Total Pageviews

Friday, November 26, 2021

२६/११, कसाब आणि मी : प्रश्न, प्रश्न, प्रश्न ...




बरोबर आजच हे ऐकून संपलं. 

लिहायला बसताना मनामध्ये असहाय्यता, विषाद, कृतज्ञता, संताप, वेदना अशा सर्व भावनांची मनात दाटी झाली आहे. ही घटना घडली तेव्हा मी नकळत्या वयाचा नव्हतो. या घटनेचं गांभीर्य तेव्हा लक्षात आलं नव्हतं असं तर अजिबातच नाही. परंतु एकूणच या अप्रिय घटनाक्रमाबद्दल संगतवार माहिती करून घ्यावी आणि त्यामधले बारकावे समजून घ्यावे असं, का कुणास ठाऊक, कधी वाटलंच नाही.

मध्यंतरी Myth of Hindu Terror या पुस्तकावर आधारित एक पुस्तिका मी लिहिली होती, पण त्यामध्ये २६/११ बद्दल काही पडद्यामागच्या प्रशासकीय पातळीवरच्या घडामोडी दिल्या होत्या, त्यामुळे प्रत्यक्ष ताज/सीएसटी वगैरेमध्ये नक्की कधी काय झालं यांच्या तपशिलांबबद्दल मी आजपर्यंत तसा अनभिज्ञच होतो. पण २६/११ च्या कटाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महालेंचं हे पुस्तक ऐकल्यावर मात्र त्यातल्या अनेक बारीक तपशिलांनी थिजून जायला झालं. कुणीतरी असंच समुद्रातून येऊन शेकड्यात मुडदे पाडतं आणि ते निस्तरायला पुढचे काही दिवस अनेक जीव खर्ची पडतात याची पुन्हा आठवण येऊन त्यातून येणारी असहाय्यता फार बेकार असते.

२६/११ची घटना ही जशी पाकिस्तानच्या प्रचंड कुटीलतेची आणि भारतीय यंत्रणांच्या प्रचंड बेसावधपणाची गोष्ट आहे, तशीच ती अनेक अडचणींतून मार्ग काढत दाखवलेल्या गेलेल्या अतुलनीय धैर्याचीही गोष्ट आहे. मुख्य घटनेच्या आजूबाजूला बिनचेहऱ्याच्या माणसांनी दाखवलेल्या कमालीच्या परिपक्वतेच्या, चौकसतेच्या नि:स्वार्थी वृत्तीच्या असंख्य हृदयस्पर्शी कहाण्या आहेत. टाइम्स आणि मिररच्या दोन फोटोग्राफरनी फोटो जीव धोक्यात घालून सीएस्टीमधल्या अतिरेक्यांचे, गोळीबाराचे मिळवणे , ज्याच्या टॅक्सीमधून दोन अतिरेकी ताजपाशी गेले आणि त्याने गेटवेजवळच्या पोलिसांना सावध केल्यामुळे बॉम्बमुळे होणारी प्राणहानी वाचणे, ताजमध्ये पाहुण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या एका मुलीने रात्रभर टेलिफोन ऑपरेटरचे काम करत हॉटेलमधल्या सर्वांना फोन करून खोलीबाहेर येऊ नका असे सांगणे, स्वतःची ड्युटी नसतानाही काही पोलीसांनी आवर्जून कामात सहभागी होऊन मदत करणं, हल्ल्यांसाठी आरोपपत्र दाखवत असताना पोलिसांच्या स्टाफ मधल्या ९८ लोकांनी ९० दिवस साप्ताहिक सुट्टीही न घेता काम करणं,  खटल्याच्या साक्षीसाठी लांबून आलेल्या काही लोकांनी साक्षीदार म्हणून कायद्याने मिळणारा प्रवास भत्ता ‘हे देशासाठीचं काम आहे’ असं म्हणून तो नाकारणं, विविध जातीधर्माच्या, सामाजिक स्तरावरच्या लोकांनी या तपासाला मदत करणं, या घटना वाचताना भावूकही व्हायला होतं.

एकीकडे हे असताना दुसरीकडे ड्युटी संपवून गेल्यानंतर आपल्याच कार्यक्षेत्रात एवढ्या वादळी घटना घडत असल्याचं कळूनही थेट दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालेला पोलीस अधिकारी, कसाबच्या हातावर गोळी झाडल्याचे श्रेय घेणारा एक पोलिस, हल्ल्यात जखमी झालेला नवरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही  केवळ टीव्हीवर चकण्याच्या इच्छेपायी आपण ‘दोन बोटींमधून अतिरेकी आल्याचं पाहिलं’ हे खोटं सांगणारी स्त्री असे दिव्य नमुनेही महाले यांना अनुभवास आले.

घटनास्थळी योगायोगाने, दुर्दैवाने उपस्थित असणाऱ्यांच्या कहाण्या चटका लावून जाणाऱ्या आहेत. उशिरा पोचल्याने एकाची सीएसटीवरची ट्रेन सुटली.. हा सीएसटी बाहेर पडला आणि बाहेर येऊन टॅक्सीने आणि नातेवाईकांकडे मुक्कामाला निघाला. त्याच सुमारास कसाब आणि त्याच्या साथीदाराने सीएसटीवर गोळीबार सुरु केला. दुर्दैवाने त्याच टॅक्सीमध्ये आधी बसलेल्या कसाबने बॉम्ब ठेवला होता, ज्याचा काहीवेळातच स्फोट झाला . काही वेळापूर्वी कसाबच्या गोळीबारातून वाचलेल्या त्या मनुष्याच्या कसाबच्याच बॉम्बने चिंधड्या उडाल्या. हे वाचताना तर काय व्यक्त व्हावं हेच सुचत नाही. अतिरक्यांनी ताजचा ताबा घेतलेला असतानाही खालच्या मजल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्याची बायको आणि मुलं वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये होती. अतिरेक्यांनी त्या मजल्यावर लावलेल्या आगीमध्ये भाजून त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा काही काळाने त्यांच्या खोलीमध्ये पोलिसांनी प्रवेश केला होता तेव्हा ते तिघेही एकमेकांना बिलगून मृत्युमुखी पडल्याचं पोलिसांना दिसलं, हे वाचून तर माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं...

रमेश महाले यांचं हे पुस्तक फापटपसारा नसणारं, अतिशय नेमकं आणि कुठेही स्वतःची टिमकी न मिरवणारं आहे. शिवाय उपेंद्र लिमयेच्या खर्जातल्या दमदार आवाजात असल्याने ऐकताना खूपच प्रभावी वाटतं. महाले यांनी निवृत्ती नंतर पुस्तक लिहिलेलं असलं तरी उगाच कुणावर टीका नाही, कटू अनुभव खूप आले असले तरी ते जास्त उगाळलेले नाहीत. २६/११ ला ज्या घटना घडल्या त्यांचे वर्णन, त्याची पार्श्वभूमी आणि पुढे झालेला खटला आणि शिक्षा असा याचा span आहे.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं महाले यांनी स्वतंत्र प्रकरण कौतुक केलं आहे.  प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या बेजाबदार वृत्तांकनाचे निवडक नमुने देतानाही महाले यांनी विलक्षण संयमित भाषा वापरली आहे. याशिवाय ऐन तपासादरम्यान उठणाऱ्या अफवांच्या मनस्तापावरही स्वतंत्र प्रकरण आहे. उडत आलेली बातमी कितीही निराधार वाटत असली तिची शहानिशा केल्याशिवाय पोलिसांना पुढे जाता येत नाही याचे पुस्तकातले काही नमुने पोलिसांच्या कामातील आव्हानांची पुरेपूर कल्पना देतात. आपल्या सर्व १०० हून अधिक सहकाऱ्यांना महाले यांनी पुस्तकात नावानिशी श्रेय दिलं आहे हे विशेष..  

नावाप्रमाणेच हे पुस्तक कसाबभोवतीच फिरतं. त्यामुळे कसाबचा इतिहास, कसाब आणि त्याचा जोडीदार यांनी घातलेल्या तांडवाची अतिशय सविस्तर माहित यात आहे, परंतु अन्य आठ जोड्यांनी नक्की काय, कुठे आणि कसं केलं याबद्दलची माहिती मात्र यात नाही, लिओपोल्ड, छबाड हाऊस इथल्या गोळीबाराबद्दल यात माहिती नाही... ती असायलाच हवी होती, असं वाटतं...

२६/११ ने असंख्य प्रश्न निर्माण केले. किंवा आधीपासून असणारे प्रश्न अधोरेखित केले. समुद्री गस्तीमध्ये किती गंभीर चुका आहेत कळलं, हे पोलिसांची स्वसंरक्षण करण्याची यंत्रणा, शस्त्रे किती मागास आहेत हे कळलं.. मुख्य म्हणजे इस्लामिक जिहाद कुठल्या नव्या कार्यपद्धतीनेही किती लेव्हलपर्यंत नुकसान करू शकतो हे आपल्याला त्या दिवशी दिसलं. यातल्या पहिल्या तीन गोष्टींवर उपाययोजनाही झाल्या. पण जिहादी मानसिकततेचं काय करायचं याचं उत्तर आपल्याकडे नाही. दहा अतिरेकी पाकिस्तानातून आले हे ख्ररंच, पण त्यांना प्रशिक्षण देणारा अबू जुंदाल बीडचा होता हे सत्य कसं नजरेआड करणार? देशाची सुरक्षा हा विषय कॉंग्रेस सरकारने कसा पार ऑप्शनला टाकला होता हे कसं विसरणार?

हिंदूंनाच दहशतवादी ठरवण्यासाठी किती मोठी यंत्रणा काम करते आहे, याचा मोठा धडा त्यादिवशी मिळाला. ‘हातात देवीचा धागा बांधून, हिंदू नावांच्या विद्यार्थ्यांची आयकार्ड्स घेऊन हिंदूंवरच आळ येईल अशा प्रकारे आलेले हे अतिरेकी होते’, हे महाले यांनी पुस्तकात आणि नंतर डेव्हिड हेडलीनेही आपल्या साक्षीमध्ये सांगितलं आहे. तुकाराम ओंबळेनी स्वतःच्या पोटात गोळ्या रिचवून नराधम कसाबला पकडलं नसतं तर हिंदूंच्या ताटात काय काय वाढून ठेवलं असतं याची कल्पनाही करवत नाही. सगळं करूनसवरून नामानिराळे राहून हिंदूंना, संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी मोठी लॉबी आजही कार्यरत आहे. कसाबचा आणि पाकिस्तानचा हात उघडपणे असूनही ‘संघाने हल्ला घडवला’ असं धादांत खोटं लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला दिग्विजय सिंह उपस्थित राहतो, तेव्हा दहशतवादाची, जिहादी मानसिकतेची पाळंमुळं कुठवर पोचली आहेत हे आपल्या लक्षात येतं.. बंगाल आणि केरळ पासून ते अगदी कल्याण, उस्मानाबाद पर्यंत वाढत चाललेली जिहादी मानसिकता खणून काढण्याऐवजी आपलेच देशबांधव तिला गोंजारत आहेत ही गोष्ट ‘२६/११’पासून आपण पुरेसं शिकलेलो नाही हेच अधोरेखित करतीये..

मुंबई पोलिसांचं चित्र आज काय आहे ? दिवसरात्र राबून मुंबई पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तत्परतेने २६/११चा तपास केला होता. एवढं कार्यक्षम पोलिस खातं आज वसुलीसाठी, वैयक्तिक सूडासाठी जुंपलं गेलं आहे, पोलिस अधिकारी फरार किंवा गजाआड आहेत, त्यांचा मुकादम असलेला मंत्री न्यायालयीन कोठडीत आहे.. दुर्दैवाने अशा स्थितीत पुन्हा २६/११ सारखं भयंकर काही घडलंच, तर त्याला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता आहे ? तेवढा आत्मविश्वास त्यांच्यात शिल्लक उरलाय?