Total Pageviews

Saturday, June 12, 2021

'लिंकन' : गुलामगिरीला मूठमाती देणाऱ्या नेत्याचे डावपेच



 १८६५ साल. अमेरिकन गृहयुद्ध गेली चार वर्षं चालू आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी (ज्यांना कॉन्फेडरेशन स्टेट्स असं संबोधलं जातं, आणि जे  गुलामगिरीचे पाठीराखे आहेत) अमेरिकेन संघराज्यातून फुटून निघून उत्तरेकडच्या राज्यांविरुद्ध आरंभलं आहे. हे युद्ध निग्रोंची गुलामगिरी कायम राहावी की नाही मुद्द्यावरच केंद्रित आहे.. युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे असं वाटतंय, आणि कॉन्फेडरेशन स्टेट्स पराभूत होतील अशी लक्षणं आहेत, पण अजून युद्धाचा शेवट झालेला नाही. तसं पाहता लिंकननी युद्धाच्या धामधुमीत दीड वर्षांपूर्वीच Emancipation Proclamation (म्हणजेच (गुलामांच्या) मुक्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर ते दुसऱ्यांदा निवडणूक अध्यक्षपदी निवडूनही आलेले आहेत, याअर्थी त्यांच्या या भूमिकेला अनेकांचा पाठिंबाही आहे. पण... 


पण गुलामांच्या मुक्तीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत, ज्यांबद्दल लिंकनना काळजी वाटते. 


मुक्तीची घोषणा एकप्रकारे अध्यादेशासारखी आहे. ती न्यायालयाकडून रद्द होऊ शकते. त्यामुळे तसा कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठी थेट घटनादुरुस्तीच व्हायला हवी. त्यासाठी २/३ संख्याबळ असणे तर आवश्यक आहेच, पण वेळ हाही मोठा फॅक्टर आहे. आज ना उद्या युद्ध संपले की कॉन्फेडरेशन स्टेट्सना पुन्हा संघराज्यात सामावून घेण्याबाबतही लिंकनच्या मनात स्पष्टता आहे. पण ती राज्यं आल्यावर ती हमखास विधेयकाला संसदेत विरोध करणार आणि २/३ बहुमत हे मृगळजळच ठरणार. त्यामुळे आहे संसदेची जी स्थिती आहे त्यातच विधेयक पारित करून घेण्याची घाई करावी लागणार आहे. 

 

संसदेत डेमोक्रॅट्सचे गुलामगिरीला उन्मत्त समर्थन आहे आहेत. तर दुसरीकडे रिपब्लिकन्समध्ये दोन गट आहेत. सगळे रिपब्लिकन्स गुलामगिरीच्या विरोधात भूमिका घेण्याप्रत अजून आलेले नाहीत, विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यातील रिपब्लिकन्सचा पाठिंबा मिळेल याची आज शाश्वती नाहीये. पण रॅडिकल रिपब्लिकन्स मात्र आज आत्ता ताबडतोब कायदा होऊन गुलामगिरी नष्ट व्हायला हवी या मानसिकतेचे आहेत आणि त्यांचा युद्ध लवकर संपवण्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्यास प्रखर विरोध आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा संस्थापक ब्लेअर याची मदत लिंकनना हवी आहे, पण ब्लेअरची दोन मुले युद्धात लढत असल्याने त्यांचा जीव जाण्याआधी त्याला युद्ध संपवणे आणि त्याच्यासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्याची आवश्यकता आहे, हे तो लिंकनच्या गळी उतवरतो आहे.  


वैयक्तिक पातळीवरही लिंकन पेचात आहेत. त्यांचा धाकटा मुलगा स्वतःची वेगळी ओळख शोधू पाहतो आहे, म्हणून त्याला सैन्यात भरती होऊन मानाने मिरवायचं आहे, पण वडील तसे होऊ देत नसल्याने पित्याबद्दल त्याच्या मनात कडवटपणा आला आहे आणि दोघांचे संबंध मधुर राहिलेले नाहीत. त्याउलट लिंकनची बायको "या जीवघेण्या युद्धात मुलाचा मृत्यू होईल" या भीतीने लिंकनना मुलाला सैन्यात भरती कारण्याबाबत कडाक्याचा विरोध करते आहे आणि तो सैन्यात जाणारच हे कळल्यावर तिने "काहीही करून युद्ध लवकर संपुष्टात यायला हवं" अशी लिंकनना जवळपास धमकीच दिली आहे...


एवढ्या सगळ्या पेचप्रसंगातून लिंकननी कुशलतेने मार्ग कसा काढला याचे चित्रण हा चित्रपट करतो. लिंकनचे हळवे मन, गुलामांप्रति असणारी त्यांची सहृदयता याबद्दल कुठेही फार मोठी डायलॉगबाजी चित्रपटात नाही. पण वेळ आल्यानंतर अगदी मोजके संवाद आणि ठाम स्वर यातून लिंकनची हा प्रश्न सोडवण्यासाठी असणारी कटिबद्धता स्पष्टपणे दिसून येते. 


संसदेतले काही सदस्य पुन्हा निवडून येऊ न शकल्याने संसदेबाहेर पडणार आहेत (आपल्यासारखं निवडणुकीचे निकाल लागले की की जुने बाहेर आणि नवे आत अशी एकदमच प्रक्रिया होत नाही बहुतेक इकडे. याबद्दल अधिक वाचायला हवं). अशांचा पाठिंबा मिळवणं तसं कठीणच (आपल्या इथे नोटीस पिरियडमध्ये असणाऱ्या नोकरदाराकडून मॅनेजरने हवं ते काम करवून घेण्याइतकंच अवघड काम होतं हे... ). मग अशावेळी लिंकन त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा मार्ग अवलंबतात. हा तसा ग्रे एरिया होता. म्हणजे मतांसाठी लाच देणे, इतका हा थेट भ्रष्टाचार नाही. पण संसदेबाहेर जाणाऱ्यांना (ज्यांना 'लेम डक' अशी संज्ञा वापरतात) भविष्यात नोकरीधंद्याची गरज पडणार, हे ओळखून आपल्या राजवटीत नव्याने निर्माण होऊ घेतलेल्या नोकरीच्या संधी त्यांना मिळू शकतील याबद्दल आश्वस्त करण्याचं लिंकन (अप्रत्यक्षपणे) करतात. पण हे सगळं ते करतात ते 'ग्रेटर गुड'साठीच..  मोठ्या माणसाच्या शुभ्र नसणाऱ्या अशा बाजूचे चित्रीकरण आपल्या इथे कधी होऊ शकेल? चित्रपट पाहताना आणखी एक विचार मनात आला. अमेरिकेत आफ्रिकन्सना निग्रो म्हणणं आता निषिद्ध आहे. पण याचे चित्रीकरण दीडशे वर्ष जुन्या काळाचं असल्याने तेव्हा प्रचलित असलेला 'निग्रो' हा शब्द त्यांनी जसाच्या तसा चित्रपटात वापरला आहे. आपल्या इथे असं त्या काळाशी प्रामाणिक राहणारं काही चित्रित झालं तर ते ज्ञातीसंघटना, त्यांना पाठीशी घालणारे राजकीय पक्ष ते समजून घेतील?


विधेयक संसदेत मांडल्यावर संसदेतली वादळी भाषणं पाहताना थरारून जायला होतं. वाईट आणि चांगल्या, दोन्ही अर्थाने. गुलाम बाळगणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा तोऱ्यात गुलामगिरीचे नि:संकोचपणे समर्थन करणारे सिनेटर, "आज हे केलं तर उद्या तुम्ही निग्रोंना मतदानाचा अधिकारही द्याल!" असं म्हणतात तेव्हा हतबुद्ध व्हायला होतं. दुसरीकडे गुलामगिरीचा प्रखर विरोधक असणारे सिनेटर स्टीव्हन्स असतात. गोरे आणि काळे यांच्यात वांशिक समानताही आहे अशी टोकाची वाटेलशी भूमिका जपलेले स्टीव्हन्स संसदेत बोलायला उभे राहतात तेव्हा मात्र आपल्या भूमिकेमुळे अधिक गोंधळ उडून विधेयकाच्या भवितव्यावर गदा येईल हे जाणून आपली भूमिका मवाळ करत, "काळे आणि गोरे वांशिक समानता नसून ए असं मी मानत नाही, पण त्यांच्यातली कायदेशीर समानतेचा मी पुरस्कर्ता आहे" असं सांगतात, तेव्हा त्यांचं आपल्याला कौतुक वाटतं. अगदी विधेयकावरच्या मतदानाच्या क्षणापर्यंत चलबिचल होणारे सिनेटर्स पाहून आज ऑब्व्हिअसली मानवतावादी वाटणारी भूमिका त्या काळी घेणं किती अवघड होतं हे जाणवतं. 

 

लिंकन आपल्या हजरजबाबी स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते. चित्रपटातही त्यांचा मिश्किल स्वभाव दाखवणारे प्रसंग खुबीने पेरले आहेत. तणावाच्या वेळी एखादा किस्सा सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्या संवादपटुत्वाची चुणूक दाखवून जाते. चित्रपट पाहताना आवश्यक त्या सर्व ठिकाणी लिंकननी संवादाचे दरवाजे मोकळे ठेवल्याचं दिसून येतं. अगदी घटनादुरुस्ती नंतरही कॉन्फेडरेशन स्टेट्सशी लढत राहण्यापेक्षा त्यांना संघराज्यात यायची आणि त्याबद्दल चर्चेची ऑफरही लिंकन देतात आणि तशी चर्चाही करतात. यातून आणि मृत्यूदंडाच्या दयेच्या अर्जावर विचार करण्याच्या प्रसंगातून आणखी कुणाला तरी धडा शिकवावा म्हणून मुडदे पाडण्यात लिंकनना अजिबात रस नसल्याचंही आपल्या मनावर ठसत जातं. लोकशाहीवर असणारी त्यांची निष्ठा लोभसवाणी वाटते. शक्य तितकं  सामोपचाराने घेणं, आपले सहकारी उगाच फार फाटे फोडत आहेत असं वाटल्यावर त्यांना एक राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःच्या हाती असलेल्या प्रचंड अधिकारांची आठवण करून देणं, या गोष्टींमुळे या लिंकन पात्राचं चित्रपटातलं  संतुलन व्यवस्थित राखलं गेलं आहे. 


डॅनियल डे-लुईसला मेकप कमाल भारी केलाय. खुद्द लिंकनच पडद्यावर अवतरलेत असं वाटतं. फक्त या भूमिकेसाठी दमदार आवाजाच्या अपेक्षेत मी होतो आणि प्रत्यक्षात त्याचा एकदम पातळ आवाज ऐकून नाही म्हटलं तरी निराशा झाली. पण त्याने काम मात्र छानच केलं आहे. वि. ग. कानिटकर यांनी 'फाळणी टाळणारा महापुरुष' असे ज्यांचे वर्णन केले आहे त्या लिंकन यांच्या शेवटच्या काळावरचा हा चित्रपट नक्की पहा (आणि हो, चित्रपट सुरु करण्याआधी गृहपाठ जरूर करा, नाहीतर अनेक गोष्टींचे संदर्भ लागणं कठीण जातं!)


टीप : चित्रपट 'सोनी लिव्ह'वर उपलब्ध आहे. 


(छायाचित्र सौजन्य : https://wallpapercave.com)

डिव्हाईन जस्टिस : एका कार्यकर्त्याच्या जडणघडणीचा प्रवास



शिक्षण, नोकरी, लग्न, निवृत्ती हे सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यातले ढोबळ टप्पे असतात. काही जणांना मात्र चाकोरीबाहेर पडून वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा मिळते आणि वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही त्यांचा प्रवास ते थांबवत नाहीत. अशाच वेगळ्या वाटेने जाणाऱ्या उमाकांत मिटकर या मुशाफिराचे आत्मकथन 'डिव्हाईन जस्टिस' वाचकाला आपल्या जवळ असूनही आपले लक्ष जाणाऱ्या भवतालाची ओळख करून देते.

उमाकांत मूळचे मराठवाड्यातल्या एका शिक्षकाच्या कुटुंबातले कुटुंबातले आणि त्याला अनुसरूनच त्यांचे बालपण होते. महाविद्यालयात मात्र संभाजी ब्रिगेडशी संबंध आला आणि ब्राह्मणद्वेष, हिंदुधर्मद्वेष मनामध्ये भरला जाऊन घरातले देवसुद्धा काढण्यापर्यंत मजल गेली. सुदैवाने काही काळाने महाविद्यालयातच एन. सी. सी. शी संबंध आल्यामुळे ब्रिगेडचा विखार मागे सरून राष्ट्रीय विचार अंकुरित व्हायला मदत झाली. परंतु आईचा विरोध असल्याने सैन्यात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला. पदवीधर झाल्यानंतर काही कारणाने एम. . पूर्ण झाले नाही. पुढे काय करावे हे निश्चित नव्हते, अशा परिस्थितीत एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे संघविचारांच्या कार्यकर्त्यांचा परिचय झाला. त्यातूनच हळूहळू ब्रिगेडी विचारांना कायमची तिलांजली मिळायला मदत झाली.

यमगरवाडीच्या भटके विमुक्त प्रकल्पाच्या एकलव्य विद्यालयात शिकवणारे अनिल घुगे उमाकांत यांच्या भावाच्या भेटीसाठी घरी येत असत. संघ स्वयंसेवकाच्या सहज स्वभावाला अनुसरून अनिल घुगे उमाकांत यांच्याशी सहज संपर्क ठेवत राहिले, विचारपूस करत राहिले आणि परिचयाचे रूपांतर आपोआप मैत्रीमध्ये झाले. त्यांच्यासोबत आणखीही कार्यकर्त्यांचा घरी राबता सुरु झाला, चर्चा झडू लागल्या. यमगरवाडी प्रकल्पाबद्दल माहिती मिळू लागली.  उमाकांत यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे कुतूहलही वाढू लागले. एके दिवशी अनिल घुगे यांनी "यमगरवाडीतल्या आठवी ते दहावीच्या वर्गांवर शिक्षकाची आवश्यकता आहे.” असे सांगितले. 'सध्या सरकारी मान्यता मिळालेल्या या इयत्तांना कालांतराने मान्यता मिळेल आणि शिक्षकाची जागा नियमित होऊन नोकरीचा प्रश्न सुटेल' अशी उमाकांत यांची माफक अपेक्षा  होती, परंतु  जेव्हा अधिक तपशील कळले तेव्हा मात्र ही नोकरी सध्या बिनपगारी नोकरी असल्याचे कळले. असे असूनही हा वेगळा अनुभव घेऊन बघावा असे उमाकांतना वाटले हे विशेष. इथूनच त्यांच्या आयुष्यातले एक नवे पर्व सुरु झाले.

यमगरवाडीमध्ये भटक्या विमुक्त मुलांच्या सवयी, आहार आणि एकूणच जगणे जेव्हा दृष्टीस पडले तेव्हा उमाकांत हादरून गेले. आपण त्यांच्या आयुष्याबद्दल किती अनभिज्ञ आहोत याची जाणीव झाली. उमाकांत कामात गुंतत गेले तसतश्या भटके विमुक्तांच्या समस्या त्यांच्या ध्यानात येऊ लागल्या. उदरनिर्वाहाच्या अडचणी, स्वतःचे घर नसणे, कुठलीही कागदपत्रे नसणे, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, पोलिसी अत्याचार अशी समस्यांची संपणारी यादी होती. यावर उत्तर शोधायचं तर काठावरून पाहता प्रवाहात उडी मारायला हवी होती. याच विचारातून यमगरवाडी प्रकल्पातून काही कार्यकर्ते 'पालावरची शाळा' ही संकल्पना घेऊन निघाले. इमारत, गणवेश, वह्या-पुस्तके यातले काहीच नसणारी ही शाळा असणार होती. एकेकाला एकेका समाजाच्या पालांवर जाऊन त्यांच्यात मिसळून काम करायचे होते.

उमाकांत उमरग्याजवळच्या मसणजोगी समाजाच्या पालावर पोहोचले. प्रचंड घाण, डुकरांचा मुक्त वावर, भीक मागून पोटापुरते अन्न मिळवून गुजराण करणारे लोक असे प्रगतीच्या कुठल्याही पाऊलखुणा नसणारे त्या वस्तीचे स्वरूप होते. अशा ठिकाणी तिथल्या एका व्यक्तीची ओळख काढून गेले तरीही संपूर्ण वस्तीशी संपर्क कसा करावा, संबंध वाढवावेत कसे हा प्रश्नच होता. वस्तीतल्या पत्र्याच्या शेडमधला उकिरडा साफ करून तिथेच मुक्काम ठोकला. लोक व्यवस्थित बोलायचे पण कार्य उभे करण्याच्या दृष्टीने प्रतिसाद शून्यविचित्र अवघडलेपण आलेवाट दिसेना खिशात पैसे नसल्याने जेवणही दुरापास्त होते. तशात दिवाळी आली. पण पालावर दिवाळी वगैरे काहीच नसायचे. मन घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. उमाकांतबद्दल आपुलकी असणाऱ्या वस्तीवरच्या एकाने भीक मागून आणलेल्या भाकरीचे तुकडे आणि घरात बनवलेले डुकराचे मटण आणून दिले. आता समोर दुसरा काहीही पर्याय नव्हता. माळकरी कुटुंबातल्या उमाकांतनी त्या दिवशी थेट डुक्कर खाल्ले. खाताना ब्रह्मांड आठवले खरे, पण भूक शांत झाली. त्या दिवशीपासून मात्र संपूर्ण वस्तीचा त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. उमाकांत आणि मसणजोगी यांच्यातली अदृश्य भिंत ढासळू लागली. त्यानंतर उमाकांत यांनी अनेक बदलांची सुरुवात करून दिली. मुलांसाठी शाखा लावून संस्कार रुजवायला सुरुवात केली. स्वच्छतेचे महत्व रुजवले. जन्मदाखला, रहिवास प्रमाणपत्र अशी कागदपत्रे मिळवून द्यायला सुरुवात केली. वीज, बोअरवेल यांची सोय होण्यासाठी खटपट केली. पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालांसोबत उमाकांतसुद्धा जात राहिले आणि पालावरच्या शाळेचे कार्य वृद्धिंगत केले.

 

संघ परिवारातल्या संस्थेचा अनुभव घेतल्यानंतर उमाकांत यांच्याकडे संघाचा प्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपवली गेली. या सगळ्यांमधून त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला पैलू पडत गेले. समाजाचे आकलन अधिकाधिक विस्तारत गेले. संघकामावरची निष्ठा अधिक दृढ झाली. दरम्यानच्या काळात पुण्याच्या स्पायसर कॉलेजमधून बी. एड. केल्यानंतर तिथेच चालून आलेली उत्तम पगाराची नोकरी सोडतानाही मनाची चलबिचल झाली नाही.  त्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा यमगरवाडीमधलीच शिक्षण समन्वयाची जबाबदारी आली. त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम प्रयोग करता आले. समाजातल्या मोठ्या वर्गामध्ये यमगरवाडी, संघ यांच्याबद्दल आपुलकी आणि अनुकूलता निर्माण झाली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग यमगरवाडीची सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी उपयोग झाला. उमाकांत यांच्या कामाचा आवाका वाढत वाढत एके दिवशी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पोलिस न्याय प्राधिकरणाचा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली!

 

उमाकांत मिटकर यांचा भटक्यांच्या बकाल पालापासून मुंबईच्या चकाचक कार्यालयात रुजू होईपर्यंतचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. सोपवलेली जबाबदारी कुठलीही असली तरी ती मनापासून पार पाडणे, कामामधली कल्पकता, संघावरची निष्ठा हे उमाकांत यांचे गुण पुस्तकामधून जसे जाणवतात, तसेच त्यांना योग्य वेळी आधार देणाऱ्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणाऱ्या संघकार्यकर्त्यांची वैशिष्ट्येही दिसून येतात. कुठलीही विशेष पार्श्वभूमी नसतानाही उत्तम कार्यकर्ता घडण्यासाठी 'आहे तसा मिळवा आणि हवा तसा घडवा' हा संघमंत्र कारणीभूत ठरला. मनोबल टिकून ठेवण्यासाठी, मनातल्या शंका दूर होण्यासाठी उमाकांत यांच्याशी यमगरवाडीतले अनिल घुगे, गिरीश प्रभुणे आणि इतर अनुभवी कार्यकर्ते आवर्जून चर्चा, संवाद करत राहिले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून आणि त्यांच्या वागण्याबोलण्याच्या निरीक्षणातूनही संघसंस्कार नकळतपणे कसे रुजत जातात हे उमाकांत यांनी आवर्जून नमूद केले आहे.

 

पुस्तकातले काही प्रसंग विशेष उल्लेखनीय आहेत. धर्माबाद तालुका प्रचारक म्हणून काम करत असताना उमाकांत यांनी अन्य संघ यंत्रणेच्या सहकार्याने तिथल्या दलितांना मंदिर प्रवेश मिळवून देण्याच्या घटनेबद्दल पुस्तकातच तपशीलाने वाचायला हवे.  कुठलाही भडकपणा करता काढता सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने एका गंभीर सामाजिक समस्येची उकल करून समरसता कशी साधली जाऊ शकते केली याचे हे उत्तम उदाहरण आहे.  शुद्ध सात्विक प्रेमामधून किती शाश्वत कार्य उभं राहू शकतं याची प्रचिती देणारे उमाकांत याचे अनेक अनुभव हृद्य आहेत. ॲट्रॉसिटीच्या खोट्या खटल्यात अडकवले गेले असताना छळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याशी काही वर्षांनी अगदी वेगळ्या परिस्थितीत झालेली भेट हा प्रसंग तर चित्रपटात शोभावा असा आहे. उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात उमाकांत यांनी घेतलेल्या अनुभवांचा पट खूपच विस्तृत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे अनुभव शब्दबद्ध करण्याची वाट पाहता कमी वयातच आपले अनुभव शब्दबद्ध करण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यातून तरुण वयातल्या व्यक्तींना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. पत्रकार दत्ता जोशी यांनी उमाकांत मिटकर यांच्या अनुभवांचे शब्दांकन संपादन नेमकेपणाने केल्यामुळे एक नेटके स्फूर्तिदायी पुस्तक वाचल्याचा अनुभव वाचकांना निश्चितपणे येईल.

 

               

डिव्हाईन जस्टिस

लेखक : दत्ता जोशी

प्रकाशक : कॅटालिस्ट

पृष्ठसंख्या : २२४

किंमत : ३०० रु.

पुस्तकासाठी संपर्क : मनोजकुमार जाधव - ९४२३७ ०३४३४

(या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम वात्सल्य सामाजिक संस्थेस निधी म्हणून समर्पित केली जाईल)


पूर्वप्रसिद्धी : 'मुंबई तरुण भारत', २९ मे २०२१ 
https://www.mahamtb.com//Encyc/2021/5/29/Book-Review-of-Divine-Justice.html