Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'ख्यातनाम इतिहासकार' : डाव्या इतिहासकारांच्या लबाडीचा पंचनामा


२०१४ पासून अचानक देशात भयंकर असहिष्णुता पसरली आहे !! अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. एवढंच काय तर इतिहासाचे भगवेकरण करून सगळा इतिहास बदलला जात आहे !!! यापूर्वी असे अत्याचार आणि असे खोटे इतिहासलेखन फक्त १९९९८ ते दरम्यान झाले होते, नाही का ? काय कारण आहे बरं ?? सोप्पं आहे... त्या काळात आम्हाला हवी तशी इतिहास आणि संस्कृतीची मांडणी करणारे सरकार सत्तेत नव्हते. आपला देश कसा सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदत होता, मुघल राजांनी कला, साहित्य यांच्या माध्यमातून हा देश सांस्कृतिकदृष्ट्या कसा समृद्ध केला, हिंदू धर्मात फक्त आणि फक्त विषमताच कशी होती या गोष्टी या दोन्ही कालखंडातली सरकारे सांगतच नाहीयेत हो ! मग काय करायचं ? चला पुरस्कार परत करूया !! आता उठवू सारे रान !!!...हा आहे अनेक विचारवंत’, ‘इतिहासकारयांचा गेल्या ३ वर्षांतला पवित्रा. ही मंडळी नक्की आहेत कोण, त्यांची विचारपद्धती कशी आहे याबद्दल तपशिलात जाणून घेतलं तरच त्यांच्या वक्तव्यांमागचा हेतू स्पष्ट होऊ शकतो. अशा ख्यातनाम इतिहासकारांच्या उद्योगांचा, पद्धतशीरपणे विणलेल्या जाळ्यांच्या लेखाजोखा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण शौरी यांचं ख्यातनाम इतिहासकार हे पुस्तक.

इस्लामी अत्याचारांकडे कानाडोळा आणि पण हिंदू जातीसंघर्षावर टीका
स्वतंत्र भारतात Indian Counsel For Historical Research (ICHR) या संस्थेवर कायमच डाव्या इतिहासकारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून विशिष्ट विचारांची भलावण केलीच पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधूनही रेटून सोयीस्कर इतिहास मांडला, कारण पाठयपुस्तक मंडळातही त्याच विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. आपापसात भांडणं होतील, संघर्ष होईल अशा ऐतिहासिक तपशिलांना पाठ्यपुस्तकांमधून वगळण्याचेडाव्या इतिहासकारांचे धोरण राहिले आहे. त्याचीच परिणती म्हणून मुस्लीम राजसत्तांच्या कार्यकाळात काळात झालेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणांचे उल्लेखच पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले. पुस्तकातल्याएक परिपत्रकया प्रकरणात अशा कारनाम्यांचे धक्कादायक तपशील दिले गेले आहेत. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या कार्यकाळात माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक १९८९ साली काढले होते.

त्याद्वारे काय काय फेरबदल करण्यात आले बघा हे उदाहरणादाखल पहा:   
१) भारतवर्षे इतिहास या डॉ नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या पुस्तकातून सुलतान महमुदाने मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट, विध्वंस व धर्मांतर करण्यासाठी बाळाचा वापर केलाया वाक्यातील हत्या आणि धर्मांतरहे वगळणे.

२)त्याने सोमनाथ मंदिरातील २ कोटी दिरहाम जवाहिरांची लुटालूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवलीयातीलशिवलिंगाची पायरी बनवलीहे गाळून टाकणे.

अशी २५-३० उदाहरणं इथे दिली आहेत
संघर्ष टाळण्यासाठी हे केलेहे धोरण म्हणून ऐकायला उदात्त वाटते. पण इतिहासाच्या दुसऱ्या अंगाबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा मात्र डाव्या इतिहासकारांकडून एक चलाखी केली जाते. मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचारांवर जाणीवपूर्वक पांघरुण घालणारे हे ख्यातनाम इतिहासकार भारतातील जातिव्यवस्थेमुळे गतकाळात जो परस्पर संघर्ष झाला त्याबद्दल मात्र अगदी तपशीलवार वर्णनं पाठ्यपुस्तकामधून अगदी जोरकसपणे देत असतात. जातीपातीमुळे हिंदू धर्म कसा वाईट होता हे बिंबवले की त्या तुलनेत इस्लाम हा धर्म कसा उजवा ठरतो (कारण त्यात म्हणे जातीभेद नाहीत !) हेही बेमालूमपणे सांगितले जाते. शिवाय एकदा का उच्चवर्णीय विरुद्ध दीनदलित दुबळे यांच्यातला संघर्ष ठळकपणे मांडला की तेच मनावर बिंबवल्या गेलेल्या तरुण मंडळींना हळूहळू हा मार्क्सने मांडलेल्या शोषक विरुद्ध शोषितअशा वर्गविभागणीकडे, त्यांच्या आपापसातल्या संघर्षाकडे आणि अंतिमतः न्याय्य हक्कासाठी हिंसाचार क्षम्य असतोया लाडक्या तत्वज्ञानाकडे नेणे सोपे असते. यातूनच मग रशिया झारशाहीच्या तावडीतून कसा मुक्त झाला, आणि या क्रांतीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना कशी झाली याचेही romantic चित्र उभं करायचं, पण याच डाव्या हुकुमशहांच्या राज्यात लाखो लोक कसे बळी गेले याबद्दल चकार शब्द काढायचा नाही, इतकंच काय पण भारतातल्या कम्युनिस्ट सरकार असलेल्या राज्यांमधल्या पक्षपुरस्कृत हिंसाचाराबद्दल मिठाची गुळणी धरायची हा ढोंगीपणा ख्यातनाम डाव्या इतिहासकारांनी वर्षानुवर्षे चालवला आहे.

प्राचीन काळातील भारतीय कर्तृत्वाला श्रेय नाही 
मुळात आपल्याइथले डावे इतिहासकार मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या चष्म्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे पाहत असल्यामुळे इथला संघर्ष ते कायमच ठळकपणे मांडतात पण हिंदू संस्कृतीतून उदयास आलेले साहित्य, वैज्ञानिक शोध इ. सकारात्मक बाबींविषयी मात्र कुचकुचत लिहितात. उदा. या पुस्तकातले "कदाचित , बहुतेककरून, संभाव्यपणे... म्हणून" या नावाचे प्रकरण पूर्णपणे याच विषयाला वाहिलेले आहे. इतिहासकार डी. एन. झा यांच्या ‘Ancient India, an introductory outline’ या पुस्तकातल्या खोडसाळबद्दल आपल्याला विस्ताराने कळते. जिथे काही ऐतिहासिक तथ्ये नाकारणे अशक्यच आहे तिथे ते मान्य करायचे पण त्याचे इथल्या विचारपद्धतीला श्रेय मात्र द्यायचे नाही हा भारतातल्या डाव्यांचा खाक्या, म्हणूनच आर्यभट्टाने मूलभूत सिद्धांत मांडले असे कबूल करायचे पण लगेच "ते इथल्या तोपर्यंतच्या विचाराच्या विरुद्ध होते" असे म्हणायचे किंवा कालिदासाच्या साहित्याबद्दल त्याने जे मांडले तो आधीच्याच शैलीचा विकास होताअशी मखलाशी करून कालिदासाचीसुद्धा 'ऑल्सो रॅन' गटात गणती करून टाकायची. थोडक्यात काय तर इथे असलेल्या चांगल्या गोष्टी कुठल्यातरी दुसऱ्याच कारणांमुळे घडल्या असं म्हणायचं आणि वाईट गोष्टींना मात्र धर्माचे अधिष्ठान कसे होते हेच उच्चरवाने सांगायचं. तीच गोष्ट अन्य धर्मियांच्या राजवटीत घडली असेल तर तिची रंग सफेदी करून टाकायची (उदा. 'मौर्य काळात जमा होणाऱ्या करातून करवसुली करणाऱ्यांना पोसले जायचे' असे म्हणायचे पण 'औरंगजेबाचा जिझिया कर मात्र हिंदूंना सुरक्षितपणे जगण्यासाठी होता' असे म्हणून भलावण करायची) असे उद्योग इथे निर्लज्जपणे चालले. (विशेष म्हणजे डाव्या इतिहासकारांच्या सर्व निष्ठा ज्या रशियाच्या चरणी वाहिल्या होत्या त्या देशातल्या The History of India या पुस्तकात मात्र प्राचीन काळातल्या भारताच्या अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल मोकळेपणाने कबुली दिली आहे, असे अरुण शौरी नमूद करतात. याचाच अर्थ भारताच्या इतिहासाच्या सोयीस्कर मांडणीत भारतातल्या डाव्या इतिहासकारांचे वैयक्तिक हितसंबंध देखील गुंतले असले पाहिजेत)

डाव्या इतिहासकारांनी उकळलेले आर्थिक फायदे
याच वैयक्तिक हितसंबंधांबद्दल पुस्तकाच्या 'ते इतिहासकार' या पहिल्या विभागात विस्ताराने लिहिले आहे. एकमेकांची तळी उचलून धरत आपल्याच गोटातल्या इतिहासकारांची वर्णी लावण्याचे काम अनेक डाव्या इतिहासकारांनी केले. शिवाय मोठ्या संशोधन प्रकल्पांवर नेमले गेल्यावर त्यात कसा वेळकाढूपणा केला गेला "मानधन घेत नाही" अशा वल्गना करून प्रत्यक्षात मात्र अनुदान पदरात पडून घेतले, सरकारी खर्चाने परदेश दौरे पदरात पडून घेतले, (एवढे करूनही काही प्रकल्प पूर्ण झाले नाहीतच !) याबद्दल साधार विवेचन अरुण शौरी यांनी या विभागात केले आहे. वैचारिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाचा भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणारे ख्यातनाम इतिहासकार अनेक महत्वाच्या पदांवर सरकारी कृपेने राहिले हे आपल्या देशाचे दुर्दैव. रोमिला थापर, इरफान हबीब, सतीशचंद्र, के. एन. पणिक्कर इ. मंडळींनी फेरफार केलेल्या इतिहासाचे देशाच्या काही पिढ्यांवर संस्कार केले आहेत. त्याच मुशीतुन घडलेले आजचे अनेक 'विचारवंत' आणि 'इतिहासकार' आज 'इतिहासात होणाऱ्या ढवळाढवळी'बद्दल सरकारवर आरोप करतात तेव्हा त्या खोटारडेपणाला सीमा नसते. उदारमतवादाच्या मुखवट्याआडचे त्यांचे चेहरे जाणून घेण्याच्या दृष्टीने अरुण शौरींच्या या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे.

रसभंग करणारा अनुवाद
प्रस्तुत मराठी अनुवाद तपशिलाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी तो अनुवाद न वाटता शब्दशः भाषांतर वाटते. त्यातल्या कृत्रिमतेमुळे भाषेला अजिबात ओघ येत नाही.

उदा.

१) 'जपान हाही अतिमहत्वाकांक्षी आणि लोभी होता व त्यांची इच्छा आशिया खंडात आपले साम्राज्य उभारण्याची होती. त्यांच्या हेतूच्या कण्याचा (??) ब्रिटन, फ्रांस आणि अमेरिकी साम्राज्यवाद्यांशी संघर्ष झाला' किंवा 'प्रचारक आणि जाहिरात करणाऱ्यांची अप्रकट संगती तर सर्वश्रुतच आहे' अशी वाक्यं वाचताना तर मिठात खडा पडल्यासारखं वाटतं राहतं. पुस्तकाचे संपादनही नीट झाल्यासारखे वाटत नाही. सदोष वाक्यरचना आणि काही मुद्रणदोष यांच्यामुळे हा मराठी अनुवाद सुखद अनुभव देत नाही. एका महत्वाच्या पुस्तकाला अशा गोष्टींमुळे उणेपण आले आहे.
कदाचित मूळ इंग्रजीतूनच हे पुस्तक वाचणे अधिक सोयीचे ठरेल.

ख्यातनाम इतिहासकार (‘Eminent Historians - Their Technology, Their Line, Their Fraud’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद)
लेखक : अरुण शौरी 
अनुवादक : सुधा नरवणे 
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती : पहिली (२००१)
किंमत : १५० रू.
पृष्ठसंख्या  :२१६

‘चुंबक’ : स्वार्थ आणि सच्चेपणातलं द्वंद्व



छोट्याश्या पण अर्थपूर्ण गोष्टी सांगणारे चित्रपट हे मराठी सिनेमाचं वैशिष्ट्यं म्हणायला हवं. भरपूर पात्रं, भरपूर बजेट, भरपूर गाणी यातलं काहीही नसलं तरीही गुंतवून ठेवणारे अनेक चित्रपट मराठीत निर्माण झाले आहेत याचं कारण इथल्या माणसांशी, मातीशी, प्रवृत्तींशी, सुख:दुखांशी जवळचं नातं त्यांनी उलगडून दाखवलं आहे. आपल्या आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या स्वप्नांना गाठू पाहणारा एक मुलगा आणि फक्त एका छोट्याश्या परीघापुरतंच विश्व समजणारा एक माणूस यांची कथा असणारा ‘चुंबक’ हाही असाच एक हृद्य चित्रपट.

मुंबईत वेटरचं काम करता करता आपल्या गावाकडे स्वतःच्या मालकीचं रसवंतीगृह उभरायचं स्वप्नं पाहणारा एक मुलगा (भालचंद्र) पैशासाठी आपला मित्र (डिस्को) याच्यासोबत लॉटरी लागल्याच्या बहाण्याने कुणालातरी गंडवायचा घाट घालतो. जो पहिलाच मासा या दोघांच्या गळाला लागतो तो असतो काहीसा मंद, डोकं कमी वेगाने चालणारा, जगाची रीत आणि त्यातले छक्के-पंजे ठाऊक नसणारा असणारा प्रसन्न. त्याला पाहूनच फसवायची इच्छा मेलेला भालचंद्र केवळ नाईलाजाने आपल्या मित्राच्या आग्रहाखातर त्याच्याकडून पैसे लंपास करतो. पण पुढे अशा घटना घडत जातात की प्रसन्न या दोघांनाच चिकटतो आणि मग सुरू होते एक तीन पायांची शर्यत. ज्यात एका व्यक्तीला काहीही करून जिंकायचंच असतं आणि दुसरीला खरंतर जिंकायची अजिबात इच्छा नसते पण हारणं परवडणारही नसतं. तिसरी व्यक्ती मात्र शर्यत, हेवेदावे, हारजीत या सगळ्याच्या चक्रात कधी अडकलेलीच नसते. ते वैतागतात, चिडतात, रडतात आणि भांडतातही! पण या सगळ्या जांगडबुत्त्यात त्यांच्यात एक नातंही तयार होत जातं. त्या अजब नात्यातले गुंते, गाठी आणि उकल अनुभवायच्या असतील तर तर ‘चुंबक’ पहावाच लागेल.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या स्वप्नदृश्याचा एकूणच पोत लाजवाब आहे. तिथूनच चित्रपट पकड घेतो आणि पूर्णवेळ बांधून ठेवतो. यातली तीनही पात्रं समाजातल्या तीन प्रमुख प्रवृत्ती आहेत. ‘डिस्को’ हा मनाचा वाईट किंवा बनेल नाही, पण मुंबईच्या जगण्याने त्याला बरंच काहीसं कठोर बनवलंय. “कुणी आपल्याशी वाईट वागलं तर आपण आणखी कुणाशीतरी वाईट वागून त्याचं उट्टं काढायचं” असं त्याचं रोखठोक तत्वज्ञान आहे. दुसऱ्या टोकाला दुनियादारी कळण्याची क्षमताच नसल्याने आपला निरागसपणा शाबूत असणारा आणि म्हणूनच पूर्वग्रहदूषित न होता पाटी कोरी ठेवून लोकांना सामोरा जाणारा प्रसन्न आहे. खरी गोची आहे ती भालचंद्रची. त्या च्यात दुसऱ्याचं वाईट करण्याची भूक नाहीये पण त्याला स्वतःच्या स्वप्नांशी तडजोडही करायची नाहीये. शेवटच्या प्रसंगापर्यंत त्याचं हे सी-सॉ सारखं वर-खाली होत राहणंच आपल्याला गुरफटून टाकतं. त्याच्यापुढचा पेच हा खरंतर इच्छा नसतानाही खोटेपणा करून पुढे जाणाऱ्या, परंतु त्याबद्दल स्वतःला आतून सतत कुरतडत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढचा पेच आहे.

जेमतेम दोन तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक बरेच प्रसंग (आणि तेही अनेक वेगवेगळ्या स्थळी घडणारे) आहेत. पात्रांचे भावनिक चढउतार, भालचंद्र आणि प्रसन्नचे एकमेकांसोबतच्या वागण्यातले बदल यांमुळे चित्रपट पाहून बाहेर पडताना आपण बरंच काही बघितल्याची भावना होते. अनेक छोटे छोटे प्रसंग लक्षात राहणारे आहेत, पण भालचंद्र आणि प्रसन्न यांच्यातला एकमेकांना चिडून दगड मारण्याचा प्रसंग आणि एस.टी.मध्ये खिडकीवरून होणारी नोकझोक हे प्रसंग चित्रपटाचे ‘हायलाईट’ ठरावेत. एकही शब्द न वापरता फक्त पात्रांच्या हालचाली आणि मूड्समधून त्यांच्यातलं नातं कसं ठसवावं याचं उत्तम उदाहरण लेखक सौरभ भावे आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी प्रस्तुत केलं आहे.

चित्रपटाचं ध्वनिआरेखन आणि मोजकं परंतु प्रभावी पार्श्वसंगीत, सार्वजनिक ठिकाणी झालेलं छायाचित्रण आणि फ्रेममध्ये तिथल्या अनेक प्रकृती टिपणं या गोष्टींमुळे चित्रपटाची पातळी आणखीन वर गेली आहे. या सगळ्यात दुधात साखर म्हणावी अशी बाजू आहे अभिनयायची. कॅमेऱ्याचा कोणताही पूर्वानुभव नसणारी दोन नवीन मुलं (साहिल जाधव आणि संग्राम देसाई) यात अगदी सराईतपणे वावरली आहेत. प्रसन्नच्या निरागसतेत आपण नकळत गुरफटत चाललो आहोत याची मध्येच जाणीव झाल्यावर अचानक तुसडेपणाने वागणारा भालचंद्र साहिल जाधव याने समंजसपणे साकारला आहे. कलेच्या अनेक प्रांतात भटकंती केल्यानंतर स्वानंद किरकिरेंनी प्रसन्नची मोठी भूमिका साकारून अभिनयातही जबरदस्त ठसा उमटवला आहे. मंदपणा आणि मतिमंदता यांच्यात असणाऱ्या सीमारेषेचं उत्तम भान त्यांना आहे. भविष्यात त्यांच्याकडून अशाच दमदार भूमिका बघायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. भालचंद्र आणि प्रसन्नच्या भाषेवर मात्र दिग्दर्शकाने मेहनत घ्यायला हवी होती असं मात्र प्रकर्षाने जाणवतं. चित्रपटात तपशीलांवर एवढा भर दिलेला असताना सोलापूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातून आलेल्या या दोन पात्रांच्या शब्दोच्चारांमधून तसं काहीच जाणवत हे खटकलं. एवढी त्रुटी वगळता हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक सुंदर अनुभव आहे

‘लेथ जोशी’ : कालबाह्यतेचं सावट




आपल्याला आवडणारी गोष्ट उराशी कवटाळून बसण्याचा स्वभाव तसा सार्वत्रिकच. काही जण काळ पुढे सरकतो तसतसे पूर्वी घट्ट धरून ठेवलेल्या वस्तू, आठवणी, समजुती, धारणा सोडून देऊन नवीन काहीतरी पकडायला धावतात. पण सगळ्यांनाच हे जमत नाही. काही जण जातील तिथे आपलं एक जुनं गाठोडं घेऊन जातात. त्यांना मान्य करायचं नसतं. त्याचा स्पर्शच त्यांना हवाहवासा वाटत असतो. पण काळ क्रूर असतो, तो थोडाच कुणासाठी थांबणार असतो? या साचून राहिलेल्या माणसांना तो ढकलत ढकलत एका काळ्याकभिन्न दरीच्या मुखाशी आणून ठेवतो....

प्रॉब्लेम हा असतो की त्यांना याचाही पत्ता नसतो…

‘लेथ जोशी’ ही अशीच काळाबरोबर जाऊ न शकणारी वृत्ती आहे.

३५ वर्ष एका वर्कशॉपमध्ये लेथमशीनवर अगदी जीव ओतून काम करणाऱ्या विजय जोशींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एके दिवशी अचानक वर्कशॉप बंद होत असल्याचं सांगण्यात येतं. इतकी वर्ष जोशींचं विश्व लेथ मशीनभोवतीच घुटमळत असतं. बाहेरच्या जगात काय उलथापालथ चाललीये, काळाचा रेटा काय आहे या गोष्टी त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो. त्यांना ना घरचा रिमोट धड वापरता येतो, ना मोबाईल वापरायची इच्छा होते. ऑटोमेशनच्या या नव्या जगात लेथ मशीनही जवळपास इतिहासजमा झालंय. मग जोशींनी काम करायचं कुठलं? मन गुंतवायचं कुठे? नव्या जगाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ असणाऱ्या जोशींना त्या जगाच्या सुरात सूर मिळवणं जमतच नाही. मुलगा मोबाईल, कंप्यूटर रिपेअर करण्यात निष्णात आहे तर बायको स्वयंपाकात. दोघांनीही आपापले व्यवसाय चालवले आहेत आणि मुख्य म्हणजे काळासोबत होणारे बदल त्यांनी व्यवसायात अंगिकारले आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीला पुरणपोळ्या वगैरे पारंपरिक स्वयंपाकाच्या ऑर्डर्स घेणाऱ्या सौ. जोशी नंतर फूड चॅनेल वर कॉन्टिनेन्टल पदार्थ पाहताना, चायनीजची ऑर्डर घेतलेल्या दिसतात. सारखी सारखी घरातल्यांवर करवादणारी आज्जीसुद्धा नातवाने हॉटेलात नेल्यावर, नव्या कारमधून फिरवल्यावर खुश होते पण जोशींना यातल्या कशाचाही आनंदच घेता येत नाही. जगण्याच्या शर्यतीत ते फार मागे पडलेले असतात. त्यांच्या कुटुंबातही त्यांचं बिनमहत्वाचं असणं, त्यांची नोकरी गेल्यावरही घराला आर्थिकदृष्ट्या फारसा काहीच फरक न पडणं हे उत्तरोत्तर जास्तच ठळक होत जातं.


चित्रपटाला कथानक म्हणावं असं फारसं नाहीच. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यासाठी संवाद फार कळीचे असतात. 'लेथ जोशी'मध्ये संवादाचाही फार मोठा वाटा नाही. पण मग असं काय आहे की चित्रपट खिळवून ठेवतो? याचं उत्तर आहे पटकथा! घटना फार घडत नसल्या तरी पटकथा काळाच्या बदलाचं प्रतिबिंब फार प्रभावीपणे दाखवते. प्रत्येक प्रसंगात काळाच्या वेगवान प्रवाहाचे संदर्भ आहेत. नव्याजुन्यांचं द्वंद्व आहे. असं असलं तरी दिग्दर्शक मंगेश जोशी यांच्या संयत हाताळणीमुळे या द्वंद्वात कुठेही कर्कश्शपणा येत नाही. लयाला जाणाऱ्या गोष्टींबद्दल, माणसांबद्दल ओलावा जरूर आहे पण उमाळे नाहीत. सगळं कसं 'मॅटर ऑफ फॅक्ट' पद्धतीने दाखवलं आहे. चित्रपटाचा आशय गंभीर असला तरीही चित्रपट मात्र अथवा अतिगंभीर वा उदासवाणा नाही. आजी आणि नातू यांच्या संवादांमधून वातावरण हलकंफुलकं राहील याचीही काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.


बदलाचा वेग प्रचंड असला तरी चित्रपटाचा ओघ मात्र स्वाभाविकपणे आहे, कारण हा चित्रपट भौतिक प्रगतीच्या वेगाशी स्पर्धा न करू शकणाऱ्या व्यक्तीवरचा आहे. शीर्षक भूमिका करणारे चित्तरंजन गिरी यांचा या भूमिकेसाठीचा लुक एकदम परफेक्ट आहे. चित्रपटाचा बहुतांश भाग त्यांच्या चेहऱ्यावर हरवल्याचे भाव आहेत, जे स्वाभाविक आहे. परंतु संवादफेकीत मात्र ते काहीसे कमी पडतात. त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका करणारे अश्विनी गिरी, ओम भुतकर आणि आजी झालेल्या सेवा चौहान हे अन्य कलाकार छाप पडून जातात.

चित्रपटातलया काही फ्रेम्स लक्षात राहणाऱ्या आहेत (छायांकन : सत्यजित श्रीराम). आजी, वडील आणि मुलगा या तीन पिढ्यांचा संवाद एकाच खोलीच्या ३ वेगवेगळ्या खिडक्यांमधून दाखवण्याची कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. चित्रीकरणस्थळं ही विचारपूर्वक निवडलेली आहेत. उदा. जोशी राहात असलेला वाडा त्यांच्यासारखाच बदलांपासून लांब असलेला आहे. वेगवेगळी वर्कशॉप्स, त्यातून दिसणारं यंत्रवैविध्यं, बदलत्या काळाचं त्यात दिसणारं प्रतिबिंब या गोष्टी चित्रपटाचा आशय ठसवायला मदत करतात. ध्वनीचा वापरही लक्षवेधी आहे (ध्वनी आरेखन : पियुष झा). पहिल्याच प्रसंगात ते जाणवतं. सुरुवातीला एकही आवाज नाही आणि ज्या क्षणी जोशी लेथमशीन सुरु करतात तेव्हा एकदम यंत्रासह आजूबाजूचे अन्यही आवाज खाट्कन चालू होतात.पुढे वर्कशॉप बंद होणार हे कामगारांना कळल्यानंतरच्या प्रसंगात आणि शेवटच्या प्रसंगात भंगारवाला ओरडण्याचा आवाज तर अगदी सिक्सरच! सारंग कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत अगदी मोजकं आणि नेमकं आहे चित्रपट संपतो तेव्हा ऐकू येणारे सरोदाचे स्वर आपल्याला चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावरही सोबत करतात.

हा चित्रपट म्हणजे काळासोबत बदललं नाही तर काय होईल याचा आरसा आहे. बदलांची धग क्रूर आहे. तुम्ही काळाच्या प्रवाहात उडी न घेता कोरडे राहिलात तर तुम्हाला ती धग वेढणारच. मग तुम्ही कामात पाट्या टाकणारे आहेत की कामाकडेही कला म्हणून बघणारे आहात हे ती बघत नाही. चित्रपटाच्या शेवटाकडे जोशी जेव्हा आपल्या वर्कशॉपच्या मृत्युशय्येवर असलेल्या मालकाला भेटायला जातात तेव्हा मालक त्यांच्या बायकोला म्हणतात “हे लेथ जोशी…. कलाकार आहेत कलाकार…” ऐकताना आत कुठेतरी हलल्यासारखं होतं. रुटीन काम असूनही लेथ मशीनवर एवढं प्रेम करणारा आणि त्यावर बनवल्या जाणाऱ्या जॉब्जवर जणू कलाकुसर करण्याची भावना बाळगणारा माणूस कालबाह्य होतोय हे पाहून वाईट वाटून घ्यायचं की अद्ययावत न झाल्याबद्दल त्याला नावं ठेवायची अशी द्विधा मनस्थिती करून जाणारा हा क्षण... तांत्रिक बदलांची अपरिहार्यता अधोरेखित करणं आणि तरीही कथानकाला असणारा मानवी स्पर्श कुठेही कमी होऊ न देणं हे या चित्रपटाचं मोठं यश आहे. जोशींची घालमेल पाहताना 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या नारायणाच्या झोपलेल्या मुलाची आठवण आली. झोपेतही त्याने मुठीत धरून ठेवलेला लाडू काळवंडलेला असतो.... लेथ जोशींचंही फारसं वेगळं नाहीये. हातातलं सोडवतही नाहीये आणि ते आता आस्वाद घेण्याच्या परिस्थितीतही राहिलेलं नाहीये .. आता सावट आहे अंधाराचं …

टोकाच्या भावना उद्दीपित न करता , कुठलेही 'क्लिशे' न दाखवता विचारप्रवण करायला लावणारे चित्रपट फार कमी असतात. म्हणूनच 'लेथ जोशी' चुकवू नये..

गोनीदा : एका अनिकेताचे स्मरण





काही माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगून जातात. आजूबाजूचे लोक आपापलं टीचभर आयुष्य अंदमानातला कोलू ओढावा तश्या भावनेने ओढत असताना या लोकांचा मात्र अनेक प्रदेश, अनेक क्षेत्रं एवढंच काय तर अनेक काळात मुक्त विहार असतो. त्यांना बांधून घालणारं काही अस्तित्वातच नसावं की काय असा प्रश्न आपल्यासारख्या पामरांना पडू लागतो. पण एवढे मोकळेपण असूनही त्यांचा स्वच्छंदीपणा स्वैराचाराच्या अंगणात पाऊल टाकत नाही की त्यांचं मुक्त असणं त्यांना मोकाट बनवत नाही. आयुष्य समरसून जगणं आणि दोन्ही करांनी देत राहणं एवढंच त्यांना माहिती असतं. गोपाल नीलकंठ दांडेकर हे अशाच एका अवलियाचे नाव.  पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी मात्र ते होते फक्त ‘गोनीदा’ किंवा ‘आप्पा’... आप्पा आयुष्यभर लिहित गेले, वाचत गेले, वाटत गेले, शोधत गेले...  त्यांनी तुडवलेले माळ, कातळ-पत्तर पाठीमागच्यांसाठी पायवाट बनत गेले.


चिदानंद

गोनीदा मूळचे विदर्भातल्या परतवाडा गावचे. त्यांचे मूळ नाव आत्माराम.आत्माराम वयाच्या तेराव्या वर्षी सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी घरातून पळून गेला. त्यापुढच्या प्रवासात आत्मारामला एकाने "तू कोण कुठला" प्रश्न विचारल्यावर खरी ओळख लपवण्यासाठी आत्मारामने स्वतःचे नाव 'गोपाल' असे सांगितले... आणि तेच पुढे रूढ नाव झाले. त्यानंतर गोपाल वणवण भटकला, उन्हातान्हात तापला (त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत सांगायचं तर 'दोरा तुटलेल्या पतंगासारखा दिशाहीन भटकला') आणि एके दिवशी गाडगेबांकडे जाऊन आंचावला. तगमग आयुष्याला त्या भल्या माणसाची सावली मिळाली. त्यांच्यासमवेत गोपाल पुन्हा भटकला. पण हे भटकणं निरुद्देश नव्हतं. निरर्थक तर नव्हतंच. कारण याच काळात गाडगेबाबांच्या रोखठोक कीर्तनांचा त्यांना जवळून परिचय झाला. त्यांचे विचार, त्यांच्या कीर्तनामधली कला असे वेगळेवेगळे पैलू त्यांना लख्ख दिसले. त्यांचं संतसाहित्याशी नातं गहिरं होत गेलं ते इथूनच. प्रसिद्ध निरूपणकार सोनोपंत दांडेकर हे गोनीदांचे मामाच. त्यांच्याकडूनही गोनीदांना शिकायला मिळालंच होतं. संत साहित्याच्या संचिताची शिदोरी गोनीदांना आयुष्यभर पुरली. सततच्या वाचन-मनन--पठणाने संतवचने, ओव्या, अभंग, पदावल्या त्यांना मुखोद्गत झाल्या होत्या. त्यातूनच त्यांचा पिंड अध्यात्मिक बनला. ‘मृण्मयी’सारखी रचितकादंबरी असो वा मोगरा फुलला, तुका आकाशा एवढा, दास डोंगरी राहतो या ज्ञानोबा, तुकोबा, रामदास यांच्यावरच्या चरितकादंबऱ्या असोत, गोनीदांची लेखणी परमतत्वाशी पुनःपुन्हा तादात्म्य पावत राहिली.





संस्कार, मानवी मूल्यं, साधनशुचिता यावर त्यांची अपार श्रद्धा होती. बहुदा याच श्रद्धेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहून ते अतिशय प्रभावित झाले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या आवाहनाने प्रेरित होऊन जे अनेक ध्येयवादी तरुण राष्ट्रकार्यासाठी पुढे आले व संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले त्यात गोनीदाही होते. प्रचारक म्हणून पुन्हा एकदा फिरस्ती त्यांच्या वाट्याला आली. पण त्याला त्यांची कधीच ना नव्हती. ३ वर्ष मनोभावे ही भूमिका पार पडली, परंतु त्यानंतर मात्र प्रकृती त्रास देऊ लागल्याने त्यांना प्रचारक म्हणून काम थांबवावं लागलं. पण संघाशी जुळलेलं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं. रा. स्व. संघाच्या ऋणातून अंशतः का होईना उतराई होण्यासाठी पुढे त्यांनी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचं 'वादळातील दीपस्तंभ' हे चरित्रही लिहून काढलं.


पूर्णवेळ लेखन

खूप कमी वयातच पूर्णवेळ लेखक म्हणूनच जगण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांच्या भावी पत्नीने त्यांच्याशी त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला नाही कारण त्यांना थांबवणं म्हणजे वाऱ्याला मुठीत बंद करण्यासारखं होतं. लिखाणावरच चरितार्थ चालवणारे गोनीदा बहुदा पहिलेच लेखक असावेत. पण त्यांचं मोठेपण यातच आहे की, अर्थार्जनासाठी लिहिलेली धार्मिक, पौराणिक पुस्तकेही पाट्या टाकल्याप्रमाणे कधीही लिहिली नाहीत. ज्या प्रदेशावर लिखाण करायचं आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन राहायचे, तिथल्या माणसांचे व्यवहार, स्वभाव, बोली, लकबी निरखायचे, त्या प्रदेशाबद्दलच्या, तिथल्या इतिहासाबद्दलच्या नोंदी अभ्यासायच्या असा त्यांचा शिरस्ता. त्यात कोरडेपणा नव्हता. ही एक लोभस व्यावसायिकता होती..


अचपळ तन माझे

गोनीदा कधी लिखाणाचा विषय म्हणून ठरवून भटकले, तर कधी अंतरीच्या समाधानासाठी केलेल्या भटकंतीतून त्यांना नवीन काही सुचत गेलं. एकुणात काय, त्यांची पादत्राणं आणि त्यांची लेखणी यांचं नातं अगदी घनिष्ट होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाक्रा नांगलचं धरण उभं राहत होतं... ते अनुभवायला गोनीदा पोचले थेट हरियाणामध्ये. त्या अजस्र् धरणाचा पसारा, बांधकामाच्या निमित्ताने तिथे आलेल्या मजुरांचे बोटभर संसार या सगळ्याचं मिळून उभं राहिलेलं विश्व गोनीदांच्या लेखणीला खुणावत होतं. त्यातूनच मग साकारली 'आम्ही भगीरथाचे पुत्र' ही कादंबरी. आयुष्यातल्या पुन्हा एका अस्थिर मनस्थितीच्या वेळी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्या स्मृती कागदावर उतरल्या आणि अप्रतिम कादंबरी बनून गेल्या. संपूर्ण श्रद्धेने केलेल्या परिक्रमेत दिसलेली मनुष्यस्वभावाची रूपं, चमत्कार वाटावे असे अनुभव, भक्तीमार्गाच्या बाजूने जाणारी प्रीतीची धूसर पायवाट, वैराग्य, वैगुण्य या साऱ्यांचं एक रसरशीत मिश्रण म्हणजे 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'. ‘दुर्गभ्रमणगाथा’ हे पुस्तक म्हणजे तर भटक्यांची गीताच म्हणायला हवं. अनेक अनवट वाटा तुडवण्याचे त्यांचे अनुभव, एकेका किल्ल्याने दिलेलं शहाणपण, भटकंतीची झिंग या सगळ्यामुळे ते अगदी चविष्ट होऊन गेलं आहे. ही भटकंती फक्त त्यांच्या किल्ल्याबद्दलच्या आणि इतिहासाबद्दलच्या पुस्तकातूनच प्रकटते असे नाही. त्यांच्या बहुतेक सर्व कादंबऱ्या या फिरस्तीचाच परिपाक आहेत.


मैत्र जीवांचे

बाबासाहेब पुरंदरे आणि आप्पासाहेब उपाख्य गोनीदा ही दोन्हीही मराठीचिये नगरीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्वं. या दोहोंचा अकृत्रिम स्नेह हे महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न. कुठलीही स्पर्धा, ईर्ष्या यांच्या पार पोचलेलं हे मैत्र एकमेकांमधल्या अभ्यासूवृत्तीला दुणावत गेलं, उभ्या महाराष्ट्रातल्या अनवट, अवघड वाटांवर हसत हसत घेऊन गेलं. परस्परांच्या क्षमतेला दाद देणं किंवा तिला आव्हान देऊन अधिक उत्तुंग काही करण्यास प्रवृत्त करणं यामुळे महाराष्ट्र आयताच नशीबवान ठरला.... एकमेकांच्या

पावनखिंडीच्या साक्षीने एका धुवाँधार क्षणी बाबासाहेबांनी आप्पांना एक वचन मागितलं 'शिवरायांचा इतिहास शब्दबद्ध करण्याचं'. दीपस्तंभासारखं शिवचरित्र स्वतः लिहिलेलं असूनही त्यांनी गोनीदांना अशी गळ घातली यात बाबासाहेबांची उंची दिसतेच पण त्यांच्याठायीची पारखही दिसते. त्यांचा गोनीदांच्या क्षमतेवर आणि ज्ञानावर प्रगाढ विश्वास होता. त्या वचनाला जागून गोनीदांनी केलेल्या बखरी, पत्रव्यवहार, गड-कोट यांच्या अभ्यासातून साकारलं शिवरायांवरचं आणखी एक लेणं - पाच कादंबऱ्यांनी मिळून बनलेला 'कादंबरीमय शिवकाल' !

बरोबर तितकाच विश्वास गोनीदांचाही बाबासाहेबांवर होता याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एका देवतेची जुनी मूर्ती गोनीदांच्या ताब्यात आली. त्यांचा अभ्यास एका रोमांचकारी शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करत होता. पण ‘आपल्याहून अधिक जाणकार व्यक्तीचे मत महत्वाचे’ हे त्यांना माहित होते, म्हणूनच त्यांनी गाठले बाबासाहेबांना ! बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासातून गोनीदांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि हे निश्चित झालं की गोनीदांच्या ताब्यात असणारी मूर्ती ही साक्षात जिजाऊंकडून पूजिली जाणारी त्यांच्या पाचाडच्या  देवघरातली मूर्ती होती !!!


आजच्या काळात गोनीदा

अलीकडे मला प्रकर्षाने वाटलं की निव्वळ कथानकाच्या दृष्टीने पाहता गोनीदांच्या काही कादंबऱ्या ‘आऊटडेटेड’ झाल्या आहेत. अगदी प्रेडिक्टबल कथानक, अत्यंत भाबडी पात्रं, नातेसंबंधांमधल्या गुंतागुंतीचा अभाव किंवा तशी गुंतागुंत झालीच तर त्या नात्याला काहीतरी नाव देण्याचा (भाऊ-बहिण !) अट्टहास (विशेषतः शितू, मृण्मयी वाचताना हे फारच प्रकर्षाने जाणवलं) या गोष्टी आता आकर्षून घेऊन शकत नाहीत. आजच्या काळातल्या वाचकाने त्या कादंबऱ्या प्रथमच हातात घेतल्या तर त्यांचे कथानक त्याला कितपत भुरळ पडेल याबद्दल साशंकता वाटते.

पण मग यामुळे गोनीदा पूर्णपणे कालबाह्य ठरतात का ? याचं उत्तर मात्र मी ‘नाही’ असंच देईन.

का ?

त्यामागे काही कारणं आहेत

त्यांच्या लिखाणातले वैविध्य विलक्षण आहे. कथा, प्रादेशिक कादंबऱ्या, नाटक, ऐतिहासिक कादंबऱ्या, गीतं, भक्तिसाहित्य, प्रवासवर्णन .... काय काय नाही लिहिलं लिहिलं त्यांनी !! प्रत्येक प्रकारात विलक्षण वैविध्य आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक प्रदेशांचे त्यांनी उभे केलेले तपशील थक्क करणारे आहेत. तिथल्या निसर्गाचं, पानाफुलांचं, ऋतूंचं वर्णन अतिशय बारकाईने केलेलं आहे. डोळसपणे केलेले ते एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे. त्याचबरोबर एक गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने पारंपारिक पठडतली पात्रं असताना त्यांच्या कथानायिका मात्र अतिशय कणखर आहेत ! ‘पडघवली’मधल्या अंबू वहिनी, ‘मृण्मयी’मधली मनू या अतिशय निग्रही आहेत. ‘जैत रे जैत’ मधली चिंधी म्हणजे तर मराठी साहित्यातला मैलाचा दगड ठरावी. फटकळ, निडर, आपण होऊन प्रेमात पुढाकार घेणारी, कठीण प्रसंगी नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी त्या काळात अगदी वेगळी ठरली असणार यात शंका नाही. (मला तर आजच्या ‘आर्ची’मध्येही सतत चिंधीचाच भास होत राहतो !)


भाषाप्रभू, बोलीप्रभू !

गोनीदांच्या लिखाणात सर्वात खिळवून ठेवणारं काही असेल तर ती म्हणजे अत्यंत रसाळ भाषा. वाचताना जणू एखादे वेल्हाळ आजोबा मांडीवर घेऊन नातवंडांना गोष्ट सांगत आहेत असंच वाटत राहतं.  आताच्या त्या काळात ती भाषा, उच्चार काहीसे वेगळे वाटतात. त्याची सुरुवात त्यांच्या पुस्तकावर छापल्या गेलेल्या नावापासूनच होते, कारण मुखपृष्ठावर त्यांचे नाव आताच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुस्वारासह ‘गोपाल नीलकंठ दांडेकर’ असे न लिहिता जोडाक्षरासह ‘गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर’ असं असतं ! त्यांच्या लिखाणातले ‘माझ्यासवे आले’, ‘मजजवळ नाही’ असे शब्दप्रयोग वाचताना अतिशय गोड वाटतात.

गोनीदांच्या भाषावैभवाबद्दल बोलत असताना त्यांनी वापरलेल्या बोलीभाषांचा उल्लेख न करणे हे पातकच ठरेल. त्यांच्या पूर्ण साहित्यप्रवासात ओघवती भाषा वेगवेगळ्या बोलींचं अंगडं-टोपडं परिधान करून आल्यामुळे अधिक लोभसवाणी बनली आहे.  वऱ्हाडी (श्रीगाडगेमहाराज),  मावळी (माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी), कातकरी (जैत रे जैत), प्राकृत (मोगरा फुलला), १६व्या शतकातली मराठी (त्यातही ‘दास डोंगरी राहतो’ आणि तुका आकाशाएवढा’ मधल्या बोलींमध्ये पुन्हा फरक !),  उत्तर भारतीय (आम्ही भगीरथाचे पुत्र) या बोलींवरचे त्यांचे प्रभुत्व पाहून ते त्या त्यांच्या मातृबोलीच असाव्यात की काय अशी शंका येते. भालचंद्र नेमाडेंच्या 'हिंदू'च्या कितीतरी पूर्वी एकाच पुस्तकात अनेक बोलीभाषांचा समावेश गोनीदांच्या 'कादंबरीमय शिवकाल'मध्ये झालेला आहे.

कीर्तन-निरूपणासारख्या performing art मध्ये हातखंडा असल्यामुळे कदाचित पण गोनीदा अतिशय उत्तम अभिवाचकही होते. 'जगन्नाथाचा रथ' हे गोनीदांनी लिहिलेले नाटक. त्यासंदर्भात भेटायला डॉ. लागू गोनीदांच्या तळेगावच्या घरी गेले होते. घराबाहेर पडून त्यांनी वृक्षराजीच्या सान्निध्यात सर्वांसमक्ष केलेले अभिवाचन म्हणजे कसा अविस्मरणीय अनुभव होता हे डॉ. लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या पुस्तकात तपशिलाने नमूद केले आहे.  सादरीकरणातली ही हातोटीच गोनीदांच्या  लिखाणात अलगदपणे उतरली असावी.

चुकवू नये असे काही




या उत्कट, तल्लीन, स्वच्छंदी व्यक्तिमत्वाचं लिखाणात प्रतिबिंब कसं पडतं हे जाणून घ्यायचं असेल तर कथानकाच्या पलीकडचे गोनीदा अनुभवायलाच हवेत आणि त्यासाठी पुढील ३ पुस्तकं 'मस्ट' आहेत.


१) आशक मस्त फकीर : कन्या वीणा देव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात गोनीदांच्या फकीर वृत्तीबद्दल खूप विस्तारानं लिहिलं आहे. सगळ्यात असूनही कशातच नसण्याची त्यांची वृत्ती, संसारी असूनही विरक्तीची ओढ असल्यामुळे  त्यांच्या पत्नीची होणारी ओढाताण, त्याचवेळेस आपल्या एकुलत्या कन्येवर केलेले संस्कार, तिला दिलेली मोकळीक, एवढंच नव्हे तर अगदी जावयालाही आपल्या गड-कोट मोहिमांमध्ये सामावून घेणे, असंख्य लोकांशी जोडलेला स्नेह याबद्दल अगदी जवळून कळतं.

२) छंद माझे वेगळे : खुद्द गोनीदांनी स्वतःच्या छंदांबद्दल लिहिलंय. एका माणसात किती कलागुण असू शकतात ते वाचून अचंबित व्हायला होतं. छायाचित्रकला (यासाठी त्यांनीं 'सावलीदिवलीचा खेळ' असा अतीव गोड शब्दप्रयोग केलाय), स्फटिकातले कोरीवकाम इथपासून ते पुराणवस्तू, नाणी इथपर्यंत अनेक गोष्टींमध्ये एकाच माणसाला असलेली गती पाहून तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही.
या पुस्तकात नसलेली आणखी एक कला म्हणजे गीतलेखन. त्यांचं एक गंमतशीर धनगर गीत तुम्ही इथे ऐकू शकता.





'जैत रे जैत' कादंबरीत त्यांची काही फर्मास गीतं आहेत. त्यावर चित्रपट बनला तेव्हा त्यातली गीतं गोनीदांनी का लिहिली नसावीत हे एक कोडंच आहे. याशिवाय रा. स्व. संघात म्हटली जाणारी अनेक पद्यं/गीतं गोनीदांनी रचलेली आहेत. परंतु संघात पद्यलेखक कोण याची नोंद ठेवली जात नसल्यामुळे दुर्दैवाने नक्की कुठली कुठली गीतं त्यांची आहेत हे आता निश्चित माहित नाही.)

३) कहाणीमागची कहाणी : गोनीदांच्या गाजलेल्या पुस्तकांच्या जन्मकथा खुद्द त्यांच्याच शब्दात. एकेका कादंबरीचे बीज त्यांच्या मनात कसे रुजले, ते फुलवण्यासाठी गोनीदांनी काय काय तयारी केली आणि मेहनत घेतली याचे रोचक अनुभव.


खरंतर ही तीन पुस्तकंच काय, पण त्यांचे संपूर्ण साहित्य वाचले तरी त्या सगळ्याच्या बेरजेपेक्षा गोनीदा अधिक मोठे आहेत असं वाटत राहतं. हेच आयुष्याचं सार होतं. इतक्या गोष्टी करूनही, इतका लोकसंग्रह जोडूनही त्यांना खरं आकर्षण होतं अनाघ्रात शांततेचं. झाडं-वेली, पशुपक्षी, फळंफुलं या सगळ्यांच्या बेरजेपेक्षा अधिक असणाऱ्या निसर्गाचं. ‘माचीवरला बुधा’सारखा कुठेतरी गिरिकुहरी अखेरचा श्वास घ्यावा हेच त्यांचं स्वप्न होतं. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ ही ओळ सुरेश भटांनी त्यांच्यासाठीच लिहिलेली असावी की काय असंच वाटत राहतं....

 - प्रसाद फाटक


mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/8/Article-on-Gopal-nilkanth-dandekar-s-101-birth-anniversary-by-prasad-phatak-.html




रोलबॉल खेळाचे जनक "राजू दाभाडे" यांच्या प्रवासाची गाथा..



रोलबॉल खेळाचे जनक हे 'राजू दाभाडे' या नावाचे मराठमोळे शिलेदार असून ते चक्क पुणेकर आहेत हे मित्राकडून जेव्हापासून कळलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की त्यांची थेटभेट घ्यायचीच. पण ठरवणं आणि प्रत्यक्षात आणणं यामध्ये तीन महिन्यांचा अवधी गेला ! याचं मुख्य कारण म्हणजे दाभाडे सरांची प्रचंड व्यस्तता.... आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे ते सचिव असल्याने संघटनात्मक काम भरपूर, देशात आणि देशाबाहेरही होणाऱ्या सामन्यांकडे त्यांचे लक्ष आणि त्यात सहभागही... शिवाय खेळाच्या प्रसारासाठीची धावपळ.... अखेर बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलात चालू असलेल्या 'महा रोलबॉल लीग' निमित्ताने मी त्यांना गाठलेच. या भेटीनिमित्ताने एका अपरिचित खेळाबद्दल, त्याच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल जवळून जाणून घेता आलं.


आपण जन्माला घातलेला खेळ आता लीग स्वरुपात आल्यामुळे लोकमान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे याचं खूप समाधान वाटतअसेल ना ?

हो, नक्कीच. पण अजूनही अधिकाधिक लोकांनी या खेळाकडे वळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.


तुम्ही स्वतः राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळलेले आहात. शिवाय शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे. या गोष्टी रोलबॉलच्या जन्मामागेकारणीभूत आहेत का ? या खेळाची कल्पना कशी सुचली ?

मी काम करत असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) च्या बालशिक्षण शाळेमधील बास्केटबॉल, हॉकी वगैरे खेळांच्या संघांना झेड.पी. च्या स्पर्धेत तसेच शालेय स्तरांवरील अन्य स्पर्धांसाठी घेऊन जायचो. त्यादरम्यान कुतूहल म्हणून मी त्या त्या खेळांच्या जन्मकथांबद्दल माहिती मिळवायला लागलो आणि एकेक रंजक गोष्ट समजू लागली. अमेरिकेत एक माणूस एक चेंडू टप्पा-टप्पा खेळत असताना त्या चेंडूने उसळी घेतली आणि उंचावरच्या एका रिंग मधून खाली पडला. हे पाहून त्याचं डोकं चालू लागलं. त्याने काही जणांना बोलावून त्या रिंग मधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच बास्केटबॉल हा खेळ उगम पावला. बॅडमिंटनचाही असाच किस्सा. पुण्यामध्ये ड्युटीवर असणारे काही इंग्रज अधिकारी असाच विरंगुळा म्हणून शॅम्पेनच्या बाटलीचे बूच (cork) इकडून तिकडे उडवत होते, मग त्यात अधिकाधिक सुधारणा होत होत त्याचे आज ज्ञात असलेले badminton खेळात रुपांतर झाले. हे सगळं वाचत असताना माझ्याही डोक्यात एक चक्र सुरू होतंच. मी स्वतः स्केटिंगचा खेळाडू असल्यामुळे त्या अनुषंगाने मला हा खेळ सुचला.


बऱ्याचदा गल्लीत/मैदानात खेळता खेळता एकापेक्षा अधिक खेळांचं मिश्रण होऊन त्याला आपल्या पदरचे नियम लावून ते नवे खेळ खेळले जातात(उदा. आम्ही खेळायच्या रिंगने ‘रिंग गोल’ हा खेळ खेळायचो). पण तो खेळ अजून मोठ्या स्तरावर घेऊन जावा असं काही कुणाला सुचत नाही. मग तुम्हाला हा नवा खेळ अधिक गांभीर्याने पुढे घेऊन जावासा का वाटला ?

नवनव्या कल्पना लढवणं, नवा खेळ जन्माला घालणं ही दरवेळी इतर परदेशातल्याच कुणाची मक्तेदारी का असावी ? आपण दरवेळेस त्यांचे खेळ खेळतोच, मग आपण आपला स्वतःचा खेळ पुढे का आणू नये, असं मला वाटायला लागलं आणि आपण रोलबॉल पुढे आणायचा असा विचार करून मी त्याला खतपाणी घालायला सुरुवात केली.


नवीन खेळ इतरांच्या गळी उतरवणे, त्यांना खेळात सहभागी व्हायला उद्युक्त करणे हे कसं केलंत ? त्याची सुरुवात कशी होती ?

आधी आमच्या बालशिक्षण शाळेमध्ये मी ही कल्पना फुलवली. तिथे मुलांचा सराव घेतला. अन्य शाळांच्या क्रीडा शिक्षकांना संपर्क करून त्यांच्यापर्यंत रोलबॉल पोचवायला सुरुवात केली. हळूहळू आंतरशालेय मैत्रीपूर्ण सामने खेळवले. यातूनच रोलबॉचा प्रवास सुरु झाला.


विविध स्केटिंग संघटना आणि प्रशिक्षक यांच्याशी तुम्ही संपर्क केलात का ? त्यांच्याकडून तुम्हाला स्केटिंगचे कौशल्य आत्मसात केले खेळाडूअगदी ‘रेडीमेड’च मिळाले असतील ना ?

नाही. उलट अशा प्रशिक्षकांचा प्रतिसाद अतिशय थंड होता. मी अनेकांना वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे काही स्केटिंगपटू या खेळासाठी मिळावेत अशी विनंती केली. एखाद्या प्रशिक्षकाकडे असलेल्या खेळाडूंपैकी सर्वचजण स्पीड स्केटिंग (स्केटिंगची शर्यत) मध्ये प्रवीण असतील असे नाही. पण असे खेळाडू रोलबॉलसारख्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं आवश्यक असणाऱ्या खेळात चुणूक दाखवू शकतात. “तुमच्याकडे असणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांपैकी २० मुलं आम्हाला रोलबॉलसाठी द्या” अशा अर्थाच्या विनंतीतही फार कमी जणांनी रस दाखवला. त्यापेक्षा त्यांना पैशात जास्त रस ! आपल्या विद्यार्थ्याला आपल्याच परिचयातील क्रीडा साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकाकडे पाठवायचे, तो विद्यार्थी चढ्या भावाने ते विकत घेणार, आणि त्यातला एक हिस्सा त्याच्या प्रशिक्षकाला मिळणार असला प्रकार ....


म्हणजे ही एक प्रकारची ‘कट प्रॅक्टिस’च झाली, वैद्यकीय व्यवसायात चालते तशी ...

हो... माझा पैसा कमावण्याला विरोध विरोध नाही. तुमच्यात खरोखरच एवढे नैपुण्य आहे ना ? मग स्वतःची फी वाजवून घ्या. भले ती इतर प्रशिक्षकांपेक्षा जास्त असेल.... पण तो तुमच्या कौशल्याचा पैसा आहे. कट प्रॅक्टिससारखा छोटा विचार करण्यापेक्षा खेळाचा विचार करावा... असो, यामध्ये मी जास्त लक्ष घालू इच्छित नाही. पैसा हे माझे प्राधान्य नसून रोलबॉल हे आहे... त्याचा प्रसार हाच माझा ध्यास आहे. आपण मूळ विषयाकडे येऊ.


रोलबॉलची प्राथमिक तयारी किती काळ चालली ? तो सर्वांसमोर अधिकृतरित्या कधी आला ?

२००० ते २००२ दरम्यान प्राथमिक तयारी, नियम निश्चिती आणि अन्य तांत्रिक बाबी या गोष्टी पार पाडल्या. फेब्रुवारी २००३ मध्ये तो इथे बालेवाडीतच ‘launch’ करण्यात आला.


रोलबॉलच्या Rollball.org या वेबसाईटवर ‘Collected and compiled technical data and made ready for publication’ असा उल्लेख आहे. हा डेटा नक्की कशा स्वरूपाचा असतो ?

खेळाचे नियम ठरवणे उदा. गोलपोस्ट, ‘D’ची, मैदानाची मापं निश्चित करणे इ. शिवाय हे निश्चित करताना फक्त भारतीय खेळाडूंच्या शारीरिक ठेवणीचा विचार न करता विविध देशांमधील खेळाडूंच्या चणींचाही विचार करून त्याचाही डेटा तयार करावा लागला होता.


नव्या खेळाची नोंदणी करावी लागते का ? ती प्रक्रिया कशी असते याबद्दल कुतूहल आहे

एकदा खेळाचे नियम निश्चित झाल्यावर ती सर्व माहिती Sports Authority of India (SAI) यांना कळवण्यात आली. त्यांच्यासाठी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित केले. त्यांचे संचालक आणि निरीक्षक स्वतः ते पाहण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचे समाधान झाल्यावर मग रोलबॉलला स्वतंत्र खेळ म्हणून मान्यता मिळाली.


भारतातून हा खेळ परदेशात कसा पोहोचवलात ?

आधी खेळाची वेबसाईट बनवून त्यावर खेळाची माहिती, नियम व व्हिडीओज टाकले. विविध देशांच्या क्रीडासंघटनांना email द्वारे संपर्क करून खेळाबद्दल सांगितले आणि वेबसाईट बघायला सांगितले.  त्यांना सतत संपर्क करून खेळासाठी उद्युक्त करत राहिलो.


हे प्रयत्न करताना पाश्चिमात्य देशांकडून “हा भारताचा माणूस आम्हाला काय शिकवणार” असा सूर कधी जाणवला का ?

काही युरोपियन देशांकडून सुरुवातीला असा अनुभव आला. कारण त्यांचा आशियाई देशांकडे बघण्याचा, त्यातही भारतीय उपखंडातील देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सुदैवाने पाकिस्तान, श्रीलंका वगैरे  देशांच्या तुलनेत भारताची प्रतिमा खूपच चांगली असल्याने त्या देशांना थोडं ‘push’ केल्यावर तेही तयार झाले. आज चाळीस देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. या निमित्ताने विविध देशांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.


दक्षिण अमेरिकेसारख्या दूरच्या खंडातही हा खेळ पोचला आहे का ?

हो. गयाना देशाचा प्रतिसाद खूपच चांगला आहे. इतका, की आता तिथल्या संघटकांशी आता मैत्रीच झाली आहे असं म्हणू शकतो. आठवड्यातून दोन वेळा तरी रोलबॉलच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी फोनवरून संभाषण होते.


या सर्व देशांमध्ये तुम्ही प्रवास केलात का ?

हो. त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना भेटणे, त्यांनी गठित केलेल्या संघाला प्राथमिक प्रशिक्षण, त्यांचे निरीक्षण, त्यात सुधारणा सुचवणे ही कामे मी केली.


एवढ्या व्यस्त वेळापत्रकामधून कुटुंबियांना वेळ द्यायला जमते का ? त्यांची तक्रार नसते का ?

मी गेल्या चौदा वर्षात एकाही घरगुती समारंभाला उपस्थित राहिलेलो नाहीये. आजही माझ्या भाच्याचा एक समारंभ आहे आणि मी इथे आहे. सुरुवातीला कुटुंबियांची तक्रार असायची पण आता माझी तळमळ त्यांच्या लक्षात आली आहे.


तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर कधी दौऱ्यावर वगैरे घेऊन जाता का ?

माझं शेड्युल इतकं पॅक असतं की ते शक्यच होत नाही. शिवाय मी एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा मी कुठल्या वेळेस नक्की कुठे असेन हे सांगता येत नाही. ज्याची भेट घ्यायची ते भेटले नाहीत तरी मी संबंधित इतर मंडळींना गाठल्याशिवाय परत येत नाही. माझ्या सॅकमध्ये पाणी आणि फरसाण किंवा तत्सम स्नॅक्स बाळगतोच. मग मला जेवण नाही मिळालं तरी चालतं. माझं तेवढ्यावर भागतं.


अहो, अशाने तब्येतीवर परिणाम होईल तुमच्या ...

(हसत) आता काहीच वाटत नाही. सवय झाली त्याची.


या सगळ्या प्रवासात सरकार आणि क्रीडा संघटना यांचा प्रतिसाद कसा होता. ?

खूपच चांगला.... भारतीय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, सरकार यांचे खूप चांगले प्रोत्साहन मिळाले. वाजपेयी सरकारच्या काळात क्रीडामंत्री विक्रम वर्मा यांचं खूप चांगलं पाठबळ लाभलं.


अजूनही बालशिक्षण शाळेशी मध्ये क्रीडाशिक्षकाचे काम करता का ?

हो. अजूनही माझ्या शाळेतल्या नोकरीची ७ वर्षे शिल्लक आहेत. शाळेने मला केलेलं सहकार्य अनमोल आहे. माझं शाळेशी गहिरं नातं निर्माण झालं आहे. मी शाळा सोडणं शक्य नाही. (हसत....) उद्या शाळा ‘येऊ नका’ म्हणाली तरी मी जात राहीन.


एवढा व्याप, जबाबदाऱ्या आणि खर्च कसं सांभाळता ?

या सर्व कामात मला वसंत राठी, सतीश घारपुरे, सुर्यकांत काकडे, विनीत कुबेर आदींचा खूपच आधार आहे. माझा मी खर्च करण्याचाच प्रयत्न करतो परंतु त्यापुढेही गरज पडल्यास मी यांच्याकडे आर्थिक मदतीची विचारणा करतो. ती तशी करण्याचा अवकाश, मला मदत उपलब्ध करून दिली जाते. शिवाय आता आदेश बांदेकर हे रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष झाल्यापासून त्यांचीही खूपच मदत होते आहे. फक्त शोभेपुरते अध्यक्ष न राहता ते जातीने सर्व गोष्टीत लक्ष घालतात. आता रोलबॉल लीगच्या चारही दिवसात त्यांची रोज भेट असते. प्रेक्षकांमधून सामना कसा दिसतो इथपासून ते सहभागी संघातील खेळाडूंशी संवाद साधण्यापर्यंत सर्व प्रकारे सहभाग घेतात.


आतापर्यत मानसन्मान, पुरस्कार कोणकोणते मिळाले आहेत ?

मान भरपूर मिळाला. अमिताभ बच्चंन यांनी एका चॅनेलवरच्या कार्यक्रमात माझी मुलाखत घेतली, बांग्लादेशमधल्या रोलबॉल वर्ल्डकपच्या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान झाला....  पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं तर क्रीडापुरस्कारांच्या यादीत रोलबॉल खेळाचं नावच समाविष्ट झालेलं नाहीये अजूनपर्यंत, त्यामुळे पुरस्कार मिळालेला नाही.


शेवटचा प्रश्न, रोलबॉल १४ वर्षात ४९० देशांपर्यंत पोचला. इतर देशी खेळांच्या तुलनेत ही खूप मोठी झेप आहे. यामागे काय कारण असावं ?

सतत पाठपुरावा ... काळाला अनुसरून प्रसार व्हायला हवा..... हरिभाऊ सानेंसारख्या महर्षींनी फार आधी सांगितलं होतं की कबड्डी मॅटवर न्यायला हवी, पण ती नेली गेली नाही.. शेवटी जपानने ती मॅटवर नेली तेव्हा आपण जागे झालो. अशा गोष्टींमुळे भारतीय खेळ जास्त दूर पोचू शकले नाहीत. आता एक कबड्डीचे लीग आले आहे, बाकीच्या खेळाचंही येईल ही अपेक्षा.


सरांना अजूनही प्रश्न विचारायचे होते पण ते किती व्यस्त आहेत हे मुलाखती दरम्यानही चालू असणारी कामं, रोलबॉल लीगच्या ठिकाणी ये जा करणारे स्वयंसेवक, संघटक, खेळाडू यांच्याशी चालू असणारा संवाद यातून लक्षात येत होतं. शेवटी त्यांची एक महत्वाची मीटींग सुरु होणार असल्यामुळे मी मुलाखत आवरती घेतली. मुलाखत संपली तेव्हा एका अतिशय जिद्दी आणि समर्पित व्यक्तीला आपण भेटलो आहोत याची पूर्ण जाणीव झाली होती. एका खेळाचा जनक आणि यशस्वी प्रसारक असणारा हा मनुष्य इतका साधासुधा असल्याचं पाहून माझा त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता....



mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/1/roll-ball-king-raju-dabhade-.html