Total Pageviews

Friday, January 22, 2016

एका आत्महत्या पंथाची अखेर



गावोगावी उगवलेले बुवा-बाबांचे पीक, त्यांनी केलेली फसवणूक, नरबळी, लूट या गोष्टी आपल्याला नवीन नाहित. किंबहुना आपला देश 'फॉरेन' च्या तुलनेत किती अंधश्रद्ध नि मागासलेला आहे हे दाखवायला अनेक लोक उत्सुक असतात पण असा अंधविश्वासू वर्ग अगदी अमेरिकेतही अस्तित्वात होता, आहे आणि असतो हे अगदी ठळकपणे दाखवून देणारे हे पुस्तक. ज्येष्ठ पत्रकार, 'सकाळ'चे माजी संपादक विजय कुवळेकर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेले हे पुस्तक वाचले तेव्हा अक्षरशः चक्रावून गेलो होतो

ही सत्यकथा आहे रेव्हरंड जिम जोन्सची. तऱ्हेतऱ्हेच्या गुणावगुणांचे अजब रसायन. जिम अमेरिकेतल्या लीन नावाच्या लहान गावात जन्माला आला. जन्मापूर्वीच त्याच्या आईला स्वप्नात दृष्टांत झाला होता "तुझा मुलगा सर्वांचा उद्धार करेल". जिमचा सुरुवातीचा रस्ता योग्य होत. पण नवा मार्ग बनवण्याच्या नादाने तो इतका पछाडला की आपल्यासोबत हजारो लोकांना तो खाईत लोटून गेला

जिमचे वडील खरेतर निग्रोद्वेषी  संघटनेत होते. पण लहानपण पासून जिमचे मन मात्र समानता, समाजवाद यांच्याकडे ओढ घेत होते. कोणत्याही सुधारकच्या वाट्याला येतो तसाच सामाजिक विरोध त्याच्या वाट्याला आला. एकीकडे तो कनवाळू, प्राणीमित्रसुद्धा होता तर दुसरीकडे तो अतिशय आग्रही - खरेतर हट्टी - असा होता. मित्रांना टोचून बोलायचा पण तरीही मित्र त्याला सोडून जायचे नाहीत. त्याचे व्यक्तिमत्वच जणू चुंबक होते

वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून तो ख्रिस्तधर्माविषयी प्रवचने द्यायचा. हळू हळू तो चर्चचा सदस्य बनला. त्याच्या समाजवादी स्वप्नांममधूच 'People's Temple' म्हणजेच 'लोकांचे देवालय' जन्माला आले. 'बोले तैसा चाले' ही त्याची वृत्ती होती. तो लोकांना जसा उपदेश करायचा तसाच स्वतःही वागायचा. त्याने अनेक मुले दत्तक घेतली - ज्यात अनेक निग्रो मुलांचाही समावेश होता. त्याच्या अनुयायांचा परिवार खूप मोठा होता. पण हा सर्व परिवार तो एकाच ठिकाणी कधीच ठेवत नसे. समाजातले हितशत्रू लोक मोडता घालतात या सबबीखाली तो त्याचा काफिला लमाणांसारखा सतत हलवत राहायचा. कधी इंडियानापोलीस, कधी कॅलिफोर्निया तर कधी चक्क ब्राझील ! पुढे रशियात जायचेही त्याचे स्वप्न होते. शेवटी अखेर त्याने गयाना मध्ये बस्तान  बसवले

 
हळूहळू स्वतःच्या प्रसिद्धीचे मध्यम म्हणून तो वृत्तपत्रांकडे पाहू लागला. समाजात स्वतःचे वजन वाढवले. पाय जमिनीवर नसलेल्या लोकांचे होते तेच त्याचेही होऊ लागले. मनातली परोपकाऱ्याची जागा दिखाव्याने घेतली. अहंकाराने त्याला गिळंकृत केले. बायबल पायाखाली घेऊन तो प्रवचने देऊ लागला. येशुपेक्षाही श्रेष्ठ असल्याची बतावणी करू लागला. 'अंतिम मुक्तिदाता मीच' अशा वल्गना करू लागला. 'माझे अनुयायी व्हा आणि पुण्य कमवा' अशी आमिषे दाखवू लागला. धर्मादाय संस्थेच्या नावाखाली पैश्याच्या राशीत लोळू लागला. हळूहळू भारतात घडते तसेच घडले. लाखो अंध भाविकांच्या बळावर हा विषवृक्ष फोफावू लागला

जोन्सच्या धूर्तपणाची साक्ष देते ते म्हणजे त्याचे अफलातून planning. केव्हा, कुठे आणि काय करायचे याचे  आराखडे त्याच्या डोक्यात तयार असायचे. डोळे दिपून अनुयायी झालेल्यांना 'जमेल तेवढे दान माझ्या कार्यासाठी द्या' असे सांगता सांगता त्यांच्या पासपोर् सकट सगळे ताब्यात घ्यायचा. वैतागून लोकांनी बाहेर पडू नये यासाठी एक अतिशय हलकट उपाय त्याच्याकडे होता. तो आधीच अनुयायांकडून निरनिराळ्या कागदावर एक प्रकारचे self declaration लिहून घ्यायचा, उदा. 'मी (म्हणजे त्या अनुयायाने सरकार विरोधी कट रचला' किंवा 'मी अमकीतमकीवर बलात्कार केला' . मग कायतो अनुयायी जर  पळून गेला तर ती आधीच लिहिलेली निवेदने तो सरळ पेपरातून प्रसिद्ध करून द्यायचा . पळालेल्याला जगात तोंड दाखवायला जागा उरायची नाही.

त्याने सदैव सजगता दाखवणारा पत्रलेखकांचा ताफा तयार ठेवला होता. कोणी जोन्सची स्तुती केली तर आनंद व्यक्त करणारी हजारो पत्रे हे लोक लिहून वर्तमानपत्रांना पाठवायचे किंवा कुणी टीका केली तर निषेध करणारी पत्रे ! याशिवाय जोन्सची कीर्ती पसरवण्यासाठी त्यांचे लिखाण चालू असायचेच.

जोन्सचा स्वभाव अतीविक्षिप्त होता. तो पीपल्स टेम्पलच्या अनुयायांना क्रूर शिक्षा द्यायचा आणि ती भोगताना अपराध्याला 'Thank you father' ची पारायणे करायला लावायचा. क्रौर्याची सीमा गाठणाऱ्या शिक्षा तो स्वतःच्या हातांनी मात्र द्यायचा नाही. त्याचे 'देवदूत' शिक्षा द्यायचे आणि हा ते बघत बघत खिदळायचा. जोन्स स्वतः लिंगपिसाट होताच आणि त्याच्या अनुयायी पती-पत्नींनाही अत्यंत विकृत शिक्षा द्यायचा. असा हा क्रूर माणूस अणुयुद्धाला मात्र प्रचंड घाबरायचा. त्याच्या मनात सतत अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायचे विचार घोळायचे.

हळूहळू त्याच्या कृत्यांच्या बातम्यांना पाय फुटू लागले.  'न्यू वेस्ट' नावाच्या वृत्तपत्राच्या किल्डफ नावाच्या वार्ताहराने त्याचे बिंग फोडणारा मजकूर प्रसिद्ध केला. ते साल होते १९७७. जोन्सला याची कुणकुण लागली होतीच. त्याने गयानाला पळ काढला. तिथे त्याचे 'जोन्स टाऊन' आधीच तयार होते !! त्या धूर्त माणसाने ते आधीच उभे केले होते.

जोन्स टाऊनमधल्या शेतावर त्याने आपल्या अनुयायांना मजुरासारखे राबवायला सुरुवात केली, आणि तीही एकही पैच्या मोबदल्याशिवाय ! केवळ कैद्यांना मिळते त्या दर्जाचे जेवण द्यायचा. अशातच एका 'शिस्त मोडणाऱ्या' अनुयायाला ठार करून प्रेत रेल्वे मार्गावर टाकून देण्यात आले. या क्रूर कृत्यापासून जोन्सचा शेवटचा अध्याय सुरु झाला. 'लिओ रायन' हा अमेरिकेतला खासदार हा त्या मृताचा  नातेवाईक होत. तो वकिलांना घेऊन थेट जोन्सटाऊनमध्येच येउन थडकला. सुरुवातीला जोन्सच्या धाकापोटी त्याच्या अनुयायांनी आपण अगदी खुशीत असल्याचे भासवले. पण थोडा जोर लावल्यावर सगळे मुखवटे हळूहळू गळून पडू लागले. एकाने तर जोन्सदेखतच रायनला सांगितले, "मला अमेरिकेत परतायचे आहे". जोन्सला संताप गिळ्ण्याशिवाय पर्याय नव्हता. एक एक करून अठरा जण तयार झाले. सगळे गयाना विमानतळाकडे निघाले. १८ जणांबरोबर जोन्सचा एक अतिविश्वासू साथीदारही 'टेंपल' सोडून निघाला. हे पाहून इतर १८ जणांच्या मनात पाल चुकचुकली. अन् झालेही तसेच ! सगळे विमानात बसताना त्या साथीदाराने आतून आणि ऐनवेळी tractor वरून आलेल्या अन्य साथीदारांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यात छायाचित्रकार आणि लिओ हे नाव करणारा तो धडाडीचा खासदार यांचा दुर्दैवी अंत झाला. काही अनुयायी आणि लिओबरोबरचे अनुयायांचे नातेवाईक जखमी झाले किंवा कसेबसे पळून गेले. सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे विमानतळावरच्या सैनिकांनी बघ्याची भूमिका घेतली ! आणि वर "आम्ही काही केले असते तर गोळीबार वाढून आणखी काही जीव गेले असते" असे लंगडे कारणही दिले.

इकडे या कटाचा सूत्रधार जिम जोन्सच्या मनाचा थांग तर येशुलाही लागू शकत नव्हता. जोन्सने सर्वांना बोलावून सांगितले, "आपल्याला या जगात कोणी जगू देणार नाही. त्यापेक्षा स्वतःहून मृत्यू पत्करून आपण आपली मूल्ये जगाला पटवून देऊ. विमानतळावर काही गडबड झाली तर पोलिस पकडून तुमच्या मुलाबाळांना छळतील, मारतील… त्यापेक्षा तुम्ही स्वहस्तेच मुलांना विष पाजा… " कहर म्हणजे अनेकांना ते पटले. 'जिवंतपणे मृतवत् राहण्यापेक्षा खरे मरण बरे' असा त्यांनी विचार केला असावा. सर्वांनी विष पिउन सामुदायिक आत्महत्या केली. जोन्सने स्वतःनेही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.



तिकडे गयाना पोलिसांना गोळीबाराची माहिती कळल्यावर त्यांनी जोन्सटाऊनकडे धाव घेतली. तिथे जाउन पाहतात तर काय , प्रेतांचा खच पडला होता. मुख्य हॉल व इतर घरांमध्ये आढळलेल्या मृतांची संख्या जवळजवळ ९०० होती. प्रेतांची विल्हेवाट लावणे हा एक यक्षप्रश्नच होता. जोन्सची प्रचंड संपत्ती गायब होती …. अर्थात ती घेऊन पोबारा करणाऱ्यांना लवकरच पकडण्यात आले.

जोन्सच्या मृत्यूनंतरही बरेच वाद झाले. मेलेला जोन्सच आहे हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करावे लागले. त्याच्या तपासणीत डोक्यातल्या गोळीसोबतच पोटात विषही सापडले. वैद्यकीय अहवाल पूर्णपणे प्रकाशातच आला नाही. पकडलेल्या जोन्सच्या सहकाऱ्यांपैकी एकाने पत्रकार परिषद घेऊन जोन्स कसा निरपराध होता हे पटवायचा प्रयत्न केला आणि toilet मध्ये जाउन गोळी झाडून आत्महत्या केली !

अशी ही मुलखावेगळी जीवनकहाणी रेव्हरंड जिम जोन्सची. पुस्तकाच्या शेवटी सगळ्या घटनांचा अन्वय लावताना विजय कुवळेकर लिहितात, 'जोन्सला विकृत, माथेफिरू, हुतात्मा यापैकी कोणतेही विशेषण पूर्णतः लागू होत नाही. सर्व विशेषणांचे त्याच्यामध्ये अजब म्मिश्र्न होते. त्याच्या कृत्यांचे कदापीही समर्थन शक्य नसले तरीही त्याच्यामागे हजारो अनुयायी गेले ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही.'

एकूणच जोन्सचे उत्तरायुष्यात जगण्याचे उद्दिष्ट काय होते हे जसे आपल्याला कळत नाही तसे सर्वांना घेऊन मृत्यूचे दार ठोठावण्यामागे काय तत्वज्ञान होते हेही समजत नाही. इतिहासात नोंद व्हावी ही तीव्र इच्छा पुरी करण्यासाठी त्याने इतका विचित्र, विकृत आणि विध्वंसक मार्ग का निवडावा याचे उत्तर केवळ जोन्सकडेच असू शकते … आणि कदाचित नियतीकडे !

(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

पुस्तक : एका आत्महत्या पंथाची अखेर
लेखक : विजय कुवळेकर
प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन
पृष्ठे : अंदाजे १५०




 या व्यतिरिक्त अन्य तपशील विकिपीडियाच्या या दुव्यावर मिळतील : https://en.wikipedia.org/wiki/Jim_Jones



काही डॉक्युमेंटरीज यूट्यूबवर उपलब्ध आहेत त्या अशा

Wednesday, January 13, 2016

नटसम्राट : अलौकिक शब्दसामर्थ्य आणि अविस्मरणीय अभिनय !






 
महेश मांजरेकरचे नाव दिग्दर्शक म्हणून ऐकले तेव्हा 'शिक्षणाच्या आईचा घो' सारखा कचरा आपल्या नशिबी येणार की 'काकस्पर्श' सारखा अप्रतिम चित्रपट पुन्हा बघायला मिळणार हा एक प्रश्न होताच, पण नाना आणि नटसम्राट हे दोन एका दमात उच्चारले गेले तीच वेळ श्वास रोखून धरायला लावणारी होती !  'टू सी ऑर नॉट टू सी' हा प्रश्नसुद्धा मनात येणे शक्य नव्हते. काहीही असले तरी नानासाठी हा बघायचाच हे केव्हाच ठरले होते. खरे सांगायचे तर ट्रेलर मध्ये नाना वगळता अन्य गोष्टी यथातथाच वाटत होत्या पण प्रत्यक्ष चित्रपटाने मात्र खिळवून  ठेवले !

खरेतर नाटकाचा चित्रपट करणे म्हणजे कठीण काम. शिवाय 'नटसम्राट' मधली दीर्घ स्वगते चित्रपटात तशीच्या तशी घेणे शक्य नव्हते. असे असताना चित्रपटाची स्क्रिप्ट खरोखरच डोके लावून लिहिली आहे. याचे श्रेय पूर्णपणे मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांना जाते. सगळी स्वगते घेणे शक्य नाही तरीही स्वगतांच्या जागा खुबीने पेरल्या आहेत. त्या सर्वच चपखल आहेत असे नाही पण प्रयत्नांना दाद द्यायला हवी. विक्रम गोखलेंच्या पात्राची पटकथेत घातलेली भर हा एक अतिशय आवडलेला भाग !  राम नावाचे हे पात्र म्हणजे नाना पाटेकर उर्फ आप्पासाहेब बेलवलकरांपेक्षा  अभिनयात सरस असूनही मानसन्मान आणि व्यावसायिक यशाच्या बाबतीत मागे राहिलेला त्यांचा जिवलग ! एवढेच नाही तर त्यांना संततीसुखाच्या बाबतीत देखील आप्पासाहेबांपेक्षा मागेच (अर्थात त्या मुलांकडूनदेखील आप्पासाहेबांचा भ्रमनिरास होतो हा भाग अलाहिदा). पण हा राम रोखठोक बोलून नेहमीचा आप्पासाहेबांना काही अंशी जमिनीवर ठेवतो. इतकेच काय तर स्वतःच्या संसारात रमल्याने मित्राला विसरलेल्या आप्पासाहेबांना झापडवून भानावरसुद्धा आणतो…

पटकथेतला अजून एक अत्यंत आवडलेला भाग म्हणजे चित्रपटातून खुद्द वि.वा.शिरवाडकरांनाच दिलेला tribute… पहिला प्रसंग अतिशय महत्वाचा - राम मृत्यशय्येवर असताना त्याच्या आणि आप्पासाहेबांदरम्यानच्या संवादात एका नाटकातले कृष्णार्जुनाचे संवाद नकळत मिसळत जाऊन रामच्या त्या अवस्थेशी कर्णाची परिस्थिती अत्यंत चपखलपणे जुळत जाते.  कारण जसा कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर असूनही त्याला कधीच तशी मान्यता मिळाली नाही तसेच राम हा आप्पासाहेबांपेक्षा राम श्रेष्ठ नट असूनही मागे राहिलेला !  हे संवाद खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांच्या 'कौंतेय' या कर्णाच्या जीवनावरच्या नाटकातलेच आहेत. विक्रम-नानाच्या या प्रसंगाची गुंफण म्हणजे चित्रपटाच्या लेखकाच्या उत्कृष्ट प्रतिभेचा परिपाठच ! यातल्या संवादांची जुळवाजुळव ही कल्पना पटकथाकारांच्या डोक्यातली आहे की संवादलेखक अभिजित देशपांडे/किरण यज्ञोपवीत यांच्या डोक्यातली याची मला कल्पना नाही पण ज्याने कुणी हे केले आहे त्याची पाठ थोपटायला हवी ! दुसरा tribute तसा कमी महत्वाचा -  पण दाद देण्याजोगा. आप्पासाहेब जेव्हा बुटपॉलीशवाल्यासोबत नाटक बघायला जातात ते नाटक म्हणजे खुद्द वि. वा. शिरवाडकरांचेच 'ययाती आणि देवयानी' आहे !

या चित्रपटात पटकथेपेक्षाही जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले एकमेवाद्वितीय संवाद ! मूळ नाटकातले शिरवाडकरांचे अतिप्रसिध्द संवाद वगळता मला जास्त संवाद माहित नव्हते पण यातले सर्वच संवाद इतके उत्कृष्ट आहेत की शिरवाडकरांचे आणि किरण यज्ञोपवीत/ अभिजित देशपांडेचे  वेगळे काढताच येऊ नयेत. एका review मध्ये मी या चित्रपटाचा उल्लेख 'उत्तुंग शब्दलेणे' असा वाचला होता तो अक्षरशः खरा आहे ! आणि हे फक्त गंभीर संवादासंदर्भातच नाही तर खुसखुशीत संवादाबाबतीत देखील लागू आहे. इतकेच काय पण यातले अनावश्यक वाटणारे किंवा लांबलेले प्रसंग देखील संवादांच्या जोरावर तरून गेले आहेत …

आता कलाकारांबदल : मृण्मयी देशपांडेला पुरुषोत्तममध्ये 'पोपटी चौकट' मध्ये पहिले तेव्हापासूनच तिच्या अभिनयाची ताकद जाणवली होती आणि ती पुढे अग्निहोत्रमध्ये पुन्हा प्रकर्षाने दिसली होती. इथे ती पुन्हा एकदा अव्वल आहे. आई-वडिलांवर चोरीचा आळ घेतला म्हणून गांगरून जाउन माफी मागायला येते तो प्रसंग ! त्यातल्या तिच्या विनवण्या, त्यावर नानाची आतून धगधगत असूनही वरवर थंड आणि बोचरी प्रत्युत्तरे आणि मेधा मांजरेकरचा विस्फोट हा मूर्तिमंत हादरवून टाकणारा आणि हलवून सोडणारा प्रसंग !! या प्रसंगाचे वर्णन करणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यापैकी कोण श्रेष्ठ अभिनय करते आहे हा प्रश्नच फिजूल आहे. सर्वांच्याच अत्युत्कृष्ट अभिनयाचा 'समसमासंयोग' होतो तेव्हाच असे काहीतरी अनुभवास येते.  पडद्यावरचे सगळे कल्पित आहे, एवढेच नाही तर हा एक प्रकारचा कालबाह्य शैलीतला मेलोड्रामा आहे हे सगळे लख्ख माहित असूनही मी अश्रू थोपवू शकलो नाही … आणि बहुदा बरेचसे लोक हेच अनुभवत असावेत. 
मेधा मांजरेकर हे यातले खर्या अर्थाने 'surprise package' आहे. खरेतर तिने दे धक्का मध्ये झकासच काम केले होते तरीही नानासोबत मेधा 'सरकार' चा रोल करते आहे हे कळले आहे तेव्हा निराशाच झाली होती. पण तिने फारच छान काम केले आहे. विशेषतः वरती उल्लेखलेल्या प्रसंगातला तिचा अभिनय चिरस्मरणीय आहे. विस्फोट देखील आकांडतांडव न करता कसा करता येऊ शकतो याचे ते उत्तम उदाहरण !
ज्याच्या अभिनायासाठी हा चित्रपट मी बघायला गेलो (आणि तमाम जनता जाते आहे) तो नाना कसा आहे ? तर तो खऱ्या अर्थाने 'बाप' आहे !! नाना हा कुठल्याही चित्रपटात 'नाना'च असतो हा त्याच्यावरचा बराचसा रास्त आरोप. त्या अर्थाने तो इथेही बराचसा 'नाना'च आहे (विशेषतः त्याचे जाता जाता टाकल्यासारखे वाटणारे 'वन लायनर्स' तर अशक्य आहेत). पण खरे सांगू का, नाना हा मुळातच 'नटसम्राट' असल्याने तो 'नाना' म्हणून उभा राहिला तरी 'नटसम्राट' साकारत जातो !!  सून आणि मुलासोबत बोलतानाचे बोचरेपण, नातीसोबतचा आणि कावेरी सोबतचा हळवेपणा, राम सोबत एकाच वेळेस असणारे तिरकसपणा, आदरभाव, उत्कटता यांचे मिश्रण अशा भूमिकेच्या साऱ्या मागण्या नानाने उत्कटतेने उतरवल्या आहेत पडद्यावर … आणि शेवटचे स्वगत तर कळसच !!
राहता राहिले विक्रम गोखले उर्फ राम !  या माणसाबद्दल काही बोलायचे बाकी राहिले आहे असे वाटत नाही. आप्पासोबतच्या दारू पिण्याच्या पहिल्याच प्रसंगात असे काही sixer मारले आहेत की बस्स !!! फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीर कसे अभिनय करते ते या प्रसंगात बघून थक्क व्हायला होते. साधी गोष्ट - टेबलावर ग्लास ठेवणे ! पण नशा चढत चाललेला हा माणूस समोरच्या टेबलाच्या उंचीचा अंदाज घेत त्यावर ग्लास धाडकन न ठेवता असा काही काळजीपूर्वक ठेवतो की या अभिनायातल्या बारकाईने हादरायला होते. 'नटसम्राट' म्हणून उभा राहिला असता या माणसानेदेखील तर रान पेटवले असते असे राहून राहून वाटत होते मला. आख्खा चित्रपट एकट्याच्या खांद्यावर तोलून नेण्याचे सामर्थ्य असलेला बाहुबलीच जणू ('अनुमती' मध्ये ते दिसलेच होते) !! पण हेही तितकेच खरे आहे की या चित्रपटाचे अफाट व्यावसायिक यश (पहिल्याच आठवड्यात २२ कोटी !)  हे नानाच्या अभिनयसामर्थ्याइतकेच नानामधल्या X factor  मध्येही आहे. विक्रम गोखले जर नटसम्राट असले असते तर तिकीटबारीवरचा एवढा पूर पाहायला मिळाला असता असे वाटत नाही.

इतक्या सर्व जमेच्या बाजू असताना उणे काय आहे ? बऱ्याच आहेत…. मुख्य म्हणजे दिग्दर्शन अनेक ठिकाणी अडखळते. चित्रपटात भावुक करणाऱ्या अनेक गोष्टी असल्या तरी अनेक प्रसंगांत लोक अश्रूपात करण्यासाठी ठरवून आल्यासारखे दिसतात. उदा. राम नकळत मूल नसल्याबद्दल बोलून जातो आणि दुसऱ्या क्षणाला त्याच्या बायकोचे कावेरीच्या खांद्यावर डोके ठेवून रडणे सुरु. राम मृत्युशय्येवर असताना त्याचा आणि आप्पांचा कर्णार्जुनांचा नाट्यमय संवाद सुरु होतो ते ऐकायला त्या तथाकथित हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे मंडळी दुसऱ्या-तिसऱ्या वाक्यालाच हजर होतात. आणि पुढच्या २-३ वाक्यात डोळ्यातून पाणी वगैरे सुरुवात !!! जी अश्रूंची तीच गोष्ट टाळ्यांची… आप्पासाहेब थेटरात प्रयोग बघून निघत असताना न राहवून 'टू  बी ऑर नॉट टू बी' हे स्वगत म्हणू लागतात. बाहेर पडणारे ते ऐकून थबकतात. खरेतर इतक्या अनपेक्षितपणे असे काही दमदार ऐकून कोणीही थरारून जाईल आणि काही क्षणतर स्तब्ध होईल. इथे लोक इतके टाळ्या वाजवायच्या घाईला आलेले असतात की कधी एकदा आप्पांचे स्वगत संपते आहे आणि आपण टाळ्या पिटतो याची जणू वाट बघत असावेत. या इतक्या जाणत्या दिग्दर्शकांना दोन संवादांमधला मोकळा अवकाश किती महत्वाचा असतो हे जाणवतच नाही की ते दुर्लक्ष करतात ? ('कट्यार'मध्ये हीच घाई होती, त्याबद्दल मी आधी लिहिले आहेच).

शिवाय हा चित्रपट त्यातून दिसणाऱ्या नेपथ्य, कपडे वगैरे गोष्टींमधून काळाच्या झोपाळ्यावर इतके हिंदोळे घेतो की तो १९४० ते २००० एवढ्या मोठ्या span  मध्ये घडतोय असे वाटावे. आप्पांच्या मुलीच्या लग्नातली कार एकदम vintage , तिच्या घरचे नेपथ्य (मेजापासून ते मेणबत्ती stand पर्यंत सगळे) हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या 'फॉरेन returned' माणसाचे राहणीमान असावे तसे. नातीच्या gathering च्या वेळी १९८९ अशी पाटी, रामची बायको हॉस्पिटलमध्ये असताना सगळी instruments २००० च्या दशकातली. नुसता गोंधळ !! त्याचमुळे आशयाला फार धक्का पोहोचतो अशातला भाग नाही पण ते इतक्या गोष्टी चांगल्या असताना या गोष्टी विनाकारण डोळ्यात खुपत राहतात…
मुलीचे घर कधीच सोडलेले असूनही (तेही धो धो पावसात !!) आप्पांचे कपडे हे अनेकदा इतके शुभ्र दिसतात की ते परीटघडीचे वाटावेत ! नानाचा म्हतारपणचा मेकअप झकास आहे पण मेधा मांजरेकर इतकी तुकतुकीत आणि फ्रेश दिसते की तिच्या पांढऱ्या केसांना काहीही अर्थ उरत नाही …

मूळ नाटकातले बेलवलकर हे तसे बरेचसे सज्जन वगैरे गटात मोडणारे होते असे मला सांगण्यात आले आहे. त्यापेक्षा इथले बेलवलकर वेगळे आहेत. नटसम्राट असले तरीही सद्गुणांचा पुतळा नाहीत. त्यांच्यातही उणीवा आहेत, तेही vulnarable आहेत कारण ते कलंदर वृत्तीचे आहेत हे दाखवण्यावर पटकथेचा फोकस आहे. त्यावर माझ आक्षेप नाही पण त्यांना तसे दाखवण्याच्या नादात त्यांच्या दारू पिण्यावर इतका जास्त भर दिला आहे की त्यामुळे अक्षरशः त्यांची dignity हरवायला लागते. विशेषतः मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या partyचा दारू ढोसून येऊन केलेला विचका करण्याचा प्रसंग तर (तो बरीचशी करमणूक करत असला तरी) 'नटसम्राटा' विषयीची बरीचशी सहानुभूती गमावणारा ठरतो (निदान मला तरी असे फार जाणवले).

(जाता जाता : माझे आणखी एक निरीक्षण आहे. ते बरोबर आहे का हे कुणीतरी कृपया सांगावे : आप्पासाहेबांचे घर, मुलीची शाळा आणि रामला शेवटी ठेवलेले असते ती रुग्णालयातली खोली या सगळ्या गोष्टी एकाच इमारतीतल्या वाटत होत्या. तसे जर खरच असेल तर  महेश मांजरेकरसारख्या मराठीतल्या 'showman' चा चित्रपट असूनसुद्धा शूटिंग locations साठी इतकी काटकसर का केली देव जाणे.)

आता इतक्या उणीवा लिहिल्यानंतर 'चित्रपट बघावा का?' असे मला कुणी विचारले तर या प्रश्नाचे उत्तर मी देईन 'अजिबातच चुकवू नये'. इतक्या साऱ्या खटकणाऱ्या गोष्टी असूनही मी अगदी तल्लीन होऊन चित्रपट बघू शकलो. आप्पा, कावेरी, रामच्या सुखदुःखाशी समरस होऊ शकलो. इतकेच नव्हते तर घड्याळाकडे बघण्याची वेळच आली नाही. कारण ? अर्थातच अलौकिक शब्दसामर्थ्य आणि अविस्मरणीय अभिनय !