Total Pageviews

Saturday, July 7, 2012

वावटळ

मराठीमध्ये सिनेमे दुर्लक्षित राहणे हे फुटपाथच्या कडेला असलेला बेघर माणूस दुर्लक्षित राहण्याइतकेच सवयीचे आणि किरकोळीतले झाले आहे. रोज मरे त्याला कोण रडे ? त्यातल्या त्यात पुण्यात मराठी सिनेमे बरेच तग धरतात असे म्हणायला हवे. विशेष म्हणजे काही सिनेमे नुसते
तगच धरतात असे नाही तर हिंदी सिनेमाच्या बाबतीत इतिहासजमा  झालेल्या 'जुबिल्या' साजरे करतात. हे धक्कादायकच म्हटले पाहिजे. मग असे असताना गोल्डन जुबिली नंतरही चालू राहिलेला एक सिनेमा वास्तविकपणे किती चर्चिला गेला पाहिजे किंवा त्याचे टी.व्ही. राइट्स हातोहात खपले
पाहिजेत, पण 'वावटळ' बाबत यातले काहीच घडलेले नाही. ५० आठवडे (त्यातले जवळपास ४० पेक्षा
जास्त आठवडे 'प्रभात' ला) चालल्यानंतर या सिनेमाने अखेर निरोप घेतला आणि काही दिवसांनी पुन्हा एक-दोन आठवड्यासाठी अवतीर्ण झाला. असे कुठल्या सिनेमाच्या बाबतीत घडले असावे असे वाटत नाही. एवढे घडूनही मला हा सिनेमा पाहिलेला एकही इसम सापडलेला नाही. मी नेहमीच्या सवयीने तो पहिल्याच आठवड्यात पाहून टाकला होता. पण माझी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात कोणालाही या सिनेमाविषयी माहिती / उत्सुकता दिसली नाही. एकच मित्र होता जो म्हणत होता "हो रे, 'वावटळ' बघायला हवा" (५० आठवडे त्याचे हेच विध्यर्थी विधान  चालू  राहिले) मला तर सारखे वाटते की हा सिनेमा थिएटर मालकांनी स्वतःच्या पदराला खार लावून समाजकार्य म्हणून ६०व्या आठवड्यापर्यंत चालवला असावा. बरेच महिने आश्चर्य व्यक्त करण्यात घालवल्यावर अलीकडे मात्र मला वाटले की या सुपरहिट दुर्लक्षित ('पवित्र पापी' सारखं वाटतंय नं हे ?) सिनेमा बद्दल आपणच लिहावे.  भविष्यात चुकून एखाद्याला अनायासे सिनेमा बघायला मिळाला तर निदान "शिंचा हा कुठला सिनेमा ?" म्हणून तो उठून तरी जाणार नाही. असो. नमनालाच घडाभर तेल ओतले खरे,
आता मला आवडलेल्या या सिनेमाचे कथानक सांगतो. 


चित्रपटाच्या सुरुवातीलाच राजस्थान सीमेवरच्या एका गावात कमांडो कारवाईत घरात घुसून तिथल्या पुरुषांना ठार केले जाते. हे पुरुष म्हणजे पाकिस्तानी अतिरेकी आहेत आणि त्यांनी या गावात येऊन गावातल्या एका घरात वस्ती केली आहे.  पण त्यांच्या सोबत एक स्त्री (तेजस्विनी पंडित) देखील  जणू काही त्यांचीच कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे  तिच्या लहान बाळासोबत राहात असल्याने गावातल्या लोकांना काही संशय आलेला नसतो. पण मध्यरात्रीच्या अचानक झालेल्या धुमश्चक्रीमुळे
गावकरीपण हबकले आहेत. ते कमांडो पथकाचा प्रमुख K5ला (अशोक समर्थ) सांगतात, की या स्त्रीला घेऊन जा कारण ही या गावची नाही. अतिश्रमाने थकलेली आहे ती स्त्री कशीबशी चार पावले
टाकून बेशुद्ध होते. K5 तिला गाडीत घालतो. आणि BSF (सीमा सुरक्षा दल) च्या तळावर, घेऊन
जातो आणि त्या स्त्रीला BSF च्या कमांडर चौहानच्या (विनय आपटे) ताब्यात देतो. या ठिकाणी या K5चे काम संपणे अपेक्षित आहे. कारण कमांडोचे काम गुप्त कारवाया करून अतिरेक्यांना कंठस्नान  घालणे आणि BSF मदत करणे असले तरी BSF ऑफिसरच्या इतर आज्ञा पाळण्यास तो बांधील नाही. त्यामुळे तो सरळ तिथून निघून आपल्या खोलीत निघून जातो.  

पण त्याच्यासमोर वेगळेच ताट वाढून ठेवलेले आहे.

ती स्त्री आपली पार्श्वभूमी काही केल्या चौहानला सांगत नाही.... किंबहुना ती तोंड उघडायलाच तयार  नाहीये..... ती बराच मोठा काळ कसल्यातरी 'शॉक' मध्ये आहे... तिची तब्येत कशी आहे हे पाहायला K5 तिला ठेवलेल्या खोलीत येतो. त्याला पाहून तिला आठवते की 'हाच आपली सुटका करणारा आहे' आणि ती कृतज्ञता व्यक्त करते. पण तो निघून गेल्यावर मात्र पुन्हा मूग गिळून गप्प बसते. चौहानच्या लक्षात येते की तिचा पुरुष जमातीवरचा विश्वास संपूर्णपणे उडाला आहे आणि K5 हा हिच्यासाठी देवदूत असल्यामुळे हिचा फक्त त्याच्यावर विश्वास आहे. तिला बोलते करायचे तर याला समोर उभे करणे गरजेचे आहे. म्हणून तो K5 ला गळ घालतो "कृपया या स्त्रीच्या भल्यासाठी मला मदत कर" पण K5 सांगतो "सर, आम्हाला अशा भावनिक गोष्टीत अडकण्याची परवानगी नाही.मला तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत अडकवून नका. आणि एकदा जर का मी यात लक्ष घालायचे ठरवले तर मग तुम्ही काहीही झाले तरी मला यातून बाहेर काढू शकणार नाही..... तुम्हाला फार जड जाईल ते...." कमांडोंना असेच प्रशिक्षण दिलेले असते की कोणत्याही भावनांना बळी पडणे त्यांना शक्यच  होऊ नये .... कोणी ओळख काढून देखील त्यांना असल्या गोष्टीत गुंतवू नये म्हणून त्यांची ओळख देखील इतकी गुप्त असते की अशोक समर्थ केवळ K5 या गुप्त नावाने ओळखला जात असतो... हे सारे असूनही चौहान K5 ला दादापुता करून तिच्यासमोर उभं करतो ते तिच्याकडून तिची आणि
पर्यायाने तिच्या सोबतच्या अतिरेक्यांची माहिती काढून घेण्यासाठी ..... त्यामागचे कारण स्पष्ट असते. चौहानला काहीही करून अतिरेक्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांपर्यंत पोचवणे भाग असते.
त्यामुळे तो तिची काळजी करतोय असा कितीही भाव दाखवत असला तरी तिच्या वैयक्तिक 
पूर्वायुष्यात काय झाले याच्याची त्याला फारसे काही देणे घेणे नसते.

तिच्यावर गुदरलेल्या भीषण परिस्थितीची कल्पना आपल्याला येते तिने सांगितलेल्या  माहितीतून. लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईला फिरायला  जुईली मानकर नावाच्या या तरुणीचं  आलेल्या हिंदू - मुस्लीम दंगलीत अडकणं, मुस्लीम टोळीच्या म्होरक्याने तिला पळवून नेणं, तिला एका godown मध्ये डांबून ठेऊन तिच्यावर
वारंवार बलात्कार करणं, त्यातूनच तिला मूल होणं, अतिरेक्यांच्या टोळीचं तिला तान्ह्या बाळासह
राजस्थान सीमेवर घेऊन जाऊन निर्दयीपणे वाट तुडवायला लावणं, यामध्ये तिचं आयुष्य  वावटळीतल्या पाचोळ्यासारखं दिशाहीन भोवंडत राहतं.

तिथून सुटका झाली तरी तिची परवड थांबलेली  नसते.

लष्करामार्फत मजल दरमजल करत सून सापडल्याचा संदेश जेव्हा तिच्या सासरी पोचवला जातो आणि तिला पोचवायची व्यवस्था करत आहोत असे कळवले जाते तेव्हा तिच्या वरच्या संकटा विषयी आणि त्यातून तिला झालेल्या अपत्याविषयी  कळल्याने त्यांचे चक्क  'No Thanks' वाले पत्र येते. इतकेच नव्हे तर इतकेच नव्हे तर आमदार असणारे तिचे सासरे आपले सगळे वजन वापरून  आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून जुईलीची पाठवणी परस्पर महिला आधारगृहात करायचे आदेश काढायला लावतात. K5 ला हे कळते तेव्हा तो अतिशय व्यथित होतो. केवळ
अतिरेक्यांचे धागोदोरे शोधण्यापुरतेच तिला (आणि तिच्याकडून माहिती काढण्यासाठी पर्यायाने K5 ला) वापरून घेतल्याबद्दल विनय आपटेला सुनवायलाही कमी करत नाही. आणि आधी त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आता त्याला या प्रकरणातून बाहेर काढणे चौहानला अवघड झालेले असते. चौहान "वरिष्ठांपुढे माझे हात बांधलेले आहेत" असे उत्तर देऊन जुईलीला मदत करण्यासाठी असमर्थ
असल्याचे सांगतो. शिवाय सुट्टीसाठी कोल्हापूरला घरी निघालेल्या K5लाच जुईलीला दिल्लीमधील
महिला आधारगृहामध्ये पोचवून मगच महाराष्ट्रात जाण्याची विनंती करतो पुन्हा एकदा हे भावनिक
प्रकरण गळ्यात येऊन पडल्याने K5 अस्वस्थ होतो. शेवटी एक कर्तव्य म्हणून जुईलीला घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो, पण तिला दिल्लीला पोहोचते करण्याऐवजी सरळ मुंबईच्या गाडीत चढतो आणि तिला घेऊन थेट सावंतवाडीला तिच्या सासरी येऊन धडकतो.



सुनेला दरवाजात उभे राहिलेले पाहून सासरचे लोक स्तंभित होतात. जुईलीचे आयुष्य रुळावर आणण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, K5 तिच्या सासऱ्यांना तिला पुन्हा विनंती करतो पण अपेक्षेप्रमाणे तेही हात झटकतात. आता मात्र K5 संतापतो आणि सासऱ्यांना बरेच काही सुनावतो. तिचा काहीही दोष नसताना तिने किती आणि का सहन करायचे असा प्रश्न विचारतो. सासरे निरुत्तर
होतात. पण आता काहीच होऊ शकणार नसते. जुईलीच्या नवऱ्याचे दुसरे लग्न ठरलेले असते. आता जुईलीला तिच्या बाळाशिवाय खऱ्या अर्थाने स्वतःचे अस कोणीही उरलेले नसते.... परिस्थिती
ओळखून जुईली बाहेर पडते. जुईलीला सासर परत मिळवून द्यायचे अशा निश्चयाने आलेला K5 सुद्धा नाईलाजाने जड पावलांनी निघतो.... बाहेर पडता पडता अशोक समर्थ थबकतो, काही एक विचार
करतो आणि सावकाशपणे आणि विचारतो "घरी माझी आई आहे, स्वतःची थोडी शेती आहे. माझ्याशी लग्न करशील?" ती काहीच बोलत नाही पण तरीही मूकपणे त्याच्यासोबत चालू लागते आणि सिनेमा संपतो .....
  
अनंत सामंतांच्या ‘K5’ या कादंबरीवरचा हा सिनेमा. एक स्त्री काहीही संबंध नसताना,  चूक नसताना कशी होरपळते आणि तिची सदोदित परवडच कशी होत जाते याचे हे व्यथित करणारे
चित्रण. कुठेही melodramatic न होऊ देता केलेली संयत हाताळणी हे या सिनेमाचे बलस्थान. त्याचे श्रेय दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना द्यायला हवे. विशेषतः शेवटचे  K5 चे सासऱ्याची कानउघडणी करण्याचे दृश्य तर आक्रस्ताळे आणि melodramatic होऊ शकले असते, पण अशोक समर्थचा मुळातलाच खर्जातला जबरदस्त प्रभावी आवाज आणि काहीही झाले तरी K5 हा घरात
आलेला आगंतुक आहे याचे दिग्दर्शकाने ठेवलेले भान यामुळे संपूर्ण प्रसंगाचा 'टोन' खालचा ठेऊन देखील K5 चे बोलणे अतिशय प्रभावी ठरते. 

संपूर्ण सिनेमामध्ये बलात्कारी अतिरेकी (मुकेश तिवारी) वगळता इतर कोणतेही पात्र थेट वाईट किंवा खलनायकी म्हणून येत नाही. चांगला आणि वाईट या रंगाच्या मधली असणारी, पात्रांना 'ग्रे' शेडमध्ये वागवणारी तात्कालिक परिस्थिती किंवा नियती ही देखील अनेक वेळा प्रभावी ठरत असते
हेच यातून जाणवत राहते. याची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण पुन्हा वर उल्लेखलेल्या प्रसंगाचेच द्यावे लागेल. तोपर्यंत जुईलीची सुधारगृहात पाठवणीची  व्यवस्था करून तिला नाकारणारे  सासरचे लोक हे आपल्या दृष्टीने दुष्ट-निर्दयी वगैरे झालेले असतात. पण शेवटच्या प्रसंगात मात्र
त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि पूर्वग्रह काहीसा बदलतो. एका स्त्रीची वेदना 
जाणवून अकृत्रिमपणे हळवी होणारी जुईलीची सासू आणि बोलण्याची इच्छा असूनही पुढे येऊन न बोलता केवळ मूकपणे आणि अस्वस्थपणे जुईलीकडे पाहणारा तिचा नवरा यांना पाहिले की ते परिस्थितीला शरण जाणारे, अप्रिय सत्याला उंबऱ्याबाहेर ठेवून सोयीस्कर आडोसा शोधणारे मर्त्य मानव वाटायला लागतात. 
एखाद्या पात्राला सरसकट वाईट न ठरवता त्यावर प्रेक्षकाला फेरविचार करायला भाग पाडणारं दुसरे उदाहरण कमांडर चौहान. BSF च्या Headquarters मधून K5 जुईलीला घेऊन पोहोचवण्यास निघतो तेव्हा वाटेत त्यांना गाठून निरोप  द्यायला चौहान स्वतः येतो. सुरुवातीपासून कर्तव्य कठोर असणारा,  अतिरेक्यांचा माग काढेपर्यंत जुईलीशी आपुलकीने वागून नंतर मात्र तिला तिच्या सासरी नेऊन सोडण्याची जबाबदारी घेण्याऐवजी सरळ "वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला महिला आधारगृहात पाठवायला लागेल" असे सांगून हात झटकणारा 'कमांडर' चौहान या ठिकाणी जुईलीच्या बाळासाठी खेळणी भेट देताना आणि एखाद्या बापासारखा हळवा होऊन जुईलीला निरोप देताना डोळ्याच्या कडा पुसताना दिसतो. हा प्रसंग खरोखरच touching झाला आहे. माझ्या मते संपूर्ण चित्रपटातला हा सर्वोत्कृष्ट प्रसंग आहे.

अभिनयाच्या बाबतीत अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच दमदार आहे. तगड्या व्यक्तिमत्वाचा, थंड रक्ताचा, मिळालेल्या प्रशिक्षणानुसार कोणत्याही भावनिक गुंत्यात न अडकणारा, पण अखेरीस जुईलीची फरफट पाहून अस्वस्थ होऊन तिला तिचे पूर्वायुष्य परत मिळवून देण्यासाठी सूत्र हातात घेऊ पाहणारा कमांडो त्याने सुरेख साकारलाय. विनय आपटे आणि अशोक समर्थ या
दोघांमधल्या शाब्दिक चकमकी लक्षात राहण्यासारख्या झाल्या आहेत आणि या दोन्ही अभिनेत्यांची  क्षमता पूर्णपणे दाखवून देणाऱ्या असल्यामुळे समाधान देणाऱ्या आहेत. फक्त विनय आपटेचे सुटलेले  पोट पाहून मात्र हा असा पेटू माणूस BSF मध्ये ऑफिसर कसा असेल असा प्रश्न मला छळत
होता. तेजस्विनी पंडितला 'सिंधुताई सपकाळ' सोबतच याही सिनेमामध्ये हेवा वाटावा अशी भूमिका मिळाली आहे. अतिरेक्यांच्या कळपासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरफटत
जाणारी, त्यांच्याकडून वारंवार उपभोगली गेल्याने दगडासारखी सुन्न-बधीर झालेली आणि तरीही बाळावर माया करणारी स्त्री तिने समर्थपणे रंगवली आहे. जुईलीला कित्येक महिने एका godown मध्ये बंदिस्त करून तिला कायम अर्धनग्नच ठेवणारा, तिच्यावर वारंवार बलात्कार करणारा विकृत उलट्या काळजाचा नराधम मुकेश तिवारीने जबरदस्त साकारला आहे. सुऱ्याच्या धारदार पात्याने 
जुईलीचे तळपाय उकरण्याचा प्रसंग शहारे आणतो. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण मी एके ठिकाणी वाचलेल्या परीक्षणानुसार मूळ कादंबरीत तिच्यावरच्या अत्याचाराची याहून भयानक वर्णने आहेत. कदाचित मराठी प्रेक्षकाची प्रकृती-प्रवृत्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन दिग्दर्शक शिवाजी पाटील
यांनी हे प्रसंग थोडक्यात उरकले असावेत. दंगलीचे दृश्य देखील सपक वाटते. अर्थात या त्रुटी माफक आहेत. सुरुवातीला दाखवलेली कमांडो कारवाई दमदार आहे. संपूर्ण चित्रपट प्रभावीपणे
उभा करण्यामध्ये छायाचित्रणाचादेखील वाटा आहे. मराठीत सिनेमा मध्ये यापूर्वी न आढळलेली
राजस्थानची रखरखीत पार्श्वभूमी, जुईलीच्या आयुष्यातल्या रखरखटाशी कळत नकळत खूप सुसंगत
ठरते.

सतत भोगत आलेली आणि वारा नेईल त्या दिशेला भेलकांडत राहणारी यातली स्त्री मला फक्त  कथानकापुरती मर्यादित वाटलीच नाही. कुठल्याही अप्रिय घटनेची परिणती अंतिमतः स्त्रीला दोषी
ठरवण्यात किंवा तिचे हक्क (अनेकदा जगण्याचा हक्कही) नाकारण्यात होते हे आदिकालापासून चालत आलेले आणि अजूनही रोज दिसत असलेले वास्तव मला या सिनेमातून पुन्हा अधोरेखित
झाल्यासारखे वाटले. थिएटर बाहेर पडत असताना अस्वस्थतेसोबतच एक चांगला सिनेमा पाहिल्याचे समाधान देखील वाटत होते. हा सिनेमा जर कधी पहायची संधी मिळाली तर आवर्जून बघा... आणि कसा वाटला ते मला नक्की कळवा.