Total Pageviews

Saturday, March 20, 2021

Railways and The Raj : भारताच्या धमन्यांचा इतिहास

 


 



भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार चालवणं खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम आहे.  अठरापगड जाती, धर्म, भाषा, प्रांत आणि त्या त्या प्रदेशाचे सांस्कृतिक कंगोरे यांच्यासोबत व्यवस्था, नियम, कायदे यांची सांगड घालूनच आपल्या देशाचा गाडा हाकावा लागतो. भारताला प्रशासकीय पातळीवर जोडून ठेवणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांमध्ये चट्कन लक्षात येणार नाही असा परंतु प्रत्यक्षात महत्वाचा वाटा असणारी गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वे. इंग्रजांनी आपल्या कारभाराच्या सोयीसाठी उभे करत गेलेली ही यंत्रणा बघता बघता देशव्यापी झाली आणि भारताच्या प्रगतीची साक्षीदार आणि भागीदार दोन्हीही बनली. या सेवेने देशाची सुदूर टोकं एकत्र आणली. ते घडत असताना इथला समाज, इथल्या व्यवस्था ढवळून निघत गेल्या . सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक ताण्याबाण्यांनी बनलेली भारतीय रेल्वेची कहाणी अतिशय चित्तवेधक आहे आणि ‘ख्रिश्चन वूल्मर’लिखित ‘रेल्वेज अंड द राज’ या पुस्तकातून ती विलक्षण तपशिलांसह मांडली गेली आहे. 


इंग्रजांसाठी अत्यावश्यक सोय

१६०० साली ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात पाऊल ठेवलेल्या इंग्रजांनी धूर्तपणे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली  मुळं रोवत भारताला इंग्रजांची वसाहत बनवलं. १८५७ साली अनपेक्षितपणे इंग्रजांविरोधात उभा राहिलेला स्वातंत्र्यलढा त्यांनी निकराने मोडून काढला असला तरी या घटनेचे इंग्रज अतिशय सावध झाले. यापुढे आपल्याला भारतावर राज्य करायचं असेल तर अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याच बरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने भारताची पकड अधिक तीव्रतेने आणि वेगाने मजबूत करायला हवी याची त्यांना जाणीव झाली. भारताचा ताबा कंपनीकडून अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे गेला. पुन्हा बंडाची परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी अतिशय वेगाने सैन्य पाठवण्यासाठी दळणवळणाच्या वेगवान सोयींची आवश्यकता होती. त्याचसोबत  भारतातल्या अंतर्गत भागांमधला कच्चा बंदरांपर्यंत पोचवणे इंग्रजांच्या व्यापाराच्या आक्रमक वाढीसाठीही आवश्यक होते. या दोन्ही उद्देशांची पूर्तता करण्याचं अतिशय प्रभावी माध्यम होतं ते म्हणजे रेल्वे!  

भारतात रेल्वेची झपाट्याने वाढ होण्याचं श्रेय जातं लॉर्ड डलहौसीला. त्याने अतिशय निग्रहपूर्वक आणि दूरदृष्टीने रेल्वे उभारणी आणि विस्ताराचं काम लावून धरलं. भारतात रेल्वे सुरू होण्यापूर्वी वीस वर्ष अगोदरच इंग्लंड मध्ये रेल्वे सेवेला प्रारंभ झाला होता. त्यामुळे या क्षेत्रात अनुभव असलेल्या रेल्वे कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी इंग्रज प्रस्ताव ठेवू लागले. त्यांच्या आवाहनामुळे विविध खासगी रेल्वे कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करण्यास सज्ज होऊ लागल्या. ज्या काळात इंग्लंडमध्ये गुंतवणुकीवरचा व्याजदर ३.५ टक्के होता त्या काळी या इंग्रज सरकारने रेल्वे कंपन्यांना ५% परताव्याची हमी दिल्याने या प्रकल्पांमध्ये गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर झाली आणि धुमधडाक्यात रेल्वेमार्ग उभारणी सुरू झाली. रेल्वे ही भारतीयांसाठी प्रचंड अप्रूपाची गोष्ट होती बोरीबंदर स्टेशन वरून ठाण्याकडे धावलेली पहिली रेल्वे म्हणजे भारतात या तांत्रिक प्रगतीचा एक विलक्षण टप्पा होती स्वतःच्या कारभारासाठी रेल्वे बांधणारे इंग्रज इथल्या  जनतेकडून या गोष्टीला कितपत पाठिंबा मिळेल याबाबत साशंक होते परंतु इंग्रजांची ही भीती एतद्देशीय बघता बघता मोडून काढली आणि फक्त टांगे, बैलगाड्या यांचीच सवय असणाऱ्या भारतीयांनी या वेगवान वाहतुकीला तिच्या गुणदोषांसहित आपलेसे केले आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे हुरूप येऊन इंग्रजांनी रेल्वेमार्गांचे वायव्य सरहद्दीपासून ते ईशान्य भारतापर्यंत आणि दिल्लीपासून ते मद्रासपर्यंत जाळं विस्तारत नेलं. हळूहळू या मार्गांना इतकं महत्व आलं की जणू हे रेल्वेमार्ग आपल्या देशाच्या धमन्याच बनले.  

 

अडथळ्यांवर मात

भारतासारख्या प्रचंड भौगोलिक वैविध्य असणाऱ्या देशांमध्ये रेल्वे लाईन टाकण्यासाठी भरपूर अभ्यास आणि तांत्रिक अचूकतेची आवश्यकता होती. मोठमोठ्या नद्या, डोंगराळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, बदलत जाणारं तापमान या सर्व अडचणींमधून मधून मार्ग काढणं जिकिरीचं होतं. गंगेसारख्या प्रचंड जलस्त्रोतावरून पूल बांधणे, बोर घाटासारख्या कठीण घाटातलम जंगल साफ करणे आणि बोगदे खणणे अशी आव्हानं इंग्लंडमधून खास बोलवल्या गेलेल्या इंजिनिअर्सनी स्वीकारली. या कामासाठी इंग्रजांनी केलेली तयारी थक्क करणारी आहे. इंग्रज आणि भारतीयांदरम्यान प्रचंड भाषिक, सांस्कृतिक दरी असतानाही इथल्या कामगार आणि कारागीरांकडून कामं करून घेण्यासाठी त्यांनी कुठलं कसब वापरलं असेल हे अभ्यासलं जायला हवं. 

 

रेल्वेचे सामाजिक परिणाम

रेल्वेमुळे झालेले अनेक पदरी सामाजिक परिणाम लेखक वूल्मर यांनी तपशिलाने आपल्यासमोर मांडले आहेत आणि हाच या पुस्तकातला सर्वात लक्षवेधी भाग आहे. रेल्वेने जसं स्थानिक कच्चा माल बाहेरच्या बाजारपेठांमध्ये नेणं शक्य केलं तसंच कुठलाही माल कुठेही मिळू लागल्यामुळे त्या त्या गावच्या आर्थिक स्वावलंबीत्वाला सुरुंगही लागला. रेल्वेमुळे तीर्थाटन सोपं झालं. आता जीवावर उदार होऊन जंगल आणि काट्याकुट्यांमधून प्रवास करायची गरज उरली नाही. शिवाय प्रमुख सणवारांशिवाय देखील तीर्थयात्रा घडू लागल्या आणि त्या त्या तीर्थक्षेत्रीचं स्वतंत्र अर्थकारण आकाराला येऊ लागलं जे अगदी आजपर्यंत चालू आहे. 

जसजशी रेल्वे भारतातल्या अंतर्गत भागांमध्ये येऊ लागली तसतशी इंग्रजांची पकड घट्ट झाली आणि स्थानिकांना ‘इंग्रज आपल्या धर्मात ढवळाढवळ करून त्यांचा धर्म आपल्यावर लादतील अशी भीती वाटू लागली. शिवाय एकाच गाडीच्या एकाच डब्यातून परजातीच्या माणसांसोबत प्रवास करण्यामुळे आपली जात भ्रष्ट होत असल्याची भावनाही होऊ लागली.. रेल्वेच्या डब्यात जातीय उच्च्चनीतेनुसार वेगळी व्यवस्था करणे त्यात पुन्हा स्त्रियांच्यासाठी वेगळी व्यवस्था करणे अशा अनेक अवास्तव अपेक्षा प्रवाश्यांकडून असत ज्या पुरवताना रेल्वे कंपन्यांची मोठी पंचाईत होई…  सामाजिक जीवनातल्या जुन्यापुरण्या धारणा, धार्मिक समजुती आणि जातीय संकल्पना या सर्वांना घुसळून काढणारा हा एक विलक्षण बदल होता आणि तो रोखणे कुणालाही शक्य नव्हतं. भारत हळूहळू पण निश्चितपणे अधिक प्रगत व्यवस्थेकडे वाटचाल करू लागला होता. 

 रेल्वेचा अनेक अंगांनी वेध

पुस्तकामध्ये रेल्वेच्या इतिहासाचा आढावा घेताना रेल्वे संबंधी अनेक अंगांचा बारकाईने ऊहापोह केला आहे रेल्वे वाहतुकीसाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी, मार्गांची आखणी, तांत्रिक सहाय्य, परदेशातून आयात केले गेलेले तंत्रज्ञान, त्यासाठी इंग्रज सरकारकडून केली गेलेली आर्थिक तजवीज, रेल्वेच्या आर्थिक व्यवहारा मागचं राजकारण आणि अर्थकारण, मालवाहतूक, सैन्याची वाहतूक अशा अनेक अंगांचे पैलू अगदी विस्ताराने मांडले आहेत. रेल्वेमुळे उपलब्ध होत असलेले रोजगार, कामगारांच्या युनियन्स आणि त्यांचे संप, कामाच्या स्वरूपानुसार असणारी उतरंड आणि त्यामुळे तयार झालेले वर्ग अशा अनेक अपरिचित अंगांना स्पर्श केल्यामुळे रेल्वे नावच्या अवाढव्य सेवेला वरवर लक्षातही येणार नाही किती बारीक कंगोरे आहेत हे जाणवल्यावर अचंबित व्हायला होतं. 

लेखक केवळ घटना नमूद न करता त्या त्या घटनांमुळे मनुष्यजीवनावर काय बरेवाईट परिणाम झाले हे शोधत गेल्याने असल्यामुळे त्याच्या लिखाण कोरडं रहात नाही. तिसऱ्या वर्गातून प्रवास करणाऱ्या अतिशय सामान्य आणि गरीब नागरिकांच्या प्रचंड गैरसोयीबद्दल त्याने अतिशय विस्ताराने लिहिलं आहे. अगदी तिसरा वर्ग सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत असूनही तिसऱ्या वर्गाच्या डब्यात स्वच्छतागृहं, पुरेशी मोकळी जागा पुरवण्यात रेल्वे कंपन्यांनी केलेली टाळाटाळ, त्यातून प्रवाशांचे होणारे हाल आणि ग्राहक असूनही त्यांच्याकडे बघण्याचा कंपन्या आणि सरकारचा दृष्टीकोन दाखवून देऊन प्रगत, विचारी आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या तुच्छतावादी मानसिकतेबद्दल लेखकाने आडपडदा न ठेवता लिहिलं आहे.


मनोरंजक किश्श्यांची जोड  

पुस्तकात आकडेवारी, रेल्वेचे व्यावसायिक तपशील अशी माहिती अतिशय सविस्तर असूनही त्या तांत्रिक बाबींना किश्श्यांची जोड दिल्यामुळे पुस्तक रुक्ष राहात नाही, शिवाय तात्कालिक समाजाची मानसिकता, समजुती यांवरही प्रकाश पडतो. 

उदाहरणार्थ : 

पहिली रेल्वे धावण्यापूर्वी grant trunk road या रस्त्यावरून वाफेचं रेल्वे इंजिन चालवण्याचा अयशस्वी प्रयोग करून पाहिला गेला होता.  

इंग्रजांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून उन्हाळ्यात ते सगळा कारभार हिल स्टेशनला हलवत असत आणि त्यांची व बायकामुलांची सोय व्हावी म्हणून सिमला, उटी, दार्जीलिंग या ठिकाणच्या toy trains चालू केल्या गेल्या

बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान पहिली रेल्वे धावली त्या वेळी ‘रेल्वे म्हणजे लोखंडी राक्षस आहे’, ‘रूळ टाकण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही बालकांचा बळी देऊन ती त्या मार्गावर पुरावी लागतात’, ‘रेल्वेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चटकन गेल्यामुळे आपला एकूणच आयुष्याचा विस्तार कमी होतो’ अशा समजुती स्थानिक समाजमनात रुजल्या होत्या इ. 


नाण्याच्या दोन्ही बाजूंची चर्चा

 रेल्वेच्या या सखोल इतिहासाची चर्चा करताना इंग्रजी मानसिकतेच्या गुण दोषांची अतिशय तटस्थ वृत्तीने मांडणी केली आहे. रेल्वे म्हणजे इंग्रजांसाठी एक दुधारी शस्त्र होतं असंही प्रतिपादन लेखक करतो. कारण एकाच वेळी इंग्रज आणि क्रांतिकारक व राष्ट्रवादी या दोन्ही टोकांना रेल्वे उपयुक्त ठरली. त्यामुळेच एकीकडे एवढा अवाढव्य पसारा कुशलपणे हाताळून मार्गी लावणाऱ्या दऱ्याखोऱ्यातून हिल स्टेशन मधून आणि वाळवंटातून रेल्वे मार्ग बांधणाऱ्या एकीकडे कौतुक वाटतं तर त्याचबरोबर मागे असणारे त्यांचे अतिशय धूर्त, स्वार्थी आणि भारतीयांप्रती असणारे तुच्छ विचार देखील आपल्याला दिसतात. आधुनिक विचारांचे समजले गेलेल्या परंतु प्रत्यक्षात ‘स्थानिकांना जास्त जबाबदारीची कामं (उदा. इंजिन चालक) देऊ नयेत कारण त्यांची तेवढी कुवतच नाही’ अशी ठाम समजूत असणाऱ्या इंग्रजांपासूनच हा श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदाभेद कसा केला जायचा हे लेखक परखडपणे सांगतो.

लेखक ख्रिश्चन वूल्मर हे रेल्वेचे इतिहासकार म्हणूनच प्रसिद्ध असून यापूर्वी त्यांनी इंग्लंड व अन्य ठिकाणच्या रेल्वेचा इतिहास शब्दबद्ध केलेला आहे. या पुस्तकात भारताच्या पहिल्या रेल्वेच्या आधीपासून ते कोकण रेल्वेच्या बांधकामापर्यंत अतिशय मोठा कालखंड आणि कार्यखंड लेखकाने अभ्यासला आहे. त्यासाठी त्यांनी इंग्रजांचा पत्रव्यवहार, गॅझेटियर्स, प्रवासवर्णनं असे अनेक समकालीन संदर्भ, तसेच भारतीय रेल्वेवरील अन्य लेखकांची पुस्तकं यांचा भरपूर अभ्यास केला आहे. भारताकडे पाहणाच्या सर्वसाधारण युरोपीय मनोवृत्तीपेक्षा वूल्मर यांचा भारताकडे पाहण्याचा अधिक समंजस आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन पुस्तकभर जाणवत राहतो, त्यामुळे पुस्तकाच्या प्रभावात भर पडते. 

 

पुस्तक : Railways and the Raj

लेखक : Christian Wolmar

प्रकाशक : 

पृष्ठसंख्या : ३८४

आवृत्ती : नोव्हेंबर २०१७

किंमत : ३५० रू. 



Wednesday, March 3, 2021

राममंदिर निधी संकलन अभियानाचे सखोल नियोजन

राममंदिर निधी संकलनाच्या निमित्ताने संपूर्ण देश रामरंगी रंगून निघाला आहे असं म्हणायला हरकत नाही. समाजाच्या सर्व स्तरांतून हा निधी उभा करण्यासाठी आनंदाने हातभार लावला जातोय. या संबंधीचे विविध अनुभव आपल्याला वर्तनमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमं या दोन्ही ठिकाणी वाचायला बघायला मिळत असतीलच. पण निधीसंकलनाचा एवढा प्रचंड व्याप सांभाळला कसा जातोय याबद्दल अनेकांना कल्पना नसेल. हजारो स्वयंसेवक घरोघर संपर्क करून निधी उभा करत असताना पडद्यामागे एक मोठी यंत्रणा हे नियोजन करत होती. सखोल नियोजनाच्या बळावर ही गोष्ट कशी साध्य झाली हे या लेखामधून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

रोख पैसा ही अतिशय जोखमीची गोष्ट. रामभक्तांनी श्रद्धेने दिलेला निधी सांभाळून ठेवणे आणि त्या पै न् पैचा हिशोब ठेवणे या गोष्टी सुरळीतपणे पार पाडायच्या असतील तर व्यवस्थित नियोजन ही गोष्ट अत्यावश्यक ठरते. 'पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन' हा आग्रह संघकामामध्ये कायम धरला जातो. त्यालाच अनुसरून प्रत्यक्ष अभियान सुरु होण्याच्या खूप आधीपासून आर्थिक बाजूचे नियोजन सुरु झाले होते. सर्वसाधारणपणे संघाच्या रचनेतून कोणतेही व्यापक संपर्क अभियान अथवा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होतं तेव्हा प्रांतापासून पासून ते वस्तीपर्यंत योजना केली केली जाते. संघदृष्ट्या 'नगर' हे कार्यक्षेत्र अतिशय महत्वाचं असतं. शहरी भागामध्ये साधारणपणे चार वॉर्ड मिळून होईल एवढा परिसर 'नगर'. माझ्या भवतालच्या कार्यक्षेत्राच्या रचनेबद्दल बोलायचं तर चार नगरं मिळून एक गट आणि असे पाच गट मिळून पिंपरी-चिंचवड जिल्हा (संघकार्याच्या दृष्टीने) अशी रचना आहे.

अभियानासाठी या जिल्हा ते वस्ती या प्रत्येक स्तरावर विशेष नियुक्त्या केल्या गेल्या. 'अभियान प्रमुख आणि सहअभियानप्रमुखाने घरोघर संपर्काची रचना लावणे आणि हिशोब प्रमुखाने अभियानासाठी हिशोबाच्या बारकाव्यांमध्ये लक्ष घालणे आणि त्यासाठीची पूर्वतयारी करणे अशी कामाची ढोबळमानाने विभागणी होती. माझ्याकडे आकुर्डी नगराचा हिशोब प्रमुख हे दायित्व होतं. हिशोब प्रमुख या नात्याने सर्व वस्तीप्रमुखांना कूपनपुस्तक आणि पावतीपुस्तक यांचे रोजच्या रोज वाटप करणे आणि त्याची तपशिलाने नोंद ठेवणे आवश्यक असे. प्रत्येक पुस्तकावर आणि पुस्तकातल्या प्रत्येक पावती/कूपनवर अनुक्रमांक असे. एकूण निधी संकलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारी पुस्तकांची मागणी आणि केंद्रीय स्तरावरून होत जाणारा पुरवठा यांचा ताळमेळ ठेवणे ही एक तारेवरची कसरतच होती. या पुस्तकांची छपाई केंद्रीय स्तरावर फक्त एकाच ठिकाणी होत असल्याने तिथून अगदी पार नगरापर्यंत टप्प्याटप्प्याने वितरण होईपर्यंत काळजी बाळगणे आणि संयम ठेवणेही आवश्यक असे.

रोज संपर्क होणाऱ्या घरांच्या संख्येचे उद्दिष्ट मोठे असल्याने रोज निधीही मोठ्या प्रमाणावर जमा होत असे. त्या निधीचा भरणा करण्यासाठी प्रत्येक वस्तीसाठी एक अथवा दोन वस्त्यांचा मिळून एक 'जमाकर्ता' (Depositor) नियुक्त केला गेला होता. रोज प्रत्येक उपवस्तीमध्ये घरोघर संपर्क करत फिरणाऱ्या प्रत्येक जोडीमध्ये एक जण अभियानाची माहिती देणारा तर दुसरा जण निधी घेणारा म्हणजेच 'संग्रहकर्ता' असे. प्रत्येक संग्रहकर्ता दिवसभरात जमा झालेला निधी आपल्या वस्ती अभियान प्रमुखाकडे जमा करत असे आणि वस्ती अभियान प्रमुख व त्या वस्तीचा जमाकर्ता रोज रात्री एकत्र भेटून त्या दिवसाचा हिशोब पूर्ण करत. दर दिवशी जमा झालेला निधी दुसऱ्या दिवशी भरण्याची जबाबदारी जमाकर्त्याची असे.

निधी देणाऱ्या व्यक्तीला तेवढ्या रकमेचे कूपन अथवा पावती दिली जाई. दिली गेलेली रोख रक्कम १० ते २००० रुपयांदरम्यान असेल तर त्या बदल्यात देणगीदाराला १०, १०० किंवा १००० रुपयांचे कूपन त्याच्या किमतीच्या योग्य त्या पटींमध्ये दिले जाई. २००१ पासून वरच्या रकमेसाठी रोख अथवा धनादेश स्वरूपात रक्कम देण्याची मुभा होती. परंतु करामध्ये 80Gची सवलत हवी असल्यास मात्र धनादेश देणे आवश्यक होते. अभियानप्रमुखाकडे निधी जमा करताना प्रत्येक संग्रहकर्त्याने एक प्रपत्रक (फॉर्म) भरून देणे अपेक्षित होते. या प्रपत्रकात संबंधित संग्राहकर्त्याने त्या दिवशी ज्या पुस्तकातून कूपन अथवा पावती दिली गेली त्या पुस्तकाचा क्रमांक, १०, १०० आणि १०००ची प्रत्येकी किती कूपन्स दिली गेली, चेक घेतला असल्यास त्या चेकचा क्रमांक, बँक इत्यादी तपशील प्रत्येक संग्रहकर्त्याने वस्ती अभियानप्रमुखाकडे जमा केल्यास तो वस्ती अभियानप्रमुख आणि जमाकर्त्याला दिवसाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ करणे सोपे होई. निधीचा हिशोब करताना बऱ्याच गोष्टींचे व्यवधान ठेवणे गरजेचे असे. त्यासाठी जमाकर्त्याच्या मदतीला होते एक महत्वाचे साधन : एक विशेष मोबाईल ॲप! संपूर्ण अभियानाच्या हिशोब नियोजनातील ही अतिशयउल्लेखनीय गोष्ट होती.

अभियानाची सुरुवात होण्याआधीच प्रत्येक जमाकर्त्यासाठी एक विशेष क्रमांक (ID) तयार केला गेला. ॲपमध्ये रोज त्या त्या वस्तीतील एकूण कूपन्स, पावत्या व धनादेश यांच्या तपशिलांची नोंद जमाकर्ता करत असे. तशी नोंद करण्यापूर्वी संबंधित पावती पुस्तक/ कूपन पुस्तकाची नोंदणी ॲपमध्ये स्वतःच्या नावावर करणे अनिवार्य असे. रात्री ॲपमध्ये नोंद करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जमकर्ता धनादेश व रोख रक्कम यांचा बँकेत भरणा करत असे.

बँकेत पैसे भरणे सुलभ व्हावे यासाठी काही गोष्टी केंद्रीय स्तरावरून केल्या गेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या तीन बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या नावाने खाते उघडण्यात आले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तिन्ही बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या खात्यासाठी विशेष भरणा पावती (deposit slip) होती. त्यामुळे जमाकर्त्याला रोज बँक खाते क्रमांक त्या पावतीवर लिहिण्याची आवश्यकता राहिली नाही. फक्त रोज भरणा करताना त्या पावतीवर जमाकर्ता क्रमांक लिहिणे आवश्यक होते, जेणेकरून अभियान चालू असताना प्रत्येक जमाकर्त्याने केलेला ॲपमध्ये भरलेली माहिती आणि त्या प्रत्येक जमाकर्त्याने बँकेत केलेला एकूण भरणा यांचा अभियानसमाप्तीनंतर ताळमेळ व्हायला मदत व्हावी. ज्या ज्या जमाकर्त्याने ॲपमध्ये नियमितपणे आणि अचूक माहिती भरली त्याला अभियानसमाप्तीनंतर हिशोब पूर्ण करणे सोपेही गेले आणि त्यामध्ये जास्त वेळही गेला नाही. ॲपमध्ये असणाऱ्या update now या बटणावर क्लिक केले की भरलेली माहिती मुख्य सर्व्हरवर अद्ययावत व्हायची. बँकेत भरलेली रक्कम आणि ॲपमध्ये भरलेली माहिती यात तफावत असेल तर ॲपमध्ये तशी नोंद दिसायची. त्याचप्रमाणे भरलेल्या धनादेशाचे तपशील आणि धनादेश वटला की नाही याबाबतची सद्यस्थितीची त्यामध्ये दिसायची. त्यामुळे जमाकर्त्याला आपल्या कामाचा सारांश आणि तपशील हे दोन्ही या ॲपमध्ये पाहता आले. अभियान संपल्यानंतर सर्व जमाकर्त्यांची एकूण भरणा झालेली रक्कम आणि त्यांनी वापरलेली एकूण कूपन्स यांचा ताळमेळ करून हिशोब पूर्ण करण्यात आला. ॲपमध्ये भरलेल्या माहितीवर लक्ष ठेवता यावे यासाठी गट व जिल्हा हिशोब प्रमुखांना एका विशेष वेबसाईटचा ऍक्सेस देण्यात आला होता. त्यांच्याकडून जमाकर्त्यांना नियमितपणे होणाऱ्या पाठपुरावा होत राहिला तसेच कुठलीही शंका असल्यास त्याबाबाबत लगेच माहिती पुरवली जाई. जमाकर्त्याला काही तांत्रिक अडचण आल्यास  कॉल सेंटर हेल्पलाईनवर मदतही उपलब्ध करून दिली गेली होती. अशा प्रकारे ॲप मदतीला असल्याने कूपनपुस्तक/पावतीपुस्तक कुणाच्या नावावर आहे हे शोधून काढणे गट व जिल्हा कार्यकर्त्यांनाही शक्य झाले. या सर्व कामामध्ये बँकांकडूनही उत्तम प्रकारे सहकार्य मिळाले. म्हणूनच अभियान संपल्यावर बँकेमध्ये कर्मचारी व व्यवस्थापक यांची भेट आवर्जून घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

एकूणच अभियानाच्या उत्साहाला हिशोबाच्या नियोजनाची जोड मिळाल्याने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसोबतच विश्व हिंदू परिषद, अखिल भरतीत विद्यार्थी परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय स्त्री शक्ती इ. समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही महत्वाचं योगदान दिल्याने अभियान यशस्वीपणे पार पडण्यास मोठीच मदत झाली. अधिकाधिक घरांपर्यंत श्रीराम मंदिर हा विषय पोचवणं आणि या निमित्ताने संपर्कात येणाऱ्या अनुकूल व्यक्तींना संघकार्याशी जोडून घेणं, पूर्वी संघ अथवा समविचारी संस्थांचे कार्य केलेले आहे परंतु सध्या कार्यरत नाहीत अशा जुन्या कार्यकर्त्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणं हे या अभियानाचे महत्वाचे उद्देश होते. त्या दृष्टीनेही हे अभियान नक्कीच यशस्वी ठरलं आहे हे निश्चित.

 (मार्च महिन्याच्या 'हिंदूबोध' मासिकात प्रकाशित लेख)

Tuesday, March 2, 2021

संचार : चिं. वि. जोशी यांचे प्रवासवर्णन


चिं. वि. जोशींनी भारताच्या विविध भागांना दिलेल्या भेटींचे प्रवासवर्णन 'संचार' या पुस्तकात आहे.  आहे. साधारणपणे १९१४ ते १९४५ दरम्यान केलेले हे प्रवास आहेत. जुन्या काळातलं प्रवासवर्णन हा खूप रंजक अनुभव असावा हे गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मधून आणि मुकुंद वझे यांच्या 'प्रवासवर्णनांचा प्रवास' वाचून लक्षात आलं होतं. त्यामुळे हे पुस्तक घेण्यामागे चिं. वि. जोशींच्या नावापेक्षाही त्यातल्या कालखंडाचं कुतूहल हे जास्त कारणीभूत होतं. पुस्तकात विजापूर, उत्तर काठेवाड, जुनागड, बंगाल, मध्य प्रदेश, साल्हेर-खान्देश, त्रावणकोर-मदुरै, मेवाड अशा प्रांतांचे प्रवासवर्णन आहे.  चिं. वि. जोशी स्वतः बडोदा संस्थानच्या चाकरीत होते. त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित कळत नसले तरी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असावे. कारण पुस्तकात इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला बडोदा सरकारचे प्रतिनिधी या नात्याने गेल्याचे दोन-तीन लेखांमध्ये उल्लेख आहेत. शिवाय एका लेखात "आमच्या बडोदा कॉलेजच्या क्रिकेट संघासोबत जुनागडला प्रवास" केल्याचा उल्लेख उल्लेख आहे. याशिवाय पाली भाषेच्या अभ्यासात धर्मानंद कोसंबी आपल्याला गुरुस्थानी होते, असा चिं. विं. नी  कुठल्याश्या पुस्तकात उल्लेख केल्याचं स्मरतंय. असो. कामानिमित्ताने तसेच वैयक्तिक प्रवासही जमेस धरता त्या काळाच्या मानाने चिं. विं. नी पुष्कळच प्रवास केला म्हणायला हवं. 

सुरुवातीचा प्रवास  फक्त रत्नागिरी ते गणपतीपुळे असा आहे. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. हा प्रवास पायी केलेला होता. "गाडी रस्ता सोयीचा नसल्याने कोकणात बहुतेक प्रवास पायीच करावा लागतो" असं चिं. वि. नोंदवतात. हे अंतर सहा कोस. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. चिं. विं. ना प्रवासात तीन वेळा खाडी पार करावी लागली. लेखाच्या शेवटी 'श्रीक्षेत्र गणपती-पुळे माहात्म्यवर्णन' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख आहे. त्यातल्या दोन प्रथा चिं. विं. नी पुस्तकात दिलेल्याही दिल्या आहेत. 

१) दर गणेशचतुर्थीला सकाळी सहा तास ब्राह्मणेतरांना गाभाऱ्यात प्रवेश करण्याची व मूर्तीस स्पर्श करण्याचीही मुभा आहे. अन्य वेळी ब्राह्मणेतरांनी सभामंडपातूनच दर्शन घ्यावे. 

२) दुसऱ्या दिवशी हत्यारांची पूजा करून बकऱ्याचा बळी दिला जातो. 

त्या काळातला ब्राह्मणांचा व्यवहार पाहता पहिल्या प्रथेबाबत आश्चर्य वाटले नाही. पण पुळ्याच्या गणपतीसमोर बळी हा प्रकार नवीन वाटला. चिं. वि. स्पष्ट शब्दांत "ही हिंसा बंद व्हायला हवी" असं नमूद करतात. ब्राह्मणेतरांना वर्षभर गाभाऱ्यात प्रवेश न देण्याबद्दलही नाराजी व्यक्त करतात. चिं. वि. मंदिरांत वगैरे जात असले तरी फार मोठे भाविक नसावेत असं या आणि अन्य लिखाणावरूनही वाटतं. पुळ्याला आणि पुढच्याही एका प्रकरणात मंदिर परिसरात रूढींच्या नावाखाली केलेला आगाऊपणा करणाऱ्याला चिं. विं. नी खपवून न घेतल्याचे उल्लेख आहेत. 

बंगालच्या प्रकरणात १९४०च्या दशकातल्या बंगाली नाटकाचं वर्णन आलं आहे. अन्य भागातल्या रंगभूमीविषयी त्या काळातल्या मराठी साहित्यात कितपत लिहून आलं असावं याची शंकाच वाटते. अन्य प्रकरणं वर्णनात्मक आहेत, त्यावर इथे वेगळं लिहावं असं काही नाही. पण पुस्तक चिं. विं. चे आहे म्हटल्यावर अपेक्षित होता तसा खुसखुशीतपणा मात्र  अभावानेच दिसल्याने त्या आघाडीवर मात्र निराशाच झाली. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत असणारं 'बडोद्यातील जलप्रलय' हे प्रकरण मात्र यातून वगळ्याचं दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशकाने या पुस्तकात लिहिलेल्या टिपणामुळे कळलं. असले बदल का करतात हे खरंच अनाकलनीय असतं. असा 'आँखों देखा हाल' म्हणजे किती महत्वाचा दस्तावेज असतो! तो वगळून नक्की काय साध्य केलं असेल? अर्थात दुसऱ्या आवृत्तीत दोन प्रकरणं नव्याने समाविष्टही केली गेली आहेत. त्यातलंच एक प्रकरण 'खैबरघाटाची सफर'  माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं प्रकरण वाटलं. कारण भारतापासून कायमच्या तुटलेल्या त्या भागात जायचा अनुभव असणारी मराठी माणसं आणि त्यातूनही कुणी ते अनुभव लिहून ठेवलेले असणं हे दुर्मिळच.. 

चिं. वि. १९४५ मध्ये इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला पेशावरला गेले होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा धाकटा भाऊ राहात होता. कराचीमध्ये मराठी लोक पुष्कळ होते, इतकंच काय अगदी आत्ताही तिथे मराठी शाळा आहे असं वाचण्यात आलं होतं. पण पेशावरसारख्या वायव्येच्या भागातही मराठी माणूस राहायला होता हे वाचून नवल वाटलं. या प्रकरणात पुढे तसे अनेक उल्लेख आहेत. दिल्लीहून पेशावरला जाताना गाडीत चिं. विं. ना महामहोपाध्याय द. वा पोतदार भेटले! त्यांच्या सोबतीमुळे ज्या ज्या प्रदेशातून रेल्वे गेली त्या त्या प्रदेशाचा इतिहास चिं. विं. ना जाणून घेता आला. 
पुढे येऊ घातलेल्या अराजकाची १९४५च्या या प्रवासात चाहूल लागली असावी. कारण "आम्ही हिंदू आहोत असं मुसलमानांना कळलं तर आमची अब्रू धोक्यात येईल, म्हणून आम्ही कुंकू लावत नाही" असं म्हणणाऱ्या बायकाही भेटल्या. यापुढच्या नोंदी वाचताना आज रोचक वाटतात, कारण आज त्यावर विश्वास बसणंही अशक्य व्हावी अशी परिस्थिती आहे. ते वाचताना आपल्या हिंदू मनाला सुया बोचतात. या प्रवासात चिं. विं. नी एका टेकाडावरच्या गोरखत्री नावाच्या स्थानबद्दल लिहिले आहे. हे गोरखनाथांचे स्थान, परंतु हे नाथ संप्रदायातील सुप्रसिद्ध गोरखनाथ नव्हेत, हे त्याच नावाचे दुसरे. याचं वैशिष्टय असं की एक मशीद पाडून त्यावर हे उभं केलेलं आहे. "मंदिरे पाडून मशिदी केल्याचे दाखले हिंदुस्थानात लक्षावधी आहेत, परंतु मोठी थोरली मशीद तिच्याजवळील सराईसह जमीनदोस्त करून तेथे मंदिर बांधल्याचे उदाहरण मला वाटते हे एकच असेल. हे श्रेय प्रसिद्ध शीखसुभेदार अबू ह्यास. हा सन १८३८-४२ पर्यँत पेशावरचा सुभेदार होता. हिंदुमहासभेने ह्या सुभेदाराचा पुतळा अवश्य उभारला पाहिजे" ही चिं. विं. ची प्रतिक्रिया बोलकी आहे.  

याशिवाय चिं. वि. , प्राध्यापक शेजवलकर (बहुदा पानिपत अभ्यासक ते हेच असावेत) आणि डॉ. यशवंत देशपांडे यांनी मिळून एका जयकृष्ण पंथाच्या मंदिराचा शोध घेण्यास सुरुवात केली . पेशावरच्या हिंदुबहुल भागात एका हवेलीत गोपाळकृष्णाच्या अनेक मूर्ती होत्या. तिथे काही महंत होते त्यांनी चिं. विं. ना ओळखले, कारण चिं. विं. चे 'मनोहर'च्या अंकाततलं छायाचित्र त्यांनी पाहिलं होतं. एवढ्या लांब मठ आणि महंत होते आणि तेही मराठी भाषक हे वाचताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या महंतांनी महानुभाव पंथांच्या अनेक पोथ्या जपून ठेवल्या होत्या, शिवाय "काबूल येथे शेवटचा महानुभावी मठ जिवंत आहे आणि तिथेही पुष्कळ अनुयायी आहेत" असंही त्या महंतांनी सांगितलं. 

पुढे त्यांनी खैबरखिंडीलाही भेट दिली. त्या परिसरात बुद्धमूर्ती आणि कलाकृती तोपर्यँत खूप सापडल्या होत्या आणि सापडत होत्या. तिथल्या बुद्धमूर्तींची ठेवणही पठाणांसारखीच असल्याची गमतीशीर पण महत्वाची नोंदही ते करतात. हे सगळं वाचताना आतमध्ये कुठेतरी अस्वस्थही वाटलं. वायव्य सरहद्द प्रांत आणि अफगाणिस्तानात मुस्लिमांचं राज्य शेकडो वर्षं होतं, आहे. त्या रासवट राजवटीत बौद्ध फार आधीच उखडले गेले, पण अगदी फाळणी होईपर्यंत काही हिंदू तिथे नेटाने आपलं स्थान आपली देवालयं कशीबशी का होईना टिकवून होते. एवढ्या राजेशाहीत घडलं नाही ते पुढे घडलं आणि उरल्या सुरल्या हिंदू, बौद्ध खुणा तिथून उखडल्या गेल्या. हा लेख चिं. विं. नी प्रवासानंतर काही काळानंतर लिहिला आहे. त्यांच्या लिखाणातही खंत जाणवते. आता या भागात महाराष्ट्रीय लोकांना जायला मिळण्याची शक्यता फारच थोडी आहे, हे ते सुरुवातीलाच नमूद करतात आणि महंतांच्या भेटीनंतर लिहितात, "सत्तेचाळीच्या दंगलीत या मठाचा नाश झाला असावा असे भय वाटते. काबूलचा मठ चालू आहे का तेही कळत नाही..." "....मी अद्यापपर्यंत ह्या दोन मठांची आणि त्यातील  महंतांची काय गत झाली याचा तपास केला नाही ही माझी अक्षम्य चूक आहे."


जुनी पुस्तकं (त्यातही प्रवासवर्णनं) यासाठी वाचायला हवीत, काही ना काही महत्वाचं गवसतं. जुन्या पुस्तकाचा विषय निघाला आहे तर एक निरीक्षण नोंदवतो. चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये (आणि बहुदा सर्वच जुन्या पुस्तकांमध्ये) कुणाही मोठ्या सन्माननीय पुरुषाच्या नावामागे रा. ('राजमान्य'चा शॉर्ट फॉर्म) कायम असतं. पूर्वी नावामागे 'श्री.' लिहायचा अजिबातच प्रघात नसावा.  'श्री.' लिहायची सुरुवात नक्की कधीपासून झाली असेल? कुणाला काही कल्पना असेल तर कळवावे. 

एकूण हे पुस्तक शैलीच्या दृष्टीने महत्वाचं अथवा रंजक नसलं तरी काळाआड चाललेल्या प्रवासनोंदी त्यात करून ठेवल्या आहेत हे महत्वाचं. 

(जाता जाता : चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांसाठी गंमतशीर शब्द योजलेले असतात तसे या पुस्तकातही आहेत. गावातला शून्य मैलाचा दगड फादर स्टोन म्हणून ओळखला जातो त्याला चिं. वि. जोशींनी बापदगड म्हटलंय आणि पेशावर भागात त्यावेळी त्यांनी फ्लशचे संडास पाहिले त्याला त्यांनी धबधब्याचे संडास म्हटलंय :D )


संचार : चिं. वि. जोशी
आवृत्ती चौथी 
१५० पानं
पंचेचाळीस रुपये 
कॉन्टिनेन्टल प्रकाशन