेल्या बलिदानाच्या कहाण्या चटका लावणाऱ्या आहेत. 

२२) मेघदूत : डॉ. विजया देव

मेघदूताचे सौंदर्य उलगडून दाखवणारे पुस्तक. मेघदूतातील स्त्रीवर्णन, त्यांची आभूषणे, मेघदूतातील  जीवसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी, कालिदासाच्या उपमा, मेघाचा प्रवास, असे अनेकविध पैलू स्वतंत्र प्रकरणातून फार छान उलगडले आहेत. 

२३) Een wolk wordt woord : Evert Schnieder

मेघदूताचा डच पद्यानुवाद आणि त्या सोबत युरोपीय वाचकांना डोळ्यासमोर ठेवून भारताची संस्कृती, कालिदासाची प्रतिभा इ. वर दिलेली रंजक माहिती देणारे, विविध पेंटिंग्ज, स्केचेस आणि फोटोंनी सजलेले देखणे पुस्तक


*ऑडिओबुक्स*

(सर्व पुस्तके स्टोरीटेलवर आहेत)


२४) रहस्य नागांचे : अमिश

इंटरेस्टिंग कथानकाचा सातभिकार अनुवाद

२५) ड्रीमर्स अँड डूअर्स : डॉ. सतिलाल पाटील

पुणे ते सिंगापूर बाईक सफरीचे खुसखुशीत, प्रसन्न प्रवासवर्णन. परतीच्या प्रवासात घडलेल्या घटनेमुळे पुस्तकाचा तोपर्यंतचा बाज पूर्णपणे बदलून जातो आणि विचार करायला लावतो. 

२६) सूर्योपासना : निखिल कुलकर्णी

सूर्यनमस्कारांचे तंत्र, फायदे अतिशय ओघवत्या भाषेत उलगडून दाखवत, आजच्या काळातील परिभाषेत मांडणी करणारे पुस्तक

२७) फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख : वि. ग. कानिटकर

एका वेदनादायी घटनेचे 'मेकिंग' सविस्तर उलगडून दाखवणारे, अस्वस्थ करून सोडणारे पुस्तक

२८) अडोल्फ हिटलरची प्रेमकहाणी : वि. ग. कानिटकर 

हिटलर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील जगावेगळ्या प्रेमाची इतिहासात विसरली गेलेली पाने 

२९) हिटलरचे महायुद्ध : वि. ग. कानिटकर 

हे पुस्तक म्हणजे मला नाझी भस्मासुराचा उदयास्तची संक्षिप्त आवृत्ती वाटले. तसेच अभ्यासपूर्ण, माहितीने खचाखच भरलेले आणि कंटाळवाणे 

३०) डॉ. हेडगेवार : ना. ह. पालकर

सामान्य भासणाऱ्या पण असामान्य कार्य केलेल्या व्यक्तिमत्वातील उत्कटता सांगणारे चरित्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुजण्या-बहरण्याची प्रक्रिया नाना पालकरांनी फारच सुरेख उलगडून दाखवली आहे. राहुल सोलापूरकर यांचे अभिवाचन निव्वळ अप्रतिम!

३१) रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले : डॉ. एस. व्ही. भावे

लंका ते अयोध्या या रामप्रवासमार्गाचा स्वत:च्या विमानामधून शोध घेणाऱ्या हौशी पण अभ्यासू डॉक्टरचे अनुभव. १९९१-९२ मध्ये भावे यांनी धनुषकोडी येथील समुद्रात होडीतून उतरून तिथे रामसेतू प्रत्यक्ष असल्याची खात्री करून घेतली होती. 

(पुस्तक इथून खरेदी करता येईल : https://tinyurl.com/44as5nw9)

३२) पत्रापत्री : दिलीप प्रभावळकर

माधवराव आणि या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून उलगड गेलेल्या खुमासदार घडमोडी, टिपिकल प्रभावळकर शैलीततल्या मिश्कील टिप्पण्यांसह.. 

खूप दिवसांनी विनोदी साहित्य अनुभवले

३३) माझी काटेमुंढरीची शाळा : गो. ना. मुनघाटे

काटेमुंढरीची नावाच्या अतिशय दुर्गम गावात, वनवासी बांधवांमध्ये काम केलेल्या तळमळीच्या शिक्षकाचे अनुभव. 

****

वाचलेल्या पुस्तकांचा यावर्षी एका वेगळ्या माध्यमात उपयोग करून पाहिला. 'एकनाथजी रानडे यांनी विवेकानंद शिलास्मारकासाठी केलेले कार्य' या विषयावर power point च्या सहाय्याने जवळपास ५० मिनिटांचे सादरीकरण केले. 'व्हर्चुअल कट्टा' या ग्रुपसाठी अजून त्याचे  रेकॉर्डिंग यूट्यूबवर उपलब्ध झालेले नाही. झाले तर मी share करेनच. 

****


जे वाचले त्यातल्या काही पुस्तकांवर लिहिले त्यांची लिंक वर दिलीच आहे. उरलेल्यावर अल्पस्वल्प का होईना, लिहिण्याचा प्रयत्न करेन. 

या वर्षी लिहिलेले दोन लेख अतीव समाधान देऊन गेले. 

१) डच नजरेतून मेघदूत

संस्कृत मधल्या 'मेघदूत' या काव्याचे डच भाषेत अनुवाद करणारे 'एव्हर्ट श्नायडर' यांचे पुस्तक आणि मुलाखत यांच्यावर आधारित दीर्घ लेख साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकासाठी लिहिला. यानिमित्ताने एका लोकप्रिय दिवाळी अंकामध्ये स्थान मिळवता आले. 

२) बाबाविषयी ...

अतीव आवडते लेखक अनिल अवचट यावर्षी आपल्याला सोडून गेले. त्यांच्यावर लिहिलेला हा लेख अनेकांना भावला याचे विशेष समाधान आहे

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_1.html


यावर्षी लिखाणाच्या आणखी एका प्रांतात धडपड सुरू केली आहे. डोक्यात plans तर खूप शिजत असतात, पण ते सर्वांसमोर कधी येतील (किंवा येतील तरी की नाही!) याबद्दल या घडीला मी काहीच सांगू शकत नाही. शिवाय २०२१ मध्ये केलेले बरेच लिखाण अजूनही प्रकाशात येण्याची वाट पाहात आहे. ते पुढच्या वर्षी (तरी) येईल या आशेवर आहे.  


बघू, २०२३ काय घेऊन येतंय ते.. 

बाबाविषयी ...

 

अनेक वाचकांचा वाचनप्रवास हा सर्वसाधारणपणे मन रिझवणाऱ्या, चार घटका मनोरंजन करणाऱ्या आणि अलंकारिक भाषा असणाऱ्या पुस्तकांपासून सुरू होतो. तो तसा असण्यात गैर काहीच नसून ती बरीचशी स्वाभाविक गोष्ट असते. मीही याला अपवाद नव्हतो. पण महाविद्यालयात असताना 'धागे उभे आडवे' हे पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकाने मला आतून हलवले. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या पण आपल्याला कधीही दिसलेल्या प्रश्नांचे अनिल अवचटांनी असे काही ताणेबाणे गुंफले होते की त्यात गुरफटून, गुदमरून गेल्यासारखे झाले. लिखाणाला सत्याचा पाया असेल तर अकृत्रिम भाषाही किती परिणामकारक ठरू शकते याचा प्रत्यय आला. हातमाग, हळद व्यवसायांमधले पिचून गेलेले कामगार; वेश्या, देवदासी अशा समाजाच्या खालच्या पायरीवरील माणसांची विदारक शब्दचित्रे त्यांनी आपल्या अनलंकृत भाषेत रेखाटली होती. त्या पुस्तकाच्या वाचनामुळे अवचटांच्या साध्या सोप्या भाषेनेही मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती लेखनशैली कुणाचेही अनुकरण न करता त्यांच्यात आलेली होती. एका मनस्वी माणसाचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही दिसायचे.

 

अभिनिवेशापासून दूर

आपल्याला हवे ते मनापासून लिहिणे आणि ते आहे तसे लोकांना आवडणे ही फार कठीण गोष्ट आहे. 'मी मला वाटेल ते लिहितो' असे म्हणणारे लेखक बघता बघता व्यावसायिक गणितांप्रमाणे लिहू लागल्याची अनेक उदाहरणे असताना अनिल अवचट मात्र कायम स्वतःला योग्य वाटेल त्या विषयावर लिहित राहिले, याचे मुख्य कारण त्यांनी कधीही मला लेखक म्हणून मान्यता मिळवायची आहे' या भावनेने लिहिले नाही. अलीकडेच -साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांचे लिखाण त्या लायकीचे नाही अशी शेरेबाजी झाली तेव्हाही मला लेखक समजू नका आणि माझ्या लिखाणाला साहित्य समजू नका असे सहज म्हणण्याइतके त्यांचे जगणे अभिनिवेशविरहित होते.

अनिल अवचटांची ही वृत्ती त्यांच्या जगाकडे डोळे उघडे ठेवून बघण्याच्या सवयीतून आली होती. ही सवय त्यांना कशी लागली याबद्दल त्यांच्यास्वतःविषयी या पुस्तकातून कळते. स्वतःविषयी हे मला मराठीतल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक वाटते. अनिल अवचटांमधला माणूस कसा घडत गेला हे या पुस्तकामधून जाणून घेतले की, त्यांच्यातला लेखक कसा घडला हे आपल्याला नीट समजू शकते. ओतूरसारख्या छोट्या गावामध्ये गेलेले बालपण, नववीपासून शिक्षणासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतरचे भांबावलेपण, त्यातून आत्मविश्वासाला गेलेले तडे, वैद्यकीय महाविद्यालयातले शिकवून जाणारे अनुभव, श्रद्धा-अंधश्रद्धांचा गुंता, आपल्या मित्रांच्या साथीने चळवळीमध्ये उतरणे, कौटुंबिक तणावाचे प्रसंग आणि या सगळ्या टप्प्यांमधून जात स्वतः एक कुटुंबवत्सल पिता होणे असा आपल्या जडणघडणीचा आलेख त्यांनी मांडला आहे. आपल्या अडखळण्या-सावरण्यासह त्यांनी ज्या प्रांजळपणे आपला प्रवास रेखाटला आहे, ते वाचणे विलोभनीय आहे. स्वतःकडेही त्रयस्थपणे, अलिप्तपणे कसे पाहावे याचा स्वतःविषयी हा वस्तुपाठ आहे. हे पुस्तक जसे त्यांचा माणूस म्हणून प्रवास उलगडते, तसेच ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे त्यांचा लेखक म्हणून प्रवास उलगडते. अनिल अवचटांबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर ही दोन्ही पुस्तके वाचायलाच हवीत.

 

सामाजिक प्रश्नांवर क्ष-किरण

ज्या लेखनप्रकारामुळे अनिल अवचटांचे नाव सुपरिचित झाले ती म्हणजे रिपोर्ताज. ऐन तारुण्यात बिहारला केलेला प्रवास आणि तिथले दैन्य, गरिबी, शोषण पाहून आलेल्या अस्वस्थतेतून त्यांनी एक लेखमाला लिहिली आणि त्यातूनच पुढे त्यांचे ‘पूर्णिया’ हे पुस्तक जन्माला आले. समस्या आहे त्या ठिकाणाला भेट देणे, संबंधितांशी संवाद साधणे आणि त्याचे सविस्तर वृत्त तयार करणे, या गोष्टी कुठलाही पत्रकार करतोच, पण अवचटांच्या रिपोर्ताज स्वरूपाच्या लिखाणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले याचे कारण त्यांनी त्यासाठी दिलेला वेळ आणि आपल्या निरीक्षणांची त्यांनी केलेली मांडणी. सुरुवातीच्या काळामध्ये अवचटांनी पत्रकारिता करताना तात्कालिक विषयांवर लिहिले आणि समस्यांना वाचाही फोडली, पण ज्या समस्या दीर्घकालीन आहेत त्यांच्यावर लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न केले, एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, संबंधितांचा विश्वास संपादन करून समस्यांचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे समस्याग्रस्त लोक सविस्तर बोलत नसत तिथे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले. लोकांची घरे, त्यांचे कपडे इथपासून ते त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच तरळून जाणारे भाव किंवा त्यांनी केलेली अल्पशब्दी टिप्पणी यांचीही मनात नोंद घेतली आणि ती आपल्या लेखामध्ये मांडली. सोपी शब्दरचना आणि छोटी छोटी वाक्ये यांमुळे वाचक त्यांच्या लिखाणाच्या अधिक जवळ जाऊ शकले असे मला वाटते.

आत्मीय अलिप्तता हे मला अवचटांच्या रिपोर्ताजचे वैशिष्ट्य वाटते. समस्यांना भिडताना त्यांच्यातल्या माणसाने समस्याग्रस्तांकडे आत्मीयतेने बघितले, पण त्याबद्दल लिहिताना मात्र त्यांच्यातल्या लेखकाने उमाळे, कढ न आणता फक्त निरीक्षणे आणि काही टिप्पण्या नोंदवल्या आणि बाकीचे वाचकांवर सोडले. त्यांच्या लेखणीत एक मोकळेपणा मला कायम जाणवतो. विषयाच्या अनुषंगाने लिहिताना अकारण खोटा 'पॉलिटिकल करेक्टनेस' न बाळगता संबंधित जातींचे ते स्पष्ट उल्लेख करत, तसेच एखाद्या समाजघटकाच्या चुकीच्या धारणांवर टिप्पणीही करत असत (एका जातिसंमेलनावर त्यांनी लिहिलेला वृतांत मला याठिकाणी विशेषकरून आठवतो आहे).

 

 

रिपोर्ताज हा लेखनप्रकार प्रकार मराठीत आणण्याचे श्रेय अनिल अवचटांना दिले जाते. गंमत म्हणजे रिपोर्ताज नावाचे काही जगाच्या पाठीवर आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. मला जे दिसले ते मी लिहित गेलो, त्या साहित्यप्रकाराला विशिष्ट नाव आहे हे इतरांनी सांगितले तेव्हा मला कळले हेही अवचट प्रांजळपणे सांगत असत. साधना, मनोहर, माणूस, किर्लोस्कर अशा नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून अनिल अवचटांनी पांढरपेशा वाचकांना संपूर्ण अपरिचित विश्वाचे दर्शन घडवले आणि अंतर्बाह्य हादरवले. त्यांच्या लिखाणामुळे असंख्य पिचलेल्या, पिडलेल्या मूक श्वासांना आवाज मिळाला. हे लेख पुढे ‘माणसं’, ‘वाघ्या मुरळी’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘धागे उभे आडवे’ या पुस्तकांच्या स्वरुपात प्रसिद्ध झाले. ते वाचून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. विशेष म्हणजे कष्टकरी वर्गातल्या लोकांना अवचटांच्या लेखामुळे इतरांच्या कष्टांचीही जाणीव झाली. हमालांवरचा लेख वाचल्यानंतर धान्याची पोती वाहणाऱ्या हमालाने मिरच्यांची पोती वाहणाऱ्या लोकांचे हाल काय असतात हे प्रथमच कळल्याची कबुली दिली.

 

संवेदनशील लेखक, कृतिशील कार्यकर्ता

एकेकाळी ‘युक्रांद’सारख्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून कार्य केलेल्या आणि पुढे ‘आपल्याला हे झेपणारे नाही’ असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यातून बाजूला झालेल्या अनिल अवचटांनी आपल्यातल्या कार्यकर्त्याला ग्लानी मात्र येऊ दिली नाही. लेखणीच्या माध्यमातून तो कार्यकर्ता प्रकट होतच राहिला. ‘आणखी काही प्रश्न’ हे त्यांचे शेवटचे ठरलेले पुस्तकही याचीच साक्ष देते. इतरांना न दिसलेल्या गोष्टी ते बरोब्बर टिपत असत. पुण्याबद्दल लिहिता बोलताना काही ठराविक पेठाच लोकांच्या अभिमानाच्या अथवा चेष्टेच्या आणि टीकेच्या विषय ठरतात, पण अनिल अवचटांनी पुण्यावर लिहिले तेव्हा मात्र पूर्व भागातल्या पेठांमधल्या जीवनाचे चित्र रेखाटले आणि तिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कारागिरांच्या कामाचे कौतुक केले.

अंमली पदार्थांच्या नादी लागून चांगल्या घरांमधले तरूणही आयुष्यातून उठत असलेले पाहून अनिल अवचटांनी लिखाण सुरू केले त्याचेच पुढे ‘गर्द’ हे पुस्तक झाले. सुनीताबाई आणि पुलंच्या प्रोत्साहनातून आणि आर्थिक सहाय्यातून आपली पत्नी डॉ. सुनंदा यांच्यासोबत त्यांनी पुण्यामध्ये ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आणि शेकडो लोकांना गर्तेतून बाहेर काढले. ‘मुक्तांगण एक दिवस बंद करावे लागेल, अशा निर्व्यसनी स्थितीत समाज येईल’ असे त्यांचे स्वप्न असताना प्रत्यक्षात मात्र व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले पाहून ते व्यथित होत असत. “पूर्वी लोक दारू पीत नसत असे नाही, पण तेव्हा दारूला प्रतिष्ठा नव्हती. आता मात्र चांगल्या घरांमध्येही दारू पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे” हे ते व्यथित अंतःकरणाने बोलून दाखवत असत. त्यातून समाजाच्या स्वास्थ्याविषयी तळमळ असणारा कार्यकर्ताच डोकावतो.

 

समृद्ध लेखनप्रवास

सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वावरणाऱ्या काही जणांच्या रोजच्या वागण्यातही जगाबद्दलचा कडवटपणा अकारण डोकावताना दिसतो. सतत संघर्षाच्या भूमिकेत राहणेच त्यांच्या अंगवळणी पडून गेलेले असते. तरूण वयात अनिल अवचटांची जडणघडण ज्या वैचारिक वर्तुळामध्ये झाली त्यामध्येही अशा लोकांची कमतरता नाही. पण अनिल अवचट मात्र त्यांच्यात वेगळे ठरले. त्यांच्यातला लेखक आणि संवेदनशील माणूस नुसताच टिपे गाळत राहिला नाही. तो फुलत, बहरत गेला. श्रेष्ठ गायकाला जशा दोन सुरांच्या मधल्या जागा दिसतात आणि त्यांचा विस्तार तो करत जातो, तशा अवचटांना रोजच्या जगण्यातल्या असंख्य सुंदर जागा दिसू लागल्या. माणसांमधल्या चांगल्या जागा त्यांनी शब्दांत उतरवल्या, त्यातून उत्तम व्यक्तिचित्रे उभी राहिली. निसर्गामधल्या सुंदर जागांनी त्यांना खुणावले, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. कधी त्यातून ‘सृष्टीत... गोष्टीत’, ‘वनात .... जनात’ सारखे खेळकर बालसाहित्य निर्माण झाले, तर कधी ‘बहर शिशिराचे सारखे’ छायाचित्रांचे पुस्तक झाले. आपल्या जगण्यातला आनंद त्यांनी कधी ‘जगण्यातील काही’ सारख्या ललित लेखसंग्रहातून तर कधी ‘मस्त मस्त उतार’ सारख्या कवितासंग्रहातून मांडला. आपल्या जे जे आवडले ते दुसऱ्याला सांगण्याच्या ऊर्मीतून ते शेवटपर्यंत लिहित राहिले.

ज्या अंगभूत कुतूहलाने अनिल अवचट सामाजिक समस्यांच्या अंतरंगात डोकावले, त्याच कुतूहलाने त्यांनी शब्दांच्या, कॅमेऱ्याच्या, कुंचल्याच्या, सुरांच्या माध्यमातून भवतालाची गळाभेट घेतली. आयुष्याच्या उत्तरार्धातही एखाद्या लहान मुलाच्या औत्सुक्याने ते जगाकडे बघत राहिले. सतत नवीन काहीतरी शिकत राहिले. बासरी, ओरिगामी, लाकूडकाम... कितीतरी गोष्टींमध्ये त्यांनी मन रमवले. कर्करोगाने पत्नी सुनंदा यांना ओढून नेल्यानंतर बसलेल्या हादऱ्यातून त्यांना या छंदांनीच सावरले. उतारवयामध्ये अवचटांना शरीरातल्या घडामोडींविषयी कुतूहल वाटू लागले आणि त्यातून केलेल्या शोधाशोधीतून ‘कुतुहलापोटी’ नावाचे पुस्तक साकारले!

 

लोभस व्यक्तिमत्व

अनिल अवचटांचे लिखाण जसजसे वाचत गेलो तसतसा त्यांच्याबद्दल आदर वाढत गेलाच, पण त्यांच्याबद्दलच्या आदराचे आपलेपणामध्ये रूपांतर व्हायला कारणीभूत ठरले ते त्यांचे बोलणे.. जाहीर कार्यक्रम, मुलाखती यांमधले अनिल अवचटांचे बोलणे ऐकताना नेहमी कुटुंबातले प्रेमळ आजोबा बोलत आहेत असे वाटायचे. आपल्या घरातल्या लहानग्यांना त्यांच्याकडे निर्धास्तपणे सोपवावे असे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व होते. शांतपणे, कुठलेही बोजड शब्द वापरता ते बोलायचे. बोलण्याच्या ओघात ते किंचित लांबलेल्या सुरात 'हंss' असे म्हणायचे ते ऐकायला अतिशय गोड वाटायचे. एक विलक्षण आश्वासक सूर त्यामध्ये जाणवायचा.

एकदा आमच्या घरापाशी राहणाऱ्या एका साहित्यप्रेमी गृहस्थांनी आपल्या घराच्या गच्चीमध्ये अनिल अवचटांशी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण बोलता बोलता त्याचे गप्पांमध्ये कधी रुपांतर झाले कळलेच नाही. बोलता बोलता अनिल अवचट एकीकडे हातांनी कधी रुमालाचा उंदीर करत होते, तर कधी कागद दुमडून ओरिगामीमधले हंसाचे रूप साकारत होते. त्यांचे ओरिगामीमधले कौशल्य नुसत्या हौशी पातळीवरचे नव्हते. ओरिगामीमध्ये आधीपासूनच असणाऱ्या शेकडो कलाकृती शिकता शिकता नव्या कलाकृती घडवण्याएवढे प्रभुत्व त्यांनी मिळवले होते. त्यांनी ओरिगामी गणपती सुद्धा आम्हाला दाखवला!

त्यांचे बोलणे त्यांच्या लिखाणासारखेच होते. अगदी मनापासून, कुठलाही आव न आणता.. त्यांना कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे ‘ए बाबा’ का म्हणू शकते, हे त्या दिवशी मला अगदी ‘याची देहीं..’ अनुभवायला मिळाले. हळूहळू बाबाचे बोलणे कमी होत गेले... मग त्याने बासरी काढली आणि तिन्हीसांजेचे शेंदरी अवकाश सुरांनी भारून टाकले. जातिवंत हापूस आंबा पिकत जातो तसा अधिकाधिक मधुर होत जातो, तो एकवेळ सुरकुतेल पण किडत, सडत नाही... बाबा तसाच पक्व भासला होता त्या संध्याकाळी..  

परवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना बाबा आपल्या सर्वांना सोडून गेला खरा, पण जाताना तो त्याच्या जगण्यातले टवटवीत सूर आपल्याला गुणगुणण्यासाठी मागे सोडून गेला आहे याचा विसर पडू नये.


(https://www.mahamtb.com//Encyc/2022/1/29/artcle-on-tribute-to-anil-avchat.html येथे पूर्वप्रकाशित)