Total Pageviews

Wednesday, March 3, 2021

राममंदिर निधी संकलन अभियानाचे सखोल नियोजन

राममंदिर निधी संकलनाच्या निमित्ताने संपूर्ण देश रामरंगी रंगून निघाला आहे असं म्हणायला हरकत नाही. समाजाच्या सर्व स्तरांतून हा निधी उभा करण्यासाठी आनंदाने हातभार लावला जातोय. या संबंधीचे विविध अनुभव आपल्याला वर्तनमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमं या दोन्ही ठिकाणी वाचायला बघायला मिळत असतीलच. पण निधीसंकलनाचा एवढा प्रचंड व्याप सांभाळला कसा जातोय याबद्दल अनेकांना कल्पना नसेल. हजारो स्वयंसेवक घरोघर संपर्क करून निधी उभा करत असताना पडद्यामागे एक मोठी यंत्रणा हे नियोजन करत होती. सखोल नियोजनाच्या बळावर ही गोष्ट कशी साध्य झाली हे या लेखामधून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

रोख पैसा ही अतिशय जोखमीची गोष्ट. रामभक्तांनी श्रद्धेने दिलेला निधी सांभाळून ठेवणे आणि त्या पै न् पैचा हिशोब ठेवणे या गोष्टी सुरळीतपणे पार पाडायच्या असतील तर व्यवस्थित नियोजन ही गोष्ट अत्यावश्यक ठरते. 'पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन' हा आग्रह संघकामामध्ये कायम धरला जातो. त्यालाच अनुसरून प्रत्यक्ष अभियान सुरु होण्याच्या खूप आधीपासून आर्थिक बाजूचे नियोजन सुरु झाले होते. सर्वसाधारणपणे संघाच्या रचनेतून कोणतेही व्यापक संपर्क अभियान अथवा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होतं तेव्हा प्रांतापासून पासून ते वस्तीपर्यंत योजना केली केली जाते. संघदृष्ट्या 'नगर' हे कार्यक्षेत्र अतिशय महत्वाचं असतं. शहरी भागामध्ये साधारणपणे चार वॉर्ड मिळून होईल एवढा परिसर 'नगर'. माझ्या भवतालच्या कार्यक्षेत्राच्या रचनेबद्दल बोलायचं तर चार नगरं मिळून एक गट आणि असे पाच गट मिळून पिंपरी-चिंचवड जिल्हा (संघकार्याच्या दृष्टीने) अशी रचना आहे.

अभियानासाठी या जिल्हा ते वस्ती या प्रत्येक स्तरावर विशेष नियुक्त्या केल्या गेल्या. 'अभियान प्रमुख आणि सहअभियानप्रमुखाने घरोघर संपर्काची रचना लावणे आणि हिशोब प्रमुखाने अभियानासाठी हिशोबाच्या बारकाव्यांमध्ये लक्ष घालणे आणि त्यासाठीची पूर्वतयारी करणे अशी कामाची ढोबळमानाने विभागणी होती. माझ्याकडे आकुर्डी नगराचा हिशोब प्रमुख हे दायित्व होतं. हिशोब प्रमुख या नात्याने सर्व वस्तीप्रमुखांना कूपनपुस्तक आणि पावतीपुस्तक यांचे रोजच्या रोज वाटप करणे आणि त्याची तपशिलाने नोंद ठेवणे आवश्यक असे. प्रत्येक पुस्तकावर आणि पुस्तकातल्या प्रत्येक पावती/कूपनवर अनुक्रमांक असे. एकूण निधी संकलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारी पुस्तकांची मागणी आणि केंद्रीय स्तरावरून होत जाणारा पुरवठा यांचा ताळमेळ ठेवणे ही एक तारेवरची कसरतच होती. या पुस्तकांची छपाई केंद्रीय स्तरावर फक्त एकाच ठिकाणी होत असल्याने तिथून अगदी पार नगरापर्यंत टप्प्याटप्प्याने वितरण होईपर्यंत काळजी बाळगणे आणि संयम ठेवणेही आवश्यक असे.

रोज संपर्क होणाऱ्या घरांच्या संख्येचे उद्दिष्ट मोठे असल्याने रोज निधीही मोठ्या प्रमाणावर जमा होत असे. त्या निधीचा भरणा करण्यासाठी प्रत्येक वस्तीसाठी एक अथवा दोन वस्त्यांचा मिळून एक 'जमाकर्ता' (Depositor) नियुक्त केला गेला होता. रोज प्रत्येक उपवस्तीमध्ये घरोघर संपर्क करत फिरणाऱ्या प्रत्येक जोडीमध्ये एक जण अभियानाची माहिती देणारा तर दुसरा जण निधी घेणारा म्हणजेच 'संग्रहकर्ता' असे. प्रत्येक संग्रहकर्ता दिवसभरात जमा झालेला निधी आपल्या वस्ती अभियान प्रमुखाकडे जमा करत असे आणि वस्ती अभियान प्रमुख व त्या वस्तीचा जमाकर्ता रोज रात्री एकत्र भेटून त्या दिवसाचा हिशोब पूर्ण करत. दर दिवशी जमा झालेला निधी दुसऱ्या दिवशी भरण्याची जबाबदारी जमाकर्त्याची असे.

निधी देणाऱ्या व्यक्तीला तेवढ्या रकमेचे कूपन अथवा पावती दिली जाई. दिली गेलेली रोख रक्कम १० ते २००० रुपयांदरम्यान असेल तर त्या बदल्यात देणगीदाराला १०, १०० किंवा १००० रुपयांचे कूपन त्याच्या किमतीच्या योग्य त्या पटींमध्ये दिले जाई. २००१ पासून वरच्या रकमेसाठी रोख अथवा धनादेश स्वरूपात रक्कम देण्याची मुभा होती. परंतु करामध्ये 80Gची सवलत हवी असल्यास मात्र धनादेश देणे आवश्यक होते. अभियानप्रमुखाकडे निधी जमा करताना प्रत्येक संग्रहकर्त्याने एक प्रपत्रक (फॉर्म) भरून देणे अपेक्षित होते. या प्रपत्रकात संबंधित संग्राहकर्त्याने त्या दिवशी ज्या पुस्तकातून कूपन अथवा पावती दिली गेली त्या पुस्तकाचा क्रमांक, १०, १०० आणि १०००ची प्रत्येकी किती कूपन्स दिली गेली, चेक घेतला असल्यास त्या चेकचा क्रमांक, बँक इत्यादी तपशील प्रत्येक संग्रहकर्त्याने वस्ती अभियानप्रमुखाकडे जमा केल्यास तो वस्ती अभियानप्रमुख आणि जमाकर्त्याला दिवसाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ करणे सोपे होई. निधीचा हिशोब करताना बऱ्याच गोष्टींचे व्यवधान ठेवणे गरजेचे असे. त्यासाठी जमाकर्त्याच्या मदतीला होते एक महत्वाचे साधन : एक विशेष मोबाईल ॲप! संपूर्ण अभियानाच्या हिशोब नियोजनातील ही अतिशयउल्लेखनीय गोष्ट होती.

अभियानाची सुरुवात होण्याआधीच प्रत्येक जमाकर्त्यासाठी एक विशेष क्रमांक (ID) तयार केला गेला. ॲपमध्ये रोज त्या त्या वस्तीतील एकूण कूपन्स, पावत्या व धनादेश यांच्या तपशिलांची नोंद जमाकर्ता करत असे. तशी नोंद करण्यापूर्वी संबंधित पावती पुस्तक/ कूपन पुस्तकाची नोंदणी ॲपमध्ये स्वतःच्या नावावर करणे अनिवार्य असे. रात्री ॲपमध्ये नोंद करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जमकर्ता धनादेश व रोख रक्कम यांचा बँकेत भरणा करत असे.

बँकेत पैसे भरणे सुलभ व्हावे यासाठी काही गोष्टी केंद्रीय स्तरावरून केल्या गेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या तीन बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या नावाने खाते उघडण्यात आले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तिन्ही बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या खात्यासाठी विशेष भरणा पावती (deposit slip) होती. त्यामुळे जमाकर्त्याला रोज बँक खाते क्रमांक त्या पावतीवर लिहिण्याची आवश्यकता राहिली नाही. फक्त रोज भरणा करताना त्या पावतीवर जमाकर्ता क्रमांक लिहिणे आवश्यक होते, जेणेकरून अभियान चालू असताना प्रत्येक जमाकर्त्याने केलेला ॲपमध्ये भरलेली माहिती आणि त्या प्रत्येक जमाकर्त्याने बँकेत केलेला एकूण भरणा यांचा अभियानसमाप्तीनंतर ताळमेळ व्हायला मदत व्हावी. ज्या ज्या जमाकर्त्याने ॲपमध्ये नियमितपणे आणि अचूक माहिती भरली त्याला अभियानसमाप्तीनंतर हिशोब पूर्ण करणे सोपेही गेले आणि त्यामध्ये जास्त वेळही गेला नाही. ॲपमध्ये असणाऱ्या update now या बटणावर क्लिक केले की भरलेली माहिती मुख्य सर्व्हरवर अद्ययावत व्हायची. बँकेत भरलेली रक्कम आणि ॲपमध्ये भरलेली माहिती यात तफावत असेल तर ॲपमध्ये तशी नोंद दिसायची. त्याचप्रमाणे भरलेल्या धनादेशाचे तपशील आणि धनादेश वटला की नाही याबाबतची सद्यस्थितीची त्यामध्ये दिसायची. त्यामुळे जमाकर्त्याला आपल्या कामाचा सारांश आणि तपशील हे दोन्ही या ॲपमध्ये पाहता आले. अभियान संपल्यानंतर सर्व जमाकर्त्यांची एकूण भरणा झालेली रक्कम आणि त्यांनी वापरलेली एकूण कूपन्स यांचा ताळमेळ करून हिशोब पूर्ण करण्यात आला. ॲपमध्ये भरलेल्या माहितीवर लक्ष ठेवता यावे यासाठी गट व जिल्हा हिशोब प्रमुखांना एका विशेष वेबसाईटचा ऍक्सेस देण्यात आला होता. त्यांच्याकडून जमाकर्त्यांना नियमितपणे होणाऱ्या पाठपुरावा होत राहिला तसेच कुठलीही शंका असल्यास त्याबाबाबत लगेच माहिती पुरवली जाई. जमाकर्त्याला काही तांत्रिक अडचण आल्यास  कॉल सेंटर हेल्पलाईनवर मदतही उपलब्ध करून दिली गेली होती. अशा प्रकारे ॲप मदतीला असल्याने कूपनपुस्तक/पावतीपुस्तक कुणाच्या नावावर आहे हे शोधून काढणे गट व जिल्हा कार्यकर्त्यांनाही शक्य झाले. या सर्व कामामध्ये बँकांकडूनही उत्तम प्रकारे सहकार्य मिळाले. म्हणूनच अभियान संपल्यावर बँकेमध्ये कर्मचारी व व्यवस्थापक यांची भेट आवर्जून घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

एकूणच अभियानाच्या उत्साहाला हिशोबाच्या नियोजनाची जोड मिळाल्याने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसोबतच विश्व हिंदू परिषद, अखिल भरतीत विद्यार्थी परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय स्त्री शक्ती इ. समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही महत्वाचं योगदान दिल्याने अभियान यशस्वीपणे पार पडण्यास मोठीच मदत झाली. अधिकाधिक घरांपर्यंत श्रीराम मंदिर हा विषय पोचवणं आणि या निमित्ताने संपर्कात येणाऱ्या अनुकूल व्यक्तींना संघकार्याशी जोडून घेणं, पूर्वी संघ अथवा समविचारी संस्थांचे कार्य केलेले आहे परंतु सध्या कार्यरत नाहीत अशा जुन्या कार्यकर्त्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणं हे या अभियानाचे महत्वाचे उद्देश होते. त्या दृष्टीनेही हे अभियान नक्कीच यशस्वी ठरलं आहे हे निश्चित.

 (मार्च महिन्याच्या 'हिंदूबोध' मासिकात प्रकाशित लेख)

No comments:

Post a Comment