Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'निर्मिती : दो आँखें बारह हाथ' : एक 'क्लासिक' बनताना



चांगला दिग्दर्शक कला आणि तंत्र या दोन्ही गोष्टींवर हुकूमत असणारा असतो. मूल्यशिक्षण देण्याची जबादारी चित्रपटांनी घ्यावी का नाही हा नेहमी वादाचा मुद्दा असतो. पण कला आणि तंत्र या दोन्ही गोष्टींना मानवी मूल्यांचीही प्रभावी जोड दिली तर चित्रपट कालातील होतो यात शंका नाही. व्ही. शांताराम हे तंत्र, कला आणि मानवी मूल्यं या तिन्हींची प्रभावी गुंफण करणारे दिग्दर्शक होते . म्हणूनच त्यांची  गणना भारतीय चित्रपट इतिहासातल्या महान दिग्दर्शकांमध्ये होते.

कुंकू, माणूस, शेजारी, डॉ. कोटणीस की अमर कहानी आदि चित्रपटांमधून बंधुता, सहृदयता आदि मूल्यं आणि सामाजिक प्रश्न यांची अनोखी सांगड घालून व्ही. शांताराम यांनी आदर्श उदाहरणं घालून दिली. विश्राम बेडेकर, ग.दि. माडगूळकर अशा एकाहून एक सरस पटकथाकारांनी त्यांच्या चित्रपटांचा पाया रचला आणि शांतारामबापूंनी त्यावर उत्तमोत्तम वस्तू उभ्या केल्या.

ज्या चित्रपटाने पुढे इतिहास घडवला, राष्ट्रीय पुरस्कारासोबतच जो बर्लिन चित्रपट महोत्सव आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्येही गौरवला गेला त्या व्ही.शांताराम दिग्दर्शित 'दो आँखें बारह हाथ' चित्रपटाची निर्मितीकथा तपशीलवार सांगतं.  भालजी पेंढारकरांचे सुपुत्र, फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितीपटांचे दिग्दर्शक, रारंगढांग सारख्या 'सिनेमॅटिक' कादंबरीचे लेखक प्रभाकर पेंढारकर यांनी 'दो आँखें बारह हाथ' चित्रपटाचा प्रवास पटकथेपासून ते शेवटच्या स्क्रिनिंग 'याची देही ...' अनुभवला. त्यांच्याच शब्दात हे पुस्तक आकार घेतं.


'दो आँखें बारह हाथ' हा चित्रपट १९५७ सालचा. स्वातंत्र्य मिळून दहा वर्षे लोटली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या पाठीमागे प्रेरणा म्हणून उभी असलेली मूल्यं, त्यावेळचा रोमँटिसिझम या गोष्टी काहीशा विरळ व्हायला सुरुवात झाली होती. अशा काळामध्येही सहृदयता, चांगुलपणावरचा विश्वास यांचा शांताराम बापूंवरचा प्रभाग अभंग होता. परिस्थितीने माणूस वाईट बनत असला तरी विश्वासाची फुंकर त्यावर घातली तर त्याच्यावरची राख दूर होऊन आतमधल्या चांगुलपणाला साद घालता येऊ शकते आणि पुन्हा त्याला सन्मानाने 'माणूस' बनाययला मदत होऊ शकते अशा संकल्पनेवर आधारित चित्रपटाची जुळवाजुळव करायला सुरुवात त्यांनी केली. एका जेलरने खरोखरच एकट्यानेच कैद्यांसोबत राहून त्यांना सुधारण्यास मदत केल्याचा अनोखा प्रयोग स्वतंत्र भारतात घडला होता. त्या घटनेचा अभ्यास करून त्यात चित्रपटाला उपयुक्त ठरेल असे बदल करून गदिमांनी पटकथा लिहून काढली होती व ती शांतारामबापूंच्या 'राजकमल' स्टुडिओमध्ये पोचली होती. प्रभाकर पेंढारकर तेव्हा स्टुडिओमध्ये अगदीच नवखे होते. पण त्यांचे अक्षर चांगले असल्यामुळे बापूंनी अनपेक्षितपणे त्यांना पटकथेची 'फेअर कॉपी' लिहून काढायला सांगितली आणि पेंढारकरांचा चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत चंचुप्रवेश झाला.

या तपशिलांनी सुरु होणाऱ्या पुस्तकात मग हळूहळू स्टुडिओमधले चित्रीकरण, आऊटडोअर चित्रणासाठी कोल्हापूरकडे प्रस्थान, तिथल्या चित्रीकरणाचे तपशील देतदेत मग पेंढारकर एकेक रंग भरत जातात. चित्रपटातल्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व प्रसंगातले संवाद या पुस्तकात आहेत. तसेच काही महत्वाच्या प्रसंगातले कॅमेरा angles, ते तसे घेण्यामागचा शांतारामबापूंचा विचार हेही उलगडून सांगितले आहे. पटकथेत असणाऱ्या दोनच ओळी शांतारामबापूंनी आपल्या दृष्टीने आणि कला-दिग्दर्शकाच्या सहाय्याने कशा फुलवल्या हे वाचणं खूप रंजक आहे.


निर्मितीकथा सांगता सांगता पेंढारकर शांतारामबापूंचे अनेक पैलू उलगडत जातात. चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया उमटू न देणारे पण सगळीकडे अत्यंत बारीक लक्ष असणारे, अत्यंत नीटनेटके, शिस्तबद्ध, आदल्या दिवशी चित्रीकरणाला कितीही वेळ झाला तरीही दुसऱ्या दिवशी तितकेच फ्रेश असणारे असे शांतारामबापू ..... त्यांच्यातला दिग्दर्शक कायम जागा असे. या सजगतेची प्रचिती देणारा - अनपेक्षित पावसात प्रसंगावधान राखून गाण्याचे चित्रीकरण करण्याचा प्रसंग तर पेंढारकरांनी फारच बहारदार पद्धतीने शब्दबद्ध केला आहे.

शांतारामबापू तंत्राच्या बाबतीत कायमच काळाच्या पुढे होते १९४६ सालीच त्यांनी सैरंध्री हा बोलपट रंगीत चित्रित केला होता. त्या काळात रंगीत फिल्म डेव्हलपमेंटचे तंत्र  भारतात उपलब्ध नसताना त्यांनी इंग्लंडला जाऊन ते काम करून घेतले होते.  १९५७ सालापर्यंत हळूहळू रंगीत चित्रपट यायला सुरुवात झाली होती. खुद्द बापूंचाच 'झनक झनक पायल बाजे' हा रंगीत चित्रपट येऊन गेला होता. तरीही त्यांनी रंगांच्या मोहात न पडता 'दो आँखे ...' कृष्णधवलच चित्रित का केला ? त्याचेही उत्तर या पुस्तकात आहे, आणि त्यांनी ते तसे केले कारण त्यांना तंत्राची अचूक जाण होती. या चित्रपटासाठी अत्याधुनिक कॅमेरा वापरण्यामागचा आग्रह, त्यामागचा अभ्यास, त्यात चित्रीकरणाला अनुकूल असे बदल करण्याची गरज ओळखणे या बद्दलचे पुस्तकातले तपशील अभ्यासूंनी वाचलेच पाहिजेत असे आहेत. अशा गोष्टींचे documentation होणे हे अनन्यसाधारण महत्वाचे असते. प्रभाकर पेंढारकरांनी हे सगळे पुस्तकात टिपून ठेवल्यामुळे या पुस्तकाला संदर्भग्रंथांचे मूल्य प्राप्त झाले आहे.

हे पुस्तक आणखी एका कारणाने महत्वाचे आहे. या पुस्तकातून केवळ 'दो आँखें .. ' चीच माहिती मिळते असे नाही तर एकूणच सीन आणि शॉट मधला फरक काय, शॉट डिव्हिजन कसे असते, पार्श्वसंगीताची भूमिका काय असते, ध्वनिमुद्रक किती मेहनत घेतो, असतं पटकथा कुठे संपते आणि दिग्दर्शक कुठे सुरु होतो याबद्दल खूपच छान माहिती यामध्ये आलेली असल्याने सर्वसामान्य वाचकांना 'फ़िल्ममेकिंग' ची तोंडओळख यातून नक्कीच होऊ शकते.

या सर्व दृष्टीने पुस्तक महत्वाचं आहेच, पण ते सगळं लक्षात येतं ते हे पुस्तक वाचल्यानंतर.... मला हे पुस्तक 'अक्षरधारा'मध्ये पाहताक्षणीच घ्यावंसं वाटलं त्याचं कारण म्हणजे याची मांडणी ! पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच बाळ ठाकूर यांची अप्रतिम स्केचेस सुरु होतात आणि ती शेवटच्या पानापर्यंत आपल्याला सोबत करतात... व्ही शांताराम, गदिमा, वसंत देसाई यांच्या रेखाचित्रांपासून ते चित्रपटातल्या  प्रसंगांच्या इलस्ट्रेशन्स पर्यंत एकाहून एक सरस स्केचेसमुळे अगदी समृद्ध झालंय पुस्तक. इतकं, की ते विकत घेऊन न वाचता आपल्या बुक-शेल्फमध्ये ठेवलं तरी बुकशेल्फची श्रीमंती द्विगुणित होईल ! सोबत चित्रीकरणाच्या वेळी घेतलेली उत्तम स्थिरचित्रे (Stills) देखील आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या अशा स्थिरचित्रांची संख्या कमी असल्यामुळे की काय कुणास ठाऊक पण पुस्तकामध्ये चित्रपटातल्या दृश्यांची (बहुदा स्क्रीनचे फोटो घेऊन  वापरलेली) भर घालण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या पानांवर ही कमी resolution ची छायाचित्रे छापल्यामुळे ती अस्पष्ट दिसतात, एवढी एकमेव त्रुटी या पुस्तकात जाणवते. ती वगळता संपूर्ण पुस्तक म्हणजे 'कलेक्टर्स आयटम' झाले आहे हे निःसंशय झाली आहेत. एवढी एकमेव त्रुटी या पुस्तकात जाणवते. ती वगळता संपूर्ण पुस्तक म्हणजे 'कलेक्टर्स आयटम' झाले आहे हे निःसंशय !!


निर्मिती : दो आँखें बारह हाथ'

लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक: मौज प्रकाशन

पहिली आवृत्ती (२०१३)

पृष्ठे : १३५ , किंमत २५०

No comments:

Post a Comment